Friday, May 13, 2016

मॉन्सून मंगळवारपर्यंत अंदमानात

आगमनास स्थिती अनुकूल, ५ दिवस जलद वाटचाल

- विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुढील तीन चार दिवसात इशान्य, पश्चिम व मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा पुन्हा उसळी मारण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने शनिवार, रविवार व सोमवारी (ता. १४ ते १६) विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा व राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भातील कमाल तापमानात लक्षणिय वाढ होवून पारा ४४ अंशापार गेला. दिवसभरात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नागपूरमध्ये ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन तीन दिवसात यात आणखी वाढ होण्याचा इशारा आहे. १४ व १५ मे दरम्यान राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून १६ मे पासून पुन्हा गडगडाटी, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) - हिंदी महासागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) भारतीय उपखंडाकडे वेगाने झेपावले असून मंगळवारपर्यंत (ता.१६) ते अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसात निकोबार बेटे, दक्षिण अंदमानचा समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मॉन्सून पोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा सर्वसाधारण वेळेहून ५ दिवस जलद होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. अंदमानपाठोपाठ २५ मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल होतो. मॉन्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखा व त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता येत्या ७ ते १५ जून दरम्यान मॉन्सून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मध्य प्रदेश, विदर्भा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. उपसागराच्या दक्षिण भागात चक्राकार वारे सक्रीय असून शनिवारी या वाऱ्यांची तिव्रता वाढू कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होवून व रविवारी (ता.१५) त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या आगमनासाठी ही अनुकूल स्थिती असतानाच मध्य भारतात पुन्हा एकता उष्णतेचा भडका उडाला आहे. कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी गाठली असून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मॉन्सूनच्या देशांतर्गत वाटचालीलाही वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३३.८, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, पणजी ३४.६, डहाणू ३४.६, पुणे ३८.७, जळगाव ४४, कोल्हापूर ३९, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.२, सांगली ४०.५, सातारा ३९, सोलापूर ४०.५, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३, नांदेड ४२.५, अकोला ४३.६, अमरावती ३७.४, बुलडाणा ४०.५, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.४, नागपूर ४४.१, वाशिम ३८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.४
------------------- 

No comments:

Post a Comment