Wednesday, October 21, 2015

कृषीसंस्कृतीच्या संपन्न जिवनकथा

पुस्तक परिचय - संतोष डुकरे
-------------
पुस्तकाचे नाव - पावसाचे पाखरू
लेखक - र. वा. दिघे
प्रकाशक - संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे - १४४
किंमत - १०० रुपये
-------------
कृषी व ग्रामिण साहित्याचे आद्य शिलेदार म्हणून र. वा. दिघे यांचा लौकीक आहे. ते स्वतः प्रगतशिल शेतकरी होते. कोकणात उत्कृष्ट गहू उत्पादनाबाबत तत्कालिन राज्य शासनामार्फत त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शेती कसता कसता त्यांनी साहित्यनिर्मिती केली. स्वातंत्र्य पूर्व काळातील शेती व शेतकऱ्यांची त्यांनी चितारलेली परिस्थिती आजच्या स्थितीतही जशीच्या तशी लागू होते. त्यांचा वारकरी आणि शेतकरी नायक वारकरी संप्रदायाची मूल्ये जपत संतांच्या शिकवणीतून निसर्गाच्या आपत्तीशी झगडा देतो, मुकाबला करतो. पाणकळा, पड रे पाण्या आदी कादंबऱ्या, कथा, कवितांमधून त्यांनी शेतकरी जीवन समर्थपणे उभे केले आहे. पड रे पाण्या, पड पाण्या तू, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी... हे त्यांचे ७० वर्षापूर्वीचे गित आजही राज्यभर लोकप्रिय आहे. पावसाचे पाखरु हा त्यांचा १९५० च्या दशकातला कथासंग्रह. त्यातील पावसाचं पाखरु, राजा खेळतो भातुकली, फितूर, वेताळाची धोंड आदी कथांमधून कृषी व ग्रामिण जिवनाचे अनेक कांगोरे काळजाला हात घालतात.

राजाची लेक बाव्हली या कथेत पश्चाताप झालेला राजा आपल्या शेतकऱ्याशी लग्न केलेल्या राजकन्येला जावयाला राजा करण्याचे बोलतो तेव्हा राजकन्या म्हणते... शेतकरी राजा झाला तर शेती कोण करील. माझं राज्य शेती, माझा आनंद शेतीत आहे. सर्वच शेतकरी राजा होवू पाहत आहेत. त्यांनी शेतकरीच राहीलं पाहिजे. शेतकऱ्याचा राजा करण्यापेक्षा राजानं शेतकरी झालं पाहिजे. ज्या दिवशी सर्वजण शेतकरी होतील अन् आमच्या शेतीच्या राज्यात येतील त्या दिवशी राजाची जरुरी भासणार नाही. महात्मा फुलें बळीच्या राज्याची कल्पना मांडली. दिघेंनी शेतकऱ्याने राजा होण्यापेक्षा राजाने शेतकरी व्हावे, ही विचारधारा रुंदावली. या पुस्तकाची डॉ. सदानंद मोरे यांनी लिहीलेली प्रस्तावणा कृषी व ग्रामिण साहित्यातील र. वा. दिघे यांचे अमिट योगदान अतिशय नेमकेपणाने स्पष्ट करणारी आहे. हिंदू, मुस्लिम, अस्पृश्य, आदिवासी अशा विविध सामाजिक, धार्मिक गटांचे अभिसरण व्यापक मानवतावादी दृष्टीने करून जोतीराव फुल्यांना अभिप्रेत असलेल्या एकमय लोकांचे म्हणजे भारत या राष्ट्राचे प्रतिबिंब साहित्यात पाहू शकणारे र. वा. दिघे हे एकमेव लेखक आहेत. या शब्दात डॉ. मोरे यांनी त्यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.
------------

No comments:

Post a Comment