Tuesday, December 30, 2014

दुष्काळी ज्वारी, ठरेल उसाला भारी !

मोक्‍याच्या अवस्थेत संरक्षित पाण्यासाठी ठिबक सिंचन, योग्य अंतरावर लागवड व विद्राव्य खतांचा वापर या त्रिसुत्रीचा वापर केल्यास नफ्याच्या पातळीवर कोरडवाहू ज्वारीचे अवघ्या चार महिन्याचे पिक 16 महिन्यांच्या बागायती ऊस पिकालाही भारी पडू शकते याचे आदर्श पिक प्रात्यक्षिक शिरुर तालुक्‍यातील (जि.पुणे) कासारी गावचे प्रगतशील शेतकरी व भारतीय किसान संघाचे प्रांत कोषाध्यक्ष मधुकर (अण्णा) हरी टेमगिरे यांनी उभारले आहे. पुणे-शिरुर रस्त्यावरच हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे पिक सध्या ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
------------
संतोष डुकरे
-------------
सुक्ष्म सिंचनाचे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे बागायती व नगदी पिके विशेषतः फळपिके व भाजीपाला यांच्यासाठीच वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातही अन्नधान्य पिकांसाठी त्याचा वापर करण्याचे धाडस फार कुणी करत नाही. मात्र हे संरक्षित पाणीसाठ्याच्या बळावर हे धाडस दाखवले तर कोरडवाहू अन्नधान्य पिकंही नगदी व पुरेपुर मोबदला देणारे होऊ शकते हे टेमगिरे व त्यांच्या सहकार्यांनी उभारलेल्या प्रात्यक्षिकांवर सहज नजरेस भरते.

पीक सल्लागार केशव म्हस्के यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली चालू हंगामात मधुकर टेमगिरे (कासारी), गजानन इंगळे (दहीवडी), भाऊसाहेब पळसकर (करडे) यांनी प्रत्येकी एक एकरावर तर गणेश काळे व सहकार्यांनी (निमोने) तीन एकरावर असे तालुक्‍यात एकूण सहा एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनावर ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले सर्वसाधारण बियाणे (निर्मल सिड्‌स कंपनीचा सुवर्णा वाण) यासाठी वापरले आहे. हे सर्व शेतकरी भारतीय किसान संघाचे सदस्य आहेत. किसान संघामार्फत याच धर्तीवर सोलापूर, नांदेड व लातूर जिल्ह्यातही ज्वारी उत्पादकतावाढ प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

- आधी प्रयोग मग प्रात्यक्षिके
शिक्रापूर परिसरात ठिबकवरील ज्वारीचे प्रात्यक्षिक घेण्याआधी सल्लागार श्री. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन वर्षे 10 गुंठे क्षेत्रावर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात याबाबतचे प्रयोग घेण्यात आले. पहिला प्रयोग कर्जत तालुक्‍यातील कुळधरण गावात कांतीलाल गुंड यांच्या शेतात झाला. त्यात सुक्ष्म सिंचनाबरोबरच ज्वारीची रोपे नर्सरीत तयार करुन रोपांची पुर्नलागवड करण्यात आली. या प्रयोगात प्रति कणीस सरासरी 200 ग्रॅम उत्पादन मिळाले. दुसरा प्रयोग राळेगणसिद्धी गावातील सदाशीव मापारी यांच्या शेतात झाला. यात टोकण पद्धतीने लागवड व ठिबकचा वापर करण्यात आला. हा प्रयोग पाहण्यासाठी शिरुरमधील दौंडकर स्मारक समितीमार्फत श्री. टेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 शेतकऱ्यांची अभ्यास सहल नेण्यात आली. याप्रेरणेने टेमगिरे यांच्याच नेतृत्वाखाली शिक्रापूर परिसरातील चार गावांमध्ये चालू रब्बी हंगामात 6 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. श्री मस्के या प्रयोगाला दर आठ दिवसांनी भेट देवून मार्गदर्शन करतात. त्यांनी आखून दिलेल्या दिनक्रमानुसारच या प्रयोगाचे सर्व काम सुरु आहे.

- सर्व बाबींच्या काटेकोर नोंदी
टेमगिरे यांनी एक ऑक्‍टोबर 2014 रोजी एक बाय एक फुटावर एकेका बिजाची लागवड केली. ठिबकसाठी दोन ओळींमध्ये एक लॅटरल ठेवण्यात आली. यानंतर 17 व 18 ऑक्‍टोबरला नर्सरीतील रोपांचा वापर करुन गॅप फिलींग केले. पहिली प्रतिबंधात्मक फवारणी दोन नोव्हेंबरला तर दुसरी फवारणी सहा नोव्हेंबरला केली. दोन्ही फवारणीमध्ये सल्लागारांच्या सांगण्यानुसार किडनाशक, बुरशीनाशक व बायोझाईम यांचा एकत्रित वापर केला. दरम्यान 24 ऑक्‍टोबरला 10ः26ः26, युरीया व सुक्ष्म मुलद्रव्य खतांचा डोस दिला. यानंतर नोव्हेंबरच्या 2 ते 11 तारखेदरम्यान दररोज एक दिवसाआड प्रती दिवस पाच किलो याप्रमाणे 0ः52ः34 व युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट विद्राव्य स्वरुपात ठिबक सिंचन संचातून दिले. पाठोपाठ एक दिवस पाच किलो झिंक सल्फेट विद्राव्य स्वरुपात दिले. दोन वेळा खुरपणी केल्या.

- रोपे तयार केली तर...
ज्वारीची रोपे तयार करुन त्यांची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केल्यास एकसमान वाढ, उत्पादनक्षम ताटांची अधिकतम संख्या यामुळे उत्पादनात निश्‍चितच भरिव वाढ येत असल्याचे कर्जत येथे केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. मात्र यात ज्वारीची रोपे तयार करण्यासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चात होणारी ही वाढ टाळण्यासाठी कासारी येथील या प्रात्यक्षिकात रोपांऐवजी टोकण पद्धतीने ज्वारी लागवड करण्यात आली. एक एकरमध्ये किमान 30 ते 32 हजार रोपांपासून दर्जेदार उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. किसान संघ व इतर माध्यमातून राज्यातील अनेक शेतकरी व मान्यवरांनी आत्तापर्यंत या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट दिली आहे. या क्षेत्रातून एकरी किमान 40 क्विंटल ज्वारी उत्पादनाचा शेतकरी व तज्ज्ञांचा अंदाज आहे. पिक व कणसाचा आकार पाहता जास्तीत जास्त 50 क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची आशा आहे.

- उत्पादन खर्च एकरी 40 हजार
टेमगिरेंनी या प्रात्यक्षिकाच्या सुरवातीपासूनच काटेकोर नोंदी व हिशेब ठेवले आहेत. ठिबकवरील या ज्वारी उत्पादनासाठी जमीनीची पुर्वमशात म्हणजेच नागंरणी, रोटरणी, एक ट्रक शेणखत, लागवड, दोन खुरपण्या, दोन फवारण्या, ठिबक सिंचन साहित्य भाडे यापोटी आत्तापर्यंत 30 हजार रुपये खर्च झाले आहेत. कापणी, मळणीसह धान्य हाती पडेपर्यंत आणखी 10 हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे. एकूण उत्पादन खर्च एकरी 40 हजार रुपयांच्या आत राहील, असे त्यांचे गणित आहे.

