Tuesday, February 4, 2014

किमान तापमान सरासरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भाचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. विदर्भात किमान तापमान सरासरीहून दोन ते चार अंशांनी घसरलेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी सकाळपर्यंत (ता. 6) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा व कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल न होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी (ता. 4) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीहून किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. जळगाव येथे राज्यातील नीचांकी 10.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

ंमंगळवारी (ता. 4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान व कंसात सरासरीहून झालेली वाढ किंवा घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.1 (2), अलिबाग 19.8 (2), रत्नागिरी 19.5, हर्णे 23 (2), पणजी 20.5 (0), डहाणू 19.5 (2), भिरा 18.5 (4), पुणे 12.4 (1), नगर 11.7 (-1), जळगाव 10.7 (-2), कोल्हापूर 18.5 (3), महाबळेश्‍वर 15.2 (1), मालेगाव 14.2 (3), नाशिक 11.6 (1), सांगली 16.4 (1), सातारा 14 (1), सोलापूर 16.7, उस्मानाबाद 14.3, औरंगाबाद 14 (1), परभणी 12.9 (-3), नांदेड 11 (-3), अकोला 13.8 (-1), अमरावती 15.6, बुलडाणा 15.4 (-1), ब्रम्हपुरी 15 (0), चंद्रपूर 15 (-1), गोंदिया 11.4, नागपूर 13.3 (-1), वाशिम 17.6, वर्धा 14.4 (-1), यवतमाळ 12.6 (-4).
- - - -

कृषी अधीक्षक, सेवक, लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर

969 उमेदवारांची निवड; माजी सैनिकांअभावी 101 पदे रिक्त

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागामार्फत नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यासाठीच्या 1070 रिक्त पदांच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यापैकी 969 पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून, उमेदवारांअभावी माजी सैनिकांची 101 पदे रिक्त राहिली आहेत. कृषी विभागाच्या संकेतस्थळावर वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची विभाग व प्रवर्गनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 5 जून 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन 23 नोव्हेंबर 2013 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

- हे आहेत "टॉपर'
कृषी सेवक ः भूषण दिलीप वाघ, औरंगाबाद व मुकेश भाईदास सोनवणे, नाशिक (प्रत्येकी 186 गुण)
सहायक अधीक्षक ः वर्षा रमेश चौधरी, नाशिक (186 गुण)
वरिष्ठ लिपिक ः प्रवीण राजधर चौधरी, मंदार नारायण म्हाडेश्‍वर, ठाणे (186 गुण)
कनिष्ठ लिपिक ः मनोज दगडू पाटील, नागपूर (191 गुण)

आठ दहा दिवसांत "ऑर्डर'
निवड झालेल्या उमेदवारांनी पदासाठी अर्ज करताना सादर केलेली माहिती व त्याबाबतची मूळ कागदपत्रे तपासून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र (ऑर्डर) देण्यात येणार आहे. संबंधित विभागीय कार्यालयामार्फत येत्या आठ दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. हे पत्र हाती पडल्यानंतर तत्काळ किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होता येईल.

...तर निवड रद्द
कृषी विभागाने जाहीर केलेली निवड यादी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीच्या आधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार पुढील आठ दिवसात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून नियुक्तीपूर्वी आवश्‍यक मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीत उमेदवार पात्र असल्यास नियुक्ती देण्यात येईल. पडताळणीत चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

101 पद भरती "वेटिंग लिस्ट'मधून
या भरती प्रक्रियेत माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेली कृषी सेवकांची 93 व कनिष्ठ लिपिकांची आठ पदे याच परीक्षेतील उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतून भरण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. यासाठी जिल्हा सैनिक बोर्डाची परवानगी घेण्यात येणार आहे. बोर्डाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर संबंधित प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे रिक्त पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.
------------
सर्वाधिक रिक्त पदे विदर्भात
माजी सैनिक उमेदवारांअभावी सर्वाधिक 66 पदे विदर्भात रिक्त राहिली आहेत. कृषी सहायकांची नागपूर विभागात 40 अमरावती विभागात 20, नाशिकमध्ये 12, ठाण्यात 10, पुणे विभागात 6, तर औरंगाबादमध्ये 5 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक संवर्गातील नागपूरमध्ये सहा तर कोल्हापूर व ठाण्यात प्रत्येकी एक पद रिक्त राहिले आहे.
------------
विभागनिहाय निवड पुढीलप्रमाणे
कृषी सेवक (एकूण 763) ः नागपूर 247, अमरावती 150, नाशिक 115, औरंगाबाद 75, पुणे 89, ठाणे 87
लिपिक (एकूण 149) ः नागपूर 62, ठाणे 36, नाशिक 17, कोल्हापूर 15, आयुक्तालय 15, पुणे 4
वरिष्ठ लिपिक (एकूण 39) ः नाशिक 14, नागपूर 8, पुणे 5, ठाणे 5, कोल्हापूर 4, लातूर 3
सहायक अधीक्षक (एकूण 12) ः नाशिक 3, ठाणे 3, कोल्हापूर 2, नागपूर 2, लातूर 1, पुणे 1
------------(समाप्त)--------------

कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद तीन महिन्यांपासून रिक्त

सात महिन्यांपासून बैठकच नाही; कामकाजावर विपरीत परिणाम

पुणे (प्रतिनिधी) ः मंत्रिपदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (कृषी परिषद) उपाध्यक्षपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून अद्याप नवीन नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेले नाही. उपाध्यक्षांअभावी कृषी परिषदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

राज्याचे कृषिमंत्री हे कृषी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र कृषिमंत्र्यांना व्यस्त कामकाजातून पुरेसा वेळ देणे शक्‍य होत नसल्याने चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय साधून कामकाजास गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी उपाध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा, वाहन, वाहनचालक, लेखनिक, शिपाई आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र सध्या उपाध्यक्षांची खुर्ची रिकामी असल्याने अनेक महत्त्वाच्या बाबींना खीळ बसल्यासारखी स्थिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी परिषदेची यापूर्वीची बैठक मे 2013 मध्ये शिर्डी (नगर) येथे झाली. यानंतर अद्याप परिषदेची बैठक होऊ शकलेली नाही. विद्यापीठांच्या संचालकांच्या एकत्रित शिक्षण, विस्तार व संशोधन विषयक आढावा बैठका, कुलसचिव, अभियंते, वित्त अधिकारी यांच्या समन्वय बैठका सध्या बंद आहेत. शासनाकडे प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे, विद्यापीठांना निधी मिळवून देण्याचा व मिळालेला निधी वेळेत खर्च करण्याचा पाठपुरावा करण्याची कामे सध्या बंद आहेत. विद्यापीठांची प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदी रिक्त पदभरती प्रक्रियाही थंडावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने राज्यात येत्या महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या पदावरील नियुक्ती साठी पुढील दोन-तीन आठवड्यांचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या पदावर नियुक्ती करता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर उपाध्यक्ष निवडीस विलंब झाल्यास त्याचा विपरीत परिणाम कृषी परिषदेच्या कामकाजावर होण्याचा धोका आहे.

चौकट
- कोणीही होऊ शकतो उपाध्यक्ष !
माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे आहे. पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना नावाची शिफारस केली जाईल व त्यानंतर मुख्यमंत्री उपाध्यक्ष नेमणुकीचा आदेश जारी करतील. उपाध्यक्षपदाच्या पात्रतेसाठी वेगळे निकष नाहीत. सर्वसाधारणपणे शेती व संलग्न क्षेत्रातील व्यक्तीची या पदी निवड केली जाते. राज्यातील प्रगत शेतकरी किंवा इतर कोणीही व्यक्ती उपाध्यक्ष होऊ शकते.

चौकट
- सुरेश वरपुडकर, सोपान कांचन चर्चेत
उपाध्यक्षपदासाठी सध्या माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष सोपान कांचन, माजी पाटबंधारे मंत्री अजित घोरपडे व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यातही वरपुडकर किंवा कांचन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------

Sunday, February 2, 2014

डॉ. सुभाष पुरी - शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणुकीवर शासनाला भर द्यावा लागेल

जळगावचे भरताचे वांगे कानपूरला पाठवले तर कुणी घेणार नाही, पण पश्‍चिम बंगालला पाठविले तर चांगले पैसे मिळतील, ही बाजार साक्षरता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणूक अत्यल्प आहे यावर शासनाने भविष्यात अधिक भर द्यावा लागेल, असे मत डॉ. सुभाष पुरी व्यक्त करतात. इंफाळ येथील ईशान्येकडील सात राज्यांसाठीच्या एकमेव केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गेली नऊ वर्षे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबद्दल "आयसीएआर'मार्फत त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर देशातील कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार याबाबत त्यांची ही विशेष मुलाखत...

