Monday, June 1, 2015

विद्यापीठांची बियाणे साखळी विस्कळीत

लोगो - जॉईंट अॅग्रेस्को 2015
------------------------
पुरवठा वाढविण्याची कृषी विभागाची आग्रही मागणी

राहुरी, जि. नगर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात वापरल्या जाणाऱ्या 20 लाख क्विंटल पैकी फक्त 25 हजार क्विंटल बियाणे कृषी विद्यापीठे पुरवतात. गेल्या तीन वर्षात विद्यापीठांची बियाणे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अनेक पिकांचा एकही नवीन वाण गेल्या दहा वर्षात आलेला नाही. पिकवाल तेवढ्या बियाण्याला अनुदान देतो, सर्व बियाणे विकत घेतो, पण बिजोत्पादन वाढवा. यंदा किमान एक लाख क्विंटल बिजोत्पादन कराच, अशी आग्रहाची मागणी कृषी विभागामार्फत चारही कृषी विद्यापीठांकडे करण्यात आली.

जॉईंट अॅग्रेस्कोच्या पहिल्या सत्रात कृषी विभागामार्फत राज्यातील स्थिती मांडण्यात आली. खरिपासाठीची बियाणे उपलब्धता व पुरवठ्यातील अडचणी आणि याबाबत विद्यापीठांकडूनच्या अपेक्षा याविषयी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक जयंत देशमुख सादरीकरण केले. सत्राचे अध्यक्ष कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल यांनीही मुख्यमंत्र्यांच्या बिजोत्पादन वाढविण्याच्या सुचनांची आठवण देत विद्यापीठे तयार करतील त्या सर्व बियाण्याला अनुदान देण्याची व सर्व बियाणे विकत घेण्याची हमी दिली.

डॉ. गोएल म्हणाले, बियाणे पुरवठ्यात विद्यापीठांनी तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. बिजोत्पादनासाठी महाबीजला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते. यापेक्षाही अधिक अनुदान विद्यापीठांना मिळू शकते. मात्र त्यासाठी पुढील दोन वर्षे अतिरिक्त सुविधांची मागणी करु नये. केंद्राच्या नव्या नियमानुसार 10 वर्षाच्या आतील चांगल्या वाणांचे अधिकाधिक बिजोत्पादन करावे. कृषी विभाग हे सर्व बियाणे विविध योजनांतून शेतकऱ्यांना पुरविल.

श्री. देशमुख म्हणाले, खरिप पिकांच्या बाबतीत विद्यापीठांची बियाणे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. संकरीत ज्वारी, बाजरी, मका यांच्या बियाण्याची कमतरता आहे. विद्यापीठांकडून या बियाण्याच्या पुरवठ्याची अपेक्षा आहे. मात्र पुरवठा होत नसल्याने यात खासगी कंपन्यांची एकाधिकारशाही वाढली आहे. उडीद, सोयाबीन, गहू या सर्वच पिकांच्या नवीन वाणांची गरज आहे. अनेक पिकांचे दहा वर्षाच्या आतील वाण विद्यापीठांकडे उपलब्धच नाहीत. शेतकऱ्यांची भात, कापूस, सोया, हरभरा या पिकांच्या दहा वर्षाहून जुन्या वाणांनाही मागणी आहे. मात्र या वाणांमध्ये गेल्या दहा वर्षात बदल झाले असून विद्यापीठांनी या वाणांचे शुद्धीकरण करण्याची गरज आहे.

- चौकट
जनुकीय चाचण्यांचा दर्जा सुधारा
कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर जनुकीय पिकांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. मात्र त्यासाठी विद्यापीठांकडून सोई सुविधा निट राखल्या जात नाहीत, अशा कंपन्यांच्या तक्रारी आहेत. कंपन्यांकडून आपण चाचण्यांचे पैसे घेतो त्यामुळे सर्व बाबींचा दर्जा राखणे आवश्यक आहे. अन्यथा उद्या खासगी कंपन्या आपल्याविरुद्ध ओरड करतील. विद्यापीठांच्या पैदासकार बियाण्याच्या लेबलवर अनेकदा पैदासकाराची सही नसते. कट ऑफ डेट नसते. बियाण्याची मागणी केली तर अजून तयार नाही, असे सांगण्यात येते. सोयाबीनचे बियाणे 50 किलोच्या पॅकमध्ये असते. बियाण्याची पिशवी ही त्या पिकाच्या प्रति एकर क्षेत्रासाठीच्या बियाण्याच्या गरजेनुसारच तयार केल्या जाव्यात, अशी मागणी श्री. देशमुख यांनी केली.

