Friday, May 13, 2016

मॉन्सून मंगळवारपर्यंत अंदमानात

आगमनास स्थिती अनुकूल, ५ दिवस जलद वाटचाल

- विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुढील तीन चार दिवसात इशान्य, पश्चिम व मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा पुन्हा उसळी मारण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने शनिवार, रविवार व सोमवारी (ता. १४ ते १६) विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा व राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भातील कमाल तापमानात लक्षणिय वाढ होवून पारा ४४ अंशापार गेला. दिवसभरात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नागपूरमध्ये ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन तीन दिवसात यात आणखी वाढ होण्याचा इशारा आहे. १४ व १५ मे दरम्यान राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून १६ मे पासून पुन्हा गडगडाटी, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) - हिंदी महासागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) भारतीय उपखंडाकडे वेगाने झेपावले असून मंगळवारपर्यंत (ता.१६) ते अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसात निकोबार बेटे, दक्षिण अंदमानचा समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मॉन्सून पोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा सर्वसाधारण वेळेहून ५ दिवस जलद होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. अंदमानपाठोपाठ २५ मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल होतो. मॉन्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखा व त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता येत्या ७ ते १५ जून दरम्यान मॉन्सून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मध्य प्रदेश, विदर्भा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. उपसागराच्या दक्षिण भागात चक्राकार वारे सक्रीय असून शनिवारी या वाऱ्यांची तिव्रता वाढू कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होवून व रविवारी (ता.१५) त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या आगमनासाठी ही अनुकूल स्थिती असतानाच मध्य भारतात पुन्हा एकता उष्णतेचा भडका उडाला आहे. कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी गाठली असून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मॉन्सूनच्या देशांतर्गत वाटचालीलाही वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३३.८, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, पणजी ३४.६, डहाणू ३४.६, पुणे ३८.७, जळगाव ४४, कोल्हापूर ३९, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.२, सांगली ४०.५, सातारा ३९, सोलापूर ४०.५, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३, नांदेड ४२.५, अकोला ४३.६, अमरावती ३७.४, बुलडाणा ४०.५, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.४, नागपूर ४४.१, वाशिम ३८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.४
------------------- 

Tuesday, May 10, 2016

गारपिटीचे सावट निवळले



शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

- मृगाआधी रोहिणी बरसणार ?
मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीसाठी सर्वोत्तम समजला जातो. तर त्याआधीच्या रोहिनी नक्षत्रावर पडलेला पाऊस हा पेरणीपूर्व मशागतींसाठी सर्वोत्तम समजला जातो. रोहिणीच्या पावसावर मशागत आणि मृगाच्या पावसावर पेरणी असे खेडोपाडी समिकरण आहे. अद्याप रोहीणी सुरु होण्यास दहा पंधरा दिवसाचा कालावधी बाकी असला तरी सध्या राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेला पाऊस रोहिणीसारखाच असल्याचे अनुभवास येत आहे. बदलत्या ऋतूमानानुसार रोहिणीचा पाऊस मागेपुढे होवू शकतो, त्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याचे अंदाज... यानुसार सध्याचा पाऊस रोहिणीचाच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत असून सध्याची स्थिती पाहता मृग चांगला बरसेल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे (प्रतिनिधी) - मध्य महाराष्ट्रावरील चक्राकार वारे ओसरल्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील गारपिटीचे सावट निवळले आहे. मात्र या दोन्ही विभागांसह विदर्भातही मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने गुरुवारपर्यंत (ता.१२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात व त्यानंतर पुढची दोन दिवस फक्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळे वारे व मेघगर्जेनेसह पाऊस पडला. तुरळक ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर ढगांच्या प्रमाणात घट झाली. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद व महाबळेश्वर येथे प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पुणे, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्विप बेटे, मालदिव परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या सिस्टिमच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागरात विश्ववृत्ताजवळ शुक्रवारपर्यंत (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या दोन्ही हवामान स्थितींच्या प्रभावामुळे हिंदी महासागरातील मॉन्सूनच्या वाटचालीला बळ मिळण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३४, अलिबाग ३२.४, रत्नागिरी ३३.४, पणजी ३५, डहाणू ३४.७, पुणे ३८.७, जळगाव ४२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३, मालेगाव ४१, नाशिक ३८, सांगली ४०, सातारा ३९.९, सोलापूर ४१.९, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३७.९, परभणी ४१.२, नांदेड ४०, अकोला ३९.७, अमरावती ३९, बुलडाणा ३९, ब्रम्हपुरी ४१.३, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.६, नागपूर ४१.७, वाशिम ३६.६, वर्धा ४०.९, यवतमाळ ३९.२
-------------------- 

