Thursday, December 17, 2015

राज्यात हवामान कोरडे, सोमवारी विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात येत्या रविवारपर्यंत (ता.२०) सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून सोमवारी (ता.२१) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी थंडीची प्रतिक्षा कायम असून अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ झाली आहे. राजाच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई १५.६, अलिबाग १९, रत्नागिरी २०, पणजी २४.२, डहाणू १९.५, भिरा १६.५, पुणे १६.६, जळगाव १४.२, कोल्हापूर १९.५, महाबळेश्वर १८.६, मालेगाव १५, नाशिक १२.४, सातारा १८.९, सोलापूर १९.३, उस्मानाबाद १६.८, औरंगाबाद १९.४, परभणी २१.१, नांदेड १४.५, अकोला १९.२, अमरावती १८, बुलडाणा १९, ब्रम्हपुरी १८.३, चंद्रपूर १९.२, गोंदिया १६, नागपूर १७.२, वर्धा १८.५, यवतमाळ १८.४
---------------- 

कृषी पदव्यत्तर पदवी प्रवेश प्रक्रीया रखडली

 आयसीएआर कोट्यातील जागा रिक्‍त, विद्यापिठस्तरावरून प्रवेश देण्याची मागणी

औरंगाबाद(प्रतिनिधी) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोट्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्‍त असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शासनाने खास विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधांचा अपव्यय सुरु असून इच्छूक पात्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या रिक्‍त जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

कृषी परिषदेमार्फत चालू शैक्षणीक वर्षातील (2015-16) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात आली. यात २5 टक्के जागा (अतिरिक्त 10 टक्के सह) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (आयसीएआर) भरण्यात येतात. आयसीएआर देशपातळीवर प्रवेश परिक्षा घेवून त्यातून निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी संबंधित कृषी विद्यापीठाकडे पाठवते. यानंतरही जागा रिक्त राहिल्यास, नियमानुसार संबंधित विद्यापीठे राज्यस्तरावर जाहिरात देऊन विद्यापीठस्तरावर प्रवेश प्रक्रिया घेतात. यानुसार रिक्त जागांबाबत कृषी विद्यापीठस्तरावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र कृषी परिषदेच्या शिक्षण संचालकांनी चारही कृषी विद्यापीठांना दिले आहे. मात्र, विद्यापीठांनी अद्याप काहीही पावले उचलली नसल्याने या जागांपासून मुकण्याची आपत्ती विद्यार्थींवर ओढावली आहे.

एकट्या परभणी कृषी महाविद्यालयात 2014-15 शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतील 9 जागा रिक्‍त राहूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. यंदाही 2015 -16 या शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतर्गत 7 जागा रिक्‍त असूनही त्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पात्र असूनही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यासंदर्भात दिग्विजय दिवटे यांनी कुलसचिवांना व कृषी परिषदेला निवेदन दिले आहे. कृषी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला आहे.

- विद्यापीठाचा असाही कारभार
कृषी परिषदेच्या कोट्यातील फक्त एका रिक्‍त जागेसाठी 12 ऑक्‍टोबर 2015 ला स्पॉट ऍडमिशन राउंड फक्त परभणी येथे घेण्यात आला. यात आयसीएआर कोट्यातील रिक्त जागांचा समावेश केला नाही. एका जागेसाठी तब्बल 29 विद्यार्थ्यी रांगेत होते. यापैकी एकाला प्रवेश मिळाला. उर्वरित विद्यार्थ्यांना आयसीएआरचा कोटा रिक्‍त असूनही प्रवेशापासून वंचित रहावे लागले. बदनापूर येथील महाविद्यालायत कोणताही स्पॉट राउंड घेतला गेला नाही.

- कोट
आयसीआरच्या रिक्‍त जागा नेमक्‍या कशा भराव्यात, निकष नेमके कसे असावेत, यासंदर्भात कृषी परिषदेकडे वरिष्ठांकडे माहिती व मार्गदर्शन मागितले आहे. यावर निर्णय झाल्यानंतर जाहीरात काढून रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
डॉ. दि. ल. जाधव, कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणी.
.........................

Monday, December 14, 2015

ppp प्रस्ताव दाखल करण्यास 25 डिसेंबर अंतिम मुदत

पुणे (प्रतिनिधी) - येत्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) राज्यात सार्वजनिक खासगी गुंतवणूकीतून (पीपीपी) एकात्मिक कृषी विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०१५ ही आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प राबविण्यास इच्छूक असलेल्या खासगी कंपन्या, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी आपले प्रस्ताव अंतिम मुदतीत कृषी आयुक्तालयातील नियोजन शाखेत जमा करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या mahaagri.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 

Monday, December 7, 2015

मराठा चेंबर अपारंपरिक उर्जा परिषद व प्रदर्शन - 9-10 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज ॲन्ड ॲग्रिकल्चर आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल हयात हॉटेलमध्ये अपारंपरिक उर्जा परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (ता.९) सकाळी जेष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. प्रमोद देव यावेळी उपस्थित असतील. ही परिषद व प्रदर्शन बुधवारी शुल्क (३००० रुपये) असून गुरुवारी सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

सौर व पवन उर्जेतील संधी, धोरणे, वित्तपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कायदेशीर बाबी, आव्हाणे, यशोगाथा आदी विषयावर या परिषदेत चर्चा होणार असून त्यात या दोन्ही क्षेत्रातील सर्व प्रमुख कंपन्या व तज्ज्ञ सहभागी होत आहेत. मराठा चेंबरचे महाव्यवस्थापक अनंत सरदेशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने अपारंपरिक उर्जा विषयक धोरण जाहिर केले आहे. यासाठी विविध योजनाही राबविण्यात येत आहेत. यातून उद्योग, उद्योजक, शेतकरी, संस्थांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. इमारतीच्या छपरांवरील सौर प्रकल्पातून विज स्वयंपूर्णता मिळविण्यास मदत होईल. शिवाय या प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त उर्जा राज्य सरकार खरेदी करणार असल्याने त्यातून उत्पन्नाचीही संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अपारंपरिक उर्जेतील संधींबाबत जागृती करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सौर किंवा पवन उर्जेतील संधींचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी या परिषद व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सरदेशमुख यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ०२० २५७०९००० 

Friday, December 4, 2015

गोदरेज ॲग्रोव्हेटचे सुरभी अभियान

पुणे (प्रतिनिधी) - गोदरेज ॲग्रोव्हेट लि. या पशुखाद्य उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांमध्ये संकरित गाईंचे आरोग्य व पोषण आहार याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाबमध्ये सुरभी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील १२५ गावांमध्ये याअंतर्गत एक ते पाच गाय असलेल्या पशुपालकांसाठी उत्तम दुध उत्पादन, आरोग्य आणि सुयोग्य प्रजनन या निकषांवरील सर्वोत्तम गाय स्पर्धा व मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कंपनीच्या पशुखाद्य व्यवसायाचे प्रमुख मंगेश वांगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. विनय वतल व डॉ. संजय टोके यावेळी उपस्थित होते. श्री. वांगे म्हणाले, संकरित गाईंची दुध देण्याची क्षमता जास्त असते. मात्र त्या क्षमतेनुसार उत्पादन मिळविण्यात शेतकऱ्यांना अपुऱ्या माहितीमुळे अनेक अडचणी येतात. आरोग्य संवर्धन, दुध उत्पादनात सुधारणा आणि प्रजनन क्षमता वाढविणे या सर्वात महत्वाच्या बाबी आहेत. याबाबत सुरभी अभियानात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

Thursday, December 3, 2015

कृषी सल्ला सेवा केंद्रे सुरू करणार



आयुक्त विकास देशमुख ः ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन

लोगो- एसआयएलसी
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिली जातात. मात्र याबाबतचे तांत्रिक सल्ले व सेवा न मिळाल्याने छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती बंद राहतात. तंत्रज्ञान असूनही त्याचा पुरेसा वापर होत नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत तरुणांच्या सहभागातून गावपातळीवर मोफत कृषी तांत्रिक सल्ला व सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमार्फत (एसआयएलसी) आयोजित करण्यात आलेल्या ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ या विषयावरील कृषी ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन गुरुवारी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी अप्पर मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘नेटाफिम’चे व्यवसाय प्रमुख विकास सोनवणे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, ‘एसआयएलसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आहे. फक्त पावसावर अवलंबून असलेला शेतकरी कोलमडून पडलाय. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जमिनीच्या ओलाव्याची सुरक्षा, पाण्याच्या थेंबाथेंबापासून अधिकाधिक उत्पादन व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वाधिक भर देण्यात येत आहे. यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन आदी विविध उपाययोजना, अभियाने राबविण्यात येत आहेत. उत्पादन वाढले की भाव नाही आणि भाव असेल तर उत्पादन नाही, या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक ठरणार आहे. उसाला ठिबक केल्यानंतर वाचलेल्या पाण्यातून इतर पिके घेतली जावीत. कुटुंबाची धान्य, भाजीपाला आदी वार्षिक गरज लक्षात घेऊन उर्वरित जमिनीवर नगदी पिकांचा विचार करावा लागेल.’’

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, शेतीतील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून मूल्य साखळी तयार करण्यापलीकडे शेती विकासाची दुसरी गुरुकिल्ली नाही, असे मत डॉ. गोयल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ शेती करण्यासाठी अनेक घटकांवर अवलंबून राहावे लागते. हे सर्व घटक विखुरलेले अाहेत. यात दुवे नसल्याने दलाल तयार झाले आहेत. या सर्व घटकांना एकत्र केल्याशिवाय शेतीत फायदा नाही. कृषी क्षेत्रातील कंपन्यांनीही शेतकरी विकासासाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय तुमचे धंदे चालणार नाहीत व चांगले दिवसही टिकणार नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांत संघटन शक्ती आहे. संघटितपणे प्रयत्न केल्यास हमीभाव व शासन या दोन्हींशिवाय शेतीतून समृद्धी मिळवता येईल. यासाठी ‘ॲग्रोवन‘मधून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत.’’

श्री. सोनवणे यांनी या वेळी ‘नेटाफिम’ कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. डॉ. पालकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
‘‘सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या स्मार्ट व्हिलेज उपक्रमाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांनी उत्सुकता दर्शविली आहे. यातील १० ते १५ गावे निवडण्यात येतील. त्यासाठी मोठा निधी लागणार असून, तो उभा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार आणि समाजातील घटकांनी यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास हा उपक्रम पूर्ण होण्यास मदत होईल.’’
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह 

थंडीची प्रतिक्षा कायम, सोमवारी पावसाचा अंदाज



पुणे (प्रतिनिधी) - सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल व किमान तापमानामध्ये उल्लेखनिय वाढ झालेली असल्याने राज्यभर थंडी गुल झालेली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र होते. हवामान खात्याचा येत्या रविवारपर्यंत (ता.६) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज कायम आहे. तर सोमवारी (ता.७) कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सरासरीहून कमाल तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसने तर किमान तापमानात दोन ते सात अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी १४.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

अरबी समुद्रात तमिळनाडू किनारपट्टीनजीकच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीच्या पातळीहून सुमारे साडेचार किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय आहे. याच वेळी तामिळनाडूवरील चक्राकार वारे केरळ व लक्षद्विपकडे सरकले आहेत. बांग्लादेशवरही चक्राकार वारे सक्रीय असून मध्य प्रदेशच्या पश्चिम भागावरील चक्राकार वाऱ्याची तिव्रता वाढून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. समुद्रसपाटीच्या पातळीहून ९०० मिटर उंचीपर्यंत हा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील राज्यातील प्रमुख ठिकाणीचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई १९.६, अलिबाग २१.४, रत्नागिरी २३.६, पणजी २४.३, डहाणू २२, भिरा १८.५, पुणे १७.२, नगर १६, जळगाव १६.४, कोल्हापूर २०, महाबळेश्वर १६.४, मालेगाव १७.६, नाशिक १४.९, सांगली २०.६, सातारा १८, सोलापूर २१, उस्मानाबाद १७, औरंगाबाद १८.८, परभणी १९.२, नादेड १६.५, अकोला १९.५, अमरावती १८.४, बुलडाणा १९, ब्रम्हपुरी २०.३, चंद्रपूर २०.४, गोंदिया १७.७, नागपूर १८.१, वाशिम २१.२, वर्धा १७.६, यवतमाळ १५
------------------------ 

Thursday, November 5, 2015

फर्टिलायझर डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाश कवडे

पुणे ः येथील महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोपरगाव (नगर) येथील प्रकाश कवडे यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. या वेळी ही निवड करण्यात आली. संघटनेचे विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.


ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला

दक्षिण कोकण, गोव्यात हलका पाऊस; तमिळनाडू, केरळात अतिवृष्टीचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर आता अरबी समुद्राच्या अनुकूलतेमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. या मॉन्सूनच्या प्रभावाने पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात ईशान्य मॉन्सूनची सक्रीयता वाढून तमिळनाडू व केरळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून सोमवारी (ता.९) दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

किनारी आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉडेचरीसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय झाला असून पुढील दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून पश्चिमेकडे म्हणजेच माघारीच्या मॉन्सूनच्या दिशेने आहे. हे वारे उपसागरावरुन दक्षिणेकडील राज्यांवर बाष्पयुक्त ढग वाहून आणत असल्याने या भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सध्या त्याची तिव्रता सर्वाधिक आहे. अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढलेला आहे.

गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी आणि कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून तीन ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दिवसभरात आंध्र प्रदेशलगतच्या उपसागरात सक्रीय असलल्या चक्राकार वाऱ्याची तिव्रता कमी झाली. तर मध्य पूर्व अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे न्यून दाबाच्या क्षेत्रात डिप्रेशन) रुपांतर झाले. मुंबईपासून सुमारे १००० किलोमिटर अंतरावर सक्रीय असून ते ओमानच्या दिशेने सरकत आहे. शुक्रवारी (ता.६) त्याची तिव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

शुक्रावारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २६.८, अलिबाग २५.६, रत्नागिरी २३.१, पणजी २५, डहाणू २३, पुणे १८.३, नगर १६, जळगाव १९.४, कोल्हापूर २१.९, महाबळेश्वर १७.४, मालेगाव २०.२, नाशिक १६.५, सांगली २३.१, सातारा २०.९, सोलापूर २३, उस्मानाबाद १८, औरंगाबाद १८.६, परभणी १७.१, नांदेड १६, अकोला १९.५, अमरावती २०.६, बुलडाणा १९.६, ब्रम्हपुरी २१.३, चंद्रपूर २१.२, गोंदिया २०.४, नागपूर २०.३, वाशिम २१.६, वर्धा २०.५, यवतमाळ २०.४
----------------------------

Wednesday, November 4, 2015

जमीन मोजणी - मनोज आवाळे

वाचण्याजोगे काही
----------------
जमीन मोजणी
------------------
जमीन मोजणीची कार्यपद्धती, भूमी अभिलेख खात्याचे कार्य, भूमी अभिलेखाकडे असणारी कागदपत्रे, मोजणीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक पद्धत याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार मनोज आवाळे यांनी या पुस्तकात दिली आहे. आदिश्रेय प्रकाशन यांनी ते प्रकाशित केले आहे.
------------------
या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे

- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलमांनुसार जमीनीची मोजणी केली जाते.
- हद्द कायम मोजणी, पोटहिस्सा मोजणी, भूसंपादन संयुक्त मोजणी, कोर्टवाटप मोजणी, कोर्टकमिशन मोजणी, बिनशेती मोजणी असे मोजणीचे प्रकार आहेत.
- जमीनधारकाने आपला भूमी अभिलेख सक्षम करायला हवा. ज्याचे भूमी अभिलेख सक्षम असतात ताचे वाद उद्भवत नाहीत. उद्भवल्यास तातडीने, सामोपचाराने मिटवता येतात.
- भूमी अभिलेख खाते जमीन मोजणीबरोबरच भूसंपादन, सातबारा उताऱ्यावरील आकार, नकाशा, जमीनधारणेच्या नावात आलेली चुक, गटवारी, दुरुस्ती, पोटहिस्सा मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, गाव नकाशातील दुरूस्ती ही कामे करते.
- भूमी अभिलेख कार्यालयाकडील मुळ रेकॉर्डशी तुलना व पडताळणी करुनच नवीन मोजणी केली जाते.
- भूमी अभिलेख खाते जमिनीतील अतिक्रमण दाखवू शकते, अतिक्रमण काढू शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. तो अधिकार तहसिलदारांना आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो.
- जमीन पुनर्मोजणी, ईटीएस प्रणाली, ऑनलाईन मोजणी, उपग्रहाद्वारे गावठाण मोजणी, ई चावडी, ई फेरफार, ई म्युटेशन, कागदपत्रांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन यामुळे भूमी अभिलेख खात्याचा चेहरा मोहरा बदलत आहे.
- जमिनीच्या क्षेत्राबाबत व वादविवादाबाबत पोलिसांना काहीच अधिकार नसतो. त्यामुळे मोजणीबाबत किंबहुना महसूलच्या कुठल्याही बाबत पोलिसांकडे तक्रार करण्याच्या भानगडीत पडू नये. अतिक्रमण काढण्यासाठी शुल्क भरुन पोलिस बंदोबस्त मागवता येतो.
- लगतच्या शेतकऱ्याने मोजणी मागवली म्हणून त्याच्यासारखी मोजणी होईल हा गैरसमज आहे. मोजणी ही उपलब्ध जमिनीच्या रेकॉर्डनुसार होत असते. त्यात उलटापालट करता येत नाही.

Monday, November 2, 2015

कृषीकिंग स्मार्ट ॲपचे उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या कृषिकिंग स्मार्ट ॲप्लिकेशन सेवेचा शुभारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांच्या हस्ते ॲग्रोवनमार्फत पिंपरी येथे आयोजित कृषी प्रदर्शनात नुकताच झाला. कृषीकिंगचे व्यवस्थापन प्रमुख डॉ. नरेश शेजवळ, व्यवसाय प्रमुख निलेश शेजवळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोबाईल प्लेस्टोअरवर हे ॲप्लिकेशन मोफत डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. हवामान अंदाज, पिक सल्ला, बाजारभाव, कृषी क्षेत्रातील घडामोडी, शासकीय योजना व अनुदान आदी कृषी संबंधीत माहिती या ॲप्लिकेशनद्वारे मोबाईलवर उपलब्ध होते.


डाळिंब संघाच्या अध्यक्षपदी शहाजीराव जाचक

उपाध्यक्षपदी अरुण देवरे

पुणे (प्रतिनिधी) - अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या अध्यक्षपदी शहाजीराव जाचक (पुणे) तर उपाध्यक्षपदी अरुण देवरे (नाशिक) यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष रविंद्र नवलाखा व प्रभाकर चांदणे यांनी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकतिच ही निवड जाहिर केली. उर्वरीत कार्यकारणीची निवड संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत जाहिर संघाचे नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - प्रभाकर चांदणे, हरिदास थोरात, भागवत पवार, महेंद्र बाजारे, नारायणराव काटकर (सोलापूर), रविंद्र नवलाखा, शहाजीराव जाचक (पुणे), अरुण देवरे, खेमराज कोर (नाशिक), शिवलिंगप्पा संख, आनंदराव पाटील (सांगली), खंडेराव मदने (सातारा), संदीप रोहमारे (नगर), मदनराव वाडेकर (जालना), डॉ. धोंडिराम वाडकर (लातूर)


8 पीपीपी प्रकल्पांना मंजूरी

एकात्मिक कृषी विकासाच्या
८ नवीन पीपीपी प्रकल्पांना मंजूरी

पुणे (प्रतिनिधी) - राज्य सरकारने सार्वजनिक खासगी गुंतवणूकीतून (पीपीपी) आठ कंपन्यांना २३ जिल्ह्यांतील एक लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर ७०.९४ कोटी रुपयांचे एकात्मिक शेती विकास प्रकल्प राबविण्यास मंजूरी दिली आहे. उत्पादन ते विक्री मुल्यसाखळी विकासासाठी कापूस, सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला, ऊस (गुळ), वाटाणा व मका या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या एक लाख ४० हजार २६१ शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यातून सुमारे तीन लाख २८ हजार ५०० टन शेतमाल खरेदीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या प्रकल्पांसाठी सरकारमार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १५.४० कोटी व इतर योजनांतून ३.२४ कोटी असे एकूण १८.६४ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयामार्फत या प्रकल्पांचे संनियंत्रण करण्यात येणार आहे. शेतकरी हिस्सा १७.९४ कोटी रुपये तर कंपन्यांचा वाटा ३४.२८ कोटी रुपयांचा राहणार आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल संबंधीत कंपनी व संलग्न खरेदीदारांमार्फत खरेदी करण्यात येणार आहे.

- चौकट
- सार्वजनिक खासगी भागिदारी प्रकल्प (२०१५-१६)
पिक --- कंपनी --- जिल्हे --- प्रकल्प किंमत (रुपये) --- क्षेत्र (हेक्टर) --- सहभागी शेतकरी --- माल खरेदी लक्षांक (टन)
वाटाणा --- त्रिमुर्ती फुडटेक प्रा. लि. आणि ॲडवान्टा लि. --- बुलडाणा, नगर --- १००० --- ३५०० --- १४०००
मधुमका --- त्रिमुर्ती फुडटेक प्रा. लि. आणि ॲडवान्टा लि. --- औरंगाबाद, नगर --- ३००० --- ७००० --- ३००००
भाजीपाला --- आकाश ॲग्री सोल्युशन्स प्रा. लि. --- औरंगाबाद, जालना, जळगाव --- १५०० --- २००० --- ९०००
गुळ --- श्रीकांत ॲग्री इंडस्ट्रीज लि. --- सातारा, सांगली --- ५२५ --- १२५१ --- ४४०००
कापूस --- एएफपीआरओ, बेटर कॉटन इनिशिटिव्ह --- यवतमाळ --- २५००० --- १४००० --- ४०००
कापूस यांत्रिकीकरण --- जॉन डियर --- अकोला --- ४० --- १५१० --- ०
कडधान्य --- रॅलिज इंडिया लि. --- उस्मानाबाद, लातूर, बीड --- ७००० --- ११००० --- १००००
सोयाबीन --- एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज लि. --- उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर --- १,५०,००० --- १,००,००० --- २१७५०० 

Sunday, November 1, 2015

मॉन्सून आणि बदल

राज्यात पडणाऱ्या मॉन्सून पावसाचा सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांशी थेट संबंध आहे. या दोन्ही पर्वतांवरील वनसंपदेच्या गेल्या काही दशकात झालेल्या ऱ्हासाची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे. यानंतरही याकडे पुरेशा गांभिर्याने पाहिले जात नाही, हे दुर्दैव आहे.
--------------------
मॉन्सून आणि बदल यांचे अतूट नाते आहे. दर वर्षीचा मॉन्सून यापूर्वीच्या सर्व मॉन्सूनपेक्षा वेगळा असतो. यंदाचा मॉन्सूनही सर्वार्थाने वेगळा आहे. यंदा त्याने अनेक बाबतीत टोकाची स्थिती गाठली आहे. त्याचे भिषण परिणाम शेती, पर्यावरण व अर्थकारणावर झाले आहेत. कदाचित पावसाचे वितरण व मॉन्सूनच्या विविध घटकातील तिव्र बदल गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक असावेत. कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे, वाऱ्याचा समुद्रावरील, घाटमाथ्यावरील आणि पर्जन्यछायेच्या भागातील वेग, कमाल किमान तापमान साऱ्यातच मोठे बदल आहे. संपूर्ण खरिप हातचा गेलाय, रब्बी शाश्वती नाही. विहीरी, धरणं भरतील का, तहान भागेल का... प्रश्न अनेक आहेत.
आता दर वर्षी असं होतंय. परिस्थिती नापिकी आणि आत्महत्यांपर्यंत जावून पोचते. एखादा पाऊस यावा आणि सर्व प्रश्न मिटावेत या आशेवर शासन प्रशासन दिवस काढत राहतं. जागरुक नागरिक बेडकाची, गाढवाची लग्न लावतात. मारूतीला शेण चोळतात. धोड्याला गावभर फिरवून दारोदार पाणी मागतात. भिकचे सारे डोहाळे मिरवले जातात, पुरवले जातात. देवांना गाऱ्हाणी घालून झाली की पुन्हा सारे गुडघ्यावर हात आणि हातावर डोकं ठेवून पावसाची वाट पाहत बसतात. दर वर्षी हे असंच सुरु आहे. यंदाही चित्र फार काही वेगळं नाही. बेडूक ओरडल्यावर पाऊस येतो... मग लावा त्याचं लग्न. तो खुष होईल, ओरडेल व पाऊस पडेल. अशा श्रद्धांच्या नावाखाली किती दिवस आपण अंधश्रद्धा पोसणार आणि पावसाची वाट पाहत भेगाडलेल्या रानात टाचा घासत राहणार.
मॉन्सून, त्याची वाटचाल, त्यावर प्रभाव पाडणारे घटक त्यात मानवी अति हस्तक्षेपामुळे झालेले बदल हे लक्षात घेवून कृती कधी करणार. उलट दिवसेदिवस पाऊस कमी होत चाललाय आणि तो वाढणारच नाही अशा अविर्भावात थेंब न् थेंब अडविण्यासाठी, त्याच्यावर मालकी प्रस्थापिक करण्यासाठी गावोगाव प्रयत्न सुरु आहेत. चांगलं आहे. साठा वाढतोय. पण पाऊस ज्या गोष्टींमुळे कमी झालाय, जे गणित बिघडलंय ते पुन्हा जुळवून, सोडवून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा दिशेने फार कमी प्रयत्न सुरु आहेत. जे आहेत ते ही फक्त पंचतारांकित बैठकांपुरते मर्यादित. प्रत्यक्ष गावपातळीवर, शेता शिवाराच्या पातळीवर काय ? तिथे तर प्रचंड वेगाने ऱ्हास सुरु आहे.
महाराष्ट्रातील पावसावर व्यापक प्रमाणात प्रभाव पाडणारे दोन सर्वात महत्वाचे घटक म्हणजे दक्षिण-उत्तर पसरलेला सह्याद्री पर्वत आणि पुर्व-पश्चिम पसरलेला सातपुडा पर्वत. गेल्या १० ते १५ वर्षात या दोन्ही पर्वतांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास झाला आहे. विशेषतः मॉन्सूनवर थेट परिणाम करणारी वृक्षसंपदा प्रचंड प्रमाणात घटली आहे. यंदा वृक्षसंपदा घनदाट असलेल्या महाबळेश्वरमध्ये एकाच दिवशी ३५० मिलीमिटर पाऊस पडला तर त्याच वेळी अवघ्या ८-१० किलोमिटरवर पाचगणीला अवघा ३५ मिलिमिटर पाऊस होता. अशी स्थिती तोरणमाळपासून ते आजऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी यंदा अनेकदा आढळून आली. पश्चिम पट्ट्यात घाट ओलांडला की बांधावरही झाड दिसणं दुरापस्त होत चाललंय. अवघ्या काही दशकांपूर्वी संपूर्ण जंगल असलेल्या नाशिकच्या संपूर्ण त्र्यंबकेश्वर इगतपुरी पट्यात फक्त उघडे बोडके डोंगर उरलेत.
शिरपूर पँटर्नचा गाजावाजा होतो. त्याचे महत्व आहेच. पण ऐके काळी जलसंपन्न असलेल्या, दोन्ही समुद्रांवरचा मॉन्सून बरसणाऱ्या या भागात हा पँटर्न राबवण्याची गरज का पडली हे लक्षात घेतले जात नाही. सातपुडा बहुतांश उजाड झालाय. डोंगरच्या डोंगर बेचिराख झालेत. पावसाळ्यानंतर डोंगरांवर दिसणारी हिरवळ म्हणजे जंगल नाही, हे कुणी कुणाला समजून सांगायचं. पूर्वी निसर्ग हाच देव होता. प्रत्येक बाबीसाठी निसर्गाची आराधना होती. त्यातून निसर्गालाही संरक्षण होते. जंगल होतं. पाऊस शाश्वत होता. दुष्काळाचे चक्र नव्हते असे नाही पण त्याची कारणे पडणाऱ्या नाही तर वाहून जाणाऱ्या पाण्यात जास्त होती. पुढे पाणीसाठे झाले. निसर्ग देव राहीला नाही. माणसांसाठीच नाही तर देवांसाठीही सिमेंटची जंगले उभी राहताहेत. निसर्ग संपला, तेथे हवामानावर परिणाम झाला, तेथे पाऊस संपला, हे राज्यातील वास्तव आहे.
शासकीय पातळीवरही फारशी आनंददायी स्थिती नाही. युनेस्कोने पश्चिम घाट जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ घोषित करुन काय फरक पडला ते गुलदस्त्यातच आहे. केंद्राने २०१० मध्ये डॉ. माधव गाडगिळ समिती नेमली. त्यांनी बहुतांश पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह घोषीत करावा, नैसर्गिक साधनसंपत्ती टिकण्यासाठी बेकायदा खोदकाम, खाणकामावर काही बंधने घालावीत अशा शिफारशी केला. त्याला विरोध झाला. मग डॉ. कस्तुरीरंगन समिती आली. त्यांनी दगडापेक्षा विट मऊ केली. केंद्राने हा अहवाल मान्य केला. पण राज्य सरकारने दोन्ही अहवाल झुगारलेत. त्यातल्या त्यात राष्‍ट्रीय उद्याने व अभयारण्यांच्या भागात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जे काही संरक्षण होतेय ते होतेय. बाकी सर्व नद्यांचे उगम, पर्जन्यसंचयाचा पाणलोटां भाग, पर्वत शिखरे वाऱ्यावर आहे. मग आपली वाटचाल नक्की कोणत्या दिशेने सुरु आहे, हेच कळत नाही.
देशाचे 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे महत्वाचे आहे. पण हा नियम फक्त देशालाच लावायचा का. त्यासाठी प्रत्येकाने फक्त वन खात्याकडेच बोट दाखवायचे का. देशातील प्रत्येक जमीनधारकाला त्याच्या एकूण जमीन धारण क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्रावर बारमाही फळपिके, वनवृक्ष राखण्याचे बंधन का असू नये. कार्बन क्रेडिट कार्डचं महत्व वारंवार सांगितलं जाते. त्याचीही यास जोड देता येऊ शकते. आता पावसाळा संपला की अवकाळी पाऊस सुरु होईल, मग त्यानंतर गारपीटीचा हंगाम सुरु होईल पुन्हा मॉन्सूनची वाट पाहणं आलंच. आपल्याला कारणं माहित आहेत. उपाय माहित आहेत. पण घोडं अडलेलं आहे. सोशल मीडियावरची चर्चा, पारावरच्या गप्पा आणि हळहळ यापलिकडे योग्य कृतीच्या पातळीवर विषय जात नाही. जोपर्यंत बदलाची गती कमी होती तोपर्यंत हे सहन होत होतं. पण जसा जंगलांचा ऱ्हास वाढेल तसा मॉन्सूनचा आणि संलग्न आपत्तींचाही फटका वाढत राहील. त्याची किंमत आणखी किती काळ चुकवत रहायची, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
संतोष डुकरे - ९८८११४३१८०
(लेखक ॲग्रोवनचे वरिष्ठ बातमीदार आहेत)