कृषी विभागाच्या मागण्या...
- सोयाबीनच्या यंत्राने काढणी करण्यासाठी खास वाण विकसीत करावा
- कापसाचा सघन लागवडीसाठी बीटी जनुक असलेला सरळ वाण विकसित करावा
- पैदासकार व पायाभूत बियाणे पुरशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे
- बिजोत्पादनात शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) सहभागी करुन घ्यावे
- हवामान घटकांतील बदलांना प्रतिकारण वाण विकसित करावेत
-------------------------

आघारकरचा सोयाबीनचा नवीन वाण प्रसारीत

पुणे  - येथिल आघारकर संशोधन संस्थेमार्फत सोयाबीनचा एमएसीएस 1188 हा नवीन वाण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यांत खरीप हंगामात पेरणीसाठी नुकताच प्रसारीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय वाण प्रसारक व अधिसूचना समितीच्या बैठकीत या वाणाला मान्यता देण्यात आलेली आहे.

प्रचलित वाणांपेक्षा अधिक उत्पादनक्षम, किड व रोग प्रतिकारक, शेंगा फुटण्यास प्रतिकारक ही या वाणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पिक काढणीसाठी 95 ते 100 दिवसात पक्व होते. गेल्या खरीपात (2014) शेतकऱ्यांच्या शेतावर या वाणापासून हेक्टरी 3250 किलोग्रॅम उत्पादन मिळाले आहे. संस्थेच्या होळ-सोरटेवाडी (बारामती) येथिल प्रक्षेत्रावर या वाणाचे बियाणे मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहे. संपर्क - 02112282164
---------------------------------

कृषी पदविकाधारकांना फक्त कृषी पदवीलाच प्रवेश

थेट द्वितीय वर्षात प्रवेश बंद, राज्य शासनाचा निर्णय

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील कृषी तंत्र निकेतन शिक्षण संस्थांमधून सुधारीत तीन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्याचा नियम रद्द करुन फक्त कृषी पदवीच्या प्रथम वर्षातच प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के अतिरिक्त जागा गुणानुक्रमे भरण्यात येणार आहेत.

चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत खासगी संस्थांमार्फत सुरु असलेल्या कायमस्वरुपी विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालयांचा दोन वर्षाचा मराठी माध्यमातील अभ्यासक्रम 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून सुधारुन अर्ध इंग्रजी माध्यमात तीन वर्षाचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. हा निर्णय घेतना अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याची पात्रता बहाल करण्यात आली होती. आता शासनाने या पात्रतेवरच आक्षेप घेत जुना निर्णय फिरवला आहे.

कृषी तंत्र निकेतन या अभ्यासक्रमात विशेषीकरण (स्पेशलायझेशन) नाही. यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षास प्रवेश घेण्यास हे विद्यार्थी पात्र ठरत नाहीत. यामुळे याबाबतची मार्गदर्शक तत्वे व निकषांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

आता सुधारीत निकषानुसार कृषी तंत्र निकेतन उत्तीर्ण असलेले उमेदवार फक्त कृषी पदवीच्या (बीएस्सी. अॅग्री) पहिल्या वर्षात प्रवेशासाठी पात्र असतील. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला किमान 60 टक्के व मागास प्रवर्गातील उमेदवाराला किमान 50 टक्के गुण आवश्यक असतील. या उमेदवारांसाठी 10 टक्के अतिरिक्त जागा असतील व त्या गुणानुक्रमे भरण्यात येतील, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

---------------------------------

शास्रज्ञांनो... शेतकऱ्यांकडे चला !