- देशातील कृषी शिक्षणाची सद्यःस्थिती काय आहे?
देशात 712 बिगर कृषी विद्यापीठे आहेत. त्यातून लाखो पदवीधर दर वर्षी तयार होतात. तुलनेत देशातील सर्व कृषी विद्यापीठांमधून फक्त 30 हजार कृषी व संलग्न विषयांचे पदवीधर तयार होतात. बिगरकृषीच्या तुलनेत कृषीचे प्रमाण अवघे 0.5 ते एक टक्का आहे. यातील प्रत्यक्ष शेतावर जाणारे फारच अत्यल्प आहेत. देशाची 120 कोटी लोकसंख्या, त्यातील 60 ते 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र त्या तुलनेत कृषी शिक्षणाचे प्रमाण व्यस्त आहे. मुळात कृषी शिक्षण हे नोकरीसाठी नाहीच ते व्यवसाय शिक्षण आहे. पदवीधरांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा अशी अपेक्षा आहे. मात्र आज कृषी शिक्षणाबाबत मोठी दुरवस्था आहे. विद्यार्थ्यांना शेतीची आवड, आकर्षण नाही. यासाठी केंद्र सरकारनेच देशभर प्राथमिक शिक्षणात कृषी अभ्यासक्रम सक्तीचा करण्याची गरज आहे.

- कृषी पदवीधर, शेतकरी आणि शेती यातील संबंधांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता?
आज बहुसंख्य कृषी पदवीधर प्रत्यक्ष शेतीत जाऊ इच्छित नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांनाही शेती नको वाटते. नोकरीसाठी प्रसंगी शेती विकण्याचीही त्यांची तयारी आहे. शेतीत आहेत ते सुद्धा बाहेर पडू इच्छितात. दोन चार एकर शेती असलेले लोक शिपाई व्हायला तयार आहेत, पण शेती नको म्हणतात. हे का... तर शेतीत अंगमेहनत खूप करावी लागते. त्याचा खूप त्रास होतो. मजूर कठीण काम नको म्हणतात. खेड्यातून शहरांकडे ओढा वाढला आहे. खेड्यातील व शहरातील राहणीमान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिक्षण, आरोग्य व इतर सोयी सवलती शहरात आहेत तशाच गावात मिळाल्या तर शेतकरी गावात थांबतील. खेड्यात पैसा असूनही काहीच करता येत नाही, हा मोठा प्रश्‍न आहे. सरकारला यात खूप काम करावे लागेल. सर्व पिके सर्व ठिकाणी घेण्याचा अट्टहासही सोडावा लागेल. पारंपरिक पद्धत बदलावी लागेल. स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी आवश्‍यक पिके सर्वांत आधी आणि त्यानंतर इतर पिकांचा विचार करावा लागेल. निर्यातीसाठी ऑर्किड लावायचे आणि कांदा आयात करायचा अशी पद्धत योग्य नाही.

- संशोधनाच्या पातळीवर सध्या काय त्रुटी आहेत. त्याबाबत कोणती दिशा अपेक्षित आहे?
शेतीतील अंगमेहनत कमी करणारे यांत्रिकीकरण आपल्याकडे फारसे प्रगत नाही, ही मोठी समस्या आहे. शेतीचे 70 टक्के काम महिला करतात. सातत्याने काबाडकष्ट उपसून शेतकरी महिलांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टी वापरून मोठे कष्ट वाचवता येते. यांत्रिकीकरण म्हटले, की आपले लोक भव्य दिव्य असे चित्र उभे करतात. शेतीत सर्वप्रथम अल्पभूधारक शेतकरीकेंद्रित अंगमेहनत कमी करणारे यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. हाताळण्यास छोटी यंत्रे अधिकाधिक विकसित व्हायला हवीत. यंत्रांसाठी पेट्रोलियम इंधनाला पर्याय दिले पाहिजेत. एकूणच कृषी अभियांत्रिकीत आमूलाग्र बदल करावा लागेल. प्रत्येक शेतकरी वापरू शकेल व त्याचे जगणे सोपे होईल, असे तंत्रज्ञान आवश्‍यक आहे. कमी पाणी व इतर ताण सहन करून चांगले उत्पादन देतील अशा वाणांची प्रकर्षाने आवश्‍यकता आहे.

