Sunday, April 26, 2015

"शेती'साठी करा मोबाईलचा वापर - Mazahi Aaika

तरुण पोरांची मोबाईलवर भराभर फिरणारी बोटं पाहिली की हेवा वाटतो त्यांचा. किती लवकर ही मुलं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन वापरतात. पण, त्यात "टाईमपास'चा भाग किती आणि उपयोग काय? मुलानं हट्ट धरला म्हणून त्याला दहा हजाराचा ऍन्ड्रॉईड मोबाईल घेतला. मग आग्रहाने त्याच्याकडून मी त्याचा वापर समजून घेतला. पाण्याची मोटर चालू बंद करायचं, दुधाचा हिशेब ठेवायचं, सर्व पिकांचे फोटो काढून त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम तो मोबाईलवरच करतो.

गेल्या दहा वर्षात जगात सर्वाधिक वेगाने विकसित झाले, लोकांनी स्विकारलेले आणि जगणं सोपं झालं अशा तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा नंबर पहिला असेल. जादूच्या कांडीसारखे काम करतो राव मोबाईल. पण आपण शेतकऱ्यांनी त्याकडं गांभिर्यानं पाहिलेलंच नाही अजून. घराघरात पोरांकडं मोबाईल आहेत, पण ते गेम खेळायला, गाणी ऐकायला आणि पिक्‍चर पहायला घेतलेत की काय असं दिसतं. त्याचा शेतीसाठी कसा वापर करायचा हेच अनेकांना उमगत नाही. उमगले तरी पचणी पडत नाही. आणि याच वेळी आपण बाजारभावासाठी, योजनांच्या माहितीसाठी, नवीन शोधण्यासाठी, प्रश्‍नांवर उत्तर मिळविण्यासाठी हेलपाटे मारत खर्च करत बसतो. काखेत कळसा आणि गावला वळसा म्हणतात तशी अवस्था आहे.

मोबाईल हे आता फक्त संभाषणाचे माध्यम राहीलेले नाही. आपण शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपले मोबाईल निट समजून घेतले पाहिजेत. त्यात आपण काय काय करु शकतो हे समजलं तर फुटकटे हालपाटे, हमाली, खर्च वाचू शकतो. नुकसान वाचू शकतं, उत्पादन वाढू शकतं. ही अतिशयोक्ती नाही. राज्यात अनेकजण मोबाईलच्या मदतीनं चांगली शेती करत आहेत. मोबाईलवर वॉट्‌सअपमध्ये पिकनिहाय शेतकरी गट तयार झालेत. त्यात शेतकरी, शास्त्रज्ञ, व्यापारी सगळेच असतात. फोटो, व्हिडीओ सर्वांना पाहता येतात. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहारही होतात.

फेसबूकवर शेतकरी गट तयार करुन अनेकांनी खते, बियाणे मिळविण्यापासून ग्राहकांना थेट विक्रीपर्यंत लाभ मिळवला आहे. अत्यंत अद्ययावत माहिती समजल्यानं चांगला निर्णय, लाभ घेता येतो. आपल्या शेताचे संकेतस्थळ, फेसबूक पेज तयार करुन आपण आपल्या मालाची प्रसिद्धी करु शकतो. त्यातूनही ग्राहकांशी, तज्ज्ञांशी जोडणी करता येते. आपल्या भागातील हवामानाची रोजची माहिती, जगातल्या हव्या त्या बाजारपेठेतील बाजारभाव मिळवता येतात. कुठूनही पाण्याची मोटार चालू बंद करण्यापासून ते अगदी किड रोगांवर शास्त्रज्ञांकडून उपाय मिळवतात येतात. पण यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे मोबाईल समजून घेणं आणि त्याचा शेतीसाठी वापर सुरु करणं. सुरवातीला जड जाईल, पण जमलं की गाडी सुसाट पळलं.
- एक शेतकरी
-------------- 

Friday, April 24, 2015

यशोगाथा - सोपान करंडे, कोल्हारवाडी, पुणे

एकत्र कुटुंब यशोगाथा
सोपान करंडे, कोल्हारवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
------------------- 

