Friday, May 13, 2016

मॉन्सून मंगळवारपर्यंत अंदमानात

आगमनास स्थिती अनुकूल, ५ दिवस जलद वाटचाल

- विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुढील तीन चार दिवसात इशान्य, पश्चिम व मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा पुन्हा उसळी मारण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने शनिवार, रविवार व सोमवारी (ता. १४ ते १६) विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा व राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भातील कमाल तापमानात लक्षणिय वाढ होवून पारा ४४ अंशापार गेला. दिवसभरात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नागपूरमध्ये ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन तीन दिवसात यात आणखी वाढ होण्याचा इशारा आहे. १४ व १५ मे दरम्यान राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून १६ मे पासून पुन्हा गडगडाटी, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) - हिंदी महासागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) भारतीय उपखंडाकडे वेगाने झेपावले असून मंगळवारपर्यंत (ता.१६) ते अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसात निकोबार बेटे, दक्षिण अंदमानचा समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मॉन्सून पोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा सर्वसाधारण वेळेहून ५ दिवस जलद होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. अंदमानपाठोपाठ २५ मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल होतो. मॉन्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखा व त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता येत्या ७ ते १५ जून दरम्यान मॉन्सून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मध्य प्रदेश, विदर्भा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. उपसागराच्या दक्षिण भागात चक्राकार वारे सक्रीय असून शनिवारी या वाऱ्यांची तिव्रता वाढू कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होवून व रविवारी (ता.१५) त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या आगमनासाठी ही अनुकूल स्थिती असतानाच मध्य भारतात पुन्हा एकता उष्णतेचा भडका उडाला आहे. कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी गाठली असून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मॉन्सूनच्या देशांतर्गत वाटचालीलाही वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३३.८, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, पणजी ३४.६, डहाणू ३४.६, पुणे ३८.७, जळगाव ४४, कोल्हापूर ३९, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.२, सांगली ४०.५, सातारा ३९, सोलापूर ४०.५, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३, नांदेड ४२.५, अकोला ४३.६, अमरावती ३७.४, बुलडाणा ४०.५, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.४, नागपूर ४४.१, वाशिम ३८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.४
------------------- 

Tuesday, May 10, 2016

गारपिटीचे सावट निवळले



शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

- मृगाआधी रोहिणी बरसणार ?
मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीसाठी सर्वोत्तम समजला जातो. तर त्याआधीच्या रोहिनी नक्षत्रावर पडलेला पाऊस हा पेरणीपूर्व मशागतींसाठी सर्वोत्तम समजला जातो. रोहिणीच्या पावसावर मशागत आणि मृगाच्या पावसावर पेरणी असे खेडोपाडी समिकरण आहे. अद्याप रोहीणी सुरु होण्यास दहा पंधरा दिवसाचा कालावधी बाकी असला तरी सध्या राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेला पाऊस रोहिणीसारखाच असल्याचे अनुभवास येत आहे. बदलत्या ऋतूमानानुसार रोहिणीचा पाऊस मागेपुढे होवू शकतो, त्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याचे अंदाज... यानुसार सध्याचा पाऊस रोहिणीचाच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत असून सध्याची स्थिती पाहता मृग चांगला बरसेल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे (प्रतिनिधी) - मध्य महाराष्ट्रावरील चक्राकार वारे ओसरल्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील गारपिटीचे सावट निवळले आहे. मात्र या दोन्ही विभागांसह विदर्भातही मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने गुरुवारपर्यंत (ता.१२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात व त्यानंतर पुढची दोन दिवस फक्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळे वारे व मेघगर्जेनेसह पाऊस पडला. तुरळक ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर ढगांच्या प्रमाणात घट झाली. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद व महाबळेश्वर येथे प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पुणे, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्विप बेटे, मालदिव परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या सिस्टिमच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागरात विश्ववृत्ताजवळ शुक्रवारपर्यंत (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या दोन्ही हवामान स्थितींच्या प्रभावामुळे हिंदी महासागरातील मॉन्सूनच्या वाटचालीला बळ मिळण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३४, अलिबाग ३२.४, रत्नागिरी ३३.४, पणजी ३५, डहाणू ३४.७, पुणे ३८.७, जळगाव ४२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३, मालेगाव ४१, नाशिक ३८, सांगली ४०, सातारा ३९.९, सोलापूर ४१.९, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३७.९, परभणी ४१.२, नांदेड ४०, अकोला ३९.७, अमरावती ३९, बुलडाणा ३९, ब्रम्हपुरी ४१.३, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.६, नागपूर ४१.७, वाशिम ३६.६, वर्धा ४०.९, यवतमाळ ३९.२
-------------------- 

Thursday, April 21, 2016

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा


रात्रीचा उष्माही कायम

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. विदर्भात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झालेली असून शुक्रवारी (ता.२२) काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झाल्याने मराठवाड्‍यातही उन्हाचा कडाका जोरदार राहण्याची चिन्हे आहेत.

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानाचा पारा वाढलेला असतानाच किमान तापमानातही सरासरीहून पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रात्रही उष्ण झाली आहे. संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येत आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून पाच अंश सेल्सिअसने उंचावले आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झालेली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पुन्हा उष्णनेने लाही लाही अशी होरपळवणारी स्थिती अनुभवास येत आहे.

दरम्यान, इशान्येकडील आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात गुवाहाटीला १३० मिलीमिटर तर चेरापुंजीला ५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे या भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच अंशांनी घट झाली आहे. विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हिंदी महासागरात विश्ववृत्तीया भाग व लगतच्या अरबी समुद्राच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३१ (२५), भिरा ३९ (२२), डहाणू ३४ (२५), पणजी ३४ (२७), हर्णे ३२ (२५), कुलाबा ३१ (२६), सांताक्रुझ ३३ (२५), रत्नागिरी ३२ (२६), जळगाव ४३ (२७), जेऊर ४२ (२६), महाबळेश्वर ३३ (२२), मालेगाव ४४ (२७), नाशिक ४० (२३), पुणे ४० (२३), सांगली ४१ (२४), सातारा ४० (२५), सोलापूर ४४ (३०), नांदेड ४५ (३१), उस्मानाबाद ४२ (२६), परभणी ४५ (३१), अकोला ४५ (३०), अमरावती ४३ (२८), ब्रम्हपुरी ४४ (२९), बुलडाणा ४२ (२९), चंद्रपूर ४४ (३०), नागपूर ४४ (२८), वर्धा ४५ (२९), यवतमाळ ४३ (२७)
------------------ 

Thursday, April 14, 2016

विदर्भात उष्‍णतेच्या लाटेचा इशारा

शुक्रवार, शनिवार तापदायक; आद्रतेतही मोठी घसरण

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भ व मराठवाड्यात शुक्रवार (ता.१५) व शनिवारी (ता.१६) उन्हाची ताप लक्षणिय वाढून उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. उन्हाची लाहीलाही वाढतानाच सापेक्ष आद्रतेत सरासरीच्या दहा टक्क्यांहून अधिक घट झाल्याने उष्णतेच्या लाटेच्या झळा अधिक तिव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१८) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीच्या पातळीहून ९०० मिटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. याव्यतिरिक्त वाऱ्यांची हालचाल मंद असून उन्हाची तिरिप अधिक तिव्र झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. कोकणात भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपार गेला आहे. विदर्भ व मराठवाड्यात अनेक ठिकाणी सापेक्ष आद्रतेत लक्षणिय घट झाली. उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी २५ टक्के सापेक्ष आद्रतेची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी आद्रतेत सरासरीहून तब्बल १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कोकणात आद्रता पाच ते १७ टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, मध्य भारतात उष्णतेचा झटका वाढत असताना इशान्य भारतात आसाम, सिक्कमी, नागालॅन्ड, मनिपूर, मिझोरम, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात चेरापुंजी येथे तब्बल २१० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत भागात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण १० ते ४० मिलीमिटर दरम्यान होते. उपसागरात पश्चिम बंगालपासून बांग्लादेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुढील दोन दिवस या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता.१४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३१.८, सांताक्रुझ ३३, अलिबाग ३०.४, रत्नागिरी ३२.९, पणजी ३४.२, डहाणू ३३.३, भिरा ४३.५, पुणे ३९.८, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.९, मालेगाव ४२, नाशिक ३८.६, सांगली ४०.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.७, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३९.५, परभणी ४२.५, नांदेड ४२.५, अकोला ४१.५, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०, नागपूर ४२, वाशिम ३८.२, वर्धा ४२, यवतमाळ ४१.२

Friday, March 18, 2016

डॉ. दादाभाऊ यादव - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. यानंतरच्या पुरक अर्थसंकल्पात आणखी २५ ते ३० टक्के रक्कम वाढवली तर योग्य न्याय मिळू शकतो. सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारसाठीचे अनुदान अपुरे आहे. कृषी प्रक्रियेसाठीच्या २५ टक्के अनुदानामुळे क्लस्टर विकसित होवून रोजगाराचे चांगले साधन मिळेल. पिक विमा योजना निधी, हवामान केंद्र या चांगल्या तरतूदी आहे. नाबार्डच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, गोसंवर्धनशाळा या व इतर शेतीपुरक व्यवसायांना अधिक चालना द्यायला हवी. स्मार्ट गाव योजनेत अति दुर्गम भागातील गावांमध्ये रस्ते, बॅंका व आठवडे बाजार सुविधा निर्मितीवर भर द्यायला हवा. येत्या हंगामाच्या दृष्टीने तेलबिया व कडधान्य उत्पादनाच्या दृष्टीने असलेली तरतूद दुप्पट करायला हवी. कृषीपंप ग्राहकांना विज दरात सवलत आहे, पण त्याबाबतची व्यवस्था सुधारणेची गरज आहे. विजेची कार्यक्षमता ३०-४० टक्के आहे. शेतीच्या पाण्याची कार्यक्षमताही ३० ते ४० टक्केच आहे. ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. शेती व पिण्यासाठीच्या पाण्यासाठी तात्पुरती योजना करण्याऐवजी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित आहे. कृषी गुरुकुलची तरतूद वाढवायला हवी. सेंद्रीय शेती, पुरस्कार, कृषी महोत्सव यासाठी चांगली तरतूद आहे. सलग दुष्काळांमुळे कृषीचा विकासदर कमी आहे. दुष्काळ, गारपीट, बदलते हवामान याला सामोरे जाण्यासाठी संशोधन व विस्तार महत्वाचा आहे. मात्र अर्थसंकल्पात संशोधन व विस्तारासाठी अर्थसंकल्पात तरतूद दिसत नाही. पुरवणी अर्थसंकल्पात ती वाढून मिळायला हवी.
- दादाभाऊ यादव, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी 

सुनिल पवार - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

उपयुक्त तरतुदी
या अर्थसंकल्पाप्रमाणे संबंधित बाबींवर प्रत्यक्षात खर्च झाला, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वोत्तम काम या वर्षात होऊ शकते. कृषीसाठी २५ हजार कोटी ही मोठी तरतूद आहे. पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. फळबागांमध्ये त्याबाबत चांगले काम झाले आहे. आता विम्यासाठीची तरतूद समाधानकारक आहे. प्रक्रिया उद्योगाला यंत्रसामग्रीसाठी कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान वाइन व बेदाणा उद्योगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. पण ते फक्त २५ टक्के आहे. ठिबक सिंचनासाठी भरिव तरतूद झाल्याने तीन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली निघून फळबागांपलीकडे ऊस व इतर पिकांनाही त्याचा थेट चांगला लाभ होईल. निर्यात व पायाभूत गोष्टींसाठी कमी तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघांचे संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.   

डॉ. शंकरराव मगर - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

केंद्राचा अर्थसंकल्प व राज्याचा अर्थसंकल्प यात खूपच साम्य आहे. मोठ्या आशा निर्माण करायच्या आणि शेंडीला तूप लावल्यासारखी तरतूद करायची, असा प्रकार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहे. आत्महत्या वाढत आहेत. आणि एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता तुटपुंजी रक्कम असूनही शेतकऱ्यांना अर्पण आणि स्वाभिमान वर्षाचे कौतुक सांगतात, ते शेतकऱ्यांना काय कामाचे. उड्डाण पूल, रस्त्यांना प्रचंड तरतूद केली आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता एखादे वर्षे रस्त्यांची कामे थांबवून पूर्ण क्षमतेनिशी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असता, तर बिघडले असते का?

जलसिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवारसाठीची तरतूद फारच कमी आहे. साठवण व प्रक्रिया या चांगल्या विषयाला हात घालता असला, तरी याविषयीच्या तरतुदीविषयी व निकषांविषयी संधिग्धता आहे. यात अन्नधान्य व कडधान्यावर जोर देणे आवश्यक आहे. विम्याची तरतूद त्या मानाने चांगली आहे. मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप म्हणतात आणि फक्त २५ टक्के अनुदान हे कमीच आहे. मत्स्य व्यवसायातून सरकार सहा हजार कोटी रुपये कर कमावतेय आणि त्यासाठी फक्त १५० कोटी ठेवलेत. मत्स्य विद्यापीठाचा प्रस्तावही गुंडाळण्यात आलाय. सेंद्रिय शेतीसाठी बजेट ठेवलेले नाही, पण उल्लेख केला हेही चांगले झाले. ग्रामीण विभागाकडे बारिक लक्ष दिलेय ही त्यातल्या त्यात चांगली बाब आहे.
- डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परिक्षा सुरु

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सुमारे १३५० जागांसाठीची सामायिक प्रवेश परिक्षा नुकतिच सुरु झाली आहे. कृषी, फलोत्पादनसह वेगवेगळ्या १० विद्याशाखांसाठी राज्यातील १४ केंद्रांवर ही परिक्षा होत असून तब्बल १५ हजार ३२७ विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. यातील सर्वाधीक प्रतिसादाची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश परिक्षा रविवारी (ता.२०) होणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत येत्या १० एप्रिलला निकाल जाहिर होणार आहे.

पुणे, अकोला, नागपूर, परभणी, दापोली (रत्नागिरी), राहुरी (नगर), कोल्हापूर, धुळे, लातूर, बदनापूर (जालना), यवतमाळ, कराड (सातारा), अंबेजोगाई (बीड) व सोनापूर (गडचिरोली) या ठिकाणच्‍या कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश परिक्षा सुरु आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष परिक्षा घेण्यापर्यंत आणि पुढे निकालापर्यंत प्रत्येक पातळीवर गोपनियता पाळण्यात आली असून निरिक्षकांच्या देखरेखीखाली प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही होत आहे. प्रवेश अर्ज व पुढे निकालाचीही सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरवर्तन कोणत्याही पातळीवर होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी सांगितले.