अप्पर मुख्य सचिवांची शास्रज्ञांना हाक

विशेष प्रतिनिधी
राहुरी, जि. नगर - कृषी विभागाच्या खरिप नियोजनाप्रमाणेच विद्यापीठांचे जॉईंट अॅग्रेस्को हे ही फक्त औपचारिकता बनून राहीले आहेत. संशोधन जाहिर केले जाते पण पुढे काय. त्याचा शेतकऱ्यांच्या प्रगतीत हातभार लागतोय का, असा प्रश्न उपस्थित करत यंदाच्या खरीपात प्रयोग म्हणून का होईना पण राज्यातील सर्व कृषी शास्रज्ञांनी कृषी विभागासोबत विस्तार कार्यात सहभागी होऊन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधिरकुमार गोएल यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या शास्रज्ञांना केले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृ-षी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे उद्घाटन राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोएल बोलत होते. कृषी परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू, खासदार दिलीप गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी विभागाचे संचालक के. व्ही. देशमुख, डॉ. सुदाम अडसूळ, जयंत देशमुख, श्री. अंबुलगेकर, सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन, शिक्षण व विस्तार संचालक आणि सुमारे 150 हून अधिक कृषी शास्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

डॉ. गोएल म्हणाले, आत्तापर्यंत कृषी विद्यापीठांनी शिफारशी, वाण, रोपे, यंत्रे यांच्यासह सुमारे पाच हजार संशोधने प्रसिद्ध केली आहे. चारही विद्यापीठांचे काम मोठे आहे. या जॉईंट अॅग्रेस्को मध्ये 23 वाण, 247 शिफारशी व 8 यंत्रे या संशोधन शिफारशींवर चर्चा होणार आहे. शास्रज्ञांचा, विद्यापीठांचा अजेंडा नसला तरी हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कुणाचीही वाट न पाहता प्रत्येक शास्त्रज्ञांने स्थानिक कृषी विभागाच्या मदतीने येत्या खरिपात कृषी विस्ताराच्या कार्यात सहभागी व्हावे. आपापल्या कामाच्या ठिकाणापासून जवळच्या किमान 100 हेक्टर क्षेत्रापर्यंत संशोधन पोचविण्यासाठी मदत करावी. असे केले तर या खरीपात किमान दोन लाख हेक्टर क्षेत्रावर लगेच संशोधनाची अंमलबजावणी होऊ शकते. येत्या खरीपात एक हजार कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, हरितगृहे, शेडनेट, नवीन तंत्रज्ञान उभारणी, सुक्ष्म सिंचन आदीची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होणार आहे. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने जास्त चांगली शेती कशी करता येईल याचे मार्गदर्शन शास्रज्ञांनी करावे.

विद्यापीठांनी आत्तापर्यंत 608 वाण तयार केले आहेत. त्यातील कोणते वाण अजूनही सरस आहेत. मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाहीत. अशा खात्रीने उपयोगी वाणांची प्रात्यक्षिके, बिजोत्पादनासाठी कृषी विभागाने निधी राखून ठेवला आहे. बिजोत्पादनासाठी प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांहून अधिक अनुदान आहे. विद्यापीठे जेवढे बिजोत्पादन करतील तेवढे अनुदान दिले जाईल. विद्यापीठांनी पिकनिहाय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस द्याव्यात. त्याचा अवलंब वर्षभरात साडेआठ लाख हेक्टरवरील प्रात्यक्षिकांत केला जाईल. याशिवाय यंत्रसामग्री व जैविक निविष्ठांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी करावा असे आवाहन डॉ. गोएल यांनी केले.

पंजाबमध्ये कृषी विभागाला कोणी ओळखत नाही, सर्वजण पंजाब कृषी विद्यापीठाचे गुणगाण गातात. दर वर्षी ट्रॅक्टर भरुन लाखो शेतकरी विद्यापीठात भेटीला जातात. आपल्याकडे शास्त्रज्ञ कमी असले तरी त्यांना ओळखणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोने वाढले पाहिजे. त्यासाठी शास्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी वेळ काढला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सुख दुःखात त्यांनी सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा डॉ. गोएल यांनी यावेळी व्यक्त केली.