तयारी खरिपा ची - भाग 4

निविष्ठा गुणनियंत्रणासाठी
कृषी विभागाची जय्यत तयारी

दृष्टीक्षेपात गुणवत्ता नियंत्रण...
- 1131 निरिक्षकांची नेमणूक; न्यायालयीन दाव्याचीही तयारी
ृ- विक्री केंद्रे, गोदामे, प्रयोगाशाळा, उत्पादन केंद्रांची होणार तपासणी
- बियाणे 20875, खते13000, किटकनाशके 5400 नमुने तपासणी
- कृषीच्या सर्व कार्यालयांना तपासणीचे "टारगेट', मार्गदर्शक सुचना वितरीत
- खरेदीची बिले, शेतकऱ्यांच्या सह्या, बोगस व जादा दराने विक्रीवर कटाक्ष
- डमी गिऱ्हाईके पाठवूनही केली जाणार लिंकिंगचा पंचनामा

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या खरिप हंगामात राज्यभर वितरिक होणाऱ्या हजारो टन खते, बियाणे व किटकनाशकांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. निविष्ठा तपासणी मोहीमेच्या दृष्टीने मे महिना सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. कृषी विभागाने यासाठी राज्यभर निरिक्षक, भरारी पथके, तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली असून शेतकऱ्यांना निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात येत्या खरिपासाठी 407 निविष्ठा उत्पादकांकडून खते, बियाणे, औषधांचा पुरवठा होणार असून त्यांचे तब्बल एक लाख 18 हजार 993 वितरकांमार्फत शेतकऱ्यांना पुरवठा होणार आहे. गुणवत्ता नियंत्रण अभियानात या सर्व उत्पादक व विक्रेत्यांची कायद्यानुसार तपासणी होणार आहे. बोगस, अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठा, जादा दराने विक्री, लिंकिंग, साठेबाजी आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागामार्फत जप्ती, विक्री बंदी, परवाने रद्द करणे, न्यायालयात दावे दाखल करणे, पोलिसात फौजदारी तक्रार दाखल करणे आदी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.

नियमित पुरवठ्यांच्या निविष्ठांबरोबरच अनुदानित निविष्ठांची पात्र शेतकऱ्यांनाच वितरण झाले का याचीही उलटतपासणी करण्यात येणार आहे. दोषी कंपन्या व व्यक्तींवर न्यायालयात दावे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून या कामी हालगर्जीपणा करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

- कंपन्यांची असमान वर्गवारी
निविष्ठा उत्पादकांची त्यांची गेल्या काही वर्षातील गुणवत्ता विषयक कामगिरी, झालेल्या कारवाया, तक्रारी यानुसार अ, ब, क, ड या चार गटात वर्गिकरण करण्यात आले असून अ व ब गटातील अनुक्रमे पाच व 10 टक्के तपासणी करण्यात येणार आहे. सर्वाक्षिक कटाक्ष क व ड गटातील कंपन्यांवर राहणार आहे. या कंपन्यांच्या अनुक्रमे 25 व 60 टक्के नमुन्यांची तरपासणी करण्यात येणार आहे. म्हणजे गुणवत्ता तपासणीसाठी काढलेल्या 100 नमुन्यांत 60 नमुने ड गटातील, 25 नमुने क गटातील, 10 नमुने ब गटातील तर फक्त पाच नमुने अ गटातील कंपन्यांचे असतील.

- लेबल क्‍लेम तपासणी मोहीम
कृषी विभागाच्या सर्व यंत्रणेमार्फत एक जून ते 30 जून 2015 या कालावधीत राज्यभर लेबल लिफलेट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत उत्पादक व विक्रेते यांची तपासणी, संशयास्पद निविष्ठांचे नमुने व लेबल क्‍लेमची तपासणी कयात येणार आहे. यात कायद्याचे उल्लंघन झालेल्याचे वा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित निविष्ठा, व्यक्ती व परवान्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या स्पष्ट सुचना आयुक्तालयामार्फत सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

- संजिवकांचीही होणार तपासणी
पिक वाढ संजिवकांसह कुठल्याही कायद्यात समाविष्ट नसलेल्या निविष्टांचीही गुणवत्ता तपासणी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. मात्र ही तपासणी त्यात नोंदणीकृत किटकनाशकांचे काही घटक आहेत का या संदर्भाने होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची अशा निविष्ठांमधून होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अशा सर्व निविष्ठांची तपासणी करण्याचे आदेश निरिक्षकांना देण्यात आले आहेत.