- चौकट
विद्याशाखानिहाय परिक्षांना बसणारे विद्यार्थी
कृषी - ९०१८, फलोत्पादन - २५४४, कृषी व्यवसाय व्यवस्थापन - १६७२, कृषी जैवतंत्रज्ञान - ७१५, अन्न तंत्रज्ञान - ३९७, काढणी पश्चित तंत्रज्ञान - ३९६, कृषी अभियांत्रिकी - २९४, वनिकी - २२२, मत्स्यविज्ञान - ५३, गृह विज्ञान - १६

- चौकट
चार महिने अगोदरच परिक्षा
आत्तापर्यंत पदवीचे अंतिम निकाल लागल्यानंतर जुलै मध्ये पदव्युत्तर पदवीची प्रवेश परिक्षा होत होती. यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडून अभ्यासक्रम सुरु होण्यास सप्टेंबर उजाडत होता. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास फार थोडा कालावधी हाती राहत होता. ही तृटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळाने यंदा प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या धर्तीवर (आयसीएआर) निकाल लागण्यापुर्वीच प्रवेश परिक्षा घेतली आहे. या परिक्षेचा निकालही पदवीच्या निकालाआधीच जाहिर होणार आहे. पदवीचे निकाल लागल्यानंतर मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पार पडून जून मध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना सुरवात होईल, असा प्रयत्न आहे.

- कोट
‘‘नेहमीपेक्षा चार महिने आधी प्रवेश परिक्षा घेण्यास परभणीतील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. पण ही परिक्षा वेळेत होण्याची गरज आणि महत्व सांगितल्यावर त्यांनाही ते मान्य झाले. पदवीचे आठवे सत्र कार्यानुभवाचे आहे. फक्त प्रॅक्टिकल आहे, थिअरी नाही. त्यामुळे विनाकारण परिक्षा लांबवण्यात अर्थ नव्हता. परिक्षा लवकर घेतल्याने आता पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांचा मोठा फायदा होणार आहे.’’
- डॉ. आर. के. रहाणे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळ, पुणे
------------------------ 

Thursday, March 17, 2016

हेमंत ढोमे - अॅग्रोवन भेट

पुणे, ता.१७ ः राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी उत्तम शेती करत आहेत. ॲग्रोवनमधून अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असतात. मात्र प्रसिद्धी माध्यमांबरोबरच चित्रपटांमधूनही शेतीतील नायक समाजासमोर यायला हवेत, असे मत चित्रपट अभिनेता, लेखक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केले. पोस्टर गर्ल या चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर श्री. ढोमे यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ढोमे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सकाळ माध्यम समुह, ॲग्रोवन करत असलेले काम खूपच परिणामकारक आहे. हे काम मी जवळून पाहीले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे नैराश्य व स्री भृण हत्या या विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्टर गर्ल या चित्रपटाची कथा-पटकथा लिहीताना ॲग्रोवन डोळ्यांसमोर होता. बहुतेक चित्रपटांमधून शेतकऱ्यांचे चित्र एक तर नकारात्मक रेखाटले जाते. दारिद्र्य, आत्महत्या, गावाकडचे विनोद एवढ्यापुरतेच ते मर्यादित असते. या पलिकडे जावून शेतीकडे चला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेवून शेती व शेतकरी विषयक आणखी विषय व चित्रपट पुढे येतील, अशी आशा आहे.

गावाकडील झगमगाटीला विकास म्हटले जातेय. खेडोपाडीही काळानुरुप बदल हवा. या बदलात शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. गावात शेती अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. हा खरा विकास म्हणता येईल, असेही ढोमे म्हणाले. चित्रपट सृष्टीचा शेती व शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, व्यवसायिक स्थिती व स्पर्धा, चित्रपट निर्मितीत मोठी वाढ झाली असली तर गुणवत्तेत होत असलेली घसरण, राजकारण ते गटतट आदी विषयांबाबत त्यांने ॲग्रोवनच्या संपादकीय विभागाशी मनसोक्त गप्पा मारल्या. ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी श्री. ढोमे यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.
------------------- 

विदर्भात पावसाचा अंदाज कायम



पुणे (प्रतिनिधी) - शुक्रवारी (ता.१८) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात ठिकठिकाणी सुरु असलेला हलका पाऊस व ढगाळ हवामानमुळे कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे सर्वात कमी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोदविण्यात आले.

गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२ (२३.७), अलिबाग ३१.५ (२१.६), रत्नागिरी ३०.२ (१९.६), पणजी ३२.५ (२१.७), डहाणू ३०.४ (२१.९), भिरा ३८.२ (१६.५), पुणे ३५.१ (१६.७), नगर (१६.६), जळगाव ३६.५ (१८.२), कोल्हापूर ३३ (१८.३), कोल्हापूर ३३ (१८.३), महाबळेश्वर २९.६ (१६.२), मालेगाव ३८.२ (२०.६), नाशिक ३५.४ (१७.७), सांगली ३४.५ (१८.५), सातारा ३५.१ (१७.५), सोलापूर ३८.४ (२२.१), उस्मानाबाद ३६.२ (१८.८), औरंगाबाद ३६ (१८.८), परभणी ३७.४ (२२.६), नांदेड ३७.५ (२५), अकोला ३७.६ (२४.६), अमरावती ३५.४ (२२.४), बुलडाणा ३५ (२२.२), ब्रम्हपुरी ३४.१ (२३.३), चंद्रपूर ३५.८ (२५.४), गोंदिया ३३.२ (२०.५), नागपूर ३४.४ (२०.५), वाशिम ३३.८, वर्धा ३४.८ (२२.६), यवतमाळ ३४ (२२.८)
------------------ 

Wednesday, March 16, 2016

डाळिंब संघाचे वार्षिक अधिवेशन - 26 ते 28 मार्च



पुणे - अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधक संघाचे वार्षिक अधिवेशन येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान जैन हिल्स (जि.जळगाव) येथे होणार आहे. यानिमित्ताने अधिवेशनस्थळी राष्ट्रीय डाळिंब परिसंवाद आणि प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, कृषीमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जैन इरिगेशनचे अशोक जैन, राज्य व देशातील प्रमुख कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, केंद्रीय पातळीवरील अधिकारी परिसंवादास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशातील डाळिंब पिकसंबंधीचे प्रमुख शास्त्रज्ञ यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद सशुल्क आहे. राज्यातील अधिकाधिक डाळींब उत्पादकांनी या परिसंवाद व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - मारुती बोराटे ७५८८५९२८९१
------------------

औषधी वनस्पती प्रदर्शन



पुणे - इको फ्रेन्डली फ्लोरा नर्सरीमार्फत जैवविविधता जतन व संवर्धनासाठी देशभरातील ३०० हून अधिक औषधी, आयुर्वेदिक वनस्पती व १०० हून अधिक देशी विदेशी फळ झाडांच्या प्रजातींचे वृक्षप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जुन्या पुणे -मुंबई महामार्गावरील परंदवाडी (सोमाटणे फाटा) येथे येत्या १८ ते ३१ मार्चदरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळात हे प्रदर्शन निशुल्क सुरु राहणार आहे. आयुर्वेद, युनानी, होमीयोपॅथी, फार्मासी, कृषी, वनस्पतीशास्त्र या क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी, औषधी कंपन्या, वृक्ष व पर्यावरण प्रेमींसाठी हे वृक्षप्रदर्शन उपयुक्त ठरु शकते. अधिक माहितीसाठी संपर्क - ९२२५१०४३८४
-------------------

पोस्टऑल - थेट शेतमाल विक्री पोर्टल

शेतमालाच्या थेट विक्रीसाठी
मोफत ऑनलाईन पोर्टल

आयटीतील तरुणाचा उपक्रम, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांना शेतमालाची ऑनलाईन पद्धतीने थेट विक्री करणे सोपे व्हावे, यासाठी पुण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेल्या निरंजन माने या तरुणाने मोफत खरेदी विक्री संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. शेतकरी व खरेदीदार या दोघांसाठीही त्यांचे www.postall.in हे संकेतस्थळ उपयुक्त ठरत आहे. माने यांच्याबरोबरच राज्यात ठिकठिकाणी आयटी क्षेत्रातील तरुणांनी शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची मोफत सेवा पुरविण्यास सुरवात केली अाहे. इंटरनेटवर यासाठी विविध प्रकारची संकेतस्थळे सुरु झाली आहेत.

निरंजन माने हे लातूर जिल्ह्यातील वाकसा (ता.निलंगा) गावचे मुळ रहिवासी आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात पदवी संपादन केल्यानंतर ते पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. योग्य बाजारभावाअभावी शेतकऱ्याचे कष्ट व शेतमालाची बाजारात होणारी अवहेलना पाहिलेल्या माने यांनी त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विकता यावा यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. यात सध्या द्राक्ष व डाळींब उत्पादक शेतकरी आघाडीवर आहेत. शेतीतील व शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची उत्पादने खरेदी विक्री करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्याने त्याच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेतमालाची माहिती, त्याला अपेक्षित किमतीसह संकेतस्थळावर जाहिरातीच्या स्वरुपात प्रसिद्ध करावी लागते. शहरी ग्राहक, व्यापारी यांनाही या त्यांच्या गरजेनुसार शेतमाल आवश्यकतेची व अपेक्षित दराची जाहिरात प्रसिद्ध करता येते. त्यानुसार खरेदीदार व शेतकरी यांच्यात एकमेकांच्या सहमतीने, सोईने पुढचे व्यवहार होतात. संकेतस्थळाची भुमिका फक्त दोघांची गाठ घालून देण्याची आहे. जुन्या नव्या वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सध्या देशभर अग्रेसर असलेल्या व जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या एका लोकप्रिय संकेतस्थळापासून प्रेरणा घेवून माने यांनी हे संकेतस्थळ बनवले आहे.

- कोट
‘‘पोस्टऑल हे संकेतस्थळ शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही सोईसाठी तयार केले आहे. ही सुविधा मोफत आहे. यात माझा कोणताही व्यवसाईक हेतू नाही. तसं झालं तर मग माझ्यात आणि दलालांत काय फरक राहीला. मला दलाल व्हायचं नाही. माहिती तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करुन द्यायचा आहे. म्हणून हे संकेतस्थळ तयार केले आहे.’’
- निरंजन माने 

अशोक डोंगरे, संगमनेर - पोल्ट्री यशोगाथा

कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्रीने दाखवला
शाश्वत विकासाचा महामार्ग
----------------
अत्यल्पभुधारणा आणि पाणी टंचाई यामुळे निमज (संगमनेर, नगर) येथिल एका तरुणाने बी कॉम झाल्यावर नोकरीचा मार्ग स्विकारला. अनेक ठिकाणी काम केले. बॅकेत काम करुनही आर्थिक गणित तोट्याचेच राहीले. बॅंक बुडाल्यावर नोकरी गेली आणि मग शेती पुरक व्यवसायात उडी घेतली. उत्पादन, गुणवत्ता आणि अर्थकारणात मजल एवढी मारली की पोल्ट्री व्यवसायातील कंपन्या व शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरले आहेत. पोल्ट्रीतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळवलेले श्री. अशोक व सौ. विमल डोंगरे यांची ही यशोगाथा...
----------------
एकत्र कुटुंब होतं. शेतीत फारसा काही अर्थ नव्हता. यामुळं 1989 साली पदवीधर झाल्याबरोबर अशोक डोंगरे यांनी नोकरी करायला सुरवात केली. पीडब्लूडीमध्ये कंत्राटदाराच्या हाताखाली मुकादम म्हणून पुलांची, रस्त्यांची कामं केली. सिन्नर येथिल बिडी उद्योगात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. यानंतर 1993 पासून संगमनेरमधील बी.जे.खताळ जनता सहकारी बॅंकेत कर्ज विभागात क्लर्क म्हणून काम करायला सुरवात केली. तिघे भाऊ आणि आई वडील 2003 पर्यंत कुटुंब एकत्र होतं. मधला भाऊ सर्व शेती पहायचा. गहू, बाजरी, भुईमुग, घास अशी पिकं होती. पाच गाई, दोन बैल असायचे.

नोकरीतून फार काही हाती येत नसलं, महिन्याच्या शेवटी शिल्लक शुन्य असली तरी ती सोडून दुसरं काही करण्याचं धाडस नव्हतं. अशातच 2009 मध्ये बॅंक बुडाली. लिक्विडेशनमध्ये निघाली. नोकरी गेली. आता दुसऱ्या धंदा व्यवसायात हात पाय हलवल्याशिवाय पर्याय नव्हता. स्वतःला दुध काढता येत नव्हते, पत्निलाही शेतीकामाची सवय नव्हती. यामुळे दुग्धव्यवसायाचा पर्याय संपल्यात जमा होता. पर्याय म्हणून मग लहान कालवडी विकत घेवून त्या मोठ्या करुन खाली व्हायच्या वेळी विक्री करायची असा व्यवसाय सुरु केला. सुमारे 15 हजाराची कालवड दीड वर्ष सांभाळून 40 हजाराला जायची. पण तोपर्यंत ती जवळपास 15 हजाराचा चारा खायची. मिळायचे फक्त दहा हजार. चार पाच कालवडी सांभाळायचे, घासाची ओझी- उसाच्या मुळ्या डोक्यावर वहायच्या आणि दीड वर्षाचे उत्पन्न फक्त 40 हजार रुपये. बॅंकेत काम केलेल्या मानसासाठी हे अर्थकारण तापदायक होतं. मग करायचं काय...

तालुक्यातच गोडसेवाडी (धांदरफळ खुर्द) येथे मामांची (शांताराम गोडसे) सुमारे 25-30 वर्षे जुनी 22 हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री होती. ते यशस्वीपणे व्यवसाय करत होते. नंतर त्यांना जमेना. मग डोंगरे यांच्या मालदाड येथे शिक्षक असलेल्या लहान भावाने (रोहिदास डोंगरे) मामांची पोल्ट्री चालवायला घेतली. नोकरी करुन मोकळ्या वेळात ते पोल्ट्री पहायचे, भरपूर उत्पन्न भेटायचे. ते नोकरी पाहून करतात... मी तर मोकळाच आहे. मग मी का नाही करु शकत... असा विचार करुन पोल्ट्री चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचीच उभारायचा निर्णय घेतला आणि 2011 साली अशोकरावांनी आपल्या गिताप्रसाद पोल्ट्री फार्मचा श्रीगणेशा केला.