- उसाहून दुप्पट नफा शक्‍य
शिक्रापूर परिसरात शेतकऱ्यांना ऊस पिकापासून वार्षिक एकरी सरासरी 50 हजार रुपये नफा होतो. याऊलट सुक्ष्म सिंचन पद्धतीने एकट्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकापासून शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो असा दावा, टेमगिरे करतात. त्यांच्या गणितानुसार 40 क्विंटल ज्वारीपासून प्रति क्विंटल तीन हजार रुपये दराने एक लाख 20 हजार रुपये व चाऱ्यापासून सुमारे 20 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. उत्पादन खर्चाचे 40 हजार रुपये वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा हाती राहू शकतो. शिवाय खरीप व उन्हाळी हंगामात पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी इतर पिकेही घेऊ शकतात.
-----------
*प्रतिक्रीया
""गेल्या वर्षी 10 गुंठ्यावर प्रयोग झाला. यंदा तो सहा एकरवर आहे. या प्रात्यक्षिकांचे यश पाहून यापुढील काळात शेतकरी स्वतःहून या पद्धतीने उत्पादन घेतील. किसान संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्वारी उत्पादक भागात प्रात्यक्षिके उभारण्याचा प्रयत्न आहे.''
- मधुकर टेमगिरे, प्रयोगशिल शेतकरी व प्रांत कोषाध्यक्ष, भारतीय किसान संघ

""टेमगिरे यांच्या ठिबकवरील ज्वारीच्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रेरणादायी आहेत. कृषी विभागाने परिसरात 500 हेक्‍टरवर ज्वारी पिक प्रात्यक्षिके घेतली आहेत. या शेतकऱ्यांना हा प्रयोग दाखवून पुढील हंगामात या पद्धतीने ज्वारी उत्पादकतावाढीस चालना देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.''
- सुरेश जोशी, मंडळ कृषी अधिकारी, शिक्रापूर
-------------
संपर्क ः
मधुकर टेमगिरे - 9403722447, 9850099847
केशव म्हस्के - 9822075738
------------- 

उमेद वाढूया ... साहेबराव वाघ, धुळे

हे दिवसही जातील...
------------
गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना निसर्गाचा कमी पाऊस, जास्त पाऊस, वारा, गारपीट याचा मोठा मार बसला. शेतीचे उत्पादन अत्यंत अल्प झाले. शेतीत भांडवल ओतले तर पिके चांगले येतात. यासाठी शेतकरी बॅंकांकडे हेलपाटे घालून कर्ज घेतात, शेतीत खर्च करतात. उत्पादन न आल्याने सर्व आर्थिक गणित कोलमडते. गेल्या तीन वर्षात निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे.

संकटे येतात, परंतु ती कायमस्वरुपी राहत नाही. "हे दिवसही जातील' हे लक्षात घेतले पाहीजे. एका शेतकऱ्याला दोन मुले होती. त्यांचे वाटणीचे वेळी एक सोन्याची अंगठी होती. तिच्यावर हे दिवसही जातील असे लिहले होते. दुसरा हिस्सा दुप्पट पैशाचा होता. थोरल्या मुलाने दुप्पट पैसे घेतले आणि लहान मुलाने सोन्याची अंगठी घेतली. पुढे संकटे आली. थोरल्याने संकटातून वाचण्यासाठी पैसे संपवले. लहान भावावरही संकटे आली. परंतु त्याच्याकडे असलेल्या अंगठीवरील धिराच्या संदेशाने त्याला हुरुप आला. तो डगमगला नाही. वडीलांच्या संदेशाचा अर्थ त्याला पूर्ण समजला. संकटातही संधी शोधत तग धरुन राहीला. संकटाचे दिवस कायम स्वरुपी नसतात. रात्रीनंतर दिवस येतोच.

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधून पाही या समर्थांच्या वचनाचे मनन झाले पाहिजे. सर्व सुखी असा कोणीही नाही. धाडस माणसाचे अंगी असावयास पाहिजे. संयम आणि सहनशिलता सोडू नये. शेतकऱ्यांनी विवेकपूर्ण वागणे अगत्याचे आहे. आत्महत्या हा संकटावर मात करण्याचा मार्ग किंवा उपाय नाही. उलट त्यामुळे उर्वरीत सर्व कुटुंबच संकटांच्या मालिकेत सापडते. संकटे कोणावर आली नाहीत. ती सर्वांवर येतात. त्यातून जिद्दीने मार्ग काढण्यातच पुरुषार्थ आहे. भ्याडपणे आणि अविचाराने वागले तर नुकसान आपल्याच कुटुंबाचे होते. तरुणपणी अवघ्या 30 ते 50 वयात अघोरी कृत्य करुन शरीर नष्ट करणे हा नैतिक गुन्हा आहे. आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, मरणाचा नाही. विचारपुर्वक निर्णय घेवून ठामपणे, शुर योद्‌ध्याप्रमाणे संकटाशी मुकाबला करण्यातच धन्यता व आदर्शपणा आहे.

वाईट दिवस किंवा संकटे नेहमीच येतात असे नाही. दर दोन तीन वर्षांनी यामध्ये बदल होत असतो. आपला थोरपुरुषांचा वारसा आहे. सर्वांनी संकटाशी दोन हात करुन त्यावर विजय मिळवलेला आहे. म्हणून "हे दिवसही जातील' यावर विश्‍वास ठेवून आत्मघाताचे कृत्य करु नका. संकटाला घाबरुन आत्महत्या करणे हे पाप आहे. आपल्यानंतर कुटुंबातील आई, बाप, बायको, मुले यांनी कसे जगावे. घरातील कर्ता पुरुषाने याचा विचार करण्याची आता गरज आहे. आपण असे अघोरी, आत्मघातकी, चुकीचे पाऊल उचलू नका. "बचेंगे तो और भी लढेंगे' याचा विसर पडू देऊ नका. धाडसाने, जिद्दीने, संयमाने वागुन एकमेकांच्या सहकार्याने आलेल्या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करावयास पाहिजे.
------------
साहेबराव वाघ, प्रगतशील शेतकरी, कापडणे, ता. जि. धुळे
9767571826
------------ 

उमेद बांधूया - डाॅ. रामचंद्र साबळे

निश्‍चिय करुया लढण्याचा...
---------
डॉ. रामचंद्र साबळे, जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ
---------
उंच दगडी इमारतींवर, किल्ल्यांवर, विहीरींच्या काठावर दगडांच्या फटीत पिंपळ आणि वडाची झाडे वाढताना आपण पाहतो. त्यांना कधी कोणी अन्न वा पाणी देत नाही. दुष्काळ असो की अवर्षण ती झाडे तग धरतात. जिवंत राहतात. पावसाचे थोडेफार पाणी मिळताच पुन्हा वाढतात. उन्हाळ्यात उन्हाचे तिव्र चटके, पाण्याविना गळणारी पाने सारे काही सहन करतात. मात्र जिवंत राहतात. अनुकूल स्थिती आली की पुन्हा वाढत राहतात. बिकट परिस्थितीवर, संकटांवर मात करणे आपण त्यांच्याकडून शिकूया. आत्महत्तेचा विचार हद्दपार करुया. नव्या उमेदिने नव्या जोमाने जिवण जगूया. निश्‍चयाने परिस्थिती बदलूया.

शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग भरभरुन देतो तेव्हाच शेतीची भरभराट होते. निसर्गात काही बदल झाल्यास त्याचे परिणामही नैसर्गिकपणे होतात. या सर्व बाबी समजून घेऊन शेती व्यवसाय करणे गरजेचे आहे. कितीही अडचणी आल्या, आपत्ती आल्या तरी त्यावर मात करीन असा निश्‍चय प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

टेन्शन, फस्ट्रेशन आणि डिप्रेशन या बाबी शेतकऱ्यांच्या नाहीत. त्यामुळे त्यांचा विचारही मनाला शिवू देण्याची गरज नाही. निसर्गाशी एकरुप होवून जगण्याची, त्यातून नवनिर्मिती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. स्वतःबरोबरच इतरांसाठी अन्न, धान्य, चारा निर्मितीचे बहुमोल काम आपण करतोय. जगाचे खरे पोशिंदे आपण आहोत, त्यामुळे काही अडचण आली. संकटे आली तर खचून न जाता आपली क्षमता आणखी वाढविण्यावर भर द्यायला हवा. इतरांना जगविण्याचा वसा आपण घेतला आहे, मग आपण खचून कसे चालेल.

अडचणींमध्येही संधी शोधतो आणि त्या काबीज करतो तो यशस्वी होतो. शेतीत दररोज नवीन संधी असते. आपण या संधी शोधणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी नुकसान होताच मनात अविचार वाढवणे आणि स्वतःच बरंवाईट करणे या गोष्टी प्रथम हद्दपार कराव्यात. संत बहिणाबाई चौधरी यांनी... अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर... असे म्हटलेच आहे. भाकरी मिळवतानाही हाताला बसणारे चटके सहन करावे लागतात. तसेच शेती करतानाही मनाला बसणारे चटके सहन करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तसा निश्‍चय करण्याची वेळ आता आली आहे.

जेथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला या उक्तीनुसार आळस झटका आणि नव्या उमेदीने, नव्या जोमाने नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगा. तसा निश्‍चय करा. मनावर सर्व संसाराचे ओझे असले तरीही चित्त उदासिन होऊ देवू नका. नाविन्याने प्रेरित होऊन शास्त्रावर आधारीत शेती करा. नव्या उमेदीने अपार कष्ट करण्याचे, संकटे पचविण्याचे विचार मनात बाळगा. तुमच्या शेतीत नवनवीन संकल्पना राबवा, यश तुम्हाला साथ देईल.
--------- 

फळे भाजीपाला प्रशिक्षण समारोप

पुणे ः राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेती उत्पादनाचा नफा वाढविण्यासाठी फळे व भाजीपाला प्रक्रीया तंत्रज्ञान मोहिम राबविण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी व्यक्त केले. फळे व भाजीपाला प्रक्रीया महासंघामार्फत आयोजित सात दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. नगरसेवक अशोक हरणावळ, महासंघाचे अध्यक्ष बी.के.माने आदी यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य एस.आर. नजन, प्रा. बी. बी. गुंजाळ, प्रा. संतोष घारे, प्रा. रमेश बेंद्र, प्रा. राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी एम. डी. लिके, एम.सी.डी.चे सुरेश उमप यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. उषा माने, किर्ती जोशी, विद्या जव्हेरी व सुनिता घोगरे यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात 40 प्रशिक्षणार्थींना जॅम, जेली, सॉस, लोणची, सोया दुध, दुध प्रक्रिया व निर्जलीकरण यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
------------- 

रोझ सोसायटी गुलाब प्रदर्शन

पुणे (प्रतिनिधी) ः दि रोझ सोसायटी ऑफ पुणे या संस्थेमार्फत येत्या तीन व चार जानेवारीला टिळक स्मारक मंदिर येथे हिवाळी गुलाब प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन तीन जानेवारीला दुपारी तीन वाजता एस्सार गृपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश कारले यांच्या हस्ते, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थित होणार आहे. शनिवारी दुपारी एक ते रात्री आठ व रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पारनेर (नगर) येथिल गुलाब उत्पादक शेतकरी राहुल शंकर पडवळ यांना "गुणवंत गुलाब शेतकरी' पुरस्कार तर गुलाब विषयक लेखनासाठी प्रा. अरुण वाराणशीवार यांना कै. लक्ष्मीबाई अनंत नाईक रौप्यपदक देवून गौरविण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये 75 विभाग आहेत. उत्कृष्ट पुष्परचना आणि गुलाबाची छायाचित्रे यांचाही यात समावेश आहे. प्रदर्शनाचे बक्षिस वितरण रविवारी (ता.4) संध्याकाळी किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे कार्यकारी संचालक आर. आर. देशपांडे यांच्या हस्ते होणार असल्याचे रोझ सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र भिडे यांनी सांगितले.
--------------- 

Monday, December 29, 2014

थंडीचा कडाका; गारपीटीचे सावट - 29 डिसेंबर

हवामान खात्याचा इशारा कायम

*किमान तापमानाचा पारा... (अंश सेल्सिअस)
महाराष्ट्रात ः नागपूर 5, नांदेड 6, नाशिक 6, अकोला 7, पुणे 7.8, औरंगाबाद 8
देशात ः श्रीनगर -4.1, अमृतसर 0, चंदीगड 1.2, दार्जिलींग 2.8, सिमला 3.1, अंबाला 3.7

पुणे (प्रतिनिधी) ः कोकण वगळता राज्याच्या उर्वरीत सर्व भागात थंडीचा कहर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भातील थंडीची लाट अधिक तिव्र झाली झाली आहे. सोमवारी पहाटे नागपूरात पारा पाच अंशांपर्यंत निचांकी घसरला. मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे. बुधवारपर्यंत (ता.31) या तीनही विभागांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच वेळी बुधवारपासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह काही ठिकाणी बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

हिमालयीन भाग, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या तिनही बाजूने हवामानाच्या विविध "सिस्स्टिम' सक्रीय आहेत. त्याचा मोठा परिणाम सध्या महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. पश्‍चिम हिमालयीन परिसरात मंगळवारी रात्रीपासून नवीन पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्‍यता आहे. उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी व दाट धुके आहे. या भागातून राज्यात थंडीचे वारे दाखल होत आहेत.

बंगालच्या उपसागरावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उपसागराच्या नैऋत्य भागात श्रीलंका-तामिळनाडूलगत सक्रीय आहे. मंगळवारी या कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी वाढून त्याचे रुपांतर कमी तिव्रतेच्या चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरात व बांग्लादेश जवळही चक्राकार वारे सक्रीय आहेत. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरु आहे. आंध्र प्रदेश व केरळमध्येही कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे.

सोमवारी सकाळपर्यंत विदर्भाच्या काही भागात थंडीची तीव्र लाट तर मराठवाड्याच्या काही भागात थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरीपेक्षा लक्षणीय घट तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. बुधवारी सायंकाळी पुणे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुणे परिसरात ढगाळ हवामान असून सापेक्ष आद्रतेचे प्रमाण राज्यात सर्वाधीक 97 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे.

सोमवारी (ता.29) सकाळपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 16 (-2), भिरा 15, डहाणू 16 (-1), गोवा 20 (-1), हर्णे 17 (-5), मुंबई 15 (-2), रत्नागिरी 17 (-2), जळगाव 7.2 (-4), जेऊर 10, कोल्हापूर 15 (0), महाबळेश्‍वर 12 (-1), मालेगाव 8 (-3), नाशिक 6.1 (-4), पुणे 7.8 (-3), नगर 9.8, सांगली 13 (-1), सातारा 9.9 (-3), सोलापूर 12.5 (-2), औरंगाबाद 8.1 (-3), नांदेड 6 (-5), बीड 8, उस्मानाबाद 9 (-3), परभणी 9 (-4), अकोला 7.1 (-6), अमरावती 10.2 (-5), ब्रम्हपुरी 9.2 (-3), बुलडाणा 9.4 (-5), चंद्रपूर 11, नागपूर 5 (-7), वर्धा 7 (-6), यवतमाळ 8 (-7), वाशिम 12.6

सोमवारी (ता.20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील सापेक्ष आद्रता व कंसात सरासरीच्या तुलनेत सापेक्ष आद्रतेतील वाढ किंवा घट टक्‍क्‍यांमध्ये ः अलिबाग 75 (0), भिरा 33 (-41), डहाणू 57 (-8), पणजी 72 (-1), हर्णे 51 (-5), मुंबई 44 (-22), रत्नागिरी 49 (-9), जळगाव 56 (-14), जेऊर 52 (-17), कोल्हापूर 58 (-14), महाबळेश्‍वर 60 (-3), मालेगाव 70 (3), नाशिक 60 (-9), पुणे 97 (-13), सांगली 71 (-2), सातारा 84 (10), सोलापूर 47 (-19), औरंगाबाद 47 (-15), नांदेड 58 (-9), परभणी 44 (-17), अकोला 60 (-2), अमरावती 89 (-37), ब्रम्हपुरी 55, बुलडाणा 58 (2), चंद्रपूर 65 (-8), नागपूर 57 (-12), वर्धा 51 (-7), यवतमाळ 30 (-24)

देशातील प्रमुख ठिकाणचे सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः श्रीनगर -4.1, अमृतसर 0, चंदीगड 1.2, दार्जिलींग 2.8, सिमला 3.1, अंबाला 3.7, कोहिमा 3.9, रांची 4, सतना 4.3, नवी दिल्ली 4.8, मंगलुरु 22.3, चेन्नई 22.5, थिरुअनंतपुरम 23.8, पोर्ट ब्लेअर 26.6
----------------- 

Friday, December 26, 2014

कृषी विभागाला केंद्राचा १ कोटीचा पुरस्कार, कडधान्य उत्पादकतावाढ

केंद्राचा राज्य कृषी विभागाला
एक कोटी रुपयांचा पुरस्कार

कडधान्य उत्पादकतावाढीचा गौरव

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आर्थिक वर्षात (2013-14) महाराष्ट्रात कडधान्य पिकांच्या उत्पादकतावाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्याच्या कृषी विभागाची केंद्र सरकारच्या "कमंडेशन ऍवार्ड' साठी निवड झाली आहे. एक कोटी रुपये व सन्मान असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र पाठवून याबाबतची घोषणा केली आहे.

अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य पिकांची उत्पादकता देशाच्या सरासरी कडधान्य उत्पादकतेपेक्षा कमी असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कडधान्य अभियान राबविण्यात येत आहे. कडधान्य पिकांचे उत्पादन, उत्पादकता वाढविण्यासाठी प्रात्यक्षिके, निविष्ठा, तंत्रज्ञान प्रसार यासाठी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात योजना राबवली जाते. चांगली उत्पादकतावाढ करणाऱ्या राज्यांच्या कृषी विभागांना केंद्रामार्फत पुरस्कार देवून गौरविण्यात येते. कडधान्य पिकांच्या गटात महाराष्ट्राला हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

गेल्या खरीपात राज्यात 19 लाख 78 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यापासून हेक्‍टरी 730 किलोच्या सरासरी उत्पादकतेने राज्यात 14 लाख 43 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. पाठोपाठ रब्बी हंगामात 19 लाख 42 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यात हेक्‍टरी 864 किलोच्या सरासरीने राज्यात 16 लाख 77 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. एकूण वर्षात 39 लाख 20 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी होवून 31 लाख 20 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. या कामगिरीसाठी कृषी विभागाला हा पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली.
--------------- 

द्राक्ष विमा भरपाई निश्चित

द्राक्ष उत्पादकांना मिळणार
अवेळी पावसाची भरपाई

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पावसाचा तडाखा; अनेक तालुके विमा भरपाईस पात्र

पुणे (प्रतिनिधी) ः चालू हंगामात द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत पिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी विमा भरपाई मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. योजनेतील निकषांनुसार नुकसानग्रस्त मंडळांतील पावसाच्या प्रमाणानुसार भरपाईची रक्‍कम निश्‍चित करण्यात येणार आहे. जास्त पाऊस झालेल्या भागात भरपाईची रक्कम हेक्‍टरी एक लाख 10 हजार रुपयांपर्यंत निश्‍चित होणार आहे.

राज्य शासनामार्फत 10 सप्टेंबर 2014 ला द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत फळपिक विमा योजना लागू करण्यात आली. यातून द्राक्ष बागेला हेक्‍टरी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हेक्‍टरी नऊ हजार रुपये विमा हप्ता भरुन त्यात सहभाग घेतला आहे. अवेळी पावसाच्या विमा संरक्षणासाठी 16 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2014 ते 31 जानेवारी 2015 असे तिन टप्पे निश्‍चित करण्यात आलेले आहेत. किमान चार मिलीमिटर पाऊस नुकसान भरपाईसाठी पात्र असून या तिन कालखंडात त्यासाठी वेगवेगळी भरपाई रक्कम निश्‍चित करण्यात आलेली आहे. सर्वाधिक 51 मिलीमिटरहून अधिकच्या पावसासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांसाठी या तिन टप्प्यात अनुक्रमे 15 हजार, 80 हजार व 30 हजार भरपाईची तरतूद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हीच भरपाई तिन कालखंडांसाठी अनुक्रमे 20 हजार, 90 हजार आणि 40 हजार अशी आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विविध कालखंडात वेगवेगळी भरपाई निश्‍चित आहे.

द्राक्ष विमा संरक्षण कालावधीचे पहिले दोन टप्पे आत्तापर्यंत पार पडले असून तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. या पहिल्या दोन टप्प्यांच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने यातील विमा उतरविलेल्या बागा भरपाईस पात्र ठरणार आहेत. संबंधीत शेतकऱ्यांना पावसाच्या प्रमाणानुसार हवामान धोक्‍यासाठी आवश्‍यक असलेली विमा रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी दिली.

विमा संरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये 14, 15, 16, 17, 18 व 19 तारखेला पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचा विचार करता नगरमध्ये 42.2 मिलीमिटर, पारनेर 25.1, श्रीगोंदा 18.8, कर्जत 65, जामखेड 10.8, शेवगाव 57.5, पाथर्डी 36.8, नेवासा 30.4, राहूरी 62, संगमनेर 17.1, अकोले 12.8, कोपरगाव 53, श्रीरामपूर 56.7 तर राहाता तालुक्‍यात 28.3 मिलीमिटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्‍यात 10.1, मुळशी 20.3, भोर 34.8, मावळ 16.9, वेल्हे 35.8, जुन्नर 14.4, खेड 13.6, आंबेगाव 11.8, शिरुर 16.8, बारामती 12.6, इंदापूर 15.9, दौंड 21.1 तर पुरंदरमध्ये 13.3 मिलीमिटर पाऊस झाला. याच कालावधीत सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर 27.1, दक्षिण सोलापूर 11.4, बार्शी 29.4, अक्कलकोट 18, मोहोळ 14, माढा 32.8, करमाळा 17.4, पंढरपुर 10.3, सांगोला 21.3, माळशिरस 22.3 तर मंगळवेढा तालुक्‍यात 10.9 मिलीमिटर पाऊस झाला.

विमा संरक्षणाच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात 12, 13 व 14 डिसेंबरला पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडला आहे. यामुळे द्राक्ष विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन्ही कालावधीसाठीच्या भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री. आवटे यांनी दिली.
---------(समाप्त)---------- 

"त्या' 18 डाळींब उत्पादकांना 6.25 लाख रुपये भरपाई

स्वयंचलित हवामान यंत्राचा घोळ; महसूल विभागाची नोंद अखेर ग्राह्य

पुणे (प्रतिनिधी) ः जोरदार पाऊस होऊनही "कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्य मापकात पावसाची नोंद नाही' या कारणाखाली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने इंदापूरातील 18 शेतकऱ्यांना डाळींब विमा भरपाई नाकारली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विभागिय अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता कंपनीने ही भरपाई मान्य केली आहे. भरपाईचे 6.25 लाख रुपये खातेदारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी नुकतिच स्टॅट बॅंक ऑफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. निमगाव केतकी येथिल शेतकरी आबासाहेब हेगडे व साहेबराव मोहिते यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून (2013-14) निमगाव केतकी महसूल मंडळातील 18 शेतकऱ्यांनी डाळींब पिकासाठी 25 हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. हेक्‍टरी एक लाख रुपये संरक्षणासाठी या शेतकऱ्यांनी हेक्‍टरी सहा हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या योजनेतील निकषानुसार एक फेब्रुवारी 2014 ते 31 मार्च 2014 या कालावधीत प्रतिदिन 11 ते 20.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 15 हजार रुपये, 21 ते 30.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 25 हजार रुपये आणि 31 मिलीमिटरहून जास्त पाऊस पडल्यास प्रति हेक्‍टर 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार होती.

निमगाव केतकी मंडळात 10 मार्च 2014 रोजी 28 मिलीमिटर पाऊस पडला. महसूल विभागाच्या पर्जन्यमापकात याची नोंद झाली. मात्र विमा कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकात याची नोंद झाली नाही. यामुळे कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई देण्यास नकार दिला. याबाबत शेतकऱ्यांनी 10 सप्टेंबर 2014 रोजी विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. निमगाव केतकी येथे सदर दिवशी 28 मिलीमिटर पाऊस पडल्याचे प्रमाणपत्र इंदापूरच्या तहसिलदारांनी दिल्यानंतर ही नोंद ग्राह्य धरुन कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई द्यावी, असा आदेश विभागिय अधिक्षक कृषी अधिक्षक विनयकुमार आवटे यांनी दिला.

कृषी विभागाच्या या आदेशानुसार विमा कंपनीने 18 शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर 25 हजार रुपये याप्रमाणे 25 हेक्‍टर क्षेत्रासाठी सहा लाख 25 हजार रुपये भरपाई मंजूर करुन बॅंकेकडे जमा केली आहे. अवेळी पाऊस, अति उष्णता, अतिथंडी आदी आपत्तींमुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्यांना संरक्षण देण्यासाठी हवामान आधारीत फळपिक विमा योजना चांगली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
-------------- 

Wednesday, December 24, 2014

कोकण कृषी विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा

दापोली, जि. रत्नागिरी (प्रतिनिधी) ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथिल कृषी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात येत्या 10 व 11 जानेवारीला माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयात 1965 ते 1995 या कालावधीत नोंदणी करुन पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे. उपस्थिती निश्‍चिती व अधिक माहितीसाठी संपर्क - 9422534721, 9011566767
------------ 

Saturday, December 20, 2014

विदर्भात थंडी कायम

उर्वरित महाराष्ट्रात पारा सरासरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रमाणात अल्पशी घट झाल्याने विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा सरासरीच्या जवळपास आला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील वाढलेली थंडी कमी होवून सर्वसाधारण पातळीवर आली आहे. विदर्भातील थंडीची लाट ओसरली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात यवतमाळ येथे राज्यात सर्वात कमी 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची मोठी वाढ झाली. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात झालेली लक्षणिय घट कायम आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झालेली आहे. याउलट कोकण व गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शनिवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.2 (1), अलिबाग 19.5 (1), रत्नागिरी 22.5 (3), पणजी 23.5 (3), डहाणू 17 (-1), भिरा 21.5 (4), पुणे 13.4 (2), नगर 9.8 (-1), जळगाव 10 (-2), कोल्हापूर 17.8 (3), महाबळेश्‍वर 13.6 (0), मालेगाव 10 (-1), नाशिक 10.4 (0), सांगली 16.5 (3), सातारा 14.5 (2), सोलापूर 13.8 (-1), उस्मानाबाद 10.3, औरंगाबाद 11 (0), परभणी 10.6 (-2), नांदेड 8 (-4), अकोला 9.4 (-5), अमरावती 12.4 (-3), बुलडाणा 10.6 (-3), ब्रम्हपुरी 10.4 (-2), चंद्रपूर 10, गोंदिया 8.2, नागपूर 8.5 (-3), वाशिम 12.8, वर्धा 9.5 (-5), यवतमाळ 7.8 (-7)
------------------ 