Thursday, April 21, 2016

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा


रात्रीचा उष्माही कायम

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. विदर्भात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झालेली असून शुक्रवारी (ता.२२) काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झाल्याने मराठवाड्‍यातही उन्हाचा कडाका जोरदार राहण्याची चिन्हे आहेत.

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानाचा पारा वाढलेला असतानाच किमान तापमानातही सरासरीहून पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रात्रही उष्ण झाली आहे. संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येत आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून पाच अंश सेल्सिअसने उंचावले आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झालेली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पुन्हा उष्णनेने लाही लाही अशी होरपळवणारी स्थिती अनुभवास येत आहे.

दरम्यान, इशान्येकडील आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात गुवाहाटीला १३० मिलीमिटर तर चेरापुंजीला ५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे या भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच अंशांनी घट झाली आहे. विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हिंदी महासागरात विश्ववृत्तीया भाग व लगतच्या अरबी समुद्राच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३१ (२५), भिरा ३९ (२२), डहाणू ३४ (२५), पणजी ३४ (२७), हर्णे ३२ (२५), कुलाबा ३१ (२६), सांताक्रुझ ३३ (२५), रत्नागिरी ३२ (२६), जळगाव ४३ (२७), जेऊर ४२ (२६), महाबळेश्वर ३३ (२२), मालेगाव ४४ (२७), नाशिक ४० (२३), पुणे ४० (२३), सांगली ४१ (२४), सातारा ४० (२५), सोलापूर ४४ (३०), नांदेड ४५ (३१), उस्मानाबाद ४२ (२६), परभणी ४५ (३१), अकोला ४५ (३०), अमरावती ४३ (२८), ब्रम्हपुरी ४४ (२९), बुलडाणा ४२ (२९), चंद्रपूर ४४ (३०), नागपूर ४४ (२८), वर्धा ४५ (२९), यवतमाळ ४३ (२७)
------------------ 

Thursday, April 14, 2016

विदर्भात उष्‍णतेच्या लाटेचा इशारा

शुक्रवार, शनिवार तापदायक; आद्रतेतही मोठी घसरण

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भ व मराठवाड्यात शुक्रवार (ता.१५) व शनिवारी (ता.१६) उन्हाची ताप लक्षणिय वाढून उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. उन्हाची लाहीलाही वाढतानाच सापेक्ष आद्रतेत सरासरीच्या दहा टक्क्यांहून अधिक घट झाल्याने उष्णतेच्या लाटेच्या झळा अधिक तिव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१८) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीच्या पातळीहून ९०० मिटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. याव्यतिरिक्त वाऱ्यांची हालचाल मंद असून उन्हाची तिरिप अधिक तिव्र झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. कोकणात भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपार गेला आहे. विदर्भ व मराठवाड्यात अनेक ठिकाणी सापेक्ष आद्रतेत लक्षणिय घट झाली. उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी २५ टक्के सापेक्ष आद्रतेची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी आद्रतेत सरासरीहून तब्बल १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कोकणात आद्रता पाच ते १७ टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, मध्य भारतात उष्णतेचा झटका वाढत असताना इशान्य भारतात आसाम, सिक्कमी, नागालॅन्ड, मनिपूर, मिझोरम, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात चेरापुंजी येथे तब्बल २१० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत भागात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण १० ते ४० मिलीमिटर दरम्यान होते. उपसागरात पश्चिम बंगालपासून बांग्लादेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुढील दोन दिवस या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता.१४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३१.८, सांताक्रुझ ३३, अलिबाग ३०.४, रत्नागिरी ३२.९, पणजी ३४.२, डहाणू ३३.३, भिरा ४३.५, पुणे ३९.८, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.९, मालेगाव ४२, नाशिक ३८.६, सांगली ४०.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.७, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३९.५, परभणी ४२.५, नांदेड ४२.५, अकोला ४१.५, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०, नागपूर ४२, वाशिम ३८.२, वर्धा ४२, यवतमाळ ४१.२

Friday, March 18, 2016

डॉ. दादाभाऊ यादव - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. यानंतरच्या पुरक अर्थसंकल्पात आणखी २५ ते ३० टक्के रक्कम वाढवली तर योग्य न्याय मिळू शकतो. सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारसाठीचे अनुदान अपुरे आहे. कृषी प्रक्रियेसाठीच्या २५ टक्के अनुदानामुळे क्लस्टर विकसित होवून रोजगाराचे चांगले साधन मिळेल. पिक विमा योजना निधी, हवामान केंद्र या चांगल्या तरतूदी आहे. नाबार्डच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, गोसंवर्धनशाळा या व इतर शेतीपुरक व्यवसायांना अधिक चालना द्यायला हवी. स्मार्ट गाव योजनेत अति दुर्गम भागातील गावांमध्ये रस्ते, बॅंका व आठवडे बाजार सुविधा निर्मितीवर भर द्यायला हवा. येत्या हंगामाच्या दृष्टीने तेलबिया व कडधान्य उत्पादनाच्या दृष्टीने असलेली तरतूद दुप्पट करायला हवी. कृषीपंप ग्राहकांना विज दरात सवलत आहे, पण त्याबाबतची व्यवस्था सुधारणेची गरज आहे. विजेची कार्यक्षमता ३०-४० टक्के आहे. शेतीच्या पाण्याची कार्यक्षमताही ३० ते ४० टक्केच आहे. ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. शेती व पिण्यासाठीच्या पाण्यासाठी तात्पुरती योजना करण्याऐवजी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित आहे. कृषी गुरुकुलची तरतूद वाढवायला हवी. सेंद्रीय शेती, पुरस्कार, कृषी महोत्सव यासाठी चांगली तरतूद आहे. सलग दुष्काळांमुळे कृषीचा विकासदर कमी आहे. दुष्काळ, गारपीट, बदलते हवामान याला सामोरे जाण्यासाठी संशोधन व विस्तार महत्वाचा आहे. मात्र अर्थसंकल्पात संशोधन व विस्तारासाठी अर्थसंकल्पात तरतूद दिसत नाही. पुरवणी अर्थसंकल्पात ती वाढून मिळायला हवी.
- दादाभाऊ यादव, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी 

सुनिल पवार - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

उपयुक्त तरतुदी
या अर्थसंकल्पाप्रमाणे संबंधित बाबींवर प्रत्यक्षात खर्च झाला, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वोत्तम काम या वर्षात होऊ शकते. कृषीसाठी २५ हजार कोटी ही मोठी तरतूद आहे. पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. फळबागांमध्ये त्याबाबत चांगले काम झाले आहे. आता विम्यासाठीची तरतूद समाधानकारक आहे. प्रक्रिया उद्योगाला यंत्रसामग्रीसाठी कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान वाइन व बेदाणा उद्योगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. पण ते फक्त २५ टक्के आहे. ठिबक सिंचनासाठी भरिव तरतूद झाल्याने तीन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली निघून फळबागांपलीकडे ऊस व इतर पिकांनाही त्याचा थेट चांगला लाभ होईल. निर्यात व पायाभूत गोष्टींसाठी कमी तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघांचे संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.