- शेतकरीच तुमची अडचण सोडवतील
कुलगुरु डॉ. मोरे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठांच्या समस्या वाचून दाखवल्या. याबाबत डॉ. गोएल म्हणाले, असा कोणताही शासकीय विभाग नाही की ज्यांच्यासमोर अडचणी नाहीत. अडचणी आहेत आणि साधणेही आहेत. अडचणी सांगत बसले तर कुलगुरुंचा कार्यकाल संपेल, पण फरक काही पडणार नाही. उपलब्ध साधणांचा पूरेपूर वापर करुन शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करा. हे आमचे काम नाही असे म्हणू नका. यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आदर निर्माण होईल. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्याची मागणी आणि उर्मी शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल. आणि त्यातूनच विद्यापीठांच्या अडचणी सोडवल्या जातील. कुलगुरुंनी सभांमध्ये भाषणे करुन अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीवरुन सुटतील.

- विद्यापीठांकडून बदलाची अपेक्षा
राम शिंदे म्हणाले, विद्यापीठांनी गेल्या चार पाच दशकात खूप मोठे काम केले आहे. मात्र आता बदलत्या हवामानामुळे आव्हाणांतही बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यांना प्रतिकार करणारे वाण विद्यापीठांनी तयार करावे लागतील. पिकनिहाय उत्पादन, प्रक्रिया व विपणन तंत्रज्ञानात सुधारणा करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जिवनात बदल घडवून आणायची क्षमता व जबाबदारी शास्रज्ञांची आहे. याप्रमाणेच कृषी अधिकारी हा विद्यापीठे व शास्त्रज्ञ यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याची गरज आहे. बीटी कापसाला पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यातील 150 तालुक्यातील कोरडावाहू क्षेत्र शाश्वत होण्यासाठी विद्यापीठांकडून अधिकाधिक संशोधनाची अपेक्षा आहे.

- गरजेवर आधारीत संशोधन हवे
राम खर्चे म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या शास्रज्ञांनी डॉ. गोएल यांच्या आवाहनानुसार येत्या खरीपात थेट शेतकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचा त्रास वाटत असेल त्यांनी मनोवृत्ती बदलावी. राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होता कामा नये. आत्तापर्यंत किती शास्रज्ञांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपले उद्दीष्ट शेतकऱ्याच्या जिवनात सर्वांगिण प्रगती घडवणे हे शास्रज्ञांनी कायम लक्षात ठेवावे. उद्योग व शेतकरी यांच्याशी विद्यापीठांचा सतत संवाद हवा. गरजेवर आधारीत संशोधन व संशोधनाचे मुल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. कालबाह्य झालेले संशोधन काढून टाका व आहे हे संशोधन किती उपयोगी ठरतेय याचे मुल्यमापन करावे, अशी सुचना त्यांनी केली.

दिलीप गांधी यांचेही यावेळी भाषण झाले. दापोली कृषी विद्यापीठाच्या 11, परभणी कृषी विद्यापीठाच्या चार, अकोला कृषी विद्यापीठाची सात, राहूरी कृषी विद्यापीठाच्या पाच अशा एकूण 27 पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. तुकाराम मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. प्रकाश शिनगारे यांनी मानले.
---------------------------------

गरज-संशोधनात दहा वर्षांचा गॅप

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना विशेषतः बियाण्याच्या बाबतीत दहा वर्षाहून जुन्या संशोधनाचा विचारही करु नये. हे कालबाह्य संशोधन रद्द करुन दहा वर्षाच्या आतील संशोधनाचाच अवलंब करावा, असे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्ये व विद्यापीठांना दिले आहेत. मात्र महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, मका यासह अनेक पिकांचे दहा वर्षाच्या आतील वाण उपलब्धच नसल्याने कृषी विभाग व महाबीज यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. याशिवाय शेतपातळीवर हवामान घटकातील बदलांच्या परिणामांची दखल विद्यापीठांमार्फत घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची गरज आणि विद्यापीठांचे संशोधन यातील दरी अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांकडून विद्यापीठांकडून गेल्या १० वर्षात संकरित ज्वारी, संकरित बाजरी, संकरित मका, संकरित सुर्यफुल, संकरित देशी कपाशी, सुधारित ज्वारी, नागली, हिरवळीची खत पिके, चारा पिके व भाजीपाला पिकांचा एकही नवीन वाण उपलब्ध झालेला नाही. लाखलाखोडी, जवस या पिकांचे प्रमाणित बियाणे व वाणही गेल्या १० वर्षात मिळालेले नसल्याचे महाबीजमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या सर्व पिकांच्या वाणांसाठी शेतकऱ्यांना पूर्णपणे खासगी कंपन्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र यातील अनेक पिकांचे बियाणे खासगी कंपन्यांकडूनही उपलब्ध होत नसल्याने संबंधीत पिकांचा विकासच थांबतो की काय अशी स्थिती आहे.