Friday, December 19, 2014

थंडीची लाट कायम , 19 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात उत्तरेकडून येणारे कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्याने राज्यातील थंडीची लाट व घटलेले किमान तापमानही कायम आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भ व मराठवाड्यात थंडीची लाट कायम होती. राज्यात दिवसभर नगर येथे सर्वात कमी 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हीच परिस्थिती येत्या रविवारपर्यंत (ता.22) कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हिमालयेतर भागांमध्ये मध्य प्रदेशमध्ये किमान तापमानात सर्वाधिक घट झालेली आहे. देशातील हिमालयेतर भागामध्ये खजुराहो येथे निचांकी 3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. याबाजूने विदर्भ, छत्तीसगडमध्ये थंड वारे दाखल होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात थंड वार्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे किमान तापमानात लक्षणिय घट झालेली आहे. उत्तरेकडून विदर्भ, मराठवाड्यापर्यंत कोरडे थंड वारे वाहत आहेत.

थंड वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीहून लक्षणीय घट झाली. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. यादरम्यान अरबी समुद्राचा नैऋत्य भागात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडे सरकला आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शुक्रवार (ता.19) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 18.6 (0), अलिबाग 17.1 (-1), रत्नागिरी 22.7 (3), डहाणू 16.4 (-2), भिरा 21.5, पुणे 9 (-2), नगर 6.5 (-4), जळगाव 8 (-4), कोल्हापूर 17 (2), महाबळेश्‍वर 12.4 (-2), मालेगाव 8.5 (-2), नाशिक 7.3 (-3), सांगली 15.7 (2), सातारा 11.4 (-2), सोलापूर 13.2 (-2), उस्मानाबाद 9.5, औरंगाबाद 8.8 (-2), परभणी 9.7 (-3), नांदेड 7.4 (-5), अकोला 7.7 (-5), अमरावती 11.2 (-4), बुलडाणा 9.5 (-6), ब्रम्हपुरी 10 (-2), चंद्रपूर 10.2, गोंदिया 6.6 (-6), नागपूर 6.6 (-5), वाशिम 13, वर्धा 8 (-5), यवतमाळ 8 (-7)
-------------- 

आंबा फळपिक विम्यासाठी उरले फक्त 10 दिवस

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील आंबा पिकाला हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2014 ही आहे. पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची तर इतर शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. यातून 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत विविध हवामान घटकांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हेक्‍टरी पाच हजार ते एक लाख रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष आहेत.

अवेळी पाऊस व तापमान या हवामान धोक्‍यापासून निश्‍चित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास ठरलेल्या प्रमाणात विमा कंपन्यांमार्फत भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे निकष व वेगवेगळे विमा हप्ते लागू करण्यात आले आहेत. आंबा पिकासाठी नगरमध्ये 75 हजार रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी शासकीय अनुदान वजा जाता शेतकऱ्यांना हेक्‍टरी चार हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी एक लाख रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी अनुक्रमे सहा हजार रुपये व पाच हजार 750 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना बॅंकेत भरावा लागणार आहे. नगरसाठी टाटा एआयजी, पुण्यासाठी इफ्कोटोकियो तर सोलापूरसाठी एडीएफसी आर्गो ही कंपनी विमा सेवा देणार आहे.

या योजनेमध्ये पिकाला धोकादायक हवामानघटक व नुकसानभरपाईची रक्कम ही निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नुकसानकारक हवामान घटकाचे प्रमाण भरपाईसाठी वेगवेगळे आहेत. अवेळी पावसाच्या लाभासाठीसंरक्षित कालावधीत किमान पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस होणे बंधनकारक आहे. नगरमध्ये किमान 2 दिवस, पुण्यात 3 दिवस तर सोलापूरात 4 दिवस दररोज पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस झाला तरच नुकसान भरपाईपात्र ठरणार आहे. कमी तापमानासाठी सलग तीन दिवस 9 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमान, जास्त तापमानासाठी (टप्पा अ) सलग तीन दिवस 39 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान तर जास्त तापमानासाठी (टप्पा ब) 43 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान सलग तीन दिवस असेल तर होणारे नुकसान भरपाईपात्र असेल. अधिकाधिक आंबा उत्पादकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

*चौकट
- अशी आहे विमा संरक्षण
हवामान धोका --- संरक्षण कालावधी --- भरपाईची जास्तीत जास्त रक्कम (रुपये)
अवेळी पाऊस --- 1 जानेवारी ते 31 मे --- 30 हजार
कमी तापमान --- 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी --- 30 हजार
जास्त तापमान --- 1 मार्च ते 31 मार्च --- 25 हजार
जास्त तापमान --- 1 एप्रिल ते 31 मे --- 15 हजार
------------------ 

Thursday, December 18, 2014

मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट

मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात थंडीची लाट दाखल झाली असून मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात लक्षणिय घट होवून थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी पहाटे यवतमाळ येथे राज्यातील निचांकी 6.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कोकणेतर महाराष्ट्रात वाढलेली ही थंडी व थंडीची लाट किमान येत्या शनिवारपर्यंत (ता.20) कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात परभणी, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी थंडीच्या लाटेची नोंद झाली. यवतमाळमध्ये किमान तापमानात सरासरीहून राज्यात सर्वाधिक तब्बल 9 अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीहून लक्षणिय घट झाली. कोकण गोव्याच्या काही भागात व मराठवाड्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात सरासरीहून किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात राज्यात कमाल तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान होते. अनेक ठिकाणी कमाल तापमानातील घट सरासरीहून पाच ते सात अंशांनी अधिक आहे. कमाल तापमानातील या घसरणीमुळे अनेक ठिकाणी दिवसाही थंडी अनुभवास येत आहे. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. अरबी समुद्राचा नैऋत्य भाग व आरपासच्या भागावरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.2 (-1), अलिबाग 16.5 (-1), रत्नागिरी 19.1 (-1), पणजी 21.8 (-1), डहाणू 16.4 (-2), भिरा 18.5 (-2), हर्णे 17 (-6) पुणे 9.1 (-4), नगर 8.1 (-3), जळगाव 8.4 (-4), कोल्हापूर 15 (0), महाबळेश्‍वर 10.6, मालेगाव 8.5, नाशिक 7, सांगली 13.6, सातारा 11.9, सोलापूर 11.9, उस्मानाबाद 8.4, औरंगाबाद 9.8, परभणी 8 (-5), नादेड 10, अकोला 7.5 (-6), अमरावती 11.2 (-4), बुलडाणा 9.2 (-5.5), ब्रम्हपुरी 9.9 (-2), चंद्रपूर 10.2 (-2.5), गोंदिया 6.8 (-5.5), वाशिम 12, वर्धा 8.8 (-5), यवतमाळ 6.2 (-9)
------------------------- 

उमेद बांधूया... डाॅ. सदानंद मोरे

कर्मयोगी व्हा, हे दिवसही जातील !
----------
डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन
-----------
तत्वज्ञान सांगणे हे विचारवंताचे काम मानले जाते. पण तत्वज्ञानाचे आचरण करणे अशा पंडितांना जमेलच असे नाही. भगवदगितेत कृष्णाने कर्मयोग तत्वज्ञान सांगितले आहे. महाभारतात अनेक ठिकाणी त्याचा विस्ताराने उल्लेख आला आहे. त्यात गुढवाद वा श्रद्धा नाही तर ते पुर्णपणे बुद्धीवादी तत्वज्ञान आहे. कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माचे फळ आपल्या हाती नाही. कर्माचे फळ होण्यासाठी आणखी घटक लागतात. त्यावर आपले नियंत्रण नसते.