तळकोकणातील भात अवकाळीच्या छायेत

पुण (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी गेल्यानंतर कोकणात ठिकठिकाणी सुरु असलेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेले भात पिक नुकसानीच्या छायेत आहे. गेली दोन दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. हवामान खात्याने येत्या बुधवारपर्यंत (ता.४) दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत महाराष्‍ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील ढगाळ हवामान व कोकण-मध्य महाराष्‍ट्रातील पावसाला कारणीभूत ठरलेले अरबी समुद्रातील चापला चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यापासून दूर आखाती देशांच्या दिशेने वेगाने सरकले आहे. मंगळवारी सकाळी (ता.३) अति तिव्र स्वरुपातच येमेनच्या किनारपट्टीला जोरदार धडक देण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे वादळ दूर गेल्याने राज्यातील ढगाळ हवामानातही घट अपेक्षित असून मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाचे सावट कायम आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्‍ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यात नांदेड येथे राज्यातील निचांकी १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

बाजरी, ज्वारी, भात आदी तृणधान्य पिकांच्या काढणीच्या वेळी ढगाळ हवामान असल्यास व पाऊस झाल्यास धान्य भिजून मोठे नुकसान होते. जास्त पाऊस न होता पावसाचा हलक्या पावसाचा शिडकावा झाला तरी साठवणूकीत धान्याला काजळी व किड लागून नुकसान होते. नेमकी अशीच आपत्तीजनक स्थिती दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्‍ट्रात उद्भवलेली आहे. या भागातील ढगाळ हवामान कायम असल्याने पावसाचे सावट व पिकांच्या नुकसानीची शक्यताही कायम आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २१.८, अलिबाग २४.३, रत्नागिरी २४.७, पणजी २५, डहाणू २३.५, पुणे १७.४, जळगाव २०, कोल्हापूर २२.१, महाबळेश्वर १६.४, मालेगाव १९, नाशिक १५.९, सांगली २१.६, सातारा २०.५, सोलापूर २२.६, औरंगाबाद १९, परभणी १८.६, नांदेड १५.५, अकोला २०, अमरावती १८.६, बुलडाणा १८.६, ब्रम्हपुरी २०.३, गोंदिया १८.६, नागपूर २०, वाशिम २१.२, वर्धा १९.४, यवतमाळ १८

Wednesday, October 28, 2015

कृषी आणि पणन, फलोत्पादन - राज्य वार्षिक मुल्यांकन

डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
-------------------------------
अ) गतवर्षभरात खात्याबाबत झालेले पाच चांगले निर्णय
१) जलयुक्त शिवार कार्यक्रमातून २४ टीएमसी साठा निर्माण केला.
२) कृषी निविष्ठांचे अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय.
३) राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना
४) कृषी क्षेत्राच्या स्थैऱ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय.
५) कृषी शिक्षणाच्या विस्ताराचा निर्णय. नवीन विद्यापीठे, महाविद्यालयांची स्थापना
-------------------
ब) गतवर्षभरात खात्याबाबतचे पाच फसलेले निर्णय
१) केंद्र पुरस्कृत योजना व अनुदान यात झालेली मोठी घट
२) कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा करण्याचा निर्णय कागदावरच
३) कृषी क्षेत्रातील आर्थिक वाढीचा दर उंचावण्यात अपयश
४) कृषी अवजारे व निविष्ठा वाटपातील भ्रष्टाचार थांबविण्यात अपयश.
५) शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात अपयश.
------------------
क) आगामी काळात खात्याबाबत अपेक्षित पाच प्रमुख निर्णय किंवा उचलावयाची पावले
१) कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी इतर राज्यांच्या धर्तीवर कृषी व संलग्न खात्यांचा वेगळा अर्थसंकल्प हवा.
२) बाजार समिती कायद्यात सुधारणा करुन शेतकऱ्यांची बाजार साक्षरता (मार्केट इंटेलिजन्स) वाढविण्यावर भर द्यावा.
३) प्रत्येक जिल्ह्यात तेथील मुख्य पिकांवर आधारीत शेतमाल मुल्यवर्धन साखळीसाठी मेगा फुड पार्क स्थापन करावेत.
४) जमीन आरोग्याच्या दृष्टीने शेतीसाठी गुणवत्तापूर्ण जैविक व सेंद्रीय निविष्ठांच्या पुरवठ्याची व्यवस्था करावी.
५) शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षाकवच देण्यासाठी पिक विमा, पशु विमा आदी जनांचे बळकटीकरण करावे.
--------------
ड) खात्याची वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन
(१ ते १० गुण द्यावेत. १ गुण निचांकी कामगिरी तर १० गुण सर्वोत्कृष्ट कामगिरी दर्शवणारा असेल)

- ३ गुण
--------------- 

Tuesday, October 27, 2015

कृषी सहायक, पर्यवेक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या



चार महिन्यांपासून प्रतिक्षा; प्रस्ताव सचिवालयात पडून

पुणे (प्रतिनिधी) - राज्य कृषी विभागाच्या सेवेतील सुमारे ५०० हून अधिक कृषी सहायक व पर्यवेक्षकांच्या विनंती बदल्या गेल्या पाच महिन्यांपासून रखडल्या आहेत. विशेष म्हणजे कृषी विभागातीलच वर्ग एक व वर्ग दोन मधील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या चार महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत. इतर शासकीय विभागातील वर्ग तीन मधिल ग्रामसेवक, तलाठी आदी कर्मचाऱ्यांच्याही विनंती बदल्या झाल्या आहे. फक्त कृषी कर्मचाऱ्यांच्याच विनंती बदल्या सचिवालयात रखडल्याबाबत कृषी सहायक व पर्यवेक्षकांमध्ये तिव्र नाराजीचे वातावरण आहे.

कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या मे अखेरीस पूर्ण होतात. यानंतर जून अखेरपर्यंत विनंती बदल्या होतात. यामध्ये पती पत्नी एकत्रिकरण, कौटुंबिक अडचणी, अति गंभिर स्वरुपाचे आजार, आदिवासी भागात काम करणारे कर्मचारी यांची पात्रतेनुसार विनंती बदली करण्यात येते. सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या विभागिय संभाग बदल्यांची स्वतंत्र यादी मंत्रालयातून जाहिर केली जाते. मंत्रालयातून आयुक्तालयाकडे व तेथून विभागिय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे ही यादी येते. विभागिय कृषी सहसंचालक त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बदलीचा आदेश देतात. गेल्या वर्षीपर्यंत ही सर्व प्रक्रीया सुरळीत सुरु होती. मात्र सचिव बदलल्यानंतर फक्त विनंती बदल्यांनाच खिळ बसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

आदिवासी भागात सहा वर्षे पूर्ण केलेले एक सहायक म्हणाले, शिफारशी इ. सर्व घेवून परिपूर्ण प्रस्ताव विभागिय सहसंचालकांकडून आयुक्तालयाला व तेथून मुख्य सचिवांकडे पाठवले आहेत. आम्ही वर चौकशी केली की पुढच्या महिन्यात होतील, पुढच्या महिन्यात होतील असे सांगितले जाते. प्रत्यक्षात गेली पाच महिने काहीही प्रगती नाही. एकाच वेळी विनंतीवरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या कशा करायच्या असा सवाल, सचिवालयामार्फत उपस्थित करण्यात येत असल्याचे समजते. पण प्रत्यक्षात अधिकृतरित्या काहीही माहिती सांगितली जात नाही. यामुळे बदल्यांच्या प्रस्तावात गैरप्रकार तर सुरु नाही ना, अशी शंका आहे.

- त्यांच्या बदल्या झाल्या, आमच्या का नाही ?
मोक्याच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा मोठी चुरस असते. एका जागेसाठी अनेक इच्छूक असतात. गैरसोईच्या ठिकाणी बदली होऊ नये म्हणूनही अनेकजण जिवाचा आटापिटा करत असतात. यामुळे या सर्व प्रक्रियेत मोक्याच्या जागी असलेल्या व्यक्ती किंवा अशा व्यक्तींच्या जवळच्या लोकांमार्फत आर्थिक देवाणघेवाण करुन, पैसे देवून इच्छापूर्ती करण्याचे प्रकार सुरु असतात. पद, अधिकार व उलाढाल मोठी असल्याने ही सेटलमेंटची रक्कमही मोठी असते. कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्या बदल्यांत अशा पद्धतीने फारशी देवघेव होत नाही. म्हणून बदल्या रखडल्यात अशीही चर्चा या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

- मंत्र्यांच्या शिफारसी, कार्यकर्त्यांची सेटींग
विनंती बदल्यांबाबत राज्य शासनाचे नियम, आदेश आहेत. त्यानुसार प्रस्ताव सादर करताना बदली पात्र ठरावे व इच्छूक ठिकाणी बदलीची इच्छापुर्ती व्हावी म्हणून अनेकांनी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरुन सेटींग लावली आहे. काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दस्तुरखुद्द कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचीही शिफारस जोडली आहे. गृहमंत्री राम शिंदे व इतर मंत्री, आमदारांच्याही शिफारशी आहेत. सोईच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून अनेकांनी मथ्यस्तांमार्फत आर्थिक व्यवहारही केले आहेत. मात्र मंत्रालयातून यादीच बाहेर पडत नसल्याने हे कर्मचारी हवालदिल अवस्थेत आहेत. 

Wednesday, October 21, 2015

अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आजपासून आपल्या हाती

लोगो - ॲग्रोवन कृषी प्रदर्शन २०१५
-------------
पिंपरीतील एच.ए. मैदानावर ॲग्रोवन कृषी प्रदर्शन

- प्रवेशिका भरा, ट्रॅक्टर जिंका !
ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असलेल्या फोर्स मोटर्स लि. मार्फत प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्रदर्शनात प्रवेश करताना तिकिटासोबत देण्यात येणारी प्रवेशिका पूर्ण भरून जमा करणे अत्यावश्यक आहे. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत जमा होणाऱ्या प्रवेशिकांतून एका भाग्यवान शेतकऱ्याची निवड करण्यात येईल. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ही निवड जाहिर करून संबंधीत शेतकऱ्याला ट्रॅक्टर वितरीत करण्यात येईल.

पुणे (प्रतिनिधी) - गेली वर्षभर राज्यभरातील प्रगतशिल शेतकरी वाट पाहत असलेले उपयोगाच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम असलेले ॲग्रोवनचे भव्य कृषी प्रदर्शन आजपासून उद्योगनगरी पिंपरी चिंचवड येथिल हिंदुस्तान ॲन्टीबायोटिक्सच्या मैदानावर सुरु होत आहे. प्रदर्शनासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच शेतकरी दाखल होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित आणि राज्यात सेवा पुरविण्यात सर्वोत्तम असलेल्या कंपन्या व संस्था या प्रदर्शनातून थेट शेतकऱ्यांशी जोडणी करणार आहेत. शेतकऱ्यांना हवे ते सर्व प्रकारचे अत्याधुनिक, अद्ययावत तंत्रज्ञान या ठिकाणी पाहता, जोखता व स्विकारता येणार आहे.

वारकऱ्यांसाठी जशी पंढरी तसे प्रगतशिल शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवन कृषी प्रदर्शन हे समिकरण रूढ झाले आहे. ॲग्रोवन दर वर्षी आयोजित करत असलेल्या कृषी प्रदर्शनातून ज्ञान, तंत्रज्ञान व प्रेरणा घेवून राज्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो यशोगाथा आकारास आल्या आहेत. यंदा पुन्हा एकदा या प्रदर्शनात सहभागी होवून स्वतःच्या गरजेनुसार अत्याधुनिक, प्रगत तंत्रज्ञानाशी जोडून घेवून स्वतःची शेती, कुटूंब विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, जे.जे. ओव्हरसीज हे प्रायोजक,आईज कॉर्पोरेशन प्रा.लि. हे सहप्रायोजक आणि डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ॲग्रो) प्रा.लि. हे नॉलेज पार्टनर आहेत.

राज्य व देशपातळीवरील विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रक्रियाविषयक संस्था, शासनाचे विविध विभाग, गवडपूर्व कामांपासून ते पीक उत्पादनाची प्रक्रिया, विक्री व निर्यातीपर्यंतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्यातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य अाहे. शेती उपयोगी अवजारे, ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर, पिकांचे नवीन वाण, खते, बियाणे, ठिबक आणि तुषार सिंचन, कीडनाशके, पशुपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग, पीक व्यवस्थापन, ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पॅकेजिंग, शीतगृह तंत्र, सौर ऊर्जा उपकरणे, प्रतवारी यंत्रणा, टिश्‍युकल्चर, पशुपालन, पोल्ट्री उद्योग, पॉलिहाऊस आदींच्या कंपन्या व संस्थांनी प्रदर्शनात तंत्रज्ञान सादर केले आहे. कृषी पर्यटन, बांबू पॉलिहाऊस, इनलान ठिबक मशिन, पशुखाद्य, मोबाईल तंत्रज्ञान यांची स्वतंत्र दालने प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात पाचही दिवस सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत विविध विषयांवरील चर्चासत्रांचे होणार आहेत. ज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रगतिशील शेतकरी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

- खास आपल्या सोईसाठी...
ॲग्रोवन प्रदर्शनास सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोईसाठी यंदाचे प्रदर्शन अधिक भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनस्थळ मुंबई, नाशिक, नगर व सातारा या चारही दिशांनी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोईच्या ठिकाणी आहे. प्रदर्शनीय दालने, प्रात्यक्षिके, वाहनतळ अधिक ऐसपैस करण्यात आली आहेत. पिण्याचे पाणी व शौच्चालयांचीही सुविधा आहे. प्रदर्शन स्थळी पोचण्यासाठी न.ता.वाडी (शिवाजीनगर) बस स्थानकापासून स्वतंत्र बस सेवा सुरु करण्यात आली अाहे. स्वतःच्या वाहनाने प्रदर्शनस्थळी येणारांसाठी प्रमुख रस्त्यांवर दिशादर्शक लावण्यात आले आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत २७ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.