- येथे करा तक्रार
कृषी निविष्ठांविषयी शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर 1800 233 4000 हा टोल फ्री म्हणजेच निशुल्क दुरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे. विभागिय पातळीवर तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी तंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे ः पुणे - 9373101242, नाशिक - 9423082046, अमरावती - 9422855587, औरंगाबाद - 9422293200, कोल्हापूर - 944963709, लातूर - 9422875606, नागपूर - 9404951051

- तक्रारीवर अशी होईल कार्यवाही
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर नोंदवहीत त्याची नोंद करुन शेतकऱ्याला पोच दिली जाईल. उपविभागिय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सात दिवसाच्या आत क्षेत्रिय पहाणी, तपासणी होईल. पंचनाम्यात शेतकऱ्याची साक्ष घेतली जाईल व पंचनाम्याची अंतिम प्रतही त्याला दिली जाईल. अहवालातील निष्कर्ष स्पष्ट व निसंग्दिग्ध असावा, वाटते, शक्‍यता असे शब्द वापरु नये व सर्व बाबींची शास्त्रीय, कायदेशीर नोंद ठेवावी, असे आदेश उपविभागिय व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कापूस पिक विषयक तक्रारींवरील कार्यवाही कापूस बि बियाणे कायद्याअंतर्गत जिल्हास्तरीय समितीमार्फत स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
------------(समाप्त)--------- 

भेंडी निर्यात सुरु

- फायटो प्रमाणपत्रांना हिरवा कंदील

पुणे (प्रतिनिधी) ः निर्यात प्रणाली सुधारणेच्या नावाखाली गेली 25 दिवस बंद असलेली भेंडी निर्यात अखेर पुन्हा सुरु झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने शुक्रवारी रात्री निर्यातक्षम बागांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे शनिवारपासुन राज्यातील भेंडीची युरोपिय देशांना होणारी निर्यात पुन्हा सुरु झाली आहे.

युरोपिय बाजारपेठेत पाठवलेल्या भेंडीत फळमाशी (थ्रीप्स) आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्यात प्रणालीत सुधारणा करुन सर्व उत्पादन क्षेत्राची नोंदणी व प्रत्यक्ष तपासणी करुन कीडमुक्त उत्पादनाची हमी मिळविण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाने स्वतःहून मार्चअखेरीस देशातील भेंडी निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्रीय कृषी सचिवालय, प्लॅन्ट क्वारंटाईन विभाग व अपेडा यांच्याकडून निर्यात प्रणालीत सुधारणा करण्यात येणार होती.

मात्र बंदीला 20 दिवस उलटल्यानंतरही याबाबत केंद्राकडून काहाही हालचाल झाली नाही. यामुळे भेंडीचे देशांतर्गत दर कोसळले. निर्यातीचा हंगाम हातचा जावून मोठे नुकसान होण्याचा धोका उद्भवला होता. बारामती व फलटणमधील शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रश्‍नी लक्ष घातल्यानंतर वेगाने सुत्र हलून निर्यात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली तीन दिवस प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे पथक महाराष्ट्रात तळ ठोकून असून निर्यातदारांनी अपेडाकडे नोंदवलेल्या बहुतेक बागा तपासून फळमाशीचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा नगण्य असलेल्या क्षेत्रावरील भेंडीच्या निर्यातीसाठी ना हरकत दिली आहे. याबाबतचे ऑडिट रिपोर्ट केंद्राला पाठविल्यानंतर प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने निर्यातीस पात्र ठरलेल्या भेंडीला फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याच्या सुचना राज्याच्या कृषी विभागाला दिल्या आहेत. यानुसार फलटण, बारामती परिसरातून भेंडी निर्यात करणाऱ्या केबी एक्‍स्पोर्टसह इतर काही कंपन्यांची निर्यात शनिवारपासून पुन्हा सुरळित सुरु झाली आहे.

""मुंबई व पुण्यातून शुक्रवारी रात्री फायटो मिळाल्याबरोबर राज्यातून चार पाच कंपन्यांच्या कन्साईनमेंट युरोपला रवाना झाल्या आहेत.''
- सचिन यादव, सरव्यवस्थापक, के बी एक्‍स्पोर्ट, फलटण
------------------- 

आम्ही स्वयंसेवी - SSIAST

शेतकरी प्रबोधन, प्रशिक्षणात
श्री श्री कृषी विज्ञान संस्थेची मोहर
----------------
संतोष डुकरे
---------------
शेतकऱ्यांच्या विकासाचा हे मुख्य उद्दीष्ट घेवेवून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी कर्नाटकातील बंगलोर 2000 साली श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट (श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था) ची स्थापन केली. गेल्या पंधरा वर्षात या संस्थेमार्फत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भरीव कामगिरी करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ज्ञानाची व प्रगतीची नवी कवाडे खुली झाली आहेत.
-------------------
श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेमार्फत देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात संस्थेमार्फत अनेक उपक्रम सुरू आहेत. नैसर्गिक शेती, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, रसायनमुक्त शेती, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रम, पर्यावरण विकास, देशी गोवंश संगोपन व संवर्धन, देशी बीज विकास आदी विषयक अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांवर संस्थेचा मुख्य भर असून त्यातून अनेक यशोगाथा आकाराला आल्या आहेत.