महाभारतात कृष्णाने कर्मयोग स्पष्ट करताना शेतकऱ्याचेच उदाहरण दिले आहे. शेतकरी जमीनीची मशागत करतो. चांगले बियाणे, चांगले खत वापरतो. मेहनत करतो. आवश्‍यक ते सर्व काही बरोबर करतो. पण एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पिक येत नाही. मोठे नुकसान होते. पण अशा स्थितीतही शेतकरी हताश होत नाही. तो पुन्हा पेरणी करतो. शेतकरी हा स्वभावतःच कर्मयोगी आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. शेती हा व्यवसायच असा आहे की यश आपल्या हातात नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे.

शेतकरी हा जन्मतः स्वभावतः कर्मयोगी आहे. कर्म करत राहून फळाची अपेक्षा करू नये. एखाद्या कर्माचे फळ मिळण्यासाठी अनेक घटकांचा समावेश असतो. एखाद्या वेळी अपेक्षेप्रमाणे काही मिळणार नाही, हे देखील गृहीत धरले पाहिजे. सर्वच काही आपल्या हातात नसते. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांची मनोवृत्ती तयार केली पाहिजे. पुढाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही.

पावसाची अनिश्‍चितता ही अनादी काळापासून आहे. नापिकी किंवा दुष्काळ हा काही नवीन नाही, याची जाणीव ठेवावी. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्वेग करू नये. निराश न होता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. कधी अपुरा पाऊस पडतो, तर कधी पडतच नाही. जेथे पाऊस पडतो तेथे पाणी वाहून जाते. 15 व्या शतकामध्ये दुर्गा देवीचा भीषण दुष्काळ आला होता. संत तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता.

दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान
स्त्री एक अन्न अन्न करीता मेली
या शब्दात तुकोबांनी भोगलेल्या दुष्काळातील कर्मयोग दाखवला आहे. दुष्काळ कुणाला चुकला नाही. तुकोबांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. शेतकरी हा मुळतःच झुंजार असतो. निसर्गाशी लढण्याची ताकद अंगी असते. संकटाच्या काळात खचुन न जाता, वाईट विचार न करता श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे आचरण करत ठामपणे उभे ठाकले पाहिजे. या अचडणीच्या काळावरही मात करता येईल. हे दिवसही जातील.
-----------
शब्दांकन ः संतोष डुकरे
----------- 

Saturday, December 6, 2014

व्हर्जिन सिड्‌स कंपनीवर फौजदारी कारवाईचे आदेश

2012 चे बोगस बियाणे प्रकरण; भरपाई वसुलीसाठी कारवाई

पुणे (प्रतिनिधी) ः यवतमाळ जिल्ह्यातील 91 शेतकऱ्यांना दोषयुक्त बीटी कापूस बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 89 582 रुपयांची भरपाई न दिल्याबद्दल औरंगाबादमधील व्हर्जिन सिड्‌स प्रा. ली. या बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी यवतमाळच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले दिले आहे. गेल्या 20 दिवसापासून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत यवतमाळ कृषी विभागामार्फत चाचपणी सुरु आहे. मात्र अद्याप कंपनीवर गुन्हा दाखल झालेला नाही.

दोन वर्षांपूर्वी 2012 च्या खरीपात यवतमाळ जिल्ह्यातील 91 शेतकर्यांनी व्हर्जिन सिड्‌सच्या बीजी 2 कापूस वाणाबाबत कृषी विभागाकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. हा वाण बोंडअळी, पांढरी माशी आदी किडींना मोठ्या प्रमाणात बळी पडल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती. बीटीच्या नावाखाली नॉन बिटी बियाणे देवून कंपनीने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होता. यानुसार कृषी विभागामार्फत या प्रकरणी पंचनामे होवून प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. यात बियाणे दोषी असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांकडे झालेल्या सुनावणीत संचालकांनी कॉटन सिड ऍक्‍टमधील तरतुदीनुसार कंपनीला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दोन मार्च 2013 ला दिला. मात्र यानंतर अद्यापपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही.कॉटन सिड ऍक्‍टमधील तरतूद व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आता संचालकांनी या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

- शेतकऱ्यांची कागदपत्रे ठरली महत्वाची
या प्रकरणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीच्या पावत्या, पिक पेरणीची नोंद झालेला सात बारा, तक्रार अर्जाची पोच, उत्पादनासाठी प्रत्यक्षात झालेला खर्च, नुकसानीचे स्वरुप व तिव्रता याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती, चौकशी अहवाल, कृषी विज्ञान केंद्राचा अहवाल, पाठपुराव्याची पत्रे आदी कागदपत्रे सादर करण्यात आली होती. यामुळे जागरुक शेतकऱ्यांच्या तक्रारीस पुराव्यांचे पाठबळही मिळाले. याशिवाय चौकशीचे अहवाल, प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल वेळेत मिळण्यासाठी सुशिल ठोकळ व इतर शेतकऱ्यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

*चौकट
... तर कृषी विभागाने द्यावी भरपाई
""बियाणे दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी तालुका कृषी विभागापासून सर्वच पातळ्यांवर प्रचंड झगडावे लागले. दारव्हा, यवतमाळ, पुणे जाण्या-येण्यासाठी फार पैसा, वेळ खर्च झाला. आर्थिक मनस्ताप सोसावा लागला. शेतकऱ्यांना दोषी बियाणे मिळू नये, फसवणूक होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यामुळे आता कंपनीकडून भरपाई वसुल होत नसेल तर कृषी विभागाने आम्हाला भरपाई द्यावी.''
- सुशिल शिवशंकर ठोकळ, रा. चाणी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
----------------------------- 

Thursday, December 4, 2014

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यास केंद्र सरकार अनुकूल



पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर; काही अटींवर मिळणार मंजूरी

*कोट
""बैलगाडंयाच्या शर्यती हा पारंपरिक वारसा असलेला खेळ आहे. या खेळात प्राण्यांवर क्रौर्य होता कामा नये या अटीवर परवानगी देण्याचा विचार शासन करीत आहे.''
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली (प्रतिनिधी) ः सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी केंद्र शासनामार्फत काही अटींवर उठविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नागपंचमी या सणामध्ये नागांची होणारी छळवणूकी संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
गेल्या आठ महिन्यांपासून विविध संस्था, संघटना व राजकीय नेतृत्वामार्फत बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 11 जुलै 2011 रोजी बैलांच्या प्रदर्शन व प्रशिक्षणावर बंदी घालण्यात आली. यानंतर ऑगस्ट 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने बैलांच्या शर्यती, खेळ, प्रदर्शने व प्रशिक्षणावर बंदी घातली. यानंतर राज्य शासनाने परित्रक काढून ही बंदी वळू किंवा सांड यांच्यापुरतीच मर्यादीत असल्याचा खुलासा केला. याप्रकरणी बराच गदारोळ होवून प्राणीमित्रांमार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल झाला. उच्च न्यायालयाने मार्च 2012 मध्ये बैलांच्या शर्यती थांबविण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली. दरम्यान या निर्णयाच्या पुर्नविचाराची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड तालुका चालक-मालक संघ व प्रभाकर सपाते आदींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींची मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करुन 15 फेब्रुवारी 2013 ला विशिष्ट अटींवर शर्यतींना मान्यता देण्यात आली. यानंतर जानेवारी 2014 मध्ये या अटींचे उल्लंघन होत असल्याबाबत गार्गी गोगई यांची सर्वोच्च न्यायालयात बंदीसाठी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने 7 मे 2014 च्या निर्णयाने बैलांच्या शर्यती, झुंजी, खेळ यावर बंदी घातली. साहसी खेळांमध्ये बैलांच्या वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव फेटाळत तमिळनाडू सरकारची याबाबतची अधिसूचनाही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. गेल्या आठ महिन्यांपासून देशात ही बंदी लागू आहे.
-------------- 

हवामान कोरडे, तापमान स्थिर

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नाही.

गुरुवारी (ता.4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.6, अलिबाग 20.6, रत्नागिरी 19.4, पणजी 19.3, डहाणू 20.2, भिरा 17.5, पुणे 13.3, नगर 12.5, जळगाव 11.3, कोल्हापूर 19, महाबळेश्‍वर 15, मालेगाव 13.5, नाशिक 12.1, सांगली 16, सातारा 14.1, सोलापूर 14.8, उस्मानाबाद 13.4, औरंगाबाद 14.2, परभणी 14.1, नांदेड 11.5, अकोला 12.6, अमरावती 15.4, बुलडाणा 14.6, ब्रम्हपुरी 13.9, चंद्रपूर 14, गोंदिया 10.4, नागपूर 11.6, वाशिम 16.8, वर्धा 13.2, यवतमाळ 11.6
------- 

डाॅ. गलांडे, डाॅ. खरबडे पुरस्कार

डॉ. गलांडे, डॉ. खरवडे यांना
जागतिक विविधता कॉग्रेसमध्ये पुरस्कार

पुणे ः येथिल कृषी महाविद्यालयातील डॉ. शरद गलांडे व डॉ. साताप्पा खरबडे यांना श्रीलंकेतील कोलोंबो येथे झालेल्या जागतिक विविधता कॉग्रेसमध्ये नुकतेच उत्कृष्ट पेपर वाचन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी लोकरी मावा नियंत्रणासाठी मित्र क्‍किटकाचे तंत्र व संवर्धन या विषयावर संशोधन पेपर सादर केला.