प्रदर्शनातून मिळवा...
- शेतीतून विकासाची नवी दृष्टी
- मजूरांच्या समस्येवर उपाय
- उत्पादन खर्च कपातीचे तंत्र
- नव्या किड रोगांवरील नवी औषधे
- प्रगत, यशस्वी शेतकऱ्यांकडून प्रेरणा
- कंपन्या, संस्थांकडून उत्कृष्ट सेवा, मार्गदर्शन
- कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी
-----------

कृषीसंस्कृतीच्या संपन्न जिवनकथा

पुस्तक परिचय - संतोष डुकरे
-------------
पुस्तकाचे नाव - पावसाचे पाखरू
लेखक - र. वा. दिघे
प्रकाशक - संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे - १४४
किंमत - १०० रुपये
-------------
कृषी व ग्रामिण साहित्याचे आद्य शिलेदार म्हणून र. वा. दिघे यांचा लौकीक आहे. ते स्वतः प्रगतशिल शेतकरी होते. कोकणात उत्कृष्ट गहू उत्पादनाबाबत तत्कालिन राज्य शासनामार्फत त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शेती कसता कसता त्यांनी साहित्यनिर्मिती केली. स्वातंत्र्य पूर्व काळातील शेती व शेतकऱ्यांची त्यांनी चितारलेली परिस्थिती आजच्या स्थितीतही जशीच्या तशी लागू होते. त्यांचा वारकरी आणि शेतकरी नायक वारकरी संप्रदायाची मूल्ये जपत संतांच्या शिकवणीतून निसर्गाच्या आपत्तीशी झगडा देतो, मुकाबला करतो. पाणकळा, पड रे पाण्या आदी कादंबऱ्या, कथा, कवितांमधून त्यांनी शेतकरी जीवन समर्थपणे उभे केले आहे. पड रे पाण्या, पड पाण्या तू, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी... हे त्यांचे ७० वर्षापूर्वीचे गित आजही राज्यभर लोकप्रिय आहे. पावसाचे पाखरु हा त्यांचा १९५० च्या दशकातला कथासंग्रह. त्यातील पावसाचं पाखरु, राजा खेळतो भातुकली, फितूर, वेताळाची धोंड आदी कथांमधून कृषी व ग्रामिण जिवनाचे अनेक कांगोरे काळजाला हात घालतात.

राजाची लेक बाव्हली या कथेत पश्चाताप झालेला राजा आपल्या शेतकऱ्याशी लग्न केलेल्या राजकन्येला जावयाला राजा करण्याचे बोलतो तेव्हा राजकन्या म्हणते... शेतकरी राजा झाला तर शेती कोण करील. माझं राज्य शेती, माझा आनंद शेतीत आहे. सर्वच शेतकरी राजा होवू पाहत आहेत. त्यांनी शेतकरीच राहीलं पाहिजे. शेतकऱ्याचा राजा करण्यापेक्षा राजानं शेतकरी झालं पाहिजे. ज्या दिवशी सर्वजण शेतकरी होतील अन् आमच्या शेतीच्या राज्यात येतील त्या दिवशी राजाची जरुरी भासणार नाही. महात्मा फुलें बळीच्या राज्याची कल्पना मांडली. दिघेंनी शेतकऱ्याने राजा होण्यापेक्षा राजाने शेतकरी व्हावे, ही विचारधारा रुंदावली. या पुस्तकाची डॉ. सदानंद मोरे यांनी लिहीलेली प्रस्तावणा कृषी व ग्रामिण साहित्यातील र. वा. दिघे यांचे अमिट योगदान अतिशय नेमकेपणाने स्पष्ट करणारी आहे. हिंदू, मुस्लिम, अस्पृश्य, आदिवासी अशा विविध सामाजिक, धार्मिक गटांचे अभिसरण व्यापक मानवतावादी दृष्टीने करून जोतीराव फुल्यांना अभिप्रेत असलेल्या एकमय लोकांचे म्हणजे भारत या राष्ट्राचे प्रतिबिंब साहित्यात पाहू शकणारे र. वा. दिघे हे एकमेव लेखक आहेत. या शब्दात डॉ. मोरे यांनी त्यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.
------------

जनावरांच्या असेसरीज - मार्केट स्टोरी

पुणे (प्रतिनिधी) - गेल्या काही वर्षात वाढलेल्या इंधनाच्या किमती, सलग तीन चार वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती आणि जनावरांच्या शौकीनांच्या संख्येत झालेली घट यामुळे बैल आणि इतर जनावरांसाठीच्या विविध वस्तूंच्या मागणीत गेल्या काही वर्षात घट सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र यानंतरही वस्तूंच्या किमतींचा आलेख मात्र चढताच आहे. जोती, माळा इ. तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येही खऱ्या कवड्यांच्या ऐवजी प्लॅस्टिकच्या कवड्या वापरण्यासारखे बदल होत आहेत.

कोणत्याही प्रकारचे पशुपालन करताना जनावरांसाठी विविध प्रकारच्या वस्तु शेतकऱ्यांना अावश्यक ठरतात. बांधण्यासाठी दोरखंड, गळपेंडे, मोरखी, वेसन, सजवण्यासाठी घुंगरमाळा, दृष्टमाळा, तोडे, वशिंड पट्टा, गोंडे, बेगडं आदी अनेक प्रकारच्या वस्तू दैनंदीन पशुपालनात वापरल्या जातात. या वस्तूंच्या निर्मिती व किमतीत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बदल सुरु असल्याची स्थिती आहे. डिझेलच्या किमती वाढतील किंवा कमी होतील तसा या वस्तूंच्या किमतीत चढ उतार होत आहेत. पूर्वी मोरखी इ. वस्तू सरसकटपणे दोरखंडासून तयार करण्यात येत. आता यासाठी नायलॉन, सुती किंवा मिश्र धाग्यांच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येतोय. शेतकऱ्यांची पहिली पसंती अशा पट्ट्याच्या वस्तूंना आहे.

- अंबाडी हद्दपार
काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात घायपात या झुडुपवर्गिय वनस्पतीची पाने भिजवून त्यापासून अंबाडी आणि अंबाडीपासून दोरखंड व जनावरांच्या उपयोगी वस्तू तयार केल्या जात. काही विशिष्ट समाज या व्यवसायात होते. मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून अंबाडीपासून दोरखंड व इतर वस्तू तयार करण्याचे व्यवसाय जवळपास बंद पडले आहेत. बाजारातही अंबाडीचे दोरखंड दुर्मिळ झाले असून नायलॉनच्या दोरखंडांनी बाजारपेठ काबिज केली आहे.

- बैलगाडा शर्यतींचा असाही परिणाम
बैलगाडा शर्यतीमुळे बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू निर्मिती व विक्रीला चांगले दिवस आले होते. दोरखंड, मोरखी, वेसन, गळपट्टे, कवड्याच्या माळा, दृष्टमाळा, गोंडे, बेगडं आदींना मोठी मागणी होती. अनेक शौकीन प्रत्येक शर्यतीच्या वेळी या सर्व साहित्याचे वेगवेगळे साज वापरत. यामुळे या वस्तूंची मागणी टिकून होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शर्यती बंद आहे. यामुळे या वस्तूंची बाजारातील उलाढाल २० ते ३० टक्क्यांनी मंदावली आहे. मशागतीच्या जनावरांसाठी शेतकरी वर्षा दोन वर्षाने एकदा खरेदी करतात, ती सुद्धा पोळ्याला सुमारास किंवा आगुठीच्या वेळी. इतर वेळी बाजार मंदावलेला असतो, अशी माहीती बेल्हा (जुन्नर, पुणे) येथिल बैलबाजारातील विक्रेत्यांनी दिली.

- जनावरांसाठीच्या वस्तुंच्या प्रतिनग किमती (रुपये)
मोरखी - २० ते ४०, चाबुक - ८० ते १५०, दोरखंड - १२० ते १६० रुपये किलो, वेसन - १० ते ५०, गळपेंडे - २५ ते ८० रुपये, घुंगरमाळ - ६०० ते ७००, दृष्टमाळ - ६० ते ८०, कवडीमाळ - ५० ते ७०, गोंडे - २० ते ५०, शिंगाड्या - ७० ते ८० रुपये जोडी, भवरकडी - १० ते ६० रुपये जोडी, ताडपत्री १३० ते २०० रुपये किलो

- कोट
‘‘गेल्या दहा वर्षात बैल व जनावरांचे शौकीन लोक कमी झाले आहेत. बैलपोळा, आगुठीचे सणवारही पुर्वीसारखे होत नाहीत. यामुळे जनावरांच्या उपयोगाच्या सजावटीच्या वस्तुंच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शर्यतींवरील बंदी, डिझेलच्या वाढत्या किमती याचाही फटका बसलाय. पण वस्तूंच्या किमती चढत्या आहेत.
- हरीभाऊ नारायण गुंजाळ, विक्रेते, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे
----------------- 

रब्बीला प्रतिक्षा थंडीची


- हवामान अंदाज
राज्यात येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व विभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकणात २५ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उर्वरीत महराष्ट्रात हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशांनी चढ उतार होऊ शकतो. मात्र थंडीत फारशी वाढ होण्याची चिन्हे नाहीत.

पुणे (प्रतिनिधी) - माघारीच्या मॉन्सूनपासून पडलेला पावसावर रब्बी पिकांच्या पेरणीची वेळ साधण्यासाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीसाठी थंडीची प्रतिक्षा आहे. नैऋत्य मोसमी वारे देशातून पूर्णतः माघारी परतल्याने पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. मात्र हिवाळ्याच्या पहिल्याच ऑक्टोबर महिन्यात कमाल व किमान या दोन्ही तापमानांनी उचल खाल्ली आहे. पाणवठ्यांच्या भागातील पहाटेच्या थोड्याफार थंडीचा अपवाद वगळता राज्यात अद्याप हिवाळा सुरु होऊनही हिवाळ्याची चाहूल लागलेली नाही.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोला येथे राज्यातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून दोन ते पाच अंशांनी उंचावलेले आहे. किमान तापमान विदर्भात सर्वाधिक उंचावले आहे. या विभागात नेक ठिकाणी किमाल तापमानात सरासरीहून दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही किमान तापमान सरासरीहून अल्प प्रमाणात उंचावलेले आहे. यामुळे अद्याप फारशी थंडी अनुभवास आलेली नाही.

हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह छायाचित्रांनुसार दक्षिण अरबी समुद्र व मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. उत्तरेकडील हिमालयालगतच्या राज्यांमध्ये व दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने गुरुवारपासून राजस्थान, पंजाब, हरियानाच्या भागात माल व किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागातील तापमानात आणखी घट झाल्यास पुढील आठवड्यात उत्तरेकडून थंडी दाखल होवू शकते. मात्र, अद्याप यादृष्टीने हवामान घटकांची फारशी प्रगती झालेली नाही.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे बुधवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान व कंसात कमाल तापमानातील सरासरीहूनची वाढ अंश सेल्सिअसमध्ये - पुणे ३३.९ (२.२), नगर ३६.८ (४.१), जळगाव ३७.४ (२.६), कोल्हापूर ३३.९ (२.५), महाबळेश्वर २९.४ (३.५), मालेगाव ३६.४ (३), नाशिक ३४.४ (२.१), सांगली ३४.७ (२.२), सातारा ३३.१ (२.४), सोलापूर ३५.७ (३), मुंबई ३५.४ (२.६), अलिबाग ३७ (४.६), रत्नागिरी ३७ (४.६), पणजी ३५.८ (३.७), डहाणू ३५.६ (२.९), उस्मानाबाद ३३.२ (२.७), औरंगाबाद ३३.४ (१.५), परभणी ३५.९ (३.४), अकोला ३७.६ (४.१), अमरावती ३५.२ (१.६), बुलडाणा ३४.७ (२.३), ब्रम्हपुरी ३५.८ (३.४), चंद्रपूर ३६.८ (४.१), गोंदिया ३४.९ (२.६), नागपूर ३६.१ (३.४), वाशिम ३३.८, वर्धा ३७ (४.४), यवतमाळ ३५ (३.३)
------------------------------------ 

Monday, October 19, 2015

अतिसुक्ष्म ते अतिभव्य कृषी तंत्रज्ञानाचे सिमोल्लोंघन

लोगो - अॅग्रोवन कृषी प्रदर्शन 2015
-----------------
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन दोन दिवसांवर


पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील शेतीसाठी आणि शेती संबंधीत प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरणारे अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन आता अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच शुक्रवारी (ता.23) पिंपरी येथील हिंदुस्तान अॅंटिबायोटिक्सच्या मैदानावर हे प्रदर्शन सुरु होणार आहे. अतिसुक्ष्म व मोबाईल टेक्नॉलॉजीपासून ते अतिभव्य यंत्रसामग्रीपर्यंत सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करुन शेती विकासाचे सिमोल्लंघन करण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे.

जमीनीची मशागत किंवा लागवड पुर्व कामांपासून ते पिक उत्पादनाची प्रक्रीया, विक्री व निर्यातीपर्यंतच्या संपूर्ण मुल्य साखळीतील प्रत्येक घटकाबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असेल. शेतीपुरक व्यवसायातील संधींशी शेतकऱ्यांची जोडणी करण्यासाठी विशेष दालनांचीही निर्मिती करण्यात आली आहे. राज्य व परराज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून शेतकऱ्यांच्या सोईसाठी पुणे शहराजवळ असलेल्या पिंपरीमधील एच.ए.च्या भव्य मैदानावर यंदा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लहान-मोठ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजारे, ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर, पिकांचे नवीन वाण, खते, बियाणे, ठिबक आणि तुषार सिंचन, कीडनाशके, पशूपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग, पीक व्यवस्थापन, ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पॅकेजिंग, शीतगृह तंत्र, सौर उर्जा उपकरणे, प्रतवारी यंत्रणा, टिश्‍यूकल्चर, पशूपालन, पोल्ट्री उद्योग, पॉलीहाऊस आदींचा यात समावेश आहे.

राज्य व देशपातळीवरील विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रक्रीयाविषयक संस्था, शासनाचे विविध विभाग यांचाही यात तंत्रज्ञान व तज्ज्ञांसह सक्रीय सहभाग आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर जे.जे. ओव्हरसीज हे प्रायोजक आहेत. आईज कार्पोरेशन प्रा.लि. हे सहप्रायोजक आणि डॉ.बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा.लि. हे नॉलेज पार्टनर आहेत.

- ट्रॅक्टर जिंकण्याची संधी
अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे या ही वर्षी फोर्स टॅक्टर्समार्फत ट्रॅक्टर भेट मिळविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी प्रवेश घेताना देण्यात येणारी प्रवेशिका पूर्ण भरुन जमा करणे अत्यावश्यक आहे. जमा होणाऱ्या प्रवेशिकांतून एका भाग्यवान शेतकऱ्याला फोर्समार्फत हा ट्रॅक्टर देण्यात येईल.

- स्वतंत्र विषयांना स्वतंत्र दालने
राज्यभरातील शेतकऱ्यांनी अॅग्रोवनकडे केलेली विचारणा व मागणी यानुसार या प्रदर्शनात विविध विषयांवरील तंत्रज्ञानाची स्वतंत्र दालने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी पर्यटन, बांबू पॉलिहाऊस, इनलाईन ठिबक मशिन, पशुखाद्य, मोबाईल तंत्रज्ञान आदी दालनांचा समावेश आहे.