रासायनिक किंवा अनैसर्गिक अनैसर्गिक कृषी निविष्ठा वापरल्याने कृषी उत्पादनात वाढ झाली असली तरी त्याच्या दुष्परिणामांमुळे वातावरण, हवा, पाणी, माती प्रदूषित झाले आहे. अशा स्थितीत जमिनीवरील व जमिनीखालील जैविक चक्र सक्रिय करण्याच्या उद्देषाने संस्थेमार्फत रसायनमुक्त नैसर्गिक शेती ला चालना देण्यात येत आहे. देशी गाय, तिचे शेण, मूत्र यांचा वापर वाढविण्यास शेतकऱ्यांना चालना देण्यात येत आहे. याशिवाय संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशातील 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रसायनमुक्त नैसर्गिक शेती, देशी गायीचे महत्त्व व शेण-मुत्राचा वापर, उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर, आंतरपिके, मिश्रशेती पद्धती, कीड व रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध वनस्पतीचा वापर, देशी बियाणे निवड पद्धतीने वाण सुधारणा, बियाण्याचे सर्वेक्षण, संरक्षण व उत्पादन, बियाणे बॅंक, फळे व भाजीपाला उत्पादनवाढ व काढणीपश्‍चात प्रक्रिया, जमीन समृद्धी अशा अनेक विषयांवर संस्थेमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यापासून ते पीक उत्पादनवाढीपर्यंत अनेक प्रकारचे पाठबळ संस्थेमार्फत देण्यात येत आहे.

- श्री श्री किसान मंच
देशभरात कृषी क्षेत्रात संस्थेचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपातळीपासून जिल्हा, राज्य व देशपातळीवर संस्थात्मक उभारणीचे काम नुकतेच संस्थेमार्फत सुरू आहे. ग्राम पातळीवर श्री श्री किसान मंच स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍नांवर, अडचणीवर, तंत्रज्ञान प्रसार, पणन विषयक काम करण्यात येत आहे. जिल्हा पातळीवरील कृषी तज्ज्ञांच्या समितीमार्फत शेतकरी, शासन, ग्राहक, शास्त्रज्ञ व धोरणकर्ते अशा विविध वर्गाला स्वाभिमान, आर्थिक बळ, आत्मिक व आध्यात्मिक बळ देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंकुशदादा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी शिखर समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यात कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, माजी कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर, माजी कृषी संचालक जयंत महल्ले, ज्येष्ठ पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय व डॉ. माधव पोळ यांचा समावेश आहे. या समितीमार्फत विदर्भातील सात, मराठवाड्यातील तीन व पश्‍चिम महाराष्ट्रातील चार अशा 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मेळावे व इतर उपक्रम सुरू आहेत. किसान मंचकडे आत्तापर्यंत सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

- देशी गोवंश विकास
देशी गाईची दूध उत्पादन क्षमता व इतर गुण लोक विसरत चालले आहेत. योग्य संवर्धन व जोपासना केल्यास देशी गाय जर्सी व इतर गायींच्या बरोबरीने दूध देत आहेत. जर्सी व तत्सम गायीचे दूध "ए 1' समजले जाते. हे दूध दूध मानवी आरोग्यास हानिकारक असते, असे न्युझीलॅन्डमधील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. तुलनेत देशी गायीच्या दुधाला "ए 2' दूध संबोधले जाते. आशिया खंडातील देशी गायींचे दूध पुरातन काळापासून उत्कृष्ट समजले जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर "ए 2' दुधाचा प्रसार, प्रचार, उत्पादन वाढविण्यासाठी जागृती करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत सुरू आहेत. देशी गाईच्या संवर्धन व संगोपनासाठी देशात 10 गोशाळा स्थापन केल्या असून सुरत, महाराष्ट्र, चेन्नई या राज्यांत गोशाळांचे काम चालू आहे.