राज्यातील कृषी हवामानात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून त्याचे विपरित परिणाम पिकांवर होत आहे. फुलगळ, फळगळ, झाडे वाळून जाणे, थंडीचा वा उष्णतेचा शॉक यामुळे पिकांची अजैविक ताण सहन करण्याची क्षमता कमी होत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. राज्यात एकीकडे एवढी मोठी उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे कृषी विद्यापीठांनी कृषी हवामान आणि त्याचे पिकांवरील परिणाम या मुलभूत गोष्टीकडेच दुर्लक्ष झाल्याची बाबत संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीत प्रकर्षाने पुढे आली.

या अनुषंगाने आंबा पिकावर हवामान घटकांतील बदलाचे परिणाम नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतर कोणत्याही पिकांच्या बाबतीत हवामान घटकांच्या परिणामांची दखल घेण्याचा निर्णय झालेला नाही. म्हणजेच हे सर्व विद्यापीठ पातळीवर बेदखल राहणार की काय अशी स्थिती आहे. नगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा तीन अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरुन पिकांना मोठा स्ट्रोक बसला. याची आणि यासारख्या घटनांची दखल विद्यापीठांनी संशोधन पातळीवर घेतल्याचे आढळून येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी हवामान घटकांचे पिकांवर होणारे परिणाम वर्षभर नोंदवून त्याबाबत संशोधनात्मक कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- कोट
गेल्या काही वर्षात शेतावरील परिस्थिती बदलली आहे. नैसर्गिक आपत्तींसह किड रोगांचा प्रादुर्भावही वाढलाय. जुने पुराणे वाण या परिस्थितीला बळी पडताहेत. विद्यापीठांकडून बदलत्या हवामानातही तग धरतील, चांगले उत्पादन देतील असे वाण मिळावेत, एवढीच मागणी आहे.
- दत्ता राऊत, शिक्रापूर, ता. शिरुर, पुणे
----------(समाप्त)-------------

राहूरी विद्यापीठावर आज विद्यार्थ्यांचा मोर्चा

- परभणी विद्यापीठात आज बंद ?
कृषी परिषदेच्या जाचक अटींविरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बंद ची हाक दिली आहे. विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेमार्फत अध्यक्ष कृष्णा होगे, सचिव सारंग काळे, संजय चिंचाणे, कृष्णा वरखड, मनोज डोंबे आदी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.१) विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले. कुलसचिवांनी या मागण्या कृषी परिषदेला कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र या प्रश्नी निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून (ता.२) विद्यापीठ बंद चा इशारा दिला आहे.

पुणे (प्रतिनिधी) - कृषी पदवीचे पाचवे व सहावे सत्र संपूर्ण उत्तीर्ण असल्याशिवाय सातव्या सत्रास प्रवेश न देण्याच्या कुलगुरु समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (कृषी परिषद) निर्णयाविरोधात मंगळवारी (ता.२) कृषी पदवीधर संघटनेमार्फत पश्चिम महाराष्ट्रातील विविध कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

यापुर्वी कृषी पदवीच्या सातव्या सत्रास प्रवेश घेताना चौथ्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. कृषी परिषदेने हा निर्णय बदलून सहाव्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. गेल्या दोन वर्षात पाचव्या व सहाव्या सत्रात काही विषय अनुत्तिर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने त्यांच्या शिक्षणात एक वर्षाचा खंड पडण्याचा धोका उद्भवला आहे. कृषी पदवीधर संघटनेच्या माहितीनुसार सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना या जाचक निर्णयाचा फटका बसत आहे. संघटनेमार्फत गेली वर्षभर कृषीमंत्री, कृषी परिषद, विद्यापीठे यांना अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.