- चर्चासत्रांची मेजवानी
प्रदर्शनात पाचही दिवस सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळमुक्तीपासून पिक उत्पादन ते प्रक्रीया उद्योजक होण्यापर्यंतच्या अनेक विषयांचा यात समावेश असून राज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रगतशिल शेतकरी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

चौकट
- अॅग्रोवन कृषी प्रदर्शन
कालावधी - 23 ते 27 ऑक्टोबर 2015
ठिकाण - हिंदुस्तान अॅंटिबायोटिक्स (एच.ए) मैदान, पिंपरी, पुणे
वेळ - सकाळी 11 ते सायंकाळी 7
प्रवेश शुल्क - प्रतिव्यक्ती 40 रुपये
वाहतूक सेवा - न.ता. वाडी बस स्थानक (शिवाजीनगर) विशेष बस सेवा
-------------- 

Tuesday, October 13, 2015

पाणी वाटप

पुणे (प्रतिनिधी) - कायद्यातील तरतूदींनुसार समन्यायी पाणी वाटप अमलात आणण्यासाठी पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणी व इतर धरणांमध्ये नदीमार्गे पाणी सोडल्यास प्रत्यक्ष सोडलेल्या पाण्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक पाणी वाया जाते असा पुर्वानुभव आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या आग्रहातून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील धरणांमधून उजणी व इतर धरणांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तर प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाण्याचा धोका आहे. यातून सर्वांचेच मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीची फेररचना करण्याची गरज तज्ज्ञांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचा पावसाळा संपल्यानंतरही धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. उजणीत अवघा १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. याच वेळी घाटालगतच्या खडकवासला, पवना, चासकमान आदी धरणांमध्ये ६० ते ८० टक्के पाणीसाठा आहे. या धरणांतून उजनीमध्ये पाणी सोडण्याची याचिका जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, उजणी प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्यांची बाजू ऐकूण घेतली आहे. येत्या आठ - पंधरा दिवसात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या संभाव्य नुकसानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे विभागातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पश्चिम पट्ट्यातील अनेक धरणे ५५ ते ८० टक्के भरली आहे. यामुळे पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणीमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी आहे. नाशिक विभागातही नाशिकमधील धरणे व जायकवाडी प्रकल्प याबाबत अशीच स्थिती आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार राज्यात समन्यायी पाणी वाटपाचे धोरण आहे. संबंधीत खोऱ्यातील पाण्याचे ता भागातील सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटून देण्याचे काम याद्वारे करण्यात येते. मात्र खोऱ्याच्या एका बाजूला पाणी असताना दुसरीकडे धरणे कोरडी असून तिव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे वाटप समन्यायी व्हावे हे खरे पण सुमारे ३०० किलोमिटरपर्यंत ते पुरवताना बाष्पिभवन, गळती आदी माध्यमातून मोठे नुकसानीचा धोका आहे. शिवाय यामुळे पाटाने पाणी सोडण्यावरही मर्यादा येणार आहे. यामुळे नदीतून पाणी सोडू नये, अशी मागणी आहे.

- पाणीवापरावर निर्बंध हवेत
पुणे व पिंपरी चिंचवडसह मोठ्या शहरांमध्ये प्रतिव्यक्ती गरजेपेक्षा कित्येक पट अधिक पाणी वापरले जाते. जादा पाणी वापरामुळे सांडपाणीही अधिक प्रमाणात तयार होत असून त्यासाठीही अतिरिक्त पाणी वाया घालवले जाते. शहरांच्या या अतिरेकी पाणी वापरामुळे शेतीला पाणी कमी पडत असून शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरवले जात आहे. यंदाची स्थिती पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने बिकट आहे. यामुळे पाणी वापरावर निर्बंध आणावेत. राज्य शासनाने या सर्व बाबींकडे गांभिर्याने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------- 

मॉन्सून दोन दिवसात परतनार



पावसाळ्याची अखेर; हिवाळ्याची चाहूल

पुणे (प्रतिनिधी) - बरोब्बर चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाळा संपणार असून हिवाळ्याला प्रारंभ होणार आहे. हवामान खात्याने येत्या दोन दिवसात नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या वाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील परतीचा प्रवास पूर्ण होऊन राज्य मॉन्सूनमुक्त होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक ठिकाणी पाऊस थांबला असून उन्हाची ताप व थंडीची झुळूकही वाढू लागली आहे. तुरळक ठिकाणी पडत असलेला पाऊसही या दोन दिवसात पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी (ता.१६) सकाळपर्यंत फक्त कोकणात एखाददुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत संपूर्ण महाराष्ट्रात आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणेतर महाराष्ट्रात कोठेही पावसाची शक्यता नाही. या भागात कमाल तापमानात अल्पशी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात ऑक्टोबर हिट जाणवू लागली असून कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत उंचावला आहे.

गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रातील तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी कमी होऊन त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर ओमानच्या आखाताच्या दिशेने सरकत आहे. राज्यांतर्गत भागात वाऱ्याची दिशाही मॉन्सूनच्या नेहमीच्या दिशेच्या विरुद्ध झाली आहे. राज्यात बाष्पयुक्त ढगांची आवकही थांबलेली आहे. यामुळे राज्यातील पाऊस थांबून मॉन्सून माघारी परतणार अशी स्थिती आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. माथेरान येथे सर्वाधिक ४० मिलीमिटर पाऊस पडला. कोकणात सांगे व मध्य महाराष्ट्रात सुरगणा येथे प्रत्येकी २० मिलीमिटर पाऊस पडला. कणकवली, लांजा, संगमेश्वर, देवरुख, सुधागड, पाली, विक्रमगड, गगनबावडा, गारगोटी, भुदरगड, गिरणा धरण, महाबळेश्वर या ठिकाणी प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३३ (२६), डहाणू ३४ (२६), पणजी ३२ (२५), हर्णे ३३ (२५), मुंबई ३३ (२५), रत्नागिरी ३३ (२३), नगर ३५ (२०), जळगाव ३८ (२१), कोल्हापूर ३२ (२२), महाबळेश्वर २६ (१७), मालेगाव ३८ (२२), नाशिक ३३ (२१), पुणे ३१ (२१), सांगली ३१ (२३), सातारा ३१ (२०), सोलापूर ३५ (२३), औरंगाबाद ३३ (२१), नांदेड ३७ (१९), उस्मानाबाद ३३ (२०), परभणी ३६ (२१), अकोला ३७ (२१), अमरावती ३५ (२०), ब्रम्हपुरी ३६ (२३), बुलडाणा ३४ (२३), चंद्रपूर ३५ (२३), नागपूर ३७ (२०), वर्धा ३७ (२०), यवतमाळ ३५ (२०)
------------------ 

Wednesday, September 9, 2015

रामेती, वनामतीच्या हस्तांतरणास कृषी कर्मचाऱ्यांचा विरोध

पुणे (प्रतिनिधी) - सामान्य प्रशासन विभागामार्फत राज्याच्या प्रशिक्षण धोरणाअंतर्गत प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरण व सुसुत्रिकरणासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांना कृषी खात्यातील सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. वनामती व रामेतीतील कृषीचे कर्मचारी कमी करुन त्या ठिकाणी महसूल व इतर खात्यातील अधिकाऱ्यांच्या नेमणूका हे विरोधाचे मुख्य कारण अाहे. या प्रशिक्षण संस्थांचे हस्तांतरण थांबवावे, यातील पदे प्रचलित नियमानुसार कृषी खात्यातूनच भरावीत, कृषीच्या विभागिय सहसंचालक कार्यालांची संख्या वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाने केली आहे.

वनामती ही राज्याच्या कृषी विभागाचे शिखर प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अखत्यारित विभागिय पातळीवर सात संस्था (रामेती) कार्यरत आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून या संस्थांमध्ये शासनाच्या इतर खात्यांच्या लोकांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या या संस्थेत बहुसंख्य प्रशिक्षण महसूल विभागाचे होत असतात. आता ही संस्था सामान्य प्रशासनकडे हस्तांतरीत होत असल्याने कृषी खात्यातील ४३ राजपत्रित दर्जाची उच्च पदे तर ८० अराजपत्रित कर्मचाऱ्यांची पदे कमी होणार अाहेत. कृषी खात्याची पदे इतर खात्यातून भरली जात असताना कृषी विभाग मूग गिळून गप्प आहे. लिपीक प्रवर्गातील एक वरिष्ठ पद महसूल विभागाच्या घशात टाकले आहे. यामुळे कृषी विभागातील लिपीक संवर्गातील पदोन्नतीची साखळी खुद्द सामान्य प्रशासन विभागानेच तोडली आहे. हा कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांवरील अन्याय असल्याचा महासंघाचा आरोप आहे.

सुधारित आकृतीबंधाच्या नावाखाली कृषी विभागाच्या कर्मचारी संख्येत सातत्याने कपात करण्यात येत आहे. रिक्त पदे वर्षानुवर्ष भरली जात नाहीत. आता रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करुन काम भागविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर तेथील कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा फतवा शासनाने काढला आहे. कृषी विभागाच्या विभागिय रचनेत नागपूर विभागात सर्वाधिक ६ जिल्हे असून अमरावती, लातूर व कोकण विभागात प्रत्येकी ५ जिल्हे आहेत. याउलट पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी तीन जिल्ह्यांसाठी एक विभागिय सहसंचालक कार्यालय आहे. नाशिक विभागात चार तर पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद विभागांमध्ये प्रत्येकी तीन जिल्ह्ये आहेत. या विभागिय रचनेत विदर्भावर अन्याय करण्यात आला आहे. नागपूर व अमरावती विभागांचे विभाजन करुन चंद्रपूरसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा, अशी मागणी आहे.

वनामती संस्थेचे महसूल खात्याकडील हस्तांतरण त्वरीत रद्द करावे, वनामती व कृषी खात्यातील रिक्त पदे कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांतूनच भरली जावीत. वनामतीत प्रतिनियुक्तीवर आलेल्या इतर खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळ खात्यात परत पाठवावे. राज्यातील सर्व विभागातील रचना सुधारावी. नागपूर व अमरावती विभागाचे विभाजन करुन चंद्रपूर हा स्वतंत्र विभाग तयार करावा, या मागण्यासाठी महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शासकीय पातळीवर नुकताच निषेध व्यक्त करण्यात आला असून यापुढील काळात या प्रश्नांवर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

Wednesday, August 26, 2015

यशोगाथा - भरत वाजेंची वेगळी वाट

शेतीला दिली प्रक्रीयेची साथ
भरत वाजेंची वेगळी वाट
-----------------
पिढ्यान पिढ्या पिक उत्पादनाच्या चक्रात व्यस्त असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी शेतमाल विक्री किंवा प्रक्रियेचा वेगळा विचार करणं आणि तशी वाट धुंडाळणं ही तशी धाडसाची गोष्ट. मात्र कुटुंबाच्या पाठबळ आणि स्वतःची कल्पकता या जोरावर जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक (जि.पुणे) गावच्या भरत बाळु वाजे या युवकाने स्वतःच्या शेतीला शेतमाल प्रक्रीयेची जोड देवून विकासाची नवी वाट धरली आहे. त्याची वेगळी वाट व त्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी धडपड परिसरातील इतर तरुणांनाही शेतीतून काहीतरी वेगळं घडविण्यासाठी प्रेरक ठरत आहे.
-----------------
संतोष डुकरे
-----------------
मारुती नाना वाजे यांचे तीन मुले (बाळु, नारायण, बाबाजी), सुना,नातवंडांसह १५ जणांचे एकत्र कुटुंब. कुटुंबाची सुमारे १८ एकर पारंपरिक शेती. त्यात ऊस, घेवडा, वालवड, गवार, मिरची, दुधी भोपळा, बीट, मुग, गहू, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. विहीर, नदीवरुन पाईपलान, बोअरवेल यातून पाण्याची वर्षभराची गरज भागते. भरत हा या कुटुंबातील नव्या पिढीचा प्रतिनिधी. त्याने बी कॉमनंतर पुण्यात नुकताच अकाऊंट मॅनेजरचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि नोकरीचा शोध घेतला. पण ८-१० हजार रुपयांहून अधिक पगार मिळेना. इतर व्यवसायांमध्ये पगार अधिक मिळण्याची शक्यता होती, पण त्यात फ्युचर दिसत नव्हते.

कुटुंबाची शेतीची पार्श्वभूमी, सकाळ जॉब्झ पुरवणीतील व्यवसायविषयक मार्गदर्शन, डिस्कव्हरी चॅनलवरील फुड फॅक्टरी हा कार्यक्रम व जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या आयुष्यावरील पुस्तकांतून त्याला उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाली. मग कोणता व्यवसाय केला तर फायद्यात पडू शकतो, याचा शोध सुरु झाला. पुण्यातील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची पहाणी, इंटरनेटरील प्रोजेक्ट, उपलब्ध गाईडलाईन, मार्केट सर्वे हे सर्व टप्पे स्वतः पार केल्यानंतर बटाट्याच्या वेफर्सला मार्केटमध्ये मोठी मागणी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेक कंपन्या यात आहेत मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. अगदी स्थानिक तालुका पातळीवरही मोठी मागणी आहे, हे अभ्यासाअंती निश्चित झाल्यावर त्याने वेफर्स निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नक्की केले.

व्यवसायाचा कच्चा आराखडा तयार केला. याच वेळी बरेच व्यवसायही पडताळून पाहिले. पण कमी भांडवल व कच्च्या मालाचा पुरवठा याचा ताळमेळ पाहता वेफर्स निर्मिती चांगले वाटले. बटाटा, तेल, पॅकेजिंगचे मटेरीयल सहज उपलब्ध होते. मग प्रोजेक्ट कसा तयार करायचा याची माहिती गोळा करण्यापासून सुरवात झाली. अनेक प्रकल्पांची पहाणी केली. नारायणगाव, पुणे, रांजणगावला घरगुती वेफर्स करुन विक्री करणारांच्या भेटी घेतल्या. पुर्वी हा व्यवसाय केलेल्या संभाजी गाढवे यांचे अनुभवाचे बोल त्याला मार्गदर्शक ठरले. वेफर्स निर्मितीची प्रोसेस फायनल करण्यासाठी इतर कंपन्यांच्या लोकांनाही त्याला सहकार्य केले. प्रत्येक १८ ग्रॅमच्या वेफर्सच्या पुड्यामागे किमान 5० पैसे निव्वळ नफा शिल्लक राहतो इथपर्यंत सर्व गणित जुळले आणि मग गुंतवणूकीसाठी त्याने कुटुंबासमोर प्रस्ताव ठेवला. कुटुंबियांनी भरतची कल्पना उचलून धरत प्रक्रीया केंद्र उभारणीचा श्रीगणेशा केला.

इंटरनेटवरील संकेतस्थळावरुन वेफर्स निर्मितीसाठी लागणाऱ्या मशीनरीची ऑनलाईन खरेदी केली. प्रक्रीया युनिटचा आत्मा असलेली मुख्य मशिन पाच लाख रुपयांना पडली. या पॅकिंग मशिनला हवा भरण्यासाठीचा कॉम्प्रेसर, वेफर्स जास्त काळ टिकून रहावी व तिची तव दिर्घकाळ रहावी यासाठी पुड्यात भरण्यासाठीचा नायट्रोजन, प्लॅस्टिक पॅकेजींग मटेरीयलची खरेदी केली. बटाट्याची साल काढण्यासाठीचे पोटॅटो पिलर, वेफर्सच्या चकत्या कापण्यासाठीचे कटर, वेफर्स सुकविण्यासाठीचा ड्रायर ही यंत्रे पुण्यातून खरेदी केली. एका इंजिनिअरींग फर्म कडून बटाटे धुण्यासाठीचे वॉशिंग युनिट व वर्किंग टेबल घेतले आणि शेतातच पत्र्याचे शेड करुन त्यात दरमहा दीड टन वेफर्स निर्मिती क्षमतेचे प्रक्रीया युनिट उभे केले. यासाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च आला आहे.

