Tuesday, October 13, 2015

पाणी वाटप

पुणे (प्रतिनिधी) - कायद्यातील तरतूदींनुसार समन्यायी पाणी वाटप अमलात आणण्यासाठी पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणी व इतर धरणांमध्ये नदीमार्गे पाणी सोडल्यास प्रत्यक्ष सोडलेल्या पाण्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक पाणी वाया जाते असा पुर्वानुभव आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या आग्रहातून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील धरणांमधून उजणी व इतर धरणांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तर प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाण्याचा धोका आहे. यातून सर्वांचेच मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीची फेररचना करण्याची गरज तज्ज्ञांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचा पावसाळा संपल्यानंतरही धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. उजणीत अवघा १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. याच वेळी घाटालगतच्या खडकवासला, पवना, चासकमान आदी धरणांमध्ये ६० ते ८० टक्के पाणीसाठा आहे. या धरणांतून उजनीमध्ये पाणी सोडण्याची याचिका जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, उजणी प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्यांची बाजू ऐकूण घेतली आहे. येत्या आठ - पंधरा दिवसात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या संभाव्य नुकसानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे विभागातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पश्चिम पट्ट्यातील अनेक धरणे ५५ ते ८० टक्के भरली आहे. यामुळे पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणीमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी आहे. नाशिक विभागातही नाशिकमधील धरणे व जायकवाडी प्रकल्प याबाबत अशीच स्थिती आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार राज्यात समन्यायी पाणी वाटपाचे धोरण आहे. संबंधीत खोऱ्यातील पाण्याचे ता भागातील सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटून देण्याचे काम याद्वारे करण्यात येते. मात्र खोऱ्याच्या एका बाजूला पाणी असताना दुसरीकडे धरणे कोरडी असून तिव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे वाटप समन्यायी व्हावे हे खरे पण सुमारे ३०० किलोमिटरपर्यंत ते पुरवताना बाष्पिभवन, गळती आदी माध्यमातून मोठे नुकसानीचा धोका आहे. शिवाय यामुळे पाटाने पाणी सोडण्यावरही मर्यादा येणार आहे. यामुळे नदीतून पाणी सोडू नये, अशी मागणी आहे.

- पाणीवापरावर निर्बंध हवेत
पुणे व पिंपरी चिंचवडसह मोठ्या शहरांमध्ये प्रतिव्यक्ती गरजेपेक्षा कित्येक पट अधिक पाणी वापरले जाते. जादा पाणी वापरामुळे सांडपाणीही अधिक प्रमाणात तयार होत असून त्यासाठीही अतिरिक्त पाणी वाया घालवले जाते. शहरांच्या या अतिरेकी पाणी वापरामुळे शेतीला पाणी कमी पडत असून शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरवले जात आहे. यंदाची स्थिती पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने बिकट आहे. यामुळे पाणी वापरावर निर्बंध आणावेत. राज्य शासनाने या सर्व बाबींकडे गांभिर्याने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------- 

No comments:

Post a Comment