सातव्या सत्राची (रावे) प्रवेश प्रक्रिया कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये नुकतीच सुरु झाली आहे. मात्र यात प्रवेशप्रक्रियेतून सहाव्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राहूरी येथे विद्यापीठासमोर रास्ता रोको करण्याची परवानगी विद्यार्थ्यांनी पोलीसांकडे मागितली होती. मात्र ती नाकरण्यात आल्याने विद्यार्थ्यांमार्फत विद्यापीठ गेट पासून कुलगुरु कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेच्या विद्यार्थी सेलचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयदिप ननावरे यांनी सांगितले.  

राज्यात यंदा सरासरीच्या ९५ टक्के पाऊस


डाॅ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज; पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता

- कोट
‘‘मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमान व वाऱ्याचा वेग कमी राहील्याने माॅन्सून राज्यात उशीरा दाखल होईल. पुढील वाटचालही अडथळ्याची शक्यता आहे. मॉन्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने जून ते ऑगस्ट या काळात पावसात मोठे खंड पडतील.
- डाॅ. रामचंद्र साबळे

पुणे (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या शाश्‍वत शेती अभियानाचे राज्य सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेत कोकणात ९०.५ टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रात ९९.८ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९७ टक्के, मराठवाड्यात ९० टक्के, पुर्व विदर्भात ९२ टक्के, मध्य विदर्भात ९७.५ टक्के तर पश्चिम विदर्भात ९६ टक्के पाऊस पडण्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे.

डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधीत ठिकाणचे गेल्या तीस वर्षाचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामानघटक स्थिती विचारात घेवून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदी यात विचारात घेण्यात आल्या आहेत. कमी पावसापेक्षाही पावसात पडणारे मोठे खंड आणि कमी कालावधीमध्ये पडणारा अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे.

- हंगामाच्या सुरवातीलाच खंड ?
जूनच्या पहिल्या-दुसऱ्या पंधरवड्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पुर्व विदर्भ, धुळे व यवतमाळ या भागात कमी पावसाची शक्यता अधिक असल्याने परिस्थिती जास्त गंभिर असू शकते. राज्यातील दुष्काळप्रवण भागात विशेषतः सांगली, सातारा, पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांचा पूर्व भाग, संपूर्ण धुळे व सोलापूर जिल्ह्याचा काही भाग या मुळातच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

- पावसानुसार करा पिक नियोजन !
पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पिक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी न करणे फायद्याचे राहील. जमीनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करु नये. दुष्काळप्रवण तालुके, मराठवाडा, विदर्भात कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणारी पिके-वाण घेणे फायद्याचे राहील. या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत मुग, मटकी, उडीद, चवळी, सोयाबीन व त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीनचा अवलंब करावा लागेल. पावसाच्या स्थितीनुसार पिक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका व तूर ही पिके महत्वाची राहतील. पाणी साठवणूकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी अशा पद्धतीने उताराला आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

- चौकट
- असा राहील ठिकठिकाणचा पाऊस (जून ते सप्टेंबर २०१५)
ठिकाण -- सरासरी (मिमी) -- अंदाज (मिमी) -- टक्केवारी
अकोला -- ६८३.७ -- ६५६ -- ९६
नागपूर -- ९५८ -- ९५८ -- १००
यवतमाळ -- ८८२ -- ८४० -- ९५
शिंदेवाही(चंद्रपूर) -- ११९१ -- ११०० -- ९२
परभणी -- ८१५ -- ७३५ -- ९०
दापोली -- ३३३९ -- ३०२२ -- ९०.५
निफाड -- ४३२ -- ४३२ -- १००
धुळे -- ४८१ -- ४४२ -- ९२
जळगाव -- ६३९ -- ६४० -- १००
कोल्हापूर -- ७०६ -- ७०६ -- १००
कराड -- ५७० -- ५७० -- १००
पाडेगाव -- ३६० -- ३७० -- १०२
सोलापूर -- ५४३ -- ५४३ -- १००
राहूरी -- ४०६ -- ३९४ -- ९७
पुणे -- ५६६ -- ५७७ -- १०२
-------------------------------