Tuesday, October 13, 2015

मॉन्सून दोन दिवसात परतनार



पावसाळ्याची अखेर; हिवाळ्याची चाहूल

पुणे (प्रतिनिधी) - बरोब्बर चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाळा संपणार असून हिवाळ्याला प्रारंभ होणार आहे. हवामान खात्याने येत्या दोन दिवसात नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या वाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील परतीचा प्रवास पूर्ण होऊन राज्य मॉन्सूनमुक्त होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक ठिकाणी पाऊस थांबला असून उन्हाची ताप व थंडीची झुळूकही वाढू लागली आहे. तुरळक ठिकाणी पडत असलेला पाऊसही या दोन दिवसात पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी (ता.१६) सकाळपर्यंत फक्त कोकणात एखाददुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत संपूर्ण महाराष्ट्रात आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणेतर महाराष्ट्रात कोठेही पावसाची शक्यता नाही. या भागात कमाल तापमानात अल्पशी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात ऑक्टोबर हिट जाणवू लागली असून कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत उंचावला आहे.

गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रातील तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी कमी होऊन त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर ओमानच्या आखाताच्या दिशेने सरकत आहे. राज्यांतर्गत भागात वाऱ्याची दिशाही मॉन्सूनच्या नेहमीच्या दिशेच्या विरुद्ध झाली आहे. राज्यात बाष्पयुक्त ढगांची आवकही थांबलेली आहे. यामुळे राज्यातील पाऊस थांबून मॉन्सून माघारी परतणार अशी स्थिती आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. माथेरान येथे सर्वाधिक ४० मिलीमिटर पाऊस पडला. कोकणात सांगे व मध्य महाराष्ट्रात सुरगणा येथे प्रत्येकी २० मिलीमिटर पाऊस पडला. कणकवली, लांजा, संगमेश्वर, देवरुख, सुधागड, पाली, विक्रमगड, गगनबावडा, गारगोटी, भुदरगड, गिरणा धरण, महाबळेश्वर या ठिकाणी प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३३ (२६), डहाणू ३४ (२६), पणजी ३२ (२५), हर्णे ३३ (२५), मुंबई ३३ (२५), रत्नागिरी ३३ (२३), नगर ३५ (२०), जळगाव ३८ (२१), कोल्हापूर ३२ (२२), महाबळेश्वर २६ (१७), मालेगाव ३८ (२२), नाशिक ३३ (२१), पुणे ३१ (२१), सांगली ३१ (२३), सातारा ३१ (२०), सोलापूर ३५ (२३), औरंगाबाद ३३ (२१), नांदेड ३७ (१९), उस्मानाबाद ३३ (२०), परभणी ३६ (२१), अकोला ३७ (२१), अमरावती ३५ (२०), ब्रम्हपुरी ३६ (२३), बुलडाणा ३४ (२३), चंद्रपूर ३५ (२३), नागपूर ३७ (२०), वर्धा ३७ (२०), यवतमाळ ३५ (२०)
------------------ 

No comments:

Post a Comment