परिसरातील पोल्ट्री शेडला भेट दिली. पहाणी केली आणि त्यानुसार 10 गुंठे जागेवर 210 फुट लांब आणि 30 फुट रुंद असे 6300 चौरस फुटाचे बांधकाम सुरु केलं. साठवणूकीची खोली, शेजारी मोकळी जागा, गाड्या वळण्यासाठी जागा ठेवली. पाण्यासाठी 35,000 लिटरची टाकी उभारली. विहीरीतून त्यात पाणी आणायची सोय केली. तीन महिन्यात पोल्ट्री उभारली. सुमारे साडेनऊ लाख रुपये खर्च आला. इंडियन ओव्हरसिअर बॅंकेकडून पाच लाख रुपये कर्ज काढले आणि बाकीचे पैसे पाव्हण्या रावळ्यांकडून उभे केले. 2011 सालीच्या दसऱ्याला पोल्ट्री सुरु झाली. कुटुंबाची एकूण जमिनधारणा अडीच एकर असली तरी सर्व लक्ष 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीवर केंद्रीत केले. उर्वरीत जमिनीत 20 गुंठे ऊस आणि बाकी सर्व पडीक आहे. फक्त 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीने त्यांना यशाचा मार्ग दाखवला. गेली पाच वर्षे ते यशस्वीपणे करार पद्धतीने पोल्ट्री करत आहेत.

- उत्पादन खर्च
पिल्ले, खाद्य, औषधे, डॉक्टर, सुपरव्हिजन, वाहतूक हा सर्व खर्च कंपनी करते. त्याची मर्यादा ठरलेली असते. पिल्लू 18 रुपये, खाद्य 30 रुपये किलो, औषधांचा खर्च प्रत्यक्ष होईल तो, सुपरव्हिजनचे प्रति किलो दोन रुपये धरतात. प्रति किलो 64 रुपये उत्पादन खर्च कंपनीने निश्चित केलेला आहे. त्यापेक्षा कमी खर्चात वजन मिळवले तर त्यासाठी त्या पटीत इनसेन्टिव्ह मिळतो. मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन खर्च झाल्यास दंड आकारला जातो. प्रति किलो 4 रुपये 70 पैसे हे निश्चित संगोपन शुल्क (रेअरिंग चार्ज) आहे. डोंगरे कमी दिवसात, सुदृढ, निरोगी पक्षी तयार करत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च कंपनीच्या मर्यादेहून दहा ते पंधरा रुपये कमी येतो आणि त्यामुळे त्यांना अनेकदा निर्धारीत संगोपन शुल्काहून दुप्पट दर मिळतो.

यातिरिक्त पक्षांखाली टाकण्यासाठीचे भाताचे तुस (एका बॅचला 1.250 टन, सुमारे 6 हजार रुपये), वीज (एका बॅचला सुमारे तीन हजार रुपये), पाणी (35 हजार लिटरची टाकी आहे, ती 15 दिवस पुरते. दररोज 2000 लिटर पाणी लागते), कागदाची रद्दी, चुना, कोळसा, साखर आदींसाठी सुमारे 5000 रुपये खर्च येतो. बाहेरचे मजूर घेत नाहीत. पतीपत्नी आणि मुलं सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास असे दिवसभरात फक्त तीन तास काम करतात. सर्व बाबींचा खर्च विचारात घेतला तरी तो सुमारे 18 ते 20 हजार रुपये येतो.

- नफ्याचे... गणित फायद्याचे

डोंगरे यांनी पहिल्याच वर्षी भरघोस उत्पादनासह सात बॅच यशस्वीपणे काढल्या. कंपनीचा तीन ग्रॅम सोन्याच्या अंगठीसहचा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार त्यांना मिळाला. सरासरी ते वर्षाला सहा बॅच काढतात. एका बॅचला 50 हजार ते एक लाख रुपयांदरम्यान उत्पन्न मिळते. प्रति बॅच उत्पन्नाची सरासरी सुमारे 70 हजार रुपये आहे. वर्षाला सुमारे साडेतीन चे चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
चार हजार रुपये प्रति ट्रॉली याप्रमाणे त्याची विक्री करतात. त्यापासून प्रत्येक बॅचला सुमारे 17,200 रुपये उत्पन्न मिळते. एका बॅचला सुमारे 300 गोणी खाद्य लागते. खाद्याच्या रिकाम्या पिशव्या प्रति पिशवी सात रुपये या होलसेल दराने विकतात. त्यातूनही सुमारे दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. याशिवाय भांड्यांमध्ये व फोडलेल्या गोणींमध्ये राहीलेले खाद्य संगमनेर बाजारात विकूनही काही उत्पन्न मिळते. या सर्वातून त्या बॅचचा सर्व उत्पादन खर्च वसूल होतो आणि कंपनीकडून मिळालेले संगोपन शिल्क निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहते.

- सर्व श्रेय मार्गदर्शकाला

डोंगरे यांनी पोल्ट्री सुरु केली तेव्हा सर्वप्रथम सगुणा पोल्ट्री सोबत करार केला. सुगुणाचे त्या भागाचे तत्कालिन पोल्ट्री वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र गोरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉ. गोरेंनी पोल्ट्रीतले सर्व बारकावे शिकवले. त्यांच्यामुळे कमीत कमी दिवसात सर्वोच्च गुणवत्ता व वजन मिळवायला शिकलो, त्यांनी मोठ्या भावासारखं मार्गदर्शन केलं म्हणून यशाचं सुत्र सापडलं, असं डोंगरे आवर्जून सांगतात. पुढे डॉ. गोरे यांची पदोन्नतीने बदली झाली. ते याच भागात कायम रहावेत म्हणून डोंगरेंनी प्रयत्न केले पण यश आले नाही. शेवटी ते नाहीत म्हणून डोंगरेंनी सगुणाची साथ सोडून इतर कंपन्यांशी करार केला. अजूनही काही अडचण आल्यास डॉ. गोरे दुरध्वनीवरुन त्यांना मार्गदर्शन करतात.

- डोंगरे कुटुंबाचा दिनक्रम
दररोज सकाळी 8 वाजता श्री व सौ. डोंगरे घरापासून पाचशे मिटरवर असलेल्या पोल्ट्रीकडे जातात. साडेनऊपर्यंत पक्षांना खाद्य, पाणी, तुसाची हालवाहालव आदी काम आवरतात आणि घरी येतात. यानंतर सौ. डोंगरे स्वयंपाक, मुलांच्या शाळेची आवराआवर करतात. तोपर्यंत श्री. डोंगरे गावात जावून तास दीड तास पतसंस्थेचा कारभार पाहून येतात. गावच्या सरस्वती ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साडेअकरा बाराच्या सुमारास दोघं नवरा बायको सोबत जेवण करतात. यानंतर बाहेरची काही असतील किंवा कुठं जायचं असेल तर ते... नाही तर विश्रांती घेतात. संध्याकाळी 4 वाजता ते साडेपाच पर्यंत पुन्हा पोल्टीत काम करतात. साडेपाच वाजता पोल्ट्रीला कुलुप लावून घरी येतात. स्वयंपाक, एकत्रित जेवण, गप्पाटप्पा, मुलांचा अभ्यास आणि मग झोप. सकाळी दीड तास व संध्याकाळी दीड तास असे दिवसाला फक्त तीन तास काम करतात. हा दिनक्रम ठरलेला आहे.

- जगण्याचं, व्यवसायाचं रॉयल तत्वज्ञान
प्रत्येक माणसाची, कुटुंबाची कामाची आणि व्यवस्थापनाची एक क्षमता आणि मर्यादा ठरलेली असते. ती ओलांडण्याचा प्रयत्न केला तर कार्यक्षमता (इफिसियन्सी) कमी होते. विचार होता आणखी पोल्ट्री वाढवण्याचा... पण सर्व बाबींचा विचार करुन पाच चे दहा हजार पक्षी करण्यापेक्षा पाच हजार पक्षांपासून दहा हजार पक्षांएवढे उत्पन्न घेण्यावर भर दिला व ते साध्य केले.

अति कामाच्या किंवा पैशाच्या मागे लागून जगणं विसरण्यात अर्थ नसतो. शेवटी तुम्ही काम कशासाठी करता, कामासाठी की चांगले जगण्यासाठी. चांगलं जगायला आवश्यक तेवढा पैसा शाश्वतपणे येत असेल तर मग हव्यास कशाला. अनेक शेतकरी डेअरीला दररोज शंभर-दोनशे लिटर दुध घालतात, पण घरी चहाला दुध नसतं. त्यांना वेळेवर भाकर खाता येत नाही. ना मुलांना निट घडवता येत. मग ढोरमेहनत केल्याचा व जे काही कमवले त्या पैशाचा काय उपयोग. कामात, व्यवहारात, जगण्यात स्मार्टपणा हवा. आयुष्य एकदाच आहे. चांगलं खायचं, चांगलं रहायचं, चांगलं जगायचं. कामाच्या नादात जगणं विसरायचं नाही. अतीरेक करुन कुणासाठी कमवून ठेवायचं ?

मला पोल्ट्रीतून जे उत्पन्न मिळतंय ते शाश्वत आणि कुटुंबासाठी पुरेसे आहे. दोन मुले आहेत. मुलगा वैभव ( वय 18) कृषी पदविकेच्या पहिल्या वर्षात आहे. तर मुलगी पुनम ( वय 20) अभियांत्रिकी पदविकेच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यांना पुरेसा वेळ देतो. एखादे दिवशी पोल्ट्रीत जास्त काम असलं तर सर्व उरकल्यावर संगमनेरला हॉटेलमध्ये जेवायला जातो सर्वजण. दर वर्षी एका मोठ्या सहलीला जातो. राज्यातील सर्व प्रमुख देवस्थाने आणि प्रमुख पर्यंटन स्थळं फिरलो आहोत. गुजरात (सापुतारा), गोवा, कोकणात फिरलोय. यंदा परत कोकणात जाणार आहोत. जे काही करायचं ते कुटुंबासोबत. एकटा तर मी गावात जावून चहाही पित नाही... इति. अशोक डोंगरे

- व्यवसायिक यशाची सुत्रे...
1) पोल्ट्रीभोवती चेरी ची झाडे. ही झाडे बारमाही हिरवी असतात. त्यामुळे गारवा राहतो. ऊन थेट लागत नाही आणि झळाही बसत नाहीत. यामुळे शेडमधील जागेचा पक्षी पुरेपूर उपयोग करतात.
2) पिल्ले लहान असताना पहिले तीन दिवस पक्षांना बसू देत नाही. सारखे हलवत राहतो. यामुळे ती पाणी जास्त पितात व खाद्य जास्त खातात. लहानपणीच खाण्याची व पिण्याची सवय लागते. यामुळे त्यांचे वजन भराभर वाढते.
3) पहिले पाच सहा दिवस तापमान नियंत्रित करावं लागतं. कोळसा शेगडी वापरतो. पहिली आठ दिवस खूप काळजी घ्यावी लागते.
4) पक्षांखाली जमीनीवर एक इंच जाडीचा तुसाचा थर देतो. तो दररोज एकदा हलवतो. यामुळे वास येत नाही, आजार तयार होत नाही.
5) उष्णतेच्या प्रमाणानुसार वजन अपेक्षित असते. खूपच वजन झाले आणि उष्णता वाढली तर तयार झालेला पक्षी खावून मरतो. म्हणून उष्णता जास्त असल्यास खाद्यावर नियंत्रण ठेवतो. रात्री मुबलक खाद्य ठेवतो. दुपारी खाद्याची भांडी उंचावर घेतो.
6) पिण्याचे पाणी स्वच्छ हवे. भांडी वेळच्या वेळी साफ करायची. आत पाणी सांडू द्यायचे नाही. त्यामुळे तुस खराब होत नाही व वास येत नाही.
7) स्वच्छता खूप महत्वाची. ती राखली तर आजार येत नाही, आला तर ज्या पक्षाला बाधा होईल तो मरतोच. यामुळे आजार येवू नये म्हणूनच प्रयत्न करायचे. सरासरी 3 टक्के मर राहते.
8) कंपनीने निर्धारीत केलेल्या खर्चापेक्षा उत्पादन खर्च कमी राखतो. हवामानाची साथ आहे. आजूबाजूला बागायती क्षेत्र असल्याने हवामानाची साथ आहे. स्वच्छता, मेहनत, बारकाईने लक्ष असते. या सर्वांमुळे कंपनीच्या निर्धारीत उत्पादन खर्चाहून 10 ते 15 रुपये कमी खर्चात प्रतिकिलो उत्पादन घेतो. 50 ते 60 रुपये प्रतिकिलो उत्पादन खर्च येतो.
9) पक्षाच्या वयानुसार चार टप्प्यात चार प्रकारचे खाद्य देतो. पहिल्यांदा पीबीएस, त्यानंतर ग्रोअर, मग पॅलेट आणि सर्वात शेवटी फिनिशर असे खाद्य असते. या खाद्य बदलांच्या वेळी एक दिवस दोन प्रकारचे खाद्य मिक्स करुन चारतो. यामुळे पचनाला बाधा येत नाही.
10) कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन मिळवण्यावर कटाक्ष. 34 दिवसात 2100 ग्रॅम वजन होतेय. दोन किलोची साईज झाल्यावर कंपनी लगेच पक्षी उचलते. 30 दिवसांहून पुढे वजन जास्त वेगाने वाढते. सर्व लॉट 34 ते 37 दिवसातच उचलतात.