- देशी बीज बॅंक
दर्जेदार, सकस व अस्सल गावरान किंवा देशी बियाणे हा समृद्ध शेतीचा मुख्य आधार असतो. नैसर्गिक शेतीत देशी बियाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दृष्टीने संस्थेमार्फत देशी बियाण्याच्या विकासासाठी व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांमध्ये या कामाची व्याप्ती अधिक असून आत्तापर्यंत गहू, हरभरा, मूग आदी पिकांच्या हजारो रुपयांच्या देशी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी स्वतःची बियाणे बॅंक तयार करत आहेत.

- सर्वांसाठी कृषी शिक्षण
देशातील सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फळे व भाजीपाला मूल्यवर्धन पदविका, पीक व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका, ऍग्री क्‍लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका आदी विविध प्रकारचे कृषी शैक्षणिक अभ्यासक्रम संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले असून त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. संस्थेच्या बंगलोर येथील मुख्य कार्यालयातून हे अभ्यासक्रम चालवले जातात.

- कमी खर्चाचे देशी तंत्रज्ञान
संरक्षित शेतीचे अत्यंत कमी खर्चाचे मात्र अतिशय उपयुक्त असे देशी तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. यातूनच कमी खर्चिक पॉलिहाऊस, शेडनेट हाउस उभारणी व वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतीविषयक विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी संस्थेमार्फत रांची येथे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

- पाणलोट विकास
सिंचन हा शेतीचा आत्मा आहे. तो अधिक सशक्त करण्यासाठी संस्थेमार्फत पाणलोट विकास, जलसंवर्धन, मृद संवर्धन, नदी नाले पुनरुज्जीवन आदी कामे करण्यात येत आहेत. या जोडीनेच वन लागवड, फळझाड लागवड, जैविक इंधन झाडाची लागवड या माध्यमातून वन व पर्यावरण समृद्धीलाही चालना दिली जात आहे. दर वर्षी गुरुपौर्णिमेला "दी आर्ट ऑफ लिव्हिंग - वर्ल्ड एन्व्हिरॉन्मेंट डे' साजरा केला जातो. यात प्रामुख्याने वृक्षलागवड कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेमार्फत देशात आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक लक्ष्मीतरू वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. हा बहुगुणी वृक्ष असून त्याचा वापर कॅन्सरवरील उपचार व इतर अनेक कारणांसाठी केला जातो.

- श्री श्री शेतकरी बाजार
शेतकऱ्यांना गोपालन, दुग्धव्यवसाय, फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन याबाबत मार्गदर्शन करून सेंद्रिय उत्पादनवाढ करतानाच काढणीपश्‍चात प्रक्रिया आणि शेतमाल विक्री व्यवस्थेतही सुधारणा करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ, बिहारमधील रांची आदी ठिकाणी श्री श्री शेतकरी बाजार सुरू करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये सुरत व इतर काही शहरांमध्ये ऑरगॅनिक शॉप सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल थेट विक्रीसाठी ठेवतात. याशिवाय संस्थेच्या नावाने जालन्यासह अनेक शहरामध्येही शेतकरी उत्पादनाची थेट विक्री करत आहेत.

*कोट
""नैसर्गिक व सेंद्रीय शेती केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी संस्था कार्यरत आहे. मातीपासून शेतमाल विक्रीपर्यंत "मुल्य साखळीचा'चा प्रत्येक कमकुवत दुवा बळकट करण्याचा प्रयत्न आहे.''
- डॉ. रामकृष्ण मुळे, अध्यक्ष, श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट, बंगलोर
---------------
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः ssiast.com
संपर्क ः डॉ. रामकृष्ण मुळे - 09342139075
---------------
छायाचित्रे - अमित गद्रे सरांच्या लॉग ईनला मुव्ह केलेली आहेत.
---------------

भेंडी निर्यातीसाठी बागांची तपासणी सुरु

शरद पवार यांच्या सुचनेनंतर गती; निर्यात सुरु होण्याची शक्‍यता

पुणे (प्रतिनिधी) ः युरोपसाठीच्या भेंडी निर्यातीवर स्वतःहून बंदी घालून तीन आठवडे गप्प बसलेल्या केंद्रीय कृषी विभागाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बंदीच्या परिणामांचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतर जाग आली आहे. श्री. पवार यांच्या सुचनेनंतर लगेचच केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून काटेकोर तपासणी करुन निर्यातक्षम प्लॉटची माहिती दिल्लीला पाठवणे सुरु झाले आहे. येत्या दोन दिवसात निर्यातीला हिरवा झेंडा मिळण्याची शक्‍यता आहे.