डॉ. खरवडे यांनी या कॉग्रेसमध्ये मित्र किटकांच्या शाश्‍वत संवर्धनासाठी स्थानिक कौशल्याचा वापर या चर्चासत्राचे अध्यक्षपद भुषविले. तर डॉ. गलांडे यांनी जागतिक विविधता व व्यापार या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भुषविले. कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु, प्राध्यपक आदींमार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.
--------
फोटोओळ ः
कोलोंबो, श्रीलंका ः जागतिक जैवविविधता कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अनिता एम. यांच्या हस्ते डॉ. गलांडे व डॉ. खरबडे यांनी उत्कृष्ट पेपर वाचनाचा पुरस्कार स्विकारला.

कृषी प्रथम सत्र परिक्षा पुढे ढकलल्या...

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या
प्रथम सत्र परिक्षा पुढे ढकलल्या

पुणे (प्रतिनिधी)ः महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील संगल्न व खासगी कृषी महाविद्यालयांच्या विविध विद्याशाखांच्या प्रथम सत्राच्या परिक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. यानुसार 15 व 16 डिसेंबरला होणारी लेखी परिक्षा अनुक्रमे 18 व 19 डिसेंबरला तर 18 ते 30 डिसेंबरला होणारी प्रात्यक्षिक परिक्षा 20 ते 31 डिसेंबर 2014 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योग, व्यवसायातील जागतिक संधी या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे प्रथम सत्र परिक्षांच्या वेळापत्रकात हे बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.
----------- 

Wednesday, December 3, 2014

तुरळक ठिकाणी तापमानात घट

राज्यभर कोरडे हवामान
पुणे (प्रतिनिधी) ः हवामान खात्याने शुक्रवारी (ता.5) सकाळपर्यंत किमान तापमानात फारसा बदल न होण्याचा व सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण व गोव्याच्याकाही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरसरीहून किंचित घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे 11 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

बुधवारी (ता.3) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 20, अलिबाग 20.5, रत्नागिरी 19.1, पणजी 20.6, डहाणू 20.2, पुणे 12.9, नगर 12.5, जळगाव 12.6, कोल्हापूर 17.6, महाबळेश्‍वर 15, मालेगाव 15.2, नाशिक 12.8, सांगली 15.5, सातारा 12.8, सोलापूर 14.5, उस्मानाबाद 13.8, औरंगाबाद 15.4, परभणी 14.7, नांदेड 11, बीड 14.2, अकोला 15, अमरावती 15.2, बुलडाणा 16.4, ब्रम्हपुरी 13.8, नागपूर 11.6, वाशिम 17.2, वर्धा 14, यवतमाळ 13.6
-------------- 

राज्यातील 35 लाख कोरडवाहू शेतकरी संकटात

निम्मा रब्बी नापेर; धान्य चारा टंचाईचा धोका

पुणे (प्रतिनिधी) ः दुष्काळग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा व जनावरांची चारासुरक्षा या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला यंदाचा रब्बी हंगाम तब्बल निम्म्याने नापेर राहील्याने सुमारे 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याची स्थिती आहे. सर्व रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी आठ-पंधरा दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यात आता गेल्या पंधरा दिवसात राज्यात कोठेही पाऊस झालेला नसल्याने ओलही उपलब्ध नाही. यामुळे तुरळक ठिकाणचे बागाईत वगळता तब्बल 30 ते 35 लाख हेक्‍टर रब्बी क्षेत्र नापेर व उत्पादनाच्या दृष्टीने खाटे राहणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अन्नधान्य उत्पादन व जनावरांसाठी चारा या दोन्ही दृष्टीने रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांना पुरेसा चारा साठवता आलेला नाही. त्यात आता रब्बीही नापेर व अनुत्पादक चालल्याने शेतकर्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. रब्बी पूर्णतः हातचा जाणार हे लक्षात आल्यानंतर आता संपूर्ण रब्बी पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे विशेष.

कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या वेळेपर्यंत राज्यात 42 लाख हेक्‍टरहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. यंदा फक्त 28 लाख 71 हजार हेक्‍टरवर पेरण्या झालेल्या आहेत. यातही तृणधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र निम्म्याने तर तेलबिया पिकांचे क्षेत्र सद्यस्थितीत तब्बल 86 टक्‍क्‍यांनी घटलेले आहे. तृणधान्याचे 20 लाख 32 हजार हेक्‍टर, कडधान्याची सात लाख 76 हजार हेक्‍टर तर तेलबिया पिकांची फक्त 62 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली आहे. सुर्यफुल पिकाची अवघे सहा टक्के, करडईची 15 टक्के तर गव्हाची 25 टक्के पेरणी झाली आहे. उगवण झालेली पिकेही पाण्याच्या ताणामुळे संकटात आहेत.

रब्बीला सर्वाधिक फटका पुणे विभागात बसलेला आहे. सरासरी 22 लाख हेक्‍टरपैकी एवघ्या 10 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या असून तब्बल 12 लाख हेक्‍टर क्षेत्र या विभागात नापेर आहे. पुणे जिल्ह्यात फक्त 25 टक्के रब्बी पेरण्या होऊ शकल्या आहेत. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, वर्धा या जिल्ह्यांत रब्बीला मोठा फटका आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्येही जेमतेम क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या आहेत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख 35 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर कोकणात अद्याप रब्बी पेरण्या होवू शकलेल्या नाहीत. कोकण वगळता उर्वरीत भागात रब्बी पेरण्या अद्यापही सुरु असल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी हेक्‍टरमध्ये व कंसात पेरणीची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी ः नाशिक 33300 (25), धुळे 20800 (34), नंदुरबार 29300 (42), जळगाव 66500 (44), नगर 435300 (55), पुणे 147300 (25), सोलापूर 475300 (57), सातारा 158800 (73), सांगली 210100 (84), कोल्हापूर 10100 (25), औरंगाबाद 79100 (30), जालना 114500 (53), बीड 215500 (57), लातूर 117600 (63), उस्मानाबाद 175600 (39), नांदेड 52300 (41), परभणी 67700 (21), हिंगोली 12900 (10), बुलडाणा 93800 (62), अकोला 43000 (37), वाशिम 47700 (53), अमरावती 64400 (44), यवतमाळ 42000 (48), वर्धा 9300 (17), नागपूर 52900 (37), भंडारा 19400 (48), गोंदिया 19700 (74), चंद्रपूर 38600 (32), गडचिरोली 18900 (73)

- पिकनिहाय रब्बी पेरणी (1 डिसेंबरपर्यंत)
पिक --- पेरणी (हेक्‍टर) --- सरासरीच्या तुलनेत टक्केवारी
ज्वारी --- 16,08,800 --- 52
गहू --- 2,96,700 --- 25
हरभरा --- 7,22,900 --- 55
मका --- 1,22,200 --- 123
करडई --- 31,700 --- 15
जवस --- 13,800 --- 28
सुर्यफुल --- 10,700 --- 6
तीळ --- 600 --- 17
------------------------ 

Friday, November 28, 2014

"इग्नू'च्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

"इग्नू'च्या पाणलोट, जलसंधारण
अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

पुणे ः इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत (इग्नू) 2015 या वर्षात राबविण्यात येणाऱ्या "पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन' पदविका व "जलसंधारण व्यवस्थापन' प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रीया नुकतिच सुरु झाली आहे. विद्यापीठाचे पुणे क्षेत्रिय कार्यालय व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशनच्या वारजे येथील केंद्रावर प्रवेशाचे माहितीपत्रक उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रकासाठी 200 रुपये शुल्क आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख एक डिसेंबर 2014 आहे. यानंतर 300 रुपये विलंब शुल्कासह 15 डिसेंबर 2014 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रीयेविषयी www.ignou.ac.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. बाएफ केंद्र संपर्क क्रमांक - 020 25231661
-------------- 