- भविष्याच्या दृष्टीने शेती क्षेत्रात कोणती बाब महत्त्वाची ठरेल?
पुढच्या काळात पाणी हाच सर्वांत महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. पावसाच्या पाण्याचे जतन आणि जमा झालेल्या पाण्याचा नियंत्रित वापर या दोन गोष्टी शेती आणि शेतकऱ्यांचे यश ठरवतील. त्यामुळे याच गोष्टीवर सर्वाधिक लक्ष देण्याची आणि संशोधन करण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतावरच पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाला पाहिजे. महाराष्ट्रात पडणारा पाऊस कमी नाही. योग्य नियोजन व काटेकोर अंमलबजावणी केली तर जलस्वयंपूर्ण होणे शक्‍य आहे.

- शेतीमाल मार्केटिंग व प्रक्रिया यात काय सुधारणा आवश्‍यक आहेत?
देशभरातील शेतकरी उत्पादन कसे घ्यायचे यात तज्ज्ञ आहेत. या उत्पादनापासून अधिकाधिक पैसा कसा मिळवायचा, त्यासाठी मार्केटिंग कसे करायचे, कोणत्या बाजारात कशा प्रकारे चांगला भाव मिळेल, ही इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. जळगावचे भरताचे वांगे कानपूरला पाठवले तर कुणी घेणार नाही, पण पश्‍चिम बंगालला पाठविले तर चांगले पैसे मिळतील, ही बाजार साक्षरता शेतकऱ्यांमध्ये झाली पाहिजे. कच्चा माल व प्रक्रिया यात फार मोठे अंतर आहे. शेतकऱ्याच्या शेतावर स्वच्छ धुणे, प्रतवारी यांसारखी प्राथमिक प्रक्रिया केली तरी चांगल्या प्रकारे मूल्यवर्धन होऊ शकते. सध्या काही ठराविक पद्धतीच्या प्रक्रिया सुरू आहेत. प्रक्रिया करताना उप उत्पादनांकडेही कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना प्रक्रियेत पैसा मिळाला पाहिजे, तसे झाले तर या तंत्रज्ञानाचा प्रसारही वेगाने होईल.

- कृषी विस्ताराच्या सद्यःस्थितीबाबत आपले मत काय?
कृषी विस्तारामध्ये फार मोठा गॅप आहे. संशोधन संस्था, विद्यापीठांमध्ये होणारे फारच थोडे संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचतोय.. हे संशोधन शेतात नेण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागाची आहे. नेमके हेच लोक ही जबाबदारी झटकत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) स्थापन करण्यात येत आहे. चांगल्या संशोधनाची प्रात्यक्षिके लोकांना दाखवणे, संशोधनाची पडताळणी करून त्याचे प्रमोशन करणे हा "केव्हीकें'चा उद्देश आहे. याउलट आता कृषी विस्ताराचे सर्वच काम "केव्हीके'ने करावे, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यात मूळ उद्देश बाजूला राहून चुकीचा पायंडा पडतोय. केव्हीके हे फार्म सायन्स सेंटर आहे, ते फार्म एक्‍सटेन्शन सेंटर नाही. "केव्हीकें'ना त्यांचे काम करू द्यावे व शासनाच्या संबंधित विभागांनी आपली मुख्य जबाबदारी पार पाडावी. आज अनेक खासगी कंपन्या स्वतःचे संशोधन, उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी अत्यंत प्रभावी विस्तार यंत्रणा उभारत आहेत. या तुलनेत शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसते. आज शेतकऱ्यांपर्यंत विविध मार्गांनी भरमसाट माहिती पोचत असल्याने शेतकरी अनेकदा भांबावून जातोय. ही परिस्थिती बदलली पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम शेतीवर होतील.

- गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात कोणते बदल झाले, भविष्यात कोणते बदल अपेक्षित आहेत?
देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने गेली दहा वर्षे अतिशय महत्त्वाची ठरली आहेत. या दहा वर्षात शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा 80-85 हजार कोटी रुपयांवरून सहा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला, शेतकऱ्यांच्या अडचणीत सापडले त्या त्या ठिकाणी कर्जमाफीचे धोरण अवलंबिण्यात आले आणि पीककर्जाचा व्याजदर 11 टक्‍क्‍यांवरून चार टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला. वेळेत भरणा केल्यास शून्य टक्के व्याजदर हे तीन अतिशय मोठे बदल झाले. या काळात उत्पादन खर्च वाढला असला तरी त्या प्रमाणात हमीभावातही भरीव वाढ झाली. त्याचा मोठा फायदा शेती व शेतकऱ्यांना झाला. परिणामी, अन्नधान्य उत्पादनात आपण सलग तीन वर्षे विक्रमी कामगिरी केली आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाचे हे यश आहे. मात्र अद्यापही काही बाबींवर चांगले काम होणे आवश्‍यक आहे. विशेषतः नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीचा योग्य मोबदला मिळत नाही, शासन पैसा मंजूर करते मात्र तो वेळेत उपलब्ध होत नाही. शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणूक अत्यल्प आहे यावर भविष्यात अधिक भर द्यावा लागेल.
...............................
कोट ः ""आज कृषी शिक्षणाबाबत मोठी दुरवस्था आहे. विद्यार्थ्यांना शेतीची आवड, आकर्षण नाही. यासाठी केंद्र सरकारनेच देशभर प्राथमिक शिक्षणात कृषी अभ्यासक्रम सक्तीचा करण्याची गरज आहे.''
....................................

अफार्मला सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार

पुणे ः येथिल ऍक्‍शन फॉर ऍग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेला विदर्भातील कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजिविका सक्षमीकरणासाठी केलेल्या अभिनव कार्याबद्दल राज्य शासनामार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते "ग्रामीण उपजीविका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार' देवून गौरविण्यात आले. रविद्र नाट्यमंदीर (मुंबई) या ठिकाणी झालेल्या समारंभात नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, जागतीक बॅंक प्रतिनिधी परमेश शहा, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव विजयकुमार, प्रधान सचिव एस. एस. सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अफार्ममार्फत गेल्या सहा वर्षापासून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 39 गावांतील पाच हजार 900 शेतकरी कुटुंबांना वैफल्यग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकात्मिक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
-----------

किमान तापमानाचा पारा सरसरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी (ता.30) सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात किमान तापमानाचा पारा सरासरीहून घसरलेला तर उर्वरीत महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते. कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीहून एक ते तीन अंश सेल्सिअसने घसरलेले आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा सरासरीहून अधिक आहे. हवामान खात्याने शनिवारी (ता.1) सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 18 (1), भिरा 18 (2), डहाणू 17.9 (1), पणजी 21, हर्णे 23 (1), मुंबई 18, रत्नागिरी 19, नगर 9.9, जळगाव 11 (-2), जेऊर 13, कोल्हापूर 18 (2), महाबळेश्‍वर 13 (-1), मालेगाव 11, नाशिक 9.5 (-2), पुणे 11, सांगली 16 (2), सातारा 13 (0), सोलापूर 17, औरंगाबाद 12, नांदेड 13 (-1), उस्मानाबाद 14, परभणी 11.2 (-4), अकोला 12 (-3), अमरावती 14 (-2), ब्रम्हपुरी 13 (-1), बुलडाणा 13 (-2), चंद्रपूर 13 (-2), नागपूर 11 (-3), वर्धा 11 (-4), यवतमाळ 12 (-5)
--------------

मोफत शेतमाल मार्केटींग, प्रमोशन

पुणे ः शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेला चालना देण्यासाठी येथिल आपुलकी संस्थेमार्फत शेतकऱ्यांचा प्रक्रीया केलेल्या शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी ऑनलाईन मार्केटींग व प्रमोशनची सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. उत्पादनांची माहीती, वैशिष्ट्य, छायाचित्र, किंमत, शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक व पत्ता संस्थेच्या संकेतस्थळावर (www.apulkee.org) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलाल यंत्रणा मोडीत काढून फायदा थेट कष्टकरी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अभिजित फाळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 8983357559 माहिती पाठविण्यासाठी इ मेल ः fabhijeet1980@gmail.com
---------------------