------------------------
- काही बॅचच्या अर्थकारणाचे नमुने
बॅच विक्री दिनांक --- पक्षी --- सरासरी वजन (किग्रॅ) --- एकूण वजन (किग्रॅ) --- प्रति किलो दर, रुपये (रेअरिंग चार्ज) --- एकूण उत्पन्न रुपये) --- कालावधी (दिवस)
24.11.2011 --- 5,870 --- 2.406 --- 13,420 --- 9.40 --- 81,881 --- 37
09.10.2012 --- 5,897 --- 2.600 --- 14,929 --- 7.04 --- 1,05,164 --- 44
02.03.2013 --- 4,733 --- 2.095 --- 9691 --- 6.50 --- 61,088 --- 40
23.11.2014 --- 6,428 --- 2.174 --- 13,633 --- 6.03 --- 80,916 --- 34
28.11.2015 --- 5,100 --- 2.085 --- 10,340 --- 9.10 --- 90,591 --- 32

- कमी दिवसात जास्त वजन
आठवडा --- कंपनीला अपेक्षित वजन (ग्रॅम) --- डोंगरेंच्या पक्षांच्या वजन (ग्रॅम)
पहिला --- 250 --- 300
दुसरा --- 950 --- 1035
तिसरा --- 1435 --- 1590
चौथा --- 1800 --- 2000
-----------
"पोल्ट्रीमुळं प्रगती झालीये. पूर्वी वर्षाला मिळायचे एवढे उत्पन्न आता महिन्यात घेतोय. मानसिक ताणतणाव नाहीत. आर्थिक अडचण नाही. मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु आहे. चांगल्या प्रकारे मनासारखं आयुष्य जगतोय. खरोखर सुखी आहोत."
- सौ. विमल डोंगरे

"बारा तेरा वर्षे नोकरी केली. आज उद्या उत्पन्न वाढेल या आशेने काम करत रहायचो. पण शिल्लक काहीच राहायचं नाही. ही सर्व वर्षे फुकट घालवली असं वाटतं कधी कधी. पोल्ट्रीसाठी पाच वर्षाच्या बोलीवर घेतलेले कर्ज सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तीन वर्षात फेडले. मनासारखं संपन्न जगतोय आता. बॅंक बंद पडली नसती तर आजही नोकरीच करत असतो. "
- श्री. अशोक डोंगरे
----------
संपर्क -
अशोक गणपत डोंगरे, मु. पो. निमज (खंडोबामळा), ता. संगमनेर, जि. नगर - 9922694671














Tuesday, March 15, 2016

काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास

जगणं समृद्ध करणारा रोमांचक प्रवास
-----------------------
महात्मा गांधी, स्वामी विकेकानंद आदी जग बदलणाऱ्या, लाखो लोकांच्या जिवनावर, जिवनपद्धतीवर प्रभाव पाडणाऱ्या मोठ्या लोकांमध्ये एक गोष्ट समान दिसते. त्यांनी आपापला देश सर्वप्रथम समजून घेतला. त्यासाठी ते देशभर फिरले. माती, माणसं, प्रदेश, रुढी, परंपरा, मानसिकता, जिवनपद्धती, सुख, दुःख, वारसा, वाटचाल, दृष्टीकोन, अपेक्षा हे सारं काही समजून घेतलं. आपापल्या कार्यक्षेत्राशी नाळ जोडली, एकरुप झाले. अनुभूतीतून आलेली समज, ज्ञानाच्या जोरावर पुढे इतिहास घडवला. माणसाच्या वैयक्तिक जडणघडणीत प्रवासाचा, त्यातून होणाऱ्या आकलनाचा, आत्माभुतीचा फार मोठा वाटा असतो. हे वैश्विक सुत्र समजून घेतले तर जयदिप शिंदे व संकेत देशमुख या पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायकलवर केलेल्या काश्मिर ते कन्याकुमारी या सायकल टूर चे महत्व अधिकच अधोरेखित होते. त्यांच्या २७ दिवसाच्या प्रेरणादायी मोहिमेचे त्यांच्याच शब्दात राहूल रायकर यांनी काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. पुण्यातील स्नेहल प्रकाशन ने ते प्रसिद्ध केले आहे. आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे...

- दहा वर्षे सायकलला हात लागला नसताना अचानक शाळेतल्या मित्रांनी पुणे ते महाबळेश्वर सायकल टूर ठरवली. भाड्याच्या सायकली घेवून निघाले पण पोचता पोचता तोंडाला फेस आला. दमलेल्या अवस्थेत एकानं पैज लावली... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलवर करिल त्याला पार्टी वगैरे.
- संकेत व जयदिप ने हे चॅलेंज स्विकारले आणि अतिशय थोड्या वेळात मोहीम आखली. तयारी म्हणजे काय... तर फक्त प्रवासाचा मार्ग व मुक्कामाची ठिकाणं ठरलेली. बाकी सारं नाविन्यच. येईल तो अनुभव घ्यायचा आणि चालत रहायचं हे सुत्र. जोडीला शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणविषयक जागृतीचाही अजेंडा हाती घेतला व राबवला.
- कोषातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक्ष क्षण नवा अनुभव देत होता. मंदीरं, शाळा, ढाबे, माणसं... त्या त्या भागाशी एकरुप होत मनाची, शरिराची क्षमता वाढवत मुक्त पाखरासारखा प्रवास.
- वाऱ्याची दिशा, रस्त्यावरील पांढऱ्या रंगाचे पट्टे यांचा सायकल चालवताना झालेल्या फायदा आणि ट्रेक, ट्रॅक्टरची साखळी धरुन जानाचा तोटा, अपघात काहीही आडपडदा न ठेवता सर्व अनुभवांचे संचित दिलखुलासपणे खुले केले आहे.
- एका दिवशी ६० ते ३०४ किलोमिटरपर्यंत प्रवास. सलग ३१ दिवसांची मोहीम २७ दिवसात पूर्ण केली. उद्दीष्ट ठरवणं आणि ते वेळेआधी पुर्ण करण्याची नशा, जिद्द, जिगर एकमेकाद्वितीय. स्वतःला उद्दीष्ट गाठण्याची, जिकण्याची सवय कशी लावावी, याचा उत्तम वस्तूपाठ.
- साहसी प्रवास, त्यातून येणारी अनुभूती, गाठीशी बांधला जाणारा अनुभव, त्यातून मिळणाऱ्या टिप्स... या सर्वातून प्रगल्भ होत जाणारं व्यक्तीमत्व हे सारं या पुस्तकात पहायला मिळतं.
-----------------------

Thursday, March 10, 2016

अॅग्रोवन पुरस्कार सोहळा सामवर

साम टिव्हीवर रविवारी
ॲग्रोवन स्मार्ट पुरस्कारांचा जल्लोष

पुणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामिण संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अस्सल गावरान दिमाखदार गीत, संगीत, नृत्यमय अविष्कारात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या गौरव सोहळा याची देही याची डोळा घरबसल्या अनुभवण्याची संधी राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. भरघोस रकमेसह शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारा हा सोहळा येत्या रविवारी (ता.१३) सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत साम टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी मध्यरात्री साडे बारा वाजता या कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण करण्यात येणार आहे.

चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले व नकुल घाणेकर नृत्य पथकाची एकाहून एक सरस, ठसकेबाज ग्रामिण, कृषी व लोकगितांवरील अदाकारी, अभिनेते योगेश शिरसाट व नम्रता संभेराव या जोडीची बतावणीची जुगलबंदी, हास्याचे धबधबे आणि कारुण्याची किनार आणि गायिका आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांची नादब्रम्ह जागवणारी, काळजाला हात घालणारी सुरेल मैफिल आणि त्यांना अनेक दिग्गजांची साथ अशा एकाहून एक सरस सादरीकरणांचा या सोहळ्यात समावेश आहे.

बिकट परिस्थितीशी झुंजून उज्वल यश मिळवलेल्या, शेतीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांना ॲग्रोवनमार्फत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात विलास शिंदे (नाशिक), कुसुमताई गव्हाळे (अकोला), मनीषा कुंजिर, कांतिलाल रणदिवे, रोहिदास डोके (पुणे), अभिजिक फाळके (वर्धा), मोहोम्मद गौस (परभणी), अंकुश पडवळे (सोलापूर), जगन्नाथ बोरकर (वाशीम), उद्धव खेडेकर (जालना), चैत्राम पवार (धुळे), सचिन चुरी (पालघर) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
-------------------

विदर्भात गारपिट, वावटळींचा इशारा



येत्या सोमवारपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने शनिवारी विदर्भाच्या तुरळक भागात गारांचा पाऊस व गडगडाटी वावटळ होण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा, शनिवारी (ता.१२) मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात तर कोकण, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा, रविवारी (ता.१३) मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा तर सोमवारी (ता.१४) विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पूर्व मध्य प्रदेश, लगतचा विदर्भ व छत्तिसगडवर समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी कोकण किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विदर्भावरील चक्राकार वाऱ्यांमुळे गारपीटीचा अंदाज आहे. दिवसभरात मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तर नाशिक येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तापमानात कोकणच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते.

गुरुवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२.२ (२२.५), अलिबाग ३०.९ (२१.४), रत्नागिरी ३३.७ (१९.३), पणजी ३३ (२३.४), डहाणू ३०.६ (२०.६), भिरा (१७), पुणे ३५.८ (१६.५), नगर (१८.९), जळगाव ३७.६ (१७.४), कोल्हापूर ३५.६ (२२.५), महाबळेश्वर ३२.१ (१९.४), मालेगाव ३९ (१७.२), नाशिक ३४.९ (१४), सांगली ३६.५ (२०.३), सातारा ३५.३ (१८.७), सोलापूर ३७.६ (२४.१), उस्मानाबाद (१८.४), औरंगाबाद ३५.३ (१७.१), परभणी ३७.६ (२१.२), नांदेड ३८.६ (१८), अकोला ३७.६ (२०.४), अमरावती ३७ (२१), बुलडाणा ३५ (२१.७), ब्रम्हपुरी ३६.९ (२२.७), चंद्रपूर ३८.२ (२४.७), गोंदिया ३४ (२१.५), नागपूर ३५ (१९.६), वाशिम ३३.८ (२३.६), वर्धा ३६.२ (१९.८), यवतमाळ ३६ (२१.६)
----------------------------------- 

राजूरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन

शिवनेरी कृषी, पशु प्रदर्शनाला
उद्यापासून राजूरीत प्रारंभ

बेल्हा, ता. जुन्नर, पुणे (प्रतिनिधी) - दुग्ध उत्पादन व विकासात राज्यात अग्रसर असलेल्या राजुरी (ता.जुन्नर) येथिल गणेश सहकारी दुग्धव्यसायिक संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरिय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला शनिवारपासून (ता.१२) प्रारंभ होत आहे. पुणे जिल्हा परिषद, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व राजुरी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता.१४) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहेत.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद अध्यक्षस्थानी असतील. आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती ॲड. सारिका इंगळे-वाडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता.१३) पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिक स्पर्धा व दुग्ध स्पर्धेचे उद्घाटन होणार अाहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

सुमारे १०० कालवडींचा रॅम्पवॉक, सर्वोत्तम गाय व म्हैस स्पर्धा, द्राक्ष व डाळिंब परिसंवाद, डायड्रोपोननिक चारा तंत्र, शासकीय योजना, धान्य महोत्सव, खाद्यजत्रा, परिसरातील शेतमाल आणि फळांचे नाविन्यपुर्ण नमुने यासह विविध कृषी तंत्रज्ञानाच्या २०० दालनांचा या प्रदर्शनात समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत खुले आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाजता प्रदर्शनाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पशुसंवर्धन आयुक्त विश्‍वास भोसले, कृषी आयुक्त विकास देशमुख, पुणे विभागाचे अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
-------------------

Wednesday, March 9, 2016

देवदत्त निकम प्रतिक्रिया

निर्णयात अस्पष्टता, फरकाचे काय

राज्याच्या निर्णयानुसार नियामक मंडळाच्या दराबरोबरच एफआरपी सुद्धा बंधनकारक आहे, असे दिसते. एफआरपी दर वर्षी वाढतच जाणार आहे. कारण तिचा सारखेच्या किमतीशी संबंध नाही. साखरेच्या किमती पडल्या तर नियामक मंडळाचा दर एफआरपी पेक्षा कमी राहील. मग अशा वेळी दोन्ही दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना कोण देणार. या रकमेचा भार राज्य शासन उचलणार का. आणि जर असे नसेल तर मग सध्याची एफआरपीनुसार दर देण्याची पद्धत काय वाईट आहे. कारण चांगले दर असतील तर कारखाने एफआरपीहून अधिक दर देत आहेत. अशा स्थितीत कारखान्यांना एकाच वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींचे वेगवेगळे नियम पाळणे बंधनकारक असेल का. ते संयुक्तिक होईल का. की केंद्र सरकार त्यांचा एफआरपीचा कायदा मागे घेवून दर ठरविण्याचे अधिकार पूर्णपणे राज्य शासनाला देणार आहे. एकूणच शासनाचा या निर्णयात अद्याप स्पष्टता नाही. याबाबत सविस्तर गाईडलाईनची आवश्यकता आहे.
- देवदत्त निकम, अध्यक्ष, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव, पुणे.
------------------------------ 

Tuesday, March 8, 2016

अॅग्रोवन एनजीओ कार्यशाळा

सकाळ ॲग्रोवन तर्फे पुण्यात १७ व १८ मार्चला चर्चासत्र

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासकार्यात शासनाच्या मदतीशिवाय किंवा शासनासोबत स्वतंत्रपणे कार्य करुन सामाजिक कारकीर्द घडवू इच्छिनाऱ्यांसाठी सकाळ ॲग्रोवन तर्फे बिगरसरकारी संस्था (एनजीओ) स्थापना ते उद्दिष्टप्राप्तीविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न व्यवसायिक,नोकरदार, विद्यार्थी, सेवाभावी वृत्तीने काम करु इच्छिनाऱ्या व्यक्तींसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

सध्या राज्य व देशपातळीवर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून कृषी व ग्रामिण विकासाला मोठी चालना मिळालेली आहे. या संस्थांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झालेली आहे. आदर्श गाव योजना, जल व मृदसंधारणविषयक योजना, सार्वजनिक व खासगी गुंतवणुकीच्या (पीपीपी) योजना, विविध खासगी कंपन्यांसाठी सेवाभावी काम करणे, शासकीय कामांसाठीची कंत्राटी नोकरभरती, समाजाच्या विविध स्तरांच्या विकासासाठी सेवाभावी व्यक्ती, संस्थांनी दिलेल्या निधीचा योग्य वापर आदी असंख्य कामांसाठी एनजीओंना प्राधान्य देण्यात येत आहे.

एनजीओच्या माध्यमातून विकास, व्यवसायाच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र, एनजीओची स्थापना व कार्यपद्धती याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. ही अडचण दूर करुन इच्छुकांना एनजीओच्या माध्यमातून स्वतःबरोबरच समाजाच्याही विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सकाळ ॲग्रोवनमार्फत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. एनजीओ संबंधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सशुल्क असून वैयक्तिक पातळीवरील प्रशिक्षणाच्या दृष्टीने एका चर्चासत्रात फक्त ५० व्यक्तिंनाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार हे प्रवेश देण्यात येतील.

चर्चासत्रातील विषय...
- एनजीओ स्थापनेसाठी लागणारी माहिती, घटना, उद्दीष्टे
- एनजीओ व्यवस्थापन कसे करावे
- एनजीओ उभारणीसाठी कायदेशीर बाबी (धर्मादाय आयुक्त कार्यालय परवानगी, आयकर आयुक्त कार्यालय संबंधित बाबी)
- प्रकल्प अहवाल व उभारणी
- निधीची उभारणी (सीएसआर अंतर्गत, विदेशी सहभागाच्या अटी)
- शासकीय योजनांची एनजीओच्या सहयोगाने अंमलबजावणी
- शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थांची यशोगाथा

असे आहे नियोजन
दिनांक - १७ व १८ मार्च २०१६
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ६
ठिकाण - सकाळनगर, गेट नं १, यशदाशेजारी, बाणेर रोड, पुणे
शुल्क - प्रतिव्यक्ती ३००० रुपये (चहा, नाश्ता, जेवण व प्रशिक्षण साहित्यासह)
प्रवेश - फक्त ५० व्यक्तिंसाठी
संपर्क - सुशांत ९८५०३०५६५४, ९४२३३९१९६९
------------------------------------ 

Monday, February 29, 2016

आत्माचा अडला गाडा हलला

राज्य सरकारकडून वर्षाअखेरीस निधी उपलब्ध

संदिप नवले
पुणे - केंद्राने कृषी व्यवस्थापन यंत्रणेसाठी (आत्मा) दिलेला १५ कोटी रुपयांचा निधी गेल्या सहा महिन्यांपासून राज्याकडे पडून असून आत्माचे सर्व कामकाज ठप्प असल्याच्या प्रश्नाला ॲग्रोवनने वाचा फोडल्यानंतर अखेर राज्य शासनाला जाग आली असून आत्मासाठीच्या राज्य हिश्‍श्यासह एकूण २५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी राज्य कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, या विलंबामुळे चालू वर्षासाठी मंजूर असलेल्या ८४ कोटी रुपयांपैकी तब्बल ६० कोटी रुपयांपासून राज्य वंचित राहण्याचा धोका कायम आहे. यापैकी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी मिळालेला निधी तत्काळ खर्च करावा व पुढील निधी मिळाल्याशिवाय आत्मा साठी कोणताही खर्च करु नये, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे.