Wednesday, November 26, 2014

राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट

29 नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्रित प्रभावामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. या दोन्ही विभागांमध्ये 29 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण अरबी समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याशी संलग्न असलेले चक्राकार वारे लक्षद्वीप परिसरात सक्रीय आहेत. याच वेळी उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. पाठोपाठ 29 पासून महाराष्ट्रातही पावसाला सुरवात होण्याची दाट शक्‍यता आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात थंडी वाढली आहे. या ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचीत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. कोठेही पावसाची नोंद झाली नाही. दिवसभरात गोंदिया येथे राज्यात सर्वात कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे बुधवारी (ता.26) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 21, अलिबाग 20.2, रत्नागिरी 19.3, पणजी 19.3, डहाणू 21.1, भिरा 16.5, पुणे 12.4, नगर 11.4, जळगाव 12.2, कोल्हापूर 16.9, महाबळेश्‍वर 13.8, मालेगाव 15.5, नाशिक 12.5, सांगली 17.7, सातारा 12.5, सोलापूर 14.9, उस्मानाबाद 11.3, औरंगाबाद 14.4, परभणी 13.2, नांदेड 12, बीड 13.4, अकोला 14.2, अमरावती 15.6, बुलडाणा 15.5, ब्रम्हपुरी 12.9, चंद्रपूर 14.6, गोंदिया 11.2, नागपूर 12.1, वाशिम 15.4, वर्धा 13.2, यवतमाळ 13.2
------------ 

Monday, November 24, 2014

उत्तम कुंजीर निधन वृत्त

अधिक्षक कृषी अधिकारी
उत्तम कुंजीर यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी खात्यातील अत्यंत कार्यक्षम, मनमिळावू, पारदर्शक व प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकीक असलेले कृषी आयुक्तालयाचे माजी मुख्य सांख्यिक व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प अधिकारी उत्तम धोंडीबा कुंजीर (वय 55) यांचे रविवारी (ता.23) पहाटे ह्दयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

कुंजीर यांच्या मुळ गावी वाघापूर (पुरंदर, पुणे) येथे रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याच्या कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंजीर यांना दोन वर्षापुर्वी ह्दयविकाराला झटका आल्यानंतर त्याची अँजीओप्लास्टी शस्त्रक्रीया झाली. मात्र यानंतर जंतूसंसर्ग झाल्याने ते दिर्घकाळ आजारी होते.

राज्याच्या वित्त विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून काही काळ सेवा केल्यानंतर ते कृषी विभागात वर्ग एक चे अधिकारी म्हणून भरती झाले. नगर येथे कडा विभागात त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर कृषी आयुक्तालयाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागात कृषी उपसंचालक, नाशिकच्या विभागिय कृषी सहसंचालक अधिकारी कार्यालयात अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून काम केले. यानंतर सलग आठ वर्षे राज्याच्या कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक म्हणून केलेली कामगिरी विशेष गाजली.

राज्यासाठीच्या विविध कृषी विमा योजनांची आखणी व अंमलबजावणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. खरीप व रब्बी पिक विमा, हवामानाधारीत विमा योजना, फळपिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात सांख्यिकी विभागामार्फत अनेक महत्वाचे अहवाल प्रसिद्‌ध झाले. सध्या प्रगतीपथावर असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे उभारण्याच्या प्रकल्पाचे पायाभूत कामही त्यांनी केले होते. यासाठी तामिळनाडू कृषी विद्यापीठात त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. दोन वर्षापुर्वी युरोपमध्ये गेलेल्या शेतकरी दौऱ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. स्वतःच्या वाघापूर या कोरडवाहू गावातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. गावातील सिताफळ लागवड, शेतकरी गट स्थापना व सिताफळ निर्यातीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
---------------- 

कृषी उद्योजकता राष्ट्रीय परिसंवाद - १५,१६ डिसेंबर पुणे


कृषी विद्यापीठांमार्फत पुण्यात
कृषी उद्योजकता राष्ट्रीय परिसंवाद

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठे व जर्नल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च ऍण्ड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 व 16 डिसेंबरला बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात "कृषी उद्योजकता, व्यापारातील वैश्‍विक संधी' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व कृषी उद्योजकता या दोन गटात हा परिसंवाद होणार आहे. या निमित्ताने नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व परिचय पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

शेती व्यवसाय व कृषी उद्योगाच्या अनुषंगाने झालेल्या कामाचा मागोवा व कृषी उद्योग व्यवसायांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा उद्योग, कृषी पणन, मुल्यवर्धन तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकता यावर या परिसंवादात भर राहणार आहे. परिसंवाद सशुल्क असून त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन हजार व इतरांना पाच हजार रुपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः डॉ. एस. डी. गोरंटीवार 02426 243268
------------------ 

अन्नप्रक्रीया प्रशिक्षण - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

स्त्री शिक्षण संस्थेमार्फत महिलांसाठी
अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम
------------
पुणे ः येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री. मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर वुमेन मार्फत महिला सबलीकरणासाठी मुली व महिलांसाठी कौशल्य शिक्षणावर आधारित विविध अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत येत्या 26 नोव्हेंबरला पाव, बिस्किटे, केक, ब्रेड, पॅटिस इ. पदार्थ तयार करण्याचे "बेकिंग प्रशिक्षण' तर 28 नोव्हेंबरला "आवळा प्रक्रिया प्रशिक्षण' कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणातील सहभाग निश्‍चिती व अधिक माहितीसाठी संपर्क ः सौ. दळवी -020 25471099, 9373788933.
------- 

यशोगाथांसाठी विद्यापीठांचे रेटकार्ड... १० हजार रुपये रेट

यशोगाथा प्रसिद्ध करायचीये ?
दहा हजार रुपये द्या !!!

नाव छापण्यासाठी दोन हजार रुपये; कृषी विद्यापीठांचे अधिकृत रेटकार्ड

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील कृषी पदवीधारकांच्या यशोगाथा पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध करण्याचा स्त्युत्य निर्णय राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी घेतला आहे. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येकी तब्बल 10 हजार रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. दहा हजार रुपये भरा यशोगाथा छापा, दोन हजार रुपये भरा "परिचय दर्शिके'त (डिरेक्‍टरी) छापा असा बिझनेस मंत्र विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली आहे.

परिसंवादाच्या आयोजनासाठी सहप्रायोजकत्व (सहा लाख रुपये) व प्रायोजकत्व (तीन, दोन व एक लाख रुपये) या माध्यमातूनही निधी गोळा करण्यात येत आहे. याशिवाय परिसंवादात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 15 ते 60 हजार रुपये, संकेतस्थळावर लिंक प्रसिद्ध करण्यासाठी 25 हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. याउपर परिसंवादात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये तर इतरांना पाच हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. एक डिसेंबरपासून या शुल्कात आणखी वाढ करुन ते विद्यार्थ्यांना दोन हजार 500 व इतरांना सहा हजार रुपये करण्यात येणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डिसेंबरमध्ये कृषी उद्योजकता या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. परिसंवाद कालावधीच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुढे माजी विद्यार्थ्यांचे आदर्श उभे करावेत, त्यांना प्रेरणा द्यावी या उदात्त हेतुने यशोगाथांचे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्याचे इतर निकष पाठीमागे ठेवून एका यशोगाथेला 10 हजार रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. या शुल्कात एक हजार शब्दाचा मजकूर व दोन ते तीन छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठांनी म्हटले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांची परिचय दर्शिकाही प्रसिद्ध करण्याचे विद्यापीठांचे नियोजन असून त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. या दोन हजार रुपयात इच्छूकांचा संक्षिप्त परिचय छापण्यात येणार आहे. आकारण्यात येणारे शुल्क हा संबंधीत पुस्तकाच्या छपाईचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय परिसंवादाच्या निमित्ताने परिसंवाद स्थळी तंत्रज्ञान व नवनिर्मिती प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, व्यवसायिक, कंपन्या या प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान मांडू शकतात. यासाठी तीन मिटर लांबी व रुंदी असलेल्या दालनाला 15 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक दालनात एक टेबल व दोन खुर्च्या पुरविण्यात येतील. एकाहून अधिक दालने हवी असल्यास अधिकच्या दालनासाठी 25 हजार रुपये रेट आहे. यात शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी कोणतीही वेगळी सवलत नाही.
------------------- 

Tuesday, November 11, 2014

प्रदर्शनात शास्त्रज्ञ थेट भेट

प्रदर्शनात शास्त्रज्ञांना थेट भेटा
शंकाचे निरसन करून घ्या!

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना माहिती, तंत्रज्ञानाची सखोल माहