Wednesday, October 21, 2015

जनावरांच्या असेसरीज - मार्केट स्टोरी

पुणे (प्रतिनिधी) - गेल्या काही वर्षात वाढलेल्या इंधनाच्या किमती, सलग तीन चार वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती आणि जनावरांच्या शौकीनांच्या संख्येत झालेली घट यामुळे बैल आणि इतर जनावरांसाठीच्या विविध वस्तूंच्या मागणीत गेल्या काही वर्षात घट सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र यानंतरही वस्तूंच्या किमतींचा आलेख मात्र चढताच आहे. जोती, माळा इ. तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येही खऱ्या कवड्यांच्या ऐवजी प्लॅस्टिकच्या कवड्या वापरण्यासारखे बदल होत आहेत.

कोणत्याही प्रकारचे पशुपालन करताना जनावरांसाठी विविध प्रकारच्या वस्तु शेतकऱ्यांना अावश्यक ठरतात. बांधण्यासाठी दोरखंड, गळपेंडे, मोरखी, वेसन, सजवण्यासाठी घुंगरमाळा, दृष्टमाळा, तोडे, वशिंड पट्टा, गोंडे, बेगडं आदी अनेक प्रकारच्या वस्तू दैनंदीन पशुपालनात वापरल्या जातात. या वस्तूंच्या निर्मिती व किमतीत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बदल सुरु असल्याची स्थिती आहे. डिझेलच्या किमती वाढतील किंवा कमी होतील तसा या वस्तूंच्या किमतीत चढ उतार होत आहेत. पूर्वी मोरखी इ. वस्तू सरसकटपणे दोरखंडासून तयार करण्यात येत. आता यासाठी नायलॉन, सुती किंवा मिश्र धाग्यांच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येतोय. शेतकऱ्यांची पहिली पसंती अशा पट्ट्याच्या वस्तूंना आहे.

- अंबाडी हद्दपार
काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात घायपात या झुडुपवर्गिय वनस्पतीची पाने भिजवून त्यापासून अंबाडी आणि अंबाडीपासून दोरखंड व जनावरांच्या उपयोगी वस्तू तयार केल्या जात. काही विशिष्ट समाज या व्यवसायात होते. मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून अंबाडीपासून दोरखंड व इतर वस्तू तयार करण्याचे व्यवसाय जवळपास बंद पडले आहेत. बाजारातही अंबाडीचे दोरखंड दुर्मिळ झाले असून नायलॉनच्या दोरखंडांनी बाजारपेठ काबिज केली आहे.

- बैलगाडा शर्यतींचा असाही परिणाम
बैलगाडा शर्यतीमुळे बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू निर्मिती व विक्रीला चांगले दिवस आले होते. दोरखंड, मोरखी, वेसन, गळपट्टे, कवड्याच्या माळा, दृष्टमाळा, गोंडे, बेगडं आदींना मोठी मागणी होती. अनेक शौकीन प्रत्येक शर्यतीच्या वेळी या सर्व साहित्याचे वेगवेगळे साज वापरत. यामुळे या वस्तूंची मागणी टिकून होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शर्यती बंद आहे. यामुळे या वस्तूंची बाजारातील उलाढाल २० ते ३० टक्क्यांनी मंदावली आहे. मशागतीच्या जनावरांसाठी शेतकरी वर्षा दोन वर्षाने एकदा खरेदी करतात, ती सुद्धा पोळ्याला सुमारास किंवा आगुठीच्या वेळी. इतर वेळी बाजार मंदावलेला असतो, अशी माहीती बेल्हा (जुन्नर, पुणे) येथिल बैलबाजारातील विक्रेत्यांनी दिली.

- जनावरांसाठीच्या वस्तुंच्या प्रतिनग किमती (रुपये)
मोरखी - २० ते ४०, चाबुक - ८० ते १५०, दोरखंड - १२० ते १६० रुपये किलो, वेसन - १० ते ५०, गळपेंडे - २५ ते ८० रुपये, घुंगरमाळ - ६०० ते ७००, दृष्टमाळ - ६० ते ८०, कवडीमाळ - ५० ते ७०, गोंडे - २० ते ५०, शिंगाड्या - ७० ते ८० रुपये जोडी, भवरकडी - १० ते ६० रुपये जोडी, ताडपत्री १३० ते २०० रुपये किलो

- कोट
‘‘गेल्या दहा वर्षात बैल व जनावरांचे शौकीन लोक कमी झाले आहेत. बैलपोळा, आगुठीचे सणवारही पुर्वीसारखे होत नाहीत. यामुळे जनावरांच्या उपयोगाच्या सजावटीच्या वस्तुंच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शर्यतींवरील बंदी, डिझेलच्या वाढत्या किमती याचाही फटका बसलाय. पण वस्तूंच्या किमती चढत्या आहेत.
- हरीभाऊ नारायण गुंजाळ, विक्रेते, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे
----------------- 

No comments:

Post a Comment