ऐन हंगामात निर्यात प्रक्रीयेत सुधारणा करण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने देशातील भेंडी युरोपला निर्यात करण्यास बंदी घातली. भेंडीच्या क्षेत्राची पाहणी करुन किडमुक्त पिकाची खात्री पटल्यानंतर निर्यातीला मान्यता दिली जाईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दोन तीन आठवडे उलटूनही काहीही हालचाल झाली नाही. शेवटी बारामती व फलटण परिसरातील शेतकरी विश्‍वासराव जाचक, अरविंद निंबाळकर, संदीप शिंदे, अमोल परकाळे, ऍड. अभिजित पवार, हणमंत लोंढे आणि निर्यात कंपनी प्रतिनिधी सचिन यादव व विकास नागवडे यांनी श्री.पवार यांची दिल्लीत भेट घेवून या प्रश्‍नी तोडगा काढण्याची विनंती केली.

श्री. पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर केंद्रीय कृषी सचिव श्रीराज हुसेन व प्लॉंट क्वारंटाईनचे विभागाचे सहसचिव उत्पल सिंग यांच्याशी संपर्क साधला. हंगाम हातचा जावू नये यासाठी पिकाची पहाणी करुन निर्यात सुरु करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, निर्यातदारांना सुधारणेस थोडा वेळ द्यावा, अशा सुचना दिल्या. निर्यातदारांनी युरोपच्या निकषांचे आणि कृषी विभागाच्या एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर भेंडी उत्पादक शेतकरी, श्री. यादव व श्री. सिंग आणि हुसेन यांची कृषी भवनमध्ये बैठक झाली. प्लॉन्ट क्वारंटाईनची टिम लवकरच कार्यान्वित होईल, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिली.

यानंतर लगेचच निर्यातदारांनी अपेडाला दिलेल्या उत्पादकांच्या माहितीनुसार प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे अधिकारी बारामती व फलटनमध्ये दाखल झाले. गेल्या दोन तीन दिवसात या अधिकाऱ्यांनी विविध निर्यातदारांकडील भेंडीच्या क्षेत्राची पहाणी केली आहे. या पिक पहाणीचे अहवाल दिल्लीला पाठविण्यात येत असून निर्यातदार केंद्राच्या फायटो प्रमाणपत्रासाठीच्या ना हरकतीच्या प्रतिक्षेत आहेत. केबी एक्‍सपोर्टच्या तपासणी झालेल्या 40 पैकी तीन प्लॉट निर्यातीसाठी अपात्र तर 37 प्लॉट पात्र ठरल्याची माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक सचिन यादव यांनी दिली. फलटण व बारामती या दोन तालुक्‍यात सुमारे 600 एकर क्षेत्रावर भेंडीचे पिक घेण्यात येत आहे.

- पॅकहाऊस पातळीवर तपासणीची गरज
प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने फळमाशी मुक्त आंब्याची खात्री देण्यासाठी बॅकवर्ड लिंकेजमध्ये बागेच्या पातळीवरील उपाययोजना तर फॉरवर्ड लिंकेजमध्ये पॅक हाऊसच्या पातळीवर हॉट वॉटर ट्रिटमेंट बंधनकारक केली आहे. भेंडीच्या बाबतीत मात्र फक्त बॅकवर्ड लिंकेजमध्येच पिकातील किडींची पाहणी करण्यात येत आहे. हे करताना फॉरवर्ड लिंकेजचा महत्वाचा भाग असलेल्या पॅक हाऊस पातळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आंब्याप्रमाणेच भेंडीचीही पॅक हाऊस पातळीवर थ्रीप्समुक्त असल्याची खात्री केल्यास बंदीचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
------------(समाप्त)-----------

यवतमाळ डाळींब प्रशिक्षण

पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), यवतमाळ व अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे (डाळिंब संघ) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता.26) यवतमाळ येथील गुरुदेव मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय डाळींब पिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. डाळींब संघाचे अध्यक्ष अरुण देवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

आमदार लमदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, विभागिय कृषी सहसंचालक शु.रा. सरदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व मोडनिंब (सोलापूर) येथिल कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत कुंभार हे यावेळी डाळींब लागवडीपासून फळ विक्रीपर्यंतच्या सर्व बाबींवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा व डाळिंब संघामार्फत करण्यात आले आहे.
--------------