कृषी विस्तार उपअभियानाअंतर्गत आत्माचा चालू २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ८४ कोटी ८९ लाख रूपयांचा आराखडा मंजूर आहे. केंद्रामार्फत ६० टक्के व राज्यामार्फत ४० टक्के निधी यासाठी उपलब्ध होणार आहे. केंद्राने आपल्या हिश्श्याचा १२.१२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता १६ सप्टेंबर २०१५ रोजी राज्याला दिला. यानंतर २१ ऑक्टोबरला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतूनही २.९६ कोटी रुपये देण्यात आले. मात्र राज्य शासनाचा या तुलनेतला १० कोटी रुपयांचा हिस्सा व सर्व निधी खर्च करण्याची मंजूरी याअभावी आत्माचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. ॲग्रोवनमधून २३ जानेवारीला याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर वेगाने हालचारी होवून हा निधी नुकताच उपलब्ध करण्यात आला आहे.

राज्य शासनाकडून या वर्षासाठी निधी न मिळाल्याने आत्माच्या विविध कार्यालयांनी स्वतःकडील संचित निधीतून गेली ११ महिने खर्च केला आहे. आता उपलब्ध केलेल्या निधीतून सर्वप्रथम संचित निधीतून केलेल्या खर्चाची भरपाई करावी. याशिवाय यापुढे राज्य सरकारची परवानगी घेतल्याशिवाय आत्मा यंत्रणेतील कोणत्याही संस्थेने, अधिकाऱ्यांनी संचित निधीतून खर्च करु नये अशी तंबी शासनाने दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत योजनेअंतर्गत कोणतेही कार्यक्रम राबवू नयेत, अन्यथा त्याची गंभिर दखल घेणात येईल, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. केंद्राने सहा महिन्यापुर्वीच पुढचा हप्ता मिळण्यासाठी खर्चाचा अहवाल तत्काळ सादर करण्याची सुचना दिली होती. या सुचनेनुसार आता केंद्राकडून दुसरा हप्ता मिळण्यासाठी दिलेला निधी येत्या ३१ मार्चपर्यत खर्च करून त्याबाबत अहवाल शासनास त्वरीत सादर करावा, असे अादेश आत्माच्या संचालकांना देण्यात आले आहे.

- झारीतल्या शुक्राचाऱ्यांचा प्रताप ?
राज्य शासनाने आत्माचा अतिउशीरा उपलब्ध करताना आत्मा यंत्रणेवर प्रथमच अनावश्यक बंधने लादण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांनी याबाबतच्या अटी आदेशात आग्रहाने सामिल केल्याची व हे चुकीचे असल्याची चर्चा कृषी आयुक्तालय पातळीवर आहे. आत्मा ही केंद्राने निर्माण केलेली कृषी विस्तार व्यवस्थापनाची स्वायत्त संस्था आहे. तिला स्व निधी (संचित निधी) निर्माण करण्याचे व योग्य कारणासाठी तो खर्च करण्याचे अधिकार आहेत. तिचा वार्षिक कार्यक्रमही केंद्राकडूनच मंजूर केला जातो. मंत्रालयाने या अधिकारांवर गदा आणत स्व निधी व कार्यक्रम अंमलबजावणीवर गदा आणत निर्बंध घातले असून खर्च करण्यासाठी राज्य शासनाची म्हणजेच कृषी मंत्रालयाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

- निधी रोखण्यात भरतीचे अर्थकारण ?
आत्माला राज्यभरासाठी सुमारे १५०० कंत्राटी कर्मचारी मंजूर आहेत. यापैकी सुमारे ७०० जागा भरण्यात आल्या असून सुमारे ८०० पदे अद्यापही रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी दरमहा वेतन सुमारे २० हजार रुपयांपर्यंत आहे. या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी सेवेत कायम राहण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने जोपर्यंत आत्मा कार्यरत आहेत तोपर्यंत या अनुभवी कर्मचाऱ्यांना कंत्राटी सेवेत कायम ठेवावे, असा आदेश दिलेला आहे. मात्र सध्याच्या कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडाव्यात व सर्व कर्मचाऱ्यांची नव्याने भरती व्हावी यासाठी मंत्रालयातील काही जण विशेष प्रयत्नशिल आहेत. यासाठी गेली सहा महिने निधी रोखून धरण्यात आला होता. मात्र स्व निधीतून आत्मातून या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आल्याने त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. यामुळे आता संचित निधीच्याच वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याउलट सध्याचे कर्मचारी कायम ठेवून उर्वरीत ८०० कर्मचारी तुमच्या पद्धतीने भरा, अशी आयुक्तालयाची भुमिका आहे. मात्र सगळीच पदे भरण्याच्या हव्यासात निधी विलंबाचे राजकारण झाले, अशी माहिती सुत्रांनी दिली.
------------------------------ 

Wednesday, February 24, 2016

अतिशय चुकीचा निर्णय, नद्यांविरोधी धोरण - परिनिता दांडेकर


नदीतील वाळूमुळे होणारे जलसंधारण, जलसाठा व इतर परिनामांबाबत महाराष्ट्रापेक्षाही केरळ व दिल्लीत खूप चांगला अभ्यास झालेला आहे. यमुना नदीच्या अभ्यासानुसार तिची वाळू ही पाणी धरुन ठेवण्यात धरणाचे काम करते. केरळात पंबा नदीतील वाळूचा अति उपसा झाल्यानंतर पाणी प्रदुषण, भुजल पातळी, नदीतिल अपघात यात फारमोठे विपरीत परिणाम घडून आले. यामुळे तेथे मोठे लोकआंदोलन उभे राहून शासनाने संपूर्ण राज्यातील वाळूचे ऑडिट करुन वाळु उपलब्धता, अतिशोषण व संभाव्य उपलब्धता याबाबतचा ताळेबंद मांडला. त्यानुसार वाळूबाबतचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले. हे अतिशय चांगले उदाहरण आपल्यासमोर असताना महाराष्ट्रात दुष्काळी स्थितीत अतिशय चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पर्यावरण कायद्यांची अतिशय ढिसाळ अंमलबजावणी होते. प्रदुषण विषयक कारभार याचे जिवंत उदाहरण आहे. अशा स्थितीत पाच हेक्टरची अंमलबजावणी कशी होणार. पुर्वी फक्त हातपाटीने वाळू उपशाची परवानगी होती तरीही यंत्रांचा वापर करुन प्रचंड उपसा झाला. सरकारककडे नियंत्रण ठेवण्याची कोणतीही यंत्रणा नाही. वर्षभर वाळू उपसा सगळ्यांच्याच दृष्टीने घातक आहे. आल्या आल्याच आरआरझेड पॉलिसी मोडित काढून आणि आता वर्षभर कोणत्याही वेगळ्या निर्बंधाशिवाय वाळू उपसा चालू ठेवण्याचा निर्णय घेवून या सरकारने आपण नद्यांच्या विरोधात आहोत, हे परत एकदा दाखवून दिले आहे.

- परिनिता दांडेकर
समन्वयक, साऊथ एशियन नेटवर्क फॉर रिव्हर, डॅम ॲण्ड वॉटर
------------------------ 

Thursday, February 18, 2016

किमान तापमानात वाढ

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात अल्पशी वाढ झाली असून कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. हवामान खात्याने येत्या मंगळवारपर्यंत (ता.२३) आकाश निरभ्र राहण्याचा व बुधवारी (ता.२४) पुण्यासह काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गुरुवारी दिवसभरात पुण्यात राज्यात सर्वात कमी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उल्लेखनिय वाढ, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात लक्षणिय वाढ तर कोकणाच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुढील दोन दिवसात किमान व कमाल तापमानात अल्पसा बदल होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता.१८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २२, सांताक्रुझ १८.६, अलिबाग २०.४, रत्नागिरी १९.१, पणजी २२, डहाणू १९.२, भिरा १५.५, पुणे १३.८, नगर १५, जळगाव १५.६, कोल्हापूर १९.७, महाबळेश्वर १६.७, मालेगाव १७.६, नाशिक १४, सातारा १४.९, सोलापूर २१.६, उस्मानाबाद १५.८, औरंगाबाद १७.८, परभणी १५.७, नांदेड १४, अकोला १९, अमरावती १८.४, बुलडाणा १९.८, ब्रम्हपुरी १९.२, चंद्रपूर २०.४, गोंदिया १८.५, नागपूर १६.७, वाशिम २०.८, वर्धा १६.८, यवतमाळ २१.४
------------------------- 

कृषीकेंद्रीत ग्रामविकासाचा जागर आजपासून शिर्डीत सुरु

राज्यभरातील सरपंच शिर्डीत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) - कृषीकेंद्रीत ग्रामविकासाचा जागर गावोगाव पोहचविणाऱ्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेला आज (ता.१९) दुपारी साडेबारा वाजता सिद्ध संकल्प पॉल (साकुरी, शिर्डी) येथे प्रारंभ होत आहे. राज्यभरातील सरपंच महापरिषदेसाठी दाखल झाल्याने संपूर्ण शिर्डी परिसर सरपंचमय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते महापरिषदेचे उद्घाटन होणार असून ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनच्या या पाचव्या सरपंच महापरिषदेसाठी राज्यभरातून एक हजार उच्चशिक्षित पुरुष व महिला सरपंच उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. गावाच्या विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती व त्यासाठी सर्व बाबी समजून उमजून विधायक दिशेने प्रयत्न करण्याची तयारी हा या सर्व सरपंचांमधील समान दुवा आहे. सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून या सरपंचांना राज्यातील ग्रामविकासाच्या प्रमुख राजकीय, प्रशासकीय व सामाजिक नेतृत्वांशी थेट संपर्क साधण्याची, त्यांच्याकडून ग्रामविकासाचे मंत्र समजून घेण्याची व ग्रामविकासाच्या राज्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडणी करुन घेण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या कर्तृत्वाने गावांचा वर्तमान व भविष्य घडविलेले अनेक दिग्गज सरपंचांशी संवाद साधणार आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामविकास चळवळीतले कार्यकर्ते, सरपंच, गावांना नवी दिशा देणारी सक्षम तरुणाई या सर्वांचा यात समावेश आहे. राज्यातील सर्व सरपंचांचे प्रतिनिधी, नेतृत्व समजले जाणारे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या गावगाडा कसा हाकावा या मार्गदर्शन सत्राने परिषदेचा उद्या सायंकाळी समारोप होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी शिर्डीत सरपंच दाखल होण्यास सुरवात झाली. सध्याकाळपर्यंत बहुसंख्य सरपंच निवासाच्या ठिकाणी पोचले. विदर्भासह दूरच्या भागातील उर्वरीत सरपंच आज सकाळपर्यंत दाखल होणार आहेत. कार्यक्रम स्थळी दाखल झाल्यानंतर सरपंचांनी त्यांच्या निवडीचे पत्र किंवा सकाळ कडून आलेला एसएमएस दाखविल्यानंतर त्यांना फोटो ओळखपत्र देण्यात येणार आहे. सरपंचांसोबत आलेल्या व्यक्तींना सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही.

फोर्स मोटर्स लि प्रस्तूत व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. पॉवर्ड बाय असलेल्या या महापरिदेचे दीपक फर्टिलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पो. लि., सीएट टायर्स, ॲग्रो व्हिजन गृप, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि, सोना पॉलीप्लास्ट प्रा. लि (ठोळे गृप) हे प्रायोजक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचाही या परिषदेस सहयोग लाभला आहे.

- मार्गदर्शनाचे विषय व वक्ते
१९ फेब्रुवारी २०१६
ती व्यवसाय करु नफ्याचा --- के. बी. पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन
गटशेती, कृषी विकासाची किल्ली --- नाथराव कराड, प्रगतशिल शेतकरी
परिसंवाद - ग्रामविकासातील आव्हाने आणि उपाय --- एकनाथ डवले (विभागिय आयुक्त, नाशिक), शैलेश नवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर), कल्पिता पाटील (सरपंच, जळगाव), चंदू पाटील (सरपंच, चंद्रपूर)

२० फेब्रुवारी २०१६
परिसंवाद - दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारण --- प्रभाकर देशमुख (जलसंधारण सचिव, महाराष्ट्र राज्य), डॉ. अविनाश पोळ (जलसंधारण कार्यकर्ते), नरहरी शिवपुजे (जलसंधारण कार्यकर्ते)
परिसंवाद - कृषी उद्योगातून ग्रामविकास --- बी. बी. ठोंबरे (कृषी उद्योजक), विलास शिंदे (कृषी उद्योजक), महेश शेळके (संचालक, फार्मर प्रड्युसर कंपनी), मारुती चापके (विपणन तज्ज्ञ)
शेतीचे प्रश्न आणि उपाय --- पाशा पटेल, माजी आमदार, शेती प्रश्नांचे अभ्यासक
कृषीतील संधी आणि सरकारची धोरणे --- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
गावगाडा कसा हाकावा --- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, महाराष्ट्र राज्य
-----------(समाप्त)-------------

सरपंच महापरिषद २०१६ - वक्ते परिचय



१) के. बी. पाटील, उपाध्यक्ष, (उतीसंवर्धन, विपनन व कृषी सेवा), जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
- गेल्या २० वर्षापासून जैन इरिगेशनमध्ये कार्यरत, उल्लेखनिय कामगिरीचा चढता आलेख.
- केळी, डाळींब आदी पिकांचे उतीसंवर्धित तंत्रज्ञान विकास व प्रसारात मोलाचे योगदान
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शाखेचे पदव्युत्तर पदवीधर.
- उच्च तंत्रज्ञानाधारित फलोत्पादन, केळी उत्पादन व निर्यात या विषयातील तज्ज्ञ
- प्रकल्प आखणी, अंमलबजावणी, व्यवस्थापन यावर प्रभुत्व
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था व समित्यांचे सदस्य
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये सहभाग, अनेक देशांना भेटी, प्रशिक्षण
- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित

२) नाथराव कराड, इंजेगाव, बीड
- मराठवाड्यात गटशेतीची चळवळ रुजविण्यात, बळकट करण्यात व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात चांगला बदल घडविण्यात मोलाची कामगिरी.
- यांच्यापासून प्रेरणा घेवून राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी गट चळवळ यशस्वी झाली. शेतकरी गटांच्या माध्यमातून कृषी विकासासाठी राज्यभर मार्गदर्शन.
- राज्य शासनामार्फत गट शेतीतून कृषी विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरव.

३) एकनाथ डवले, विभागिय आयुक्त, नाशिक
- लातुरचे जिल्हाधिकारी म्हणून अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले ज्यामुळे ते शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत झाले.
- लोकसहभागातून पानंद रस्ते तयार करण्याचा त्यांचा उपक्रम प्रचंड यशस्वी, शासनाचा एक रुपयाही खर्च न करता रस्ते विकास.
- धरण, तलाव, पाणीसाठ्यातील गाळ शेतकऱ्यांसाठी विनामुल्य उपलब्ध, यातून जमिन सुपिकीकरणाबरोबरच जलसाठ्यांमध्ये प्रचंड वाढ
- राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून उल्लेखनिय कार्य, हा विभाग लोकाभिमुख करण्याचे, त्याची मरगळ झटण्याचे श्रेय श्री. डवले यांना जाते.
- सध्या नाशिक विभागाचे विभागिय आयुक्त म्हणून प्रभावी कामगिरी. प्रसंगी स्वतः ग्राऊंड लेवलला उतरुन अधिकारी, नागरिकांना प्रोत्साहन.
- उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून उंचावता आलेख व लौकिक. अष्टपैलू व्यक्तिमत्व. शेतकरी व ग्रामविकास हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय.

४) शैलेश नवाल
- भारतीय प्रशासन सेवेतील नव्या दमाचे तरुण तडफदार अधिकारी, नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
- ग्रामिण राजकीय दृष्ट्या संपन्न गुंतागुंतीच्या, वादविवादांच्या पार्श्वभूमीवर नवाल यांनी नगर जिह्यातील ग्रामविकासाला गट, तट, राजकारणाच्या पलिकडे गती देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.
- शाळांचे इ लर्निंग, शिक्षण, पाणी, शेती सुधारणेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे.

५) कल्पिता पाटील, सरपंच, कल्याणहोळ, जळगाव
- ग्रामविकासासाठी लोकसहभागातू अनेक महत्वपूर्ण, नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले आहेत.
- टीव्हीबंद अभियान- आठवड्यातून एक दिवस गावात टीव्ही बंद ठेवतात.
- जिल्हाभरात कायदेविषयक शिबिरे, दारुबंदीसाठी प्रभावी काम
- राष्‍ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून महिला जागृतीसाठी विशेष कार्य

६) चंदू पाटील मारकवार, सरपंच, राजगड, ता. मुल, जि. चंद्रपूर
- सरपंच पदाची ही चौथी टर्म
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २००२-०३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक
- राष्ट्रपतींच्या हस्ते २००६ साली निर्मलग्राम पुरस्कार व २०११ मध्ये पर्यवरण विकासरत्न पुरस्कार
- २००८ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, चार हजार मिटर लांबीची गटारे गावकरी स्वच्छ करतात.
- पंधरा वर्षापासून गावात सातत्यपूर्ण विकास, श्रमदानातून पाणलोट, गाळ उपसा आदी अनेक कामे.

७) प्रभाकर देशमुख, जलसंधारण सचिव, महाराष्ट्र राज्य
- ज्याच्या जलयुक्त शिवार अभियानाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. हे अभियानही त्यांच्याच कल्पनेचे मुर्त स्वरुप आहे.
- बारामतीचे प्रांत म्हणून शासकीय सेवेची सुरवात, त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक पदांवर उल्लेखनिय कार्य
- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती सन्मान
- पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनिय कामगिरी, अनेक उपक्रमांची राज्यभर अंमलबजावणी
- राज्याचे कृषी आयुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी, अनेक पुरस्कारांनी सन्मानित
- कृषीग्रामविकास व कडधान्य उत्पादनवाढील महत्वपूर्ण योगदान, स्वतःचे सातारा लोधवडे गाव आदर्श गाव करण्याकडे वाटचाल.
- कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामसभेस उपस्थित राहणे बंधनकारक केले. कृषी सेवकांची ग्रामपंचायतीशी जोडणी केली. हे निर्णय सरपंच परिषदेत सरपंचांनी केलेल्या मागणीनुसार घेण्यात आले.

८) डॉ. अविनाश पोळ
- व्यवसायाने दंतचिकित्सक, पण त्यापलिकडे जावून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रामिण आरोग्य, रस्ते, जलसंधारण, स्वच्छता आदी क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी.
- गावे हागनदारीमुक्त करण्यासाठी राज्यभरात 700 ग्रामसभा घेतल्या. कामाचे एनजीओकरण होऊ दिले नाही.
- सातारा जिल्ह्यात जलसंधारणविषयक भरिव काम, यामुळे अनेक गावांच्या भुजल पातळीत लक्षणिय वाढ.
- त्यांच्यापासून प्रेरणा घेवून अनेक व्यक्तींकडून जलसंधारण व ग्रामिण विकासात योगदान

९) नरहरी शिवपुजे
- १९९५ पासून पुर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते, सर्वकष ग्रामविकासासाठी पाणी या विशयात विशेष कार्य
- औरंगाबाद, नाशिक, लातुर, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये पाणलोट विकास, पाणी पुरवठा, व्यवस्थापन या क्षेत्रात मोठे कार्य
- ५० हून अधिक गावांचे तांत्रिक सल्लागार म्हणून उल्लेखनिय कार्य, गावांना विकासाचा मार्ग आखून देणारा माणूस.
- पाणी या विषयावर वृत्तपत्र, पुस्तकांतून विपूल लेखन, आकाशवाणी, दुरदर्शनवरुनही जलसाक्षरतेसाठी कार्य

१०) बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, नॅचरल शुगर्स लि.
- मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात नॅचरल शुगर्स लि. हा खासगी साखर उद्योग उभारुन हजारो शेतकऱ्यांना शाश्वत प्रगतीचा मार्ग खुला केला
- साखर कारखाना कसा चालवावा, याबाबत आदर्श उभा केला. अनेक बाबतीत इनोव्हेशन्स घडवली. शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
- महाराष्ट्र शासनामार्फत त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा राज्यातील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कार देवून गौरव.

११) विलास विष्णू शिंदे, नाशिक
- कृषी अभियांत्रिकीत उच्च शिक्षण घेतल्यानंतर आधी स्वतःच्या शेतीचा विकास केला.
- डेअरी, त्यानंतर पॅकहाऊस, कोल्डस्टोरेज उभारून 2004 पासून द्राक्ष निर्यात सुरु केली. पहिल्याच वर्षी 4 कंटेनर निर्यात.
- 2008-09 पर्यंत भारतातील सर्वात मोठा शेतकरी निर्यातदार म्हणून मजल.
- 2014-15 चा द्राक्ष निर्यातीची उलाढाल 102 कोटी रुपये, 2000 कुटुंबांना रोजगार
- शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली, फळे भाजीपाला प्रक्रीया (सह्याद्री फार्मर प्रड्युसर कंपनी लि.)

१२) महेश शेळके, नारायणगाव, पुणे
- व्यवस्थापकीय संचालक, कृषीजिवन फार्मर्स प्रड्युसर कंपनी, नारायणगाव, जुन्नर, पुणे
- दिल्लीत थेट ग्राहकांना कांदा पुरवठा करणारी राज्यातील पहिली उत्पादक कंपनी.
- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून टोमॅटो, भाजीपाला उत्पादनासाठी प्रकल्प राबवणारी राज्यातील पहिली उत्पादक कंपनी
- कांदा बिजोत्पादन, निविष्ठांचा ना नफा ना तोटा पुरवठा आदी नाविन्यपुर्ण उपक्रमांतून सभासद शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळवून देत आहेत.
- कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठीची पुरवठा साखळी उभारली. यशस्वी अंमलबजावणी.

१३) मारुती चापके, मुंबई
- व्यवस्थापकीय संचालक, गो फॉर फ्रेश प्रा. लि. मुंबई, थेट ग्राहकांना ऑनलाईन शेतमाल विक्री करणारी संस्था
- पुणे कृषीमहाविद्यालयाचे विद्यार्थी, मॅनेज हैद्राबादमधून पदव्युत्तर शिक्षण, महेंद्रा शुभलाभ, किशोर बियाणी कंपन्यामध्ये उच्चपदावर काम.
- गेल्या कांदा हंगामात दिल्ली सरकारला २५ कोटी रुपयांचा कांदा खरेदी करुन दिला.
- टाटाने त्यांना फळे व भाजीपाल्याच्या व्हॅल्यू ॲडिशन आणि ब्रॅन्डिंग साठी २०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देवू केले आहे.

१४) पाशा पटेल, माजी आमदार, लातूर
- शरद जोशींच्या शेतकरी संघटनेतून कामाला सुरवात. जोशींच्या सल्ल्यानुसार भाजपमध्ये प्रवेश, भाजपमार्फत आमदार.
- गेली दोन वर्षे शेतकरी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते, नेते. सत्तेत व विरोधात असतानाही शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे, जागृती कार्यक्रम
- कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांना राज्यातील शेतात फिरवून वस्तुस्थिती दाखवून दिली.
- कृषी मुल्य आयोगाची सिस्टिम सुधारण्यात, मालाला योग्य दर मिळवून देण्यात, राज्यस्तरीय समितीच्या निर्मितीत मोलाचे योगदान
- शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लातूरमध्ये कृषी शिक्षण संकुलाची स्थापना, कृषी अर्थशास्त्रावर सर्वाधिक भर
- मराठवाड्यातील पाणलोट विकास, जलसंधारण, ओढे-नाले खोलीकरण रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी चळवळीत मोलाचे योगदान

१५) विकास देशमुख, कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य
- राज्याचे कृषी आयुक्त म्हणून गेल्या वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी, स्वतः कृषी शाखेचे पदव्युत्तर पदवीधर
- कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीतून कृषीकेंद्रीत ग्रामविकासाला पाठबळ
- त्यापुर्वी सातारा, पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही उत्कृष्ट कारकिर्द, पुण्याच्या सर्वांगिण विकासात मोलाचा वाटा
- देशमुख सरांनी जिल्हास्तरावर राबविलेल्या अनेक प्रकल्पांची राज्यस्तरावर अंमलबजावणी.

१६) पोपटराव पवार
- १९८९ पासून नगर जिल्यातील दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार गावचे सरपंच
- ग्रामस्थांना एकजुट करुन हिवरेबाजारचा एकहाती कायापालट केला. आदर्श गाव म्हणून जगभर ख्याती.
- २० लाखाहून अधिक लोकांनी भेट देवून हिवरे बाजार मॉडेलची पहाणी केली, त्यापासून ग्रामविकासाची प्रेरणा घेतली.
- राज्यात आदर्श गावे तयार करण्यासाच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष, राज्यमंत्रीपद दर्जा
- आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था, समित्यांचे सदस्य
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे ३५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित.
- राज्यात, केंद्रात सरकार कोणाचेही असो... सरपंचांच्या मनात एकच उद्दीष्ट असते... पोपटराव पवारांसारखे सरपंच व्हायचे, त्यांच्यासारखे आपलेही गाव विकसित करायचे.
---------------------------------(समाप्त)------------------------------ 

Tuesday, February 16, 2016

मनिषा कुंजिर - लघुयशोगाथा

मनिषा कुंजिर
ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार
-------------------
सौ. मनिषा भाऊसाहेब कुंजिर या दुष्काळग्रस्त पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावच्या प्रगतशिल महिला शेतकरी. हिवरे बाजारच्या या सुकन्येवर जलसंवर्धन व पाण्याच्या काटेकोर वापराचे संस्कार माहेरीच झालेले. पती शिक्षक म्हणून शासकीय सेवेत. कुटुंबाच्या सर्व सहा एकर कोरडवाहू शेतीची जबाबदारी मनिषाताईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पाण्यासाठी २००१ मध्ये शेतीत बोअरवेल घेतला. त्याच्या अर्धा इंची पाण्यावर सिताफळाची २०० झाडे लावली आणि शेतीचा श्रीगणेशा केला. सिताफळांची विक्री २००३ साली सुरु झाली. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळेना. शेतकऱ्यांसाठी २००५ पासून ॲग्रोवन सुरु झाला. सौ मनिषा पहिल्या अंकापासून ॲग्रोवनच्या वाचक झाल्या. त्यातूनच २००७-०८ मध्ये ॲग्रोवनमधून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत पॉलीहाऊसमधील फुलशेतीची माहिती त्यांना मिळाली. ॲग्रोवनच्या त्या वर्षीच्या कृषी प्रदर्शनात त्या माहिती मिळवण्यासाठी आल्या. प्रदर्शनातून त्यांना या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती घेतली.

कमी पाण्यात, कमी जागेत जास्त उत्पादन देणारी आधुनिक शेती करायचीच या विचाराने १० गुंठ्यावर पॉलिहाऊस उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे नऊ लाख रुपये बॅंक कर्ज घेवून जून २००९ मध्ये पॉलीहाऊसची उभारणी केली. जुलै २००९ मध्ये कार्नेशियनची लागवड केली. फुलांना चांगला दर मिळाला, उत्पादन चांगले आले, हातात दरमहा चांगले पैसे येवू लागले, यामुळे सौ. कुंजिर यांचा आत्मविश्वास वाढला. पती, सासु-सासऱ्याची साथ होतीच. यातून आलेल्या उत्पन्नातून बॅंकेचे सर्व कर्ज मुदतीपुर्वीच फेडले. गावात एक चांगला बंगलाही बांधला. ॲग्रोवनने प्रेरणा दिली, यशाचा मार्ग दाखवला असे स्पष्ट करत त्या यशाचे सारे श्रेय ॲग्रोवनला देतात.

पॉलिहाऊसमधील औषध फवारणीपासूनची सिंचन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फुलांच्या काढणी, विक्रीपर्यंतची सर्व कामे सौ. कुंजीर स्वतः करतात. शेतीचे सर्व निर्णयही त्याच घेतात. कोणत्याही कामासाठी त्या मजूरांवर अवलंबून नाहीत. वापरत असलेले सर्व तंत्रज्ञान, औषधांची शास्रिय नावांपासूनची कार्यापर्यंतची सखोल माहिती त्यांना आहे. सौ. कुंजिर यांना जैन इरिगेशनमार्फत २०११ साली पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृती चिन्ह) देण्यात आला. यानंतर राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीला देवून कामाची पहाणी केली. पॉलिहाऊसमधील फुलशेतीचे सखोल ज्ञान, नफ्या तोट्याचे चोख गणित आणि सहज नजरेत भरणारे यश यामुळे सौ. कुंजिर यांच्यापासून प्रेरणा घेवून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील फुलशेतीला प्रारंभ केला. त्यांच्या वाघापुर गावात सुमारे ३५ हून अधिक पॉलिहाऊस उभी राहीली. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पॉलीहाऊसच्या माध्यमातून फुलशेतीची यशस्वी अंमलबजावणी सुरु झाली.

दोन पिकांच्या मधल्या कालावधीत त्यांनी सध्या पॉलिहाऊसमध्ये फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. जुलैमध्ये त्या पुन्हा कार्नेशियनची लागवड करणार आहेत. पॉलिहाऊसशिवाय सिताफळ (६५० झाडे), डाळिंब (५५० झाडे) या फळबागांपासूनही त्या दर्जेदार उत्पादन घेत आहेत. हंगामानुसार कलिंगड, खरबुजाचे उत्पादनही त्या घेतात. सध्या खरबूजाचे पिक आहे. गेल्या पंधरा वर्षापासून पॉलीहाऊस व फळझाडांची शेती त्या यशस्वीपणे करत असून शेतीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यातून तंत्रज्ञान प्रसाराचेही प्रभावी कार्य करत आहेत.

- कोरडवाहू भागात आधुनिक उच्च तंत्र, फळबागा, पारंपरिक पिकांची सांगड
- सुक्ष्म सिंचनावर भर, पाण्याचा काटेकोर वापर, सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण उत्पादन
- उपलब्ध पाण्यावर दुष्काळी भागातही उत्तम शेती, सर्व निर्णयप्रक्रीया, कामे स्वतः करतात
- सर्व बाबींच्या काटेकोर नोंदी, आर्थिक आघाडीवर चांगली प्रगती, वेळेआधी कर्जपरतफेड
- शेतीतील ढोरमेहनत किंवा अति शारिरिक श्रमाला फाटा देवून स्मार्ट वर्क ला प्राधान्य
-------------------
संपर्क
सौ. कुंजिर - ९६२३४१६८९७, ९९२२९१५३१७ 

सरपंच महापरिषद - मुख्यमंत्र्यांसाठी नोट

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या माहितीसाठी...
----------
ॲग्रोवन
- २० एप्रिल २००५ रोजी ॲग्रोवनचा प्रारंभ झाला. जगातले एकमेव कृषी दैनिक. पहिल्या दिवसांपासून राज्यातील शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी उल्लेखनिय प्रयत्न काम.
- गेल्या १० वर्षात ॲग्रोवनपासून माहिती व प्रेरणा घेवून राज्यातील हजारो शेतकरी कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात आले. यशस्वी झाले. कृतज्ञता म्हणून अनेकांनी आपल्या घरांना, शेताला ॲग्रोवन नाव दिले.
- वैयक्तिक शेतकऱ्यांच्या व शेतकरी समुहांच्या, गटांच्या जिवनात मोठा बदल घडवण्यात, त्यांचे अर्थिक घडी बसविण्यात ॲग्रोवनची मोलाची कामगिरी.

सरपंच
- सरपंच हा गावचा प्रमुख. तो सुशिक्षित आणि प्रशिक्षित असेल तर गावाच्या विकासाला वेळ लागत नाही. राज्यातील अनेक सरपंचांनी आपल्या कामातून आपापल्या गावांचे भाग्य बदलले आहे.
- मात्र अद्यापही राज्यातील हजारो गावांना नेतृत्व प्रशिक्षित, विकासाभिमुख नसल्याचा फटका सहन करावा लागतोय. शाळा दुरुस्ती, पाणी योजना, हागणदारी आणि तंटामुक्त म्हणजे विकसित गाव अशा समज.
- राज्यातील बहुतेक गावांची इकॉनॉमी शेतीवर आधारीत. शेती हाच गावांच्या विकासाचा कणा आहे. मात्र सरपंचांकडून त्याकडे दुर्लक्ष. परिणामी अशा गावांमध्ये शेती व शेतकऱ्यांच्या विकासाची गती कमी.
- शेतकऱ्यांच्या वैयक्तिक धडपडीला गावाचे, ग्रामपंचायतीचे बळ मिळाले तर विकासाची गती व बदलांचा आवाका प्रचंड वाढतो... हे राज्यातील अनेक उदाहरणांनी स्पष्ट.

ॲग्रोवन सरपंच महापरिषद... प्रारंभ व वाटचाल...
- गावांच्या कृषीकेंद्रीत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समुहामार्फत २०१२ पासून ॲग्रोवन सरपंच महापरिषद उपक्रम सुरु करणात आला.
- पहिली सरपंच महापरिषद मराठवाड्यात औरंगाबाद येथे घेण्यात आली. राज्यभरातील १००० सरपंच या परिषदेस उपस्थित होते.
- यानंतर नाशिक, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणी सरपंच महापरिषदा पार पडल्या. राज्यभरातील सरपंचांचा त्यास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत पाच हजार सरपंचांना प्रशिक्षण दिलेय.
- ॲग्रोवनची सरपंच महापरिषद हा सद्यस्थितीत सरपंचांना ग्रामविकासाचा मुलमंत्र देणारा राज्यातील सर्वात मोठा सोहळा आहे. त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांत प्रचंड चुरस असते.

सरपंच महापरिषदेत काय...
- परिषदेत सहभागी होण्यासाठी सकाळच्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत राज्यातील २८ हजार सरपंचांमधून उच्चशिक्षित, विकासाभिमुख, तरुण १००० महिला व पुरुष सरपंचांची निवड केली जाते.
- सलग दोन दिवस ग्रामविकास मंत्री, आदर्श सरपंच, कृषी उद्योजक, ग्रामविकास तज्ञ आदीमार्फत सरपंचांना मार्गदर्शन.
- ग्रामिण व शेती व्यवसायासंबंधी कृषीकेंद्रीत अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणात भर दिला जातो.
- सरपंचांची निवास, भोजन व्यवस्था ॲग्रोवनमार्फत केली जाते. सहभागी सरपंचांकडून कोणताही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.

महापरिषदेचा परिणाम
- गावात सहज पद्धतीने अमलबजावणी करता येईल अशा पद्धतीनेमार्गदर्शन मिळाल्याने अनेक गावात सरपंचांनी लक्षणीय बदल घडवून आणले.
- जलसंधारण, गटशेती, शेतीचे नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या कंपन्या आदी माध्यमातून गावांच्या विकासाला गती देण्यात या सरपंचांचा मोलाचा वाटा
- प्रशिक्षित सरपंचांमुळे सरकारच्या योजनांची उद्दीष्टपुर्ती होण्यास मोठी मदत, जलयुक्त शिवार व इतर योजनांची या सरपंचांकडून प्रभावी अंमलबजावणी.
- प्रभावी कामामुळे यातील अनेक सरपंचांची गावामार्फत बहुमताने सरपंच पदी फेरनिवड.

-----------------------------

सरपंच महापरिषदेत पुढील मुद्यांवर भाष्य अपेक्षीत...

१) ग्रामविकासाबाबत राज्य सरकारची भुमिका, नवी दिशा इ. सरपंचांकडूनची अपेक्षा
२) जलयुक्त शिवार, सरपंचांची भुमिका व लोकसहभाग
३) कृषीकेंद्रीत अर्थव्यवस्थेवर सरपंचांनी भर द्यावा.
४) स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट खेडी कशी होतील यासाठी सरपंचांनी कंपनीच्या सीईओ प्रमाणे गावात काम करावे.
५) १४ वा वित्त आयोगातून मिळणारा निधी, वितरण, विनियोग व सरपंचांकडूनच्या अपेक्षा. गावांचे भविष्य घडविण्याची संधी.
६) दुष्काळी स्थितीत सरपंचाकडून असलेल्या अपेक्षा, ढासळते पर्यावरण, वृक्षलागवडीची गरज, आगामी पिढ्यांसाठीचे नियोजन
७) विकासाचे राजकारणावर भर - सरपंच गावाचा... पक्षाचा नाही. संपूर्ण गावाच्या सर्वसमावेशक विकासावर भर द्यावा
८) राज्यातील उच्चशिक्षित तरुणांनी गावाच्या विकासाची धुरा खांद्यावर घ्यावी.
९) ॲग्रोवन सरपंच महापरिषद हा राज्याच्या कयसरपंचांसाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनिय
१०) सरपंचांनी विकासाची बेटं तयार केली तर शहरांवरील ताण कमी होईल. सरपचांनी गावातच रोजगार उपलब्ध करावा.
-------------------



रामदास डोके - लघुयशोगाथा

रामदास डोके
ॲग्रोवन स्मार्ट कृषीपुरक व्यवसाय पुरस्कार
--------------
दोन व्यक्ती किती संकरित गाई सांभाळू शकतात... ते ही चारा उत्पादनापासून ते दुध विक्रीपर्यंतच्या सर्व बाबी स्वतः करुन... सर्वसाधारपणे आठ ते दहा. पण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी असलेल्या रोहिदास बबन डाके यांनी पत्नी सौ. अर्चना यांच्या जोडीने दोघांच्याच बळावर काटेकोट व्यवस्थापनातून ७० गाईंचा दुग्धव्यवसाय यशस्वी केला आहे. दोन गाईंपासून सुरु झालेली त्यांची वाटचाल आता दोन लाख ७५ हजार लिटर दुध उत्पादन आणि 50 लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढालीपर्यंत गेली आहे.

कुटुंबाची फार थोडी उपजावू जमीन आणि कर्ज काढून घेतलेल्या दोन गाई या बळावर १९९७ साली रोहिदास डोके यांचा दुग्धोत्पादन व्यवसाय सुरु झाला. पहिल्या कर्जानंतर पुन्हा कधीही कर्ज काढले नाही. दोनाच्या चार, चाराच्या सहा गाई करत करत गाईंची संख्या हळूहळू वाढवत या वर्षी लहान मोठ्यासह जनावरांची संख्या 75 वर गेली आहे. यात 48 दुधाळ एचएफ गाई, 18 कालवडी, सहा दुध पित्या कालवडी, एक गावठी गाय व शेतकामाचे दोन बैल यांचा समावेश आहे. शेतकाम, चारा वाहतूक यासाठी बैल उपयोगी असून गावठी गाईचे दुध घरी वापरासाठी आणि गोमुत्राचा औषध म्हणून उपयोग होत आहे.

डोके पती पत्नी सकाळी पाच वाजता उठतात. गव्हाणीत आदल्या दिवशी संध्याकाळीच खाद्य टाकलेले असते. सात वाजेपर्यंत गाईंचे खाद्य व दुधासह सर्व कामे आवरतात. एकाच वेळी धारा काढायचे व जनावरांचे खायचे काम सुरु असते. पाण्याचे हौद भरुन, गाई मोकळ्या सोडून सकाळी साडेनऊ वाजता स्वतःच्या छोट्या टेम्पोत कॅन भरुन आळे येथे सहकारी दुग्ध संस्थेत दुध घेवून जातात. दुपारी 12 वाजता गोठ्याला कुलुप लावतात आणि पती पत्नी चारा आणण्यासाठी शेतात जातात. चारा उत्पादनासाठीची कामेही बरोबरीने सुरु असतात. चारा आणून त्याची कुट्टी करुन पुन्हा सायंकाळी दुध काढणे, खाद्य, पाणी, दुध संघात घेवून जाणे अशी कामे केली जातात. दिनक्रम असाच सुरु राहतो.

- २०१२ पासून मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब. गोठ्यासाठी 15 लाख रुपये खर्च आला.
- दुध उत्पादकांच्या बचत गटामार्फत (फंड) भांडवलाचा प्रश्न सोडवला.
- हिलारु गाय घेवून तिला अखेरपर्यंत सांभाळतात. सर्व गाई कमवत्या असतील याकडे कटाक्ष. प्रत्येक गाईचे वैद्यकीय रेकॉर्ड.
- घरच्या 10 एकर जमिनीत पाच एकर हत्ती गवत, तीन एकर कडवळ व दोन एकर ऊस आहे.
- एका गाईला पंधरा किलो ओला हिरवा चारा कुट्टी व दुधाप्रमाणे दोन ते चार किलो कांडी (सुग्रास) देतात.
- गाईंची लहान मुलांसारखी काळजी घेतात. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावर कटाक्ष, खाद्याकडे विशेष लक्ष.
- दुग्धव्यवसायातून शेतीचे सपाटीकरण, सुपिकीकरण, बांधबंदिस्ती, चार विहीरी, पाईपलाईन केली.
- कोणत्याही शासकीय योजनेची मदत न घेता ही कामगिरी. त्यांचे अनुकरण परिसरातील अनेक शेतकरी करत आहेत.

- सर्वसाधारण अर्थकारण
दुध उत्पादन : दररोज सुमारे 450 ते 500 लिटर (3.7 ते 3.8 फॅट व एसएनएफ 8.5)
उत्पादन खर्च : सुमारे 20 ते 22 रुपये प्रति लिटर
गेल्या वर्षीचे दुध उत्पादन (2015) : 1 लाख 75 हजार लिटर (46 गाई)
गेल्या वर्षीचे शेणखत उत्पादन (२०१५) : सुमारे 65 ट्रॅक्टर ट्रॉली
-----
संपर्क : रोहिदास डोके - 9860380005
(दुपारी 12 ते 2 उपलब्ध) 

Monday, February 15, 2016

अत्यल्प पावसावरही खैरेनगरने हटवला दुष्काळ

दृष्टीक्षेपात...
- यंदा फक्त २०० मिलीमिटर पाऊस
- सर्व पाणी शिवारातच मुरले, जिरले
- ५० टक्के विहीरींच्या पातळीत भरिव वाढ
- रब्बी कांदा, बटाटा, हरभरा, ज्वारीचे यशस्वी उत्पादन
- उन्हाळ्यासाठी शेततळी, विहीरीत संरक्षित पाणी साठा

पुणे (प्रतिनिधी) - सलग पाच वर्ष दुष्काळात होरपळल्यानंतर यंदा पावसाळ्याच्या अखेरीस फक्त २०० मिलीमिटर पाऊस झाला. हा पाऊस तुटपुंजा असला तरी त्याचा एकही थेंब गावाबाहेर जावू न दिल्याने खैरेनगर (ता. शिरुर, पुणे) गावचा दुष्काळ किमान चालू वर्षापूरता तरी हटला आहे. सर्व पाणी जमिनीत मुरल्याने विहीरींची पाणी पातळी लक्षणिय वाढली. शेततळ्यात ते पाणी साठवले. यामुळे पाच वर्षात प्रथमच रब्बी हंगाम हाती आला असून सर्व पिके चांगली आहेत. चालू वर्षी जूनपर्यंत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लागणार नाही अशी स्थिती आहे.

शिरुर तालुक्यातील पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई या भागात गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. हा भाग खरिप हंगामाचे क्षेत्र असला तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना गेली पाच वर्षे खरिप पेरताही आलेला नाही. पेरला त्यांच्या हाती कडबाही येत नाही असा अनुभव. चालू वर्षीही पावसाने दडी मारल्याने खैरेनगर व लगतच्या गावांचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु होता. यानंतर पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या पावसाचा एकही थेंब गावाबाहेर गेला नाही, विहीरींची पाणी पातळी वाढली आणि त्यावर कांदा, ज्वारी, कडब्यासह रब्बी हंगाम हाती आला आहे.

एकट्या खैरेनगरमध्ये प्लॅस्टिक कागद वापरलेली ४० व बिन प्लॅस्टिक कागदाची सुमारे ५० हून अधिक शेततळी खोदण्यात आली आहेत. विहीरीच्या पाण्यात वाढ झाल्याने ते पाणी उपसून शेततळ्यांमध्ये साठवण्यात आले आहे. एरवी या वेळेपर्यंत कोरड्या पडणाऱ्या विहीरींमध्ये सध्या दररोज तीन तास मोटरी चालतात एवढे पाणी टिकून आहे. यामुळे रब्बी हंगाम चांगल्या परिस्थितीत पार पडणार, असे आशादायक चित्र आहे. उर्वरीत पाणी पुढील चार महिने पिण्यासाठी व जनावरांसाठी उपयोगी ठरणार आहे. आसपासच्या गावांमध्येही काही ठिकाणी अशीच स्थिती आहे.

- फलदायी मृगजळ
पाबळ ओलांडून खैरेनगर गावाच्या हद्दीत प्रवेश केला की वाळवंटात पाण्याचा आभास दाखवणारे मृगजळ दिसावे त्याप्रमाणे कोरड्या, गवत वाळलेल्या शिवारात शेततळी दिसू लागतात. फरक एवढाच की मृगजळ आभासी असतं... इथली शेततळी वास्तव आहेत. आजूबाजूच्या पडीक रानात शेततळ्याभोवतीची जमीन कांदा, ज्वारी आदी पिकांनी हिरवीगार हे चित्र गावात अनेक ठिकाणी आहे. शेततळ्यांनी रब्बी पिकांची शाश्वती देण्याबरोबरच गावात उभ्या राहिलेल्या सुमारे १२ एकर क्षेत्रावरील पॉलिहाऊसमधील फुलशेतीलाही संजिवनी दिल्याचे चित्र आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसतानाही यंदाच्या परिस्थितीबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

- डाळिंबाच्या बहराची तयारी
खैरेनगर व लगतच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये सुमारे २०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब पिक आहे. गेली काही वर्षे टॅंकरने पाणी घालून अनेक शेतकऱ्यांनी या बागा जगवल्यात. यंदा ऑक्टोबरमध्ये धरलेला बहार पावसामुळे पूर्ण फेल गेला. आता पाणीची सोय असल्याने शेतकऱ्यांनी बहार धरण्याची तयारी सुरु केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सध्या बागांना ताण दिलेला आहे. हवामानातील चढ उतार, अवकाळी पाऊस, गारपिटीचा धोका उद्भवला नाही तर यंदा चांगले डाळींब पिकवण्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

- मागेल त्याला शेततळे कधी ?
शेततळे हे दुष्काळी भागासाठी वरदान आहे. राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात त्याबाबत काहीही झालेले नाही. शासकीय यंत्रणा अशी योजना नसल्याचे सांगते. जलयुक्त शिवारची कामे ठराविक ठिकाणीच सुरु आहेत. राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे मागेल त्याला शेततळे देवून शेतकऱ्यांना पिके, फळबागा वाचविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी खैरेनगर येथिल रघुनाथ शिंदे, अप्पासाहेब खैरे, शिवाजी खैरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------(समाप्त)----------------


Wednesday, January 27, 2016

स्थलांतर, मोलमजुरी, बेलवंडी

संतोष डुकरे
बेलवंडी, जि. नगर - मुलीच्या लग्नात झालेलं ५० हजाराचं कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षापासून राबतोय. अजूनही तीस हजार बाकी आहेत. यंदा कडक दुष्काळानं घर दार सोडावं लागलं. एका मुलाची शाळा सुटली. आता दोघा मुलांना शिकवायचंय, कर्ज फेडायचंय, घरकुल बांधायचंय... कोण कोणाची मदत करतो, मदतीची अपेक्षा नाही. जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत मोलमजूरी करुन पोरांना शिकवायला जिव काढणार, पुढचं पुढं पाहू... ही कैफियत आहे पळसखेडा दाभाडी (भोकरदन, जालना) गावचे माजी सरपंच शेनफड साळवी यांची. बेलवंडी शिवारात मोलमजूरी करुन भेगाडला संसार सावरण्यासाठी साळवी कुटुंबाची धडपड सुरु आहे.

शेनफड साळवी हे पाच वर्षे गावचे सरपंच होते. पण स्वतःच्या कुटुंबासाठी साधं घरकुलही त्यांना उभारता आलेलंनाही. घरकुल मंजुर झालं, पायाच्या कामासाठी ३५ हजार मिळाले. पण पुढचं काम पैशाअभावी थांबलं. ग्रामपंचायत म्हणतेय काम पूर्ण करा नाही तर कारवाई करु. पैसेच नाहीत तर काय करु हा त्यांचा सवाल. त्यात तीन वर्षापूर्वी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज झाले. ते फेडण्यासाठी एका मुलाला शाळा सोडावी लागली. आता दुष्काळाच्या तडाख्यात उरलेल्या दोन मुलांची शाळा सुटू नये म्हणून नवरा बायको आणि एक मुलगा मोलमजूरी करत आहेत. एक मुलगा औरंगाबादला बहिनीकडे राहून शिकतोय तर दुसरा गावच्या खोपटात एकटाच राहून कसाबसा शाळेत तग धरुन आहे. परिस्थिती बदलेल या आशेवर साळवी कुटुंबाचा झगडा सुरु आहे.

अशीच परिस्थिती याच गावातील मदास गुंडाजी रगडे यांच्याही कुटुंबाची आहे. तलावासाठी अडीच एकर जमीन गेली. अवघ्या आठ हजार रुपये एकराने भरपाई मिळाली. दुसरी जमीन घेतली त्यातलीही पाझरतलावाला गेली. पोटखराबा इत्यादी जावून अवघी दीड एकर जमीन उरलीये. त्यात ही दुष्काळी स्थिती. घरादाराला टाळा ठोकून मराठवाड्याची सिमा ओलांडून नगर जिल्ह्यात मोलमजूरी करत आहेत. आई लेकीच्या घरी आहे तर मुलगा बहिनीकडे औरंगाबादला राहून दवाखान्यात काम करतोय. घरी कुणीच नाही म्हणून आठवीला असलेल्या लहान मुलाची शाळा सुटलीये.

दुष्काळ आहे म्हणून दातावर दात धरुन न बसता बाहेर पडलं तर चार पैसे मिळतील, मुला बाळांना साथ देता येईल. ते त्यांच्या पायावर उभे राहीले तर आम्हालाही सांभाळू शकतील. मुलाबाळांसाठी सगळा झगडा सुरु आहे. जुनं पत्र्याचं घर आहे गावी. नाव दारिद्र्य रेषेखाली नाही. वर्षाच उत्पन्न जास्त असतं तर इकडं कशाला आलो असतो. घरकूल नाही. आत्तापर्यंत कोणाचीही मदत किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. मिळण्याची आशाही नाही. म्हणून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडलोय. येत्या हंगामात पाऊस चांगला झाला तरच जाणं होईल पेरणीला, नाही तर इकडंच थांबावं लागेल. दररोज काम नसतं. महिन्याला दोन तीन हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता सहा महिन्याला तीघांचे सुमारे २० हजार नेतो गावाला, अशी माहिती मदास रगडे यांनी दिली.
----------------------------
‘‘दोन अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. यंदा फक्त एक पाऊस झाला. फक्त चार आणेच शेतकरी राहीलेत गावात, बाकी सर्वजण दसरा झाला आणि बाहेर पडले. ऊस तोडीला जाणारे मुकादम व कारखाने ठरलेले आहेत. इतर जण बाहेर काम शोधतो बागायतदारांकडं. पाऊस चांगला झाला तरी शेतीवर भागत नाही. रोजंदारी करावीच लागते. दोन्ही मुलं हुशार आहेत, त्यांना शाळा शिकवायची आहे.’’
- शेनफड साळवी, पळसखेडा दाभाडी, जालना
-----------------------------

Friday, January 22, 2016

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर घरदार, शेती सोडण्याची वेळ

हजारो शेतकऱ्यांची महानगरांकडे धाव, तीन दशकांतील सर्वात मोठे स्थलांतर

संतोष डुकरे
पुणे - पिक नाही, पाणी नाही, काम नाही, मजूरी नाही... मग गावात राहून जगायचं तरी कसं. घरदार तर सावरायलाच हवं. नुसत्या आशेवर तरी किती दिवस काढणार. या स्थितीत एकमेव उपाय म्हणून राज्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, सुरत आदी महानगरांची वाट धरली आहे. गेल्या तीन महिन्यात एवट्या पुणे शहरात सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी पडेल ते काम करून कुटुंब जगविण्यासाठी दाखल झाले आहेत. निसर्गाच्या घाल्यात अत्यंत हालाकीच्या स्थितीत कुणाच्याही मदतीविना संसाराचा गाडा सावरण्यासाठी त्यांचा एकहाती संघर्ष सुरु आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांबरोबरच खानदेश व पश्चिम विदर्भातूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा लोट शहरांच्या दिशेने सुरु आहे. पावसाळ्यात पावसाने दगा दिल्याने खरीपाची पिके हातची गेली, रब्बीची पेरणीही होऊ शकली नाही. प्यायलाही पाणी नाही अशी या सर्व ग्रामस्थांची समान स्थिती आहे. या गावांची शेतीकेंद्रीत असलेली सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प झाल्याने रोजगार पूर्णतः संपून शेतकऱ्यांवर शेती, घरदार सोडून कुटुंब जगवण्यासाठी शहर गाठण्याची आपत्ती ओढावली आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. जानेवारीपासून हे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही हा ओघ सुरुच आहे.

पुण्यात कात्रज, हडपसर, संगमवाडी, शिवाजीनगर, निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण या भागात मोठ्या संख्येने स्थलांतरीत दाखल झाले आहेत. खासगी बस वाहतूकदारांच्या अंदाजानुसार गेल्या तीन महिन्यात खासगी बस, एस.टी., रेल्वे आदी मार्गांनी सुमारे दोन लाखाहून अधिक दुष्काळग्रस्त पुणे व लगतच्या भागात रोजगारासाठी दाखल झाले आहेत. यातील बहुतेक जण अकुशल व अल्पशिक्षित असून पुण्यातील मजुर, नातेवाईक, ठेकेदार यांच्या ओखळीवर कामाच्या आशेने आले अाहेत. सध्या पुणे परिसरात बांधकाम व्यवसायात मंदीचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बांधकामे बंद आहेत. यामुळे एरवी सहजपणे मिळणाऱ्या रोजगार व रहाण्याच्या सोईसाठी पुण्याच्या विविध उपनगरांमध्ये शोधाशोध करावी लागत आहे. कंपन्यांमध्ये हेल्पर, साफसफाई, आचाऱ्यांकडे, हॉटेलमध्ये वाढप्या अशी मिळेल ती कामे करुन महिना चार पाच हजार रुपये मिळतात, अशी स्थिती आहे.

- उच्चभ्रू प्रवाशांना दुष्काळग्रस्तांचे अजिर्ण
बुलडाण्याहून पुण्याला बसणे येण्यास एका व्यक्तीला ६०० ते ८०० रुपये भाडे आहे. पण ते परवडत नाही म्हणून वाहनचालकांना गयावया करुन १५०-२०० रुपये देवून दोघांच्या जागेवर चार-सहा जण दाटीवाटीत बसून येतात. मात्र या दुष्काळग्रस्त प्रवाशांचा तथाकथीत उच्चभ्रू प्रवाशांना त्रास होतो. अनेकजण त्यांना गाडीत घेवू नका म्हणून भांडतात. त्यातूनही घेतलेच तर चोरीचा आळ घेतात. काही वेळा तर भरपाईही वसुल करतात. पुण्यात पोचल्यावर पहिला सामना रिक्षाचालकांचा करावा लागतो. अव्वाच्या सव्वा भाडे मागणे, दिशाभूल करण्यापासून तर लघुशंका या किंवा त्या बाजूला का केली यावरुनच्या शिव्या धमक्यांपर्यंत अनेक बाबींचा गपगुमान सामना करावा लागतोय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महानगरांमध्ये कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने या हाल अपेष्ठांमध्ये अधिकच भर पडत आहे.

- फसवणूकीचेही प्रकार
दुष्काळग्रस्त, त्यात पुन्हा गरजवंत, पडेल ते काम करायला तयार... शेतकऱ्यांच्या या असहाय परिस्थितीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार पुण्यात कमी अधिक प्रमाणात घडत आहेत. कामाची हमी, पगाराची बोली करुन कामावर नेले जाते, मात्र प्रत्यक्षात पगार देताना कमी पैसे हातावर टेकवत. कुठलाच आधार नाही, भांडून तरी काय होणार. फसवणूक झाली तरी शेवटी गपगुमान मिळेल ती मजूरी घेवून दुसरं काम बघावं लागतंय, अशी माहिती बांधकाम मजूर म्हणून काम करत असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.
---------------------
- कोट
गावाकडं जगूच शकत नाही
‘‘आम्ही १३ जण आलोय पुण्यात. पहिल्यांदाच घर सोडलंय. एकाच्या वळखीनं भोसरीत वाढप्याचं काम करायचंय. नसतो आलो तर आई बाप पोरं उपाशी मरतील. गावाकडं जगूच शकत नाही. गाड्याच्या गाड्या भरुन लोक येताहेत. दरेक गावातून कमीत कमी शे दोनशे लोकांनी गाव सोडलय. घरी फक्त म्हतारी माणसं आणि त्यांचं तुकडा पाण्याचं पहायला एखादं तरणं माणूस एवढंच उरलंय’’
सचिन जाधव, गजानन आडे, विनोद राठोड, निलेश राठोड (सर्वजण मु.पो.राजगड, ता. मेहकर, जि. बुलडाणा)
-----
‘मी मुखेडमधील अंबुलगा गावचा. दहा वर्षापुर्वी पुण्यात आलो. झाडलोटीपासूनची कामं केली. आता थोडी बरी स्थिती आहे. नांदेड, हिंगोली, लोहा, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, कारंजा लाड, जळगाव, भुसावळ या भागातून यंदा कधी नव्हती एवढी लाट आहे. मध्य प्रदेशातूनही नागपूरमार्गे लोक येताहेत. परत कोणी जात नाही.’’
- रामा गुळवे, खुराणा ट्रॅव्हल्स
--------------------