ही सर्व सज्जता झाल्यानंतर यंदा 1 जूनपासून वेफर्स निर्मिती सुरु झाली आहे. बटाट्यासह सर्व कच्चा माल तो मंचर व नारायणगाव परिसरातून खरेदी करतो. बटाटा कमी असेल त्या वेळी याच ठिकाणी तो फरसाण निर्मितीही करतो. पहिल्या दोन महिन्यात दोन टन बटाट्याची वेफर्स तयार करुन त्याची तालुक्यातील किरकोळ दुकानांच्या साखळीमार्फत हातोहात विक्रीही झाली आहे. एक किलो बटाट्यापासून किमान 250 ग्रॅम वेफर्स तयार होतात. प्रत्येकी 18 ग्रॅमचे एक पॅकेट तयार केले जाते. त्याची कमाल विक्री किंमत पाच रुपये आहे. या एका पॅकेटमागे किमान 50 पैसे नफा हे आर्थिक गणित पहिल्या टप्प्यातच यशस्वी ठरले आहे.

वेफर्स निर्मितीसाठी मनुष्यबळ जास्त लागते, असा भरतचा अनुभव आहे. बटाटा निवडणे, धुणे, कापणे, सुकवणे, फ्राय करणे, पॅकिंग या सर्व कामांसाठी त्या त्या गोष्टीतील निष्नात कामगार लागतात. या कामाचा अनुभव असलेल्या लोकांकडून माहिती घेऊन भरतने यासाठी स्थानिक कामगार गोळा केले आहेत. कुटुंबातील सात जण, उत्तर प्रदेशातील दोन भैये (वेफर्स तळण्यासाठी), बटाटा धुण्यासाठी स्थानिक तीन व्यक्ती एवढे कामगार आहेत. प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून गुणवत्तेशी तडजोड न करण्याचा वाजे कुटुंबियांचा प्रयत्न आहे. एरवी पिक उत्पादनात मग्न असलेले कुटुंब आता शेतमाल प्रक्रियेत रंगले आहे.

- परिसरातील कोंडी फोडली
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार हे राज्यातील बटाटा उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र आहे. या ठिकाणी अनेक बड्या कंपन्या शेतकऱ्यांसोबत लागवडपूर्व करार करुन वेफर्स साठीच्या बटाट्याचे उत्पादन घेत आहे. बटाट्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग सातत्याने चालू शकेल का, तोटा झाला तर काय... या आणि अशा अनेक शंकांनी इथले बटाटा उत्पादक अद्याप प्रक्रीयेत उतरलेले नाहीत. करार शेती करुन मोठ्या कंपन्यांना बटाटा पुरवठ्यापर्यंतच ते थांबलेले आहेत. भरतने स्वतःचे बटाटा उत्पादन नसतानाही परिसरातील ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने यंदा पहिल्या वर्षी स्थानिक व्यापाऱ्यांकडून बटाटा खरेदी केला असून येत्या वर्षापासून थेट शेतकऱ्यांशी करार करुन बटाटा खरेदीचे नियोजन आहे. याशिवाय स्वतःच्या गावातही शेतकरी गटामार्फत बटाट्याची करार शेती विकसित करण्याचा विचार आहे. याशिवाय तेलासाठी सुर्यफुलाच्या करार शेतीचाही अवलंब करणार आहे. यातून परिसरातील शेतकऱ्यांनाही या प्रक्रीयेत समावून घेण्याचा त्याचा विचार आहे.

- उत्पादन विक्रीची साखळी
गावोगाव खेड्यापाड्यात किराना मालाची, खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. या दुकानांना विविध प्रकारच्या वस्तुंचा पुरवठा करणारी स्वतंत्र साखळी कार्यरत असते. पुणे जिल्ह्यातील एकेका तालुक्यात अशा अनेक साखळ्या कार्यरत आहेत. भरत वाजेंनी पहिल्या टप्प्यात स्वतःच्या जुन्नर तालुक्यातील दुकानांच्या साखळीवर लक्ष केंद्रीत केले असून संबंधीत पुरवठादारांमार्फत वेफर्सचे वितरण सुरु केले आहे. उत्पादित होणारा सर्व मालाची विक्री त्याच महिन्यात पूर्ण होत असल्याचा त्याचा अनुभव आहे. दर वर्षी दहा टनाने वेफर्स उत्पादन वाढवायचे आणि त्यानुसार विक्री व्यवस्थाही इतर तालुके व जिल्ह्यांत विस्तारीत करायची असे त्याचे नियोजन आहे.

- स्वतःची कंपनी, स्वतःचा ब्रॅन्ड
अनेक जण करतात तसे सुट्ट्या स्वरुपाच्या वेफर्स तयार करुन विकण्याचा किंवा बड्या कंपनीला वेफर्स सप्लाय करण्याचा पर्याय भरतकडे होता. पण त्याने हे दोन्ही पर्याय आणि सुरक्षित धंद्याच्या दृष्टीने तसे करण्याचे अनेकांनी दिलेले सल्ले झुगारून कंपनी कायद्याअंतर्गत श्री राजमाता फुड्स अॅन्ड वेफर्स प्रा. लि या नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. त्यासाठी फुड सेफ्टी स्टॅन्डर्ड अॅक्ट इन इंडिया यांचे लायसनही घेतले. आणि श्री हा स्वतःचा ब्रॅन्ड तयार केला. गुणवत्ता सर्वोत्तम देणार असू तर दुसऱ्याच्या नावाखाली आपला माल का विकायचा, आपल्यात व्यवसाय वृद्धीची क्षमता असताना स्वतःहून पायखुटी का घालून घ्यायची, हे त्याचे डेव्हलपमेंटचे साधे लॉजिक आहे.

- इच्छा असेल तर मार्ग दिसेल
शेती व संलग्न व्यवसाय किंवा शेतमाल प्रक्रीया विषयक कोणत्याही प्रकारचे शिक्षण, अनुभव किंवा प्रशिक्षण नसतानाही भरतने स्वतःचा प्रक्रीया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. कागदपत्र जमविण्यासाठी, गाईडलाईनसाठी बऱ्याच अडचणी आल्या. वेफर्स निर्मितीची स्टॅडर्ड पद्धतीपासून सर्व बाबी त्यांने स्वतः माहिती गोळा करुन, खातरजमा करुन व प्रयोग करुन अतिशय कमी वेळात व नगण्य खर्चात पूर्ण केल्या. या सर्व प्रवासात त्याने कुणाचीही विकतची सल्ला सेवा घेतली नाही. इंटरनेट, ओळखीच्या व्यक्ती, अनुभवी व्यक्ती यांच्याकडून माहिती मिळवली व त्यानुसार या लघुउद्योग प्रकल्पाची यशस्वी उभारणी केली. इच्छा असेल तर मार्ग दिसेल यानुसार भरतची शेतमाल प्रक्रीयेच्या वेगळ्या वाटेने वाटचाल सुरु असून त्याच्या धडपडीतून परिसरातील तरुणांनाही प्रेरणा मिळत आहे.
--------------------
भरत वाजे - 7775965025, 7387825756 

Tuesday, August 25, 2015

बीटी कापसाच्या सरळ वाणांचा मार्ग मोकळा

- विजय जावंधिया यांच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
- कृषी विभागाचे आयसीएआरला कार्यवाही करण्याचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) - शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी बीटी कपाशीच्या जनुकीय हक्कांबाबतचे वास्तव पुराव्यानिशी पंतप्रधान कार्यालयापुढे मांडून देशातील शेतकऱ्यांना बीटी कपाशीचे सरळ वाण उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. जावंधियांनी दिलेली सर्व माहिती सत्य असल्याचा निर्वाळा देत केंद्रीय कृषी विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) बीटी कपाशीचे सरळ वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

बीटी कपाशीच्या क्राय वन एसी या जनुकावरील मॉन्सॅन्टो कंपनीचे सर्व पेटंट हक्क २०१२ मध्ये संपले आहेत. याचा फायदा घेत पाकिस्तानने गेल्या काही वर्षात याच जनुकाचा वापर करुन बीटी कपाशीच्या सरळ वाणाचे ३१ वाण तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध केले आहेत. शिवाय हे जनुक वापरल्याबद्दल त्यांनी मॉन्सॅन्टोला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क (रॉयल्टी) दिलेले नाही. भारतात मात्र याकडे क्राय वन एसी जनुक खुले झाल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा किमतीला बीटी कपाशीचे संकरित बियाणे विकत घ्यावे लागत आहे. ही बाब श्री. जावंधिया यांनी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून माहिती अधिकारात माहिती मिळवून १२ मे २०१५ दरम्यान पत्र पाठवून पुराव्यांनीशी पंतप्रधान कार्यालयासमोर मांडली होती.

पंतप्रधान कार्यालयाच्या सुचनेनंतर कृषी विभागाने आयसीएआर व जैवतंत्रज्ञान विभागाकडून (डीबीटी) याबाबतची सविस्तर माहिती मागवली. पाठोपाठ ६ जुलै रोजी याविषयावर सचिवालय पातळीवर बैठक पार पडली. त्यात या जनुकावरील सर्व हक्क संपून ते खुले झाल्याचे आणि त्याचा वापर करुन नवीन वाण विकसित करणे व शेतकऱ्यांना अतिशय कमी किमतीत बीटी कपाशीचे सरळवाण उपलब्ध करुन देणे शक्य असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या जनुकीय अभियांत्रिकी समितीची परवानगी घेवून क्राय वन एसी जनुक युक्त बीटी कपाशीचे सरळ वाण प्रसारीत करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश २० जुलै २०१५ रोजी आयसीएआरला देण्यात आला. कृषी मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयास १९ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून ही सर्व माहिती दिली आहे.

- कोट
पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्यामुळे हे यश मिळाले आहे. आता पर्यावरण मंत्रालयाने बीटी कापसाच्या सरळ वाणांच्या जातीच्या बियाण्यांचा गुणाकार करण्याचे आदेश द्यावेत व २०१६ च्या हंगामात शेतकऱ्यांना या वाणांचे पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी गती वाढवून झालेल्या विलंबाची दुरूस्ती करावी.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

- घटनाक्रम
८ मे २०१५ - जावंधियांचे माहिती अधिकारात पुरावे संकलन
११ मे २०१५ - जावंधियांचे पंतप्रधान कार्यालयास पत्र
जून २०१५ - पंतप्रधान कार्यालयाची केंद्रीय कृषी विभागाला सुचना
६ जुलै २०१५ - कृषी सचिवालय पातळीवर याबाबत बैठक
२० जुलै २०१५ - अतिरिक्त आयुक्तांचा (बियाणे) आयसीएआरला आदेश
१९ ऑगस्ट २०१५ - बीटी कपाशीचे सरळ वाण उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे कृषी विभागाचे पंतप्रधान कार्यालयास पत्र
--------------(समाप्त)------------------ 

फलोत्पादन अभियान - २

अनुसुचित जाती, जमातीसांठी स्वतंत्र निधी

निधीच्या फिरवाफिरवीस मनाई; जिल्हानिहाय निधीचे नियोजन

पुणे (प्रतिनिधी) - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या चालू वर्षासाठी २०५ कोटी रुपयांपैकी २० कोटी ५२ लाख १३ हजार रुपये अनुसुचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी तर १८ कोटी ४२ लाख ३७ हजार रुपये अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. हा निधी इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यास मनाई करण्यात आली अाहे. यामुळे यंदापासून या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनांचा नियोजनानुसार पुरेपुर लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतर शेतकऱ्यांसाठी १६६ कोटी रुपयांची तरतूद आहे.

अभियानाच्या योजनांमध्ये अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना निर्धारित प्रमाणात लाभ देण्याची तरतूद होती. लाभार्थी निवडीतही या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची सुचना होती. मात्र प्रत्यक्षात या शेतकऱ्यांसाठीचा मोठी निधी लाभार्थी उपलब्ध होत नाही, प्रस्ताव नाही या कारणांखाली खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होता. यामुळे या शेतकऱ्यांसाठीच्या तरतूदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा केंद्र शासनाने अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी खर्च करावयाच्या निधीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उपलब्ध करुन दिले आहे. विशिष्ट प्रवर्गासाठी असलेल्या निधीची इतरत्र फिरवाफिरव करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या प्रवर्गासाठी असलेला निधी फक्त त्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच देता येईल, अन्यथा अखर्चित निधी परत करावा लागेल.

सेंटर ऑफ एक्सलन्स, बाजार व्यवस्था बळकटीकरण, नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान व अभियान व्यवस्थापन यासाठीचा सुमारे २५ कोटी रुपये खर्च राज्यस्तरीय कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. अनुसुचित प्रवर्गांसाठी जिल्हानिहाय तरतूद करण्यात आली अाहे. यासाठी संबंधीत प्रवर्गाची एकूण लोकसंख्या जिल्ह्यातील लोकसंख्या, यापुर्वीची लाभार्थी संख्या, प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण, मागणी यांचा विचार करुन नियोजन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय प्रवर्गनिहाय आर्थिक उद्दीष्ट ठरविण्यात आली असून त्यात अंतिम टप्प्यात वापर व मागणी यानुसार प्रवर्गाअंतर्गत बदल होऊ शकतात, अशी माहिती अभियान संचालक सु. ल. जाधव यांनी दिली.

अनुसुचित जातींच्या शेतकऱ्यांच्या संख्येनुसार सर्वाधिक निधी पुणे विभागाला देण्यात येणार आहे. यात सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक दोन कोटी एक लाख ६९ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. पाठोपाठ पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपयांहून अधिक निधीचे नियोजन आहे. या प्रवर्गात सर्वात कमी निधीची तरतूद (५.२७ लाख) गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे. अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नाशिक विभागाला सर्वाधिक ७.७७ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातही नाशिक जिल्ह्यासाठी सर्वाधिक ४.४४ कोटी रुपयांची तरतूद आहे. नंदुरबार, नगर, पालघर, अमरावती जिल्ह्यांसाठी एक ते दोन कोटी दरम्यान तरतूद आहे.

- जिल्हानिहाय अनुदान नियोजन, सर्व आकडे लाख रुपयांत (एनएचएम १५-१६)
जिल्हा --- अ.जाती --- अ. जमाती --- इतर
ठाणे --- १५.९० --- १५.१९ --- १९८.२०
पालघर --- ७.३९ --- १३७.६६ --- १४७.१४
रायगड --- ८.५५ --- २७.९९ --- १५५.२३
रत्नागिरी --- ७.८७ --- ३.४७ --- २०६.९७
सिंधुदुर्ग --- २२.२७ --- ४.०५ --- ३६५.०३
नाशिक --- १०८.९१ --- ४४४.८६ --- ८२४.५७
धुळे --- ८.५९ --- ६३.११ --- ८६.९९
नंदुरबार --- ६.१२ --- २११.०७ --- २४.६०
जळगाव --- २५.९१ --- ५८.२७ --- २३९.४८
पुणे --- १७२.६६ --- ७३.८९ --- १३३८.४४
नगर --- १५१.८५ --- १४४.९९ --- १०८५.३६
सोलापूर --- २०१.६९ --- ३४.८८ --- १३०४.०१
सातारा --- ६९.९९ --- ९.२९ --- ६६८.२९
सांगली --- १६६.९२ --- १२.५५ --- १३५४.०४
कोल्हापूर --- १०७.२४ --- ९.३० --- ८३०.५२
औरंगाबाद --- ७०.०१ --- २६.९५ --- ४५५.२५
जालना --- ७१.३० --- १६.०३ --- ५०२.३७
बीड --- ५१.७६ --- ६.९८ --- ३७९.११
लातूर --- ७७.६६ --- १३.४४ --- ३६४.४१
नांदेड --- ७६.५३ --- ४८.७४ --- ३३६.३५
परभणी --- ३२.८० --- ७.७८ --- २३९.३३
हिंगोली --- ३४.०८ --- ३०.२७ --- १८८.२८
उस्मानाबाद --- १२५.३३ --- २४.६७ --- ७५०.४५
अकोला --- ६१.१७ --- २४.४० --- २६४.७५
अमरावती --- ९३.२४ --- १०७.७७ --- ४१०.३३
वाशिम --- २३.६८ --- १२.०२ --- १०६.२८
यवतमाळ --- ३१.५२ --- ७१.४२ --- २०२.७७
बुलडाणा --- ६३.८८ --- २४.५३ --- ३१४.८६
नागपूर --- ८१.२० --- ५९.७८ --- ३५९.५९
चंद्रपूर --- १७.५९ --- २८.४७ --- ८१.८४
गडचिरोली --- ५.२७ --- २६.२५ --- २२.३०
गोंदिया --- १२.९८ --- २२.८९ --- ७६.२७
भंडारा --- १३.४४ --- ८.६४ --- ७०.४८
वर्धा --- २६.८१ --- ३०.७५ --- १५४.७४
---------------

एनएचएम विशेष - भाग १

फलोत्पादन अभियानाला यंदा २८० कोटी

केंद्राचा हप्ता राज्याकडे पोच; राज्याच्या हप्त्याची प्रतिक्षा

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात चालू वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने २०५ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजूरी दिली आहे. यापैकी ५० टक्के म्हणजेच १०२.५० कोटी रुपये राज्य हिश्श्यातून व तेवढीच रक्कम केंद्राच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमातून कांदा चाळ, संरक्षित शेती व शेततळ्यांसाठी प्रत्येकी २५ कोटी याप्रमाणे एकूण ७५ कोटी रुपये अनुदानाच्या योजनाही फलोत्पादन अभियानामार्फतच राबविण्यात येणार आहेत.

फलोत्पादन अभियानाच्या २०५ कोटी रुपयांपैकी केंद्राने आपल्या हिश्याच्या निम्म्या रकमेचा पहिला हप्ता ५१.२५ कोटी रुपये राज्याला पोच केला आहे. मात्र राज्य हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याची ५१.२५ कोटी रक्कम अद्याप मंजूर झाली नसल्याने सर्व निधी मंत्रालयातच रखडलेला असून राज्यात योजनेही अंमलबजावणीही थांबल्यासारखी स्थिती आहे. येत्या दहा दिवसात राज्याकडून हा सर्व निधी (१०२.५० कोटी) अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यालयाला उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर योजनांची राज्यातील अंमलबजावणी पूर्ववत सुरु होईल.

गेल्या वर्षीपर्यंत फलोत्पादन अभियानासाठी केंद्राकडून ८५ टक्के व राज्य शासनाकडून १५ टक्के निधी उपलब्ध करण्यात येत होता. यंदा हा आर्थिक वाटा समप्रमाणात म्हणजेच प्रत्येकी ५० टक्के झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्यासाठी १८७ कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर झाला होता. प्रत्यक्षात १७३ कोटी रुपयांचा कार्यक्रम पूर्ण झाला. उर्वरीत रक्कम अखर्चित राहीली. यंदा गेल्या वर्षाहून १७ कोटी रुपये अधिक उपलब्ध झाले असून राष्ट्रीय कृषी योजनेतून मिळालेल्या ७५ कोटी रुपयांमुळे गेल्या वर्षाहून ९२ कोटी रुपये जादा उपलब्ध होणार आहे. येत्या सात महिन्यात या सर्व अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे आव्हान अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यालयासमोर आहे.

अभियानातील विविध घटकांसाठीची वाढती मागणी लक्षात घेवून यंदा नवीन फळबाग लागवडीला अनुदान न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी विविध फलोत्पादन पिकांमधील नविन तंत्रज्ञान, काढणी पश्चात सुविधा यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. पेरु लागवडीला अनुदान नाही. मात्र मिडो ऑर्चिड या सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन लागवड केल्यास अनुदान आहे. केळी लागवडीला अनुदान नाही, मात्र केळीसाठीच्या मल्चिंगला व घडाच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशवीला अनुदान मिळेल, अशी माहिती अभियानाचे संचालक सु. ल. जाधव यांनी दिली.

- कोट
अभियानातून यापुर्वी झालेल्या लागवडीसाठीच्या उर्वरीत हप्त्यांची रक्कम वगळता यंदा नवीन फळपिक लागवडीला अनुदान दिले जाणार नाही. त्यातील नाविन्यपूर्ण, उपयुक्त व सुधारीत तंत्रज्ञानासाठी सहाय्य करण्यात येईल.
- सु. ल. जाधव, संचालक, राज्य फलोत्पादन अभियान

- घटकनिहाय अनुदान (एनएचएम २०१५-१६)
घटक --- संख्या --- आर्थिक तरतूद (लाख रुपये)
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान --- १ --- १०
मधुमक्षिकापालन --- २०१७ --- २२
विपणन सुविधा --- २६ --- १०१
रोपवाटीका --- २० --- १४०
टिशू कल्चर लॅब --- १९ --- ५६६.७७
सामुहिक शेततळी --- १७०० --- ४०००
सेंद्रीय शेती --- २०४७ हेक्टर --- १४०.५०
मनुष्यबळ विकास --- ३२९० --- १९१.९४
सेंटर ऑफ एक्सलन्स --- ६ --- १४२९.४०
हरितगृह, शेडनेट --- १५१ --- ४९२०.३५
पक्षीरोधक, गारपीटरोधक नेट --- १० --- १७.५०
प्लॅस्टिक मल्चिंग --- ९६५ हेक्टर --- १५४.४०
मौल्यवान रोपे, भाजीपाला उत्पादन --- १५१.३० --- २४०७.७५
फळपिक क्षेत्र विस्तार --- ६८२९ हेक्टर --- ९००
फळपिक पुनरुज्जीवन --- ४९९.७५ हेक्टर --- ९९.९५
एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन --- ९९८ --- ३०००
एकात्मिक अन्नद्रव्य किंवा कीड व्यवस्थापन --- ४ --- १७५
यांत्रिकीकरण (पावर टिलर, ट्रॅक्टर इ.) --- ६२०४ --- १०३०.५१
गुड ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसेस (गॅप) प्रमाणिकरण --- १०० हेक्टर --- ५
अभियान व्यवस्थापन खर्च --- ० --- ११८७.४९
-------------------

Monday, August 24, 2015

स्मार्ट व्हिलेज साठी प्रतिक्रीया


सकाळ अॅग्रोवन व डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशन यांनी इस्त्राईल गव्हर्नमेंटच्या गुंतवणूकीतून राज्यातील पाच गावे स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शेती व शेतकरी डोळ्यासमोर ठेवून गावाचा सर्वांगिन विकास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी ही अतिशय महत्वाची बाब आहे. रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा, मृद व जलसंधारण, पिक पद्धती ते शेतमाल प्रक्रीया यावर भर देऊन कालबद्ध सर्वांगिन विकास साधण्याचा हा प्रकल्प निश्चितच लाभदायी व दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. गावांच्या सर्वांगिन विकासाच्या या प्रकल्पासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देतो.

- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
---------------------------------------------
इस्रायलने अतिशय काटेकोर पाणी व्यवस्थापनातून कृषीकेंद्रीत विकास केला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम काम करुन विकास साधलाय. त्यांचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक इस्त्राईलला जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही ते पाहून आले आहेत. अॅग्रोवन व डिलीवरींग चेंज फाऊंडेशन च्या माध्यमातून इस्त्राईल स्वतः महाराष्ट्रातील पाच गावे कृषीकेंद्रीत स्मार्ट व्हिलेज करणार असेल तर ती अतिशय महत्वाची संधी आहे. गावाच्या व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी हवे ते सारे काही यात आहे. अॅग्रोवनने सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कृषीकेंद्रीत ग्रामविकासाला चालना दिली आहे. त्याचा हा पुढच्या टप्प्यात राज्यातील पाच गावे जगातील सर्वांगिन, एकात्मिक ग्रामविकासाची सर्वात सुंदर मॉडेल म्हणून विकसित होतील, असा विश्वास वाटतो. परकीय गुंतवणूकीतून सर्वांगिन ग्रामविकासाचा देशातील हा पहिला प्रकल्प आहे. ही पाच गावे स्मार्ट झाल्यानंतर पुढे ही देशभर चळवळ होईल.

- पोपटराव पवार, आदर्श सरपंच व कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना
------------------
गावाचा सर्वांगिन विकास करण्यात पायाभूत सुविधांचा अभाव ही सर्वात मोठी अडचण आहे. पाणी, विज, रस्ते, शेतमाल प्रक्रीया या सुविधा असतील तर चांगला विकास करता येतो. खैरेनगरमध्ये आम्ही सर्व पातळीवर प्रयत्न केला, बॅंकांचीही चांगली साथ मिळाली मात्र पाऊस व पाणीच नसल्याने सर्वजण कर्जबाजारी झाले आहेत. अॅग्रोवन व डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनचा इस्त्राईलच्या गुंतवणूकीतून राज्यातील पाच गावे स्मार्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प आम्हा शेतकऱ्यांना विकासाची नवी शाश्वत दिशा दाखवू शकतो, असा विश्वास वाटतो. या प्रकल्पामध्ये गावाच्या आणि गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी आवश्यक ते सर्व काही आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, पण यातूनही शेतीची प्रगती होईल, शेतकरी सावरेल, अशी आशा वाटते.

- रघुनाथ शिंदे, कोरडवाहू फलोत्पादक शेतकरी, खैरेनगर, ता. शिरुर, जि. पुणे.
--------------------

NGO Training

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकास कार्यात शासनाच्या मदतीशिवाय किंवा शासनासोबत स्वतंत्रपणे कार्य करुन व्यवसायिक व सामजिक कारकिर्द घडवू इच्छिनारांसाठी सकाळ ॲग्रोवनमार्फत बिगर सरकारी संस्था (एनजीओ) स्थापना ते उद्दीष्टप्राप्ती विषयक दोन दिवसिय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील प्रगतशील शेतकरी, कृषी व संलग्न व्यवसायिक, नोकरदार, सेवाभावी वृत्तीने काम करु इच्छीणाऱ्या व्यक्तींसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

सध्या राज्य व देशपातळीवर अनेक स्वयंसेवी बिगर सरकारी संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून कृषी व ग्रामविकासाला मोठी चालना मिळालेली आहे. या संस्थांची वार्षिक उलाढालही मोठी असून त्यामार्फत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे. आदर्श गाव योजना, जल व मृद संधारण विषयक योजना, सार्वजनीक व खासगी गुंतवणूकीच्या (पीपीपी) योजना, विविध खासगी कंपन्यांसाठी सेवाभावी काम करणे, शासकीय कामांसाठीची कंत्राटी नोकरभरती, समाजाच्या विविध थरांच्या विकासासाठी सेवाभावी व्यक्ती संस्थांनी दिलेल्या निधीचा योग्य वापर, आदी असंख्य कामांसाठी एनजीओंना प्राधान्य देण्‍यात येत आहे.

एनजीओच्या माध्यमातून विकासाच्या, व्यवसायाच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र एनजीओची स्थापना व कार्यपद्धती याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. ही अडचण दूर करुन इच्छूकांना एनजीओच्या माध्‍यमातून स्वतःबरोबरच समाजाच्याही विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ॲग्रोवनमार्फत या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

एनजीओची स्थापना कशी करावी, त्यासाठीच्या कायदेशीर बाबी, कागदपत्रे, व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल व उभारणी, निधी संकलन, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सहभाग, शेतीविषयक यशस्वी एनजीओंच्या यशोगाथा आदी माहीती या चर्चासत्रात देण्यात येणार आहे. एनजीओ संबंधीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सशुल्‍क असून वैयक्तीक पातळीवरील प्रशिक्षणाच्या दृष्टीने एका कार्यशाळेत फक्त ५० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणारास प्रथम प्राधान्य यानुसार हे प्रवेश देण्यात येतील.

- चौकट
असे आहे एनजीओ चर्चासत्र
वेळ - १२ व १३ सप्टेंबर २०१५
ठिकाण - सकाळनगर, गेट नं १, यशदा शेजारी, बाणेर रोज, पुणे.
शुल्क - प्रति व्यक्ती ३००० रुपये (चहा, नाश्ता, जेवण व प्रशिक्षण साहित्यासह)
प्रवेश क्षमता - ५० व्यक्ती फक्त
संपर्क - सुशांत ९८५०३०५६५४ (स.१० ते सायं. ६) 

Tuesday, August 4, 2015

विदर्भात मॉन्सून सक्रिय



उत्तर महाराष्ट्रात जोर वाढला, मराठवाड्यात हलक्या सरी

पुणे (प्रतिनिधी) - सुमारे दहा ते पंधरा दिवसाच्या खंडानंतर अखेर राज्यात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मंगळवारी विदर्भात मॉन्सून सक्रिय होता. मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला. दिवसभर विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु होती. कोकणातही पावसाची हजेरी कायम आहे. राज्यात सर्वत्र बाष्पयुक्त ढगांचे प्रमाण वाढले असून बुधवारी पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत.

हवामान खात्याने गुरुवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत व दिवसभरही विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक होता. सोमवारी सायंकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. मंगळवारी संध्याकाळपर्यंत विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आदी जिल्हे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी भिजपाऊस तर काही ठिकाणी संततधार सुरु होती.

दरम्यान, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या भागावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढून मंगळवारी त्याचे रुपांतर कमी तिव्रतेच्या वादळात (डिप्रेशन) झाले. हे डिप्रेशन बुधवारपर्यंत मध्य प्रदेशहून पश्चिमकडे सरकून त्याची तिव्रता कमी होऊन कमी दाबाचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा भटींडा, दिल्ली, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश व लगतच्या छत्तीसगडच्या भागावरील डिप्रेशन ते उपसागरापर्यंतच्या भागात सक्रीय आहे. पंजाब व लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय असून मध्य पाकिस्तान व लगतच्या राजस्थानच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे.

मंगळवारी (ता.4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये -
कोकण - कानकोन 40, रत्नागिरी 30, खेड, लांजा, मार्मागोवा, माथेरान, मुरुड, सावंतवाडी प्रत्येकी 20, चिपळूण, कुडाळ, माणगाव, म्हापसा, मडगाव, म्हसाळा, पालघर, पेडणे, पोलादपूर, फोंडा, राजापूर, रोहा, तळा, वाल्पोई प्रत्येकी 10
मध्य महाराष्ट्र - गगनबावडा, महाबळेश्वर, रावेर प्रत्येकी 30, मुक्ताईनगर, एदलाबाद प्रत्येकी 20, बोधवड, यावल प्रत्येकी 10
घाटमाथा - कोयना 30, लोणावळा, शिरोटा, ठाकूरवाडी, भिवपुरी, दावडी, खंद, ताम्हिणी प्रत्येकी 10
विदर्भ - गोंदिया, तुमसर, वर्धा प्रत्येकी 60, आष्टी, धामणगाव, नागपूर, सालेकसा, सावनेर, तिरोडा प्रत्येकी 50, आमगाव, चांदुर बाजार, चिखलदरा, देवळी, गोरेगाव, जळगाव जामोद, कामठी, मोहाडीफाटा, नरखेड, पारशिवनी, रामटेक, समुद्रपूर प्रत्येकी 40, अकोला, अमरावती, आर्वी, भातकुली, भंडारा, भिवापूर, एटापल्ली, हिंगणघाट, कळमेश्वर, काटोल, कुही, लाखणी, मौदा, मोर्शी, मोहाळा, मुर्तीजापूर, पवनी, साकोली, तिवसा, उमरेड, वरुड, यवतमाळ प्रत्येकी 30, अर्जूनी मोरगाव, बाळापूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, चांदूर, दर्यापूर, धारणी, घाटंजी, गोंडपिंपरी, हिंगणा, लाखंदूर, मलकापूर, नागभिड, नांदगाव काजी, परतवाडा, राळेगाव, तेल्हारा प्रत्येकी 20, अहिरी, अकोट, अंजनगाव, आरमोरी, बाभूळगाव, भामरागड, बुलडाणा, चिमूर, देसाईगंज, धानोरा, कळंब, खामगाव, नांदुरा, नेर, पांडरकवडा, पोंभूर्णा, सेलू, शेगाव, तेल्हारा, वणी, वरोरा, वाशिम प्रत्येकी 10
------------------ 

मराठवाड्यातील खरिप दुष्काळाच्या कचाट्यात

राज्यातील २६४ तालुक्यांत बिकट स्थिती, मराठवाड्यातील सर्व तालुके कोरडे

पुणे (प्रतिनिधी) - निम्मा पावसाळा उलटूनही पावसाने दगा दिल्याने राज्यातील तब्बल २६४ तालुक्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. गुरांच्या चारा पाण्यापासून ते पिके उध्वस्त होण्यापर्यंत विविध पातळ्यांवर मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्व तालुक्यात पावसाची आणि पावसाअभावी पिकांची अतिशय बिकट (क्रिटीकल) स्‍थिती असून खरिप हातचा गेल्यात जमा आहे. विदर्भ व कोकणासह राज्यात इतर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असताना मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारलेली आहे.

नैऋत्य मोसमी पावसाच्या देशातील सर्व प्रदेशांचा विचार करता मराठवाड्यात देशात सर्वात कमी पाऊस पडला असून सरासरी पावसाच्या तुलनेतही घटही मराठवाड्यात सर्वाधिक (-५८) टक्के आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत मराठवाड्यात फक्त ४२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ७२ टक्के, कोकणात ७४ टक्के तर विदर्भात ७६ टक्के पाऊस पडला आहे. पश्चिम महाराष्ट्राती सोलापूर व कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यांत बिकट स्थिती आहे.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहळ (सोलापूर), गेवराई, शिरुर कासार (बीड), चाकूर (लातूर), उस्मानाबाद (उस्मानाबाद), परभणी, पाथरी, जिंतूर, सोनपेठ (परभणी), लोणार (बुलडाणा), यवतमाळ, उमरखेड (यवतमाळ) या १५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्क्यांहून कमी पाऊस पडल्याने येथिल कडक उन्हाळा अद्याप संपलेला नाही. याशिवाय २५ ते ५० टक्के पाऊस पडलेले १२६ तालुके आणि ५० ते ७५ टक्के पाऊस पडलेले १३३ तालुकेही पाण्याविना होरपळत आहेत. पडलेला पाऊस गेल्या दोन महिन्यात एकदम पडलेला असून त्यातून पेरणी होण्यापलिकडे फारसे काहीही हाती आलेले नाही. मुळात पावसाचे प्रमाण कमी आणि त्यात आणखी ५० ते ७५ टक्क्यांची घट यामुळे या तालुक्यांतील पिके हातची जावून खरिप उध्वस्त झाल्याची स्थिती आहे.

सरासरीच्या 25 ते 50 टक्के पावसाचे तालुके - वैभववाडी (सिंधुदुर्ग), नांदगाव, सुरगाणा, पेठ, येवला, चांदवड, देवळा (नाशिक), धुळे (धुळे), जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोधवड (जळगाव), कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता (नगर), इंदापूर (पुणे), बार्शी, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा (सोलापूर), हातकणंगले, राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड (कोल्हापूर), पैठण, सोयगाव (औरंगाबाद), जाफराबाद, जालना, अंबड, बदनापूर, घनसांगवी (जालना), बीड, पाटोदा, आष्टी, माजलगाव, आंबेजोगाई, केज, परळी, धारुर, वडावणी (बीड), लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, रेणापूर, दावनी, शिरुर अनंतमाळ, जळकोट (लातूर), तुळजापूर, परांडा, भूम, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी (उस्मानाबाद), बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हादगाव, देगलूर, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव खुर्द (नांदेड), गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, मानवत (परभणी), कळमनुरी, बसमत, औंढा (हिंगोली), जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव, शेगाव, नांदुरा (बुलडाणा), अकोट, तेल्हारा, पातूर, अकोला, बार्शीटाकळी (अकोला), मालेगाव, करंजा (वाशीम), बाभुळगाव, कळम, दारव्हा, दिग्रस, अर्णी, नेर, मोहगाव, वणी, मारेगाव, झरीजामनी, केळापूर, घाटंजी, राळेगाव (यवतमाळ), देवळी (वर्धा), चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, शिंदेवाही (चंद्रपूर), धानोरा (गडचिरोली)

- कमी दाबाच्या क्षेत्रात बदल ?
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात नैऋत्य मोसमी पाऊस चांगला पडण्यासाठी सर्वसाधारपणे तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र चक्राकार वारे कमी दाबाचा पट्टा या हवामान स्थिती आणि अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर किनारी कमी दाबाचा पट्टा व चक्राकार वारे सक्रीय असणे उपयुक्त ठरते. यंदा उपसागरातील कमी दाबाशी संलग्न घडामोडींचा केंद्रबिंदू आंध्र तमिळनाडू ऐवजी बंगाल व बांग्लादेशच्या भागाकडे सरकल्याची स्थिती गेले दोन महिने होती. याच वेळी अरबी समुद्राच्या दक्षिण भागापेक्षा गुजरातलगतच्या उत्तर भागात या हवामानस्थिती अधिक सक्रीय होत्या. यामुळे राज्यातील पाऊसमानावर विपरीत परिणाम झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हवामान विभागामार्फत अद्याप त्यास अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
.
- विभागनिहाय पाऊस स्थिती
विभाग --- सरासरी --- पडलेला पाऊस --- सरासरीच्या तुलनेतील घट (टक्के )
कोकण --- १९१३.८ --- १४०९.५ --- २६
मध्य महाराष्ट्र --- ४११.२ --- २९४.१ --- २८
मराठवाडा --- ३५०.३ --- १४८.८ --- ५८
विदर्भ --- ५१५.७ --- ३९३.४ --- २४

- पावसाच्या प्रमाणानुसार तालुक्यांची संख्या व स्थिती
पावसाचे प्रमाण --- जून --- जुलै --- 1 जून ते आत्तापर्यंत
25 टक्क्यांहून कमी --- 2 --- 182 --- 15
25 ते 50 टक्के --- 26 --- 107 --- 126
50 ते 75 टक्के --- 59 --- 48 --- 133
75 ते 100 टक्के --- 77 --- 10 --- 62
100 टक्क्यांहून अधिक --- 189 --- 6 --- 17
--------------------------



Saturday, August 1, 2015

पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) - येत्या दोन दिवसात कोकण व विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. सोमवारी (ता.३) सकाळपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यातील सर्वाधिक १५० मिलीमिटर पाऊस रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पडला. सोमवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुलाबा (मुंबई) वेधशाळेने कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता.३) सकाळनंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात बुधवारी (ता.५) सकाळनंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मंगळवारपासून (ता.४) पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, वायव्य राजस्थान व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र मध्य पाकिस्तान व पश्चिम राजस्थानवर सक्रीय आहे. बांग्लादेशच्या भागावर असलेल्या कमी तिव्रतेच्या चक्रीवादळाची (डीप डिप्रेशन) तिव्रता कमी होवून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) झाले आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा मध्य पाकिस्तानपासून राजस्थानचा उत्तर पश्चिम भाग, दिल्ली, गोरखपूर, भागलपूर ते बांग्लादेशपर्यंत सक्रीय आहे.


शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - लांजा १५०, संगमेश्वर ९०, रत्नागिरी ८३, वैभववाडी, कणकवली, राजापूर प्रत्येकी ८०, कुडाळ, चिपळून, गुहागर प्रत्येकी ६०, खेड ५०, दापोली ४०, हर्णे, देवगड, सावंतवाडी, मालवण प्रत्येकी ३०, सुधागड, पाली, पोलादपूर, म्हसाळा, पनवेल, माथेरान, वेंगुर्ला प्रत्येकी २०, ठाणे, अलिबाग, भिरा, मानगाव, पेण, महाड, श्रीवर्धन प्रत्येकी १०

मध्य महाराष्ट्र - महाबळेश्वर, गगणबावडा प्रत्येकी ६०, शाहूवाडी ५०, पन्हाळा ३०, गारगोटी, हरसूल, इगतपूरी, राधानगरी, शिराळा प्रत्येकी २०, भोर, चंदगड, कोल्हापूर, पाटण, सांगली, वडगाव मावळ, वेल्हा, वाळवा, इस्लामपूर प्रत्येकी १०

घाटमाथा - कोयना ९०, ताम्हिणी ४०, शिरगाव, डुंगरवाडी प्रत्येकी ३०, शिरोटा, अम्बोणे, दावडी, खंद प्रत्येकी २०, लोणावळा, वळवण, वाणगाव, भिवपुरी, खोपोली प्रत्येकी १०

मराठवाडा - रेणापूर २०, चाकूर १०
-----------(समाप्त) ------------ 

Saturday, July 25, 2015

मॉन्सून जोरदारपणे सक्रीय

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात
मॉन्सून जोरदारपणे सक्रीय

कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी, खानदेशात सर्वदूर पाऊस

पुणे (प्रतिनिधी) - मध्य प्रदेशवरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) जोरदार पावसासह सक्रीय झाले. मराठवाडा वगळता उर्वरीत तीनही विभागात सर्वदूर पाऊस पडतानाच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील चार दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची, मराठवाड्यात पाऊस वाढण्याची तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमी होण्याची चिन्हे आहेत.

हवामान खात्याने बुधवारपर्यंत (ता.29) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकणात सर्वदूर, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश व लगतच्या राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने राज्यात वाढलेला पाऊस आणखी काही काळ सुरु राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे कोकणात पुढील आठवडाभर राज्यातील इतर भागाच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात तळकोकण व खानदेशात जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावरही ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसला. तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असून ठिकठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा पश्चिम पूर्व दिशेने राजस्थानपासून मध्य प्रदेशावरील कमी दाबाचा पट्टा ते उपसागरापर्यंत सक्रीय आहे. दोन्ही कमी दाबाचे पट्टे एकाच भागात सक्रीय असल्याची स्थिती आहे. जोडीला कर्नाटक व केरळच्या किनारपट्टीलगत किनारी कमी दाबाचा पट्टा सक्रीय झालेला आहे. यामुळे उपसागराकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखेबरोबरच अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांनाही बळ मिळाले असून दोन्ही बाजूने बाष्पयुक्त ढग येण्याचे प्रमाण वाढले आहे. उपसागराच्या उत्तर भागात सक्रीय असलेल्या चक्राकार वाऱ्यांची तिव्रता वाढली असून रविवारी दुपारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्राच्या प्रभावाने पावसात आणखी वाढ होऊ शकते.

शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये -
कोकण व गोवा : दाभोलीम २००, मामाागोवा १९०, फोंडा १७०, सावंतवाडी १६०, केपे १५०, म्हापसा १४०, कानकोन १३०, भिरा, कुडाळ प्रत्येकी ११०, तलासरी १००, कणकवली, माथेरान, पेण, शहापूर प्रत्येकी ९०, पेडणे, सांगे प्रत्येकी ८०, कर्जत, खालापूर, मोखेडा, वाल्पोई प्रत्येकी ७०, माणगाव, पोलादपूर प्रत्येकी ६०, चिपळूण, दोडामार्ग, जव्हार, खेड, पनवेल, सुधागड पाली, वाडा, वेंगुर्ला प्रत्येकी ५०, लांजा, पालघर, राजापूर, रोहा, संगमेश्वर-देवरुख प्रत्येकी ४०, अंबरनाथ, महाड, मंडणगड, म्हसाळा, मुंबई, तळा, ठाणे, उल्हासनगर, उरण, विक्रमगड प्रत्येकी 3०, भिवंडी, दापोली, कल्याण, मालवण, मुरबाड, मुरुड प्रत्येकी 2०, अलिबाग, डहाणू, गुहागर, हर्णे प्रत्येकी १०

घाटमाथा: ताम्हणी १७०, डुंगेरवाडी १३०, लोणावळा, दावडी प्रत्येकी १२०, शिरगाव, अम्बोणे प्रत्येकी ११०, खोपोली १००, वळवण ९०, कोयना ७०, शिरोटा, खंद प्रत्येकी ४०, भिवपुरी, वाणगाव प्रत्येकी ३०, ठाकूरवाडी २०.

मध्य महाराष्ट्र : नवापूर १६०, इगतपूरी १३०, धडगाव, नंदुरबार प्रत्येकी १२०, अक्कलकुवा, तळोदा प्रत्येकी ११०, महाबळेश्वर ९०, पेठ, सुरगाणा प्रत्येकी ८०, हरसूल, शहादा प्रत्येकी ७०, दिंडोरी, गगनबावडा, शिरपूर प्रत्येकी ४०, गिधाडे, साक्री, सिंदखेडा प्रत्येकी ३०, अकोले, ओझर, पाटण, शाहूवाडी प्रत्येकी २०, आजरा, चंदगड, चांदवड, गारगोटी, जळगाव, कळवण, ओझरखेडा, पन्हाळा, राधानगरी, शिराळा, सिन्नर प्रत्येकी १०

मराठवाडा: उमरी ३०, बसमत, कळमनुरी, नांदेड प्रत्येकी २०, बिल्लोली, हिंगोली, कंधार, उस्मानाबाद, पालम, पूर्णा प्रत्येकी १०

विदर्भ : सेलू, वर्धा प्रत्येकी ९०, मौदा ८०, बाभूळगाव, चामोशी, देवळी, समुद्रपूर, यवतमाळ प्रत्येकी ६०, भंडारा, धामणगाव, दिग्रस, काटोल, खारांगा, कुही, मोहाडीफाटा, नारखेडा, सावनेर, तिरोडा, तुमसर, वरूड प्रत्येकी ५०, आर्वी, भिवापूर, कळमेश्वर, पारशिवनी, पुसद प्रत्येकी ४०, आर्णी, आष्टी, गोंदिया, गोरेगाव, मोशी, नागपूर, रामटेक, तिवसा, उमरेड प्रत्येकी ३०, अकोला, अकोट, चिखलदरा, धानोरा, घाटंजी, हिंगणघाट, हिंगणा, कामठी, खामगाव, लाखनी प्रत्येकी २०, आमगाव, अमरावती, भातकुली, चांदरू बाजार, दारव्हा, देवळी, एटापल्ली, जळगाव जामोद, कळंब, महागाव, मनोरा, मुर्तीजापूर, नागभिड, नांदगाव काजी, नेर, परतवाडा, पवनी, सडक अर्जूनी, झारीझामनी प्रत्येक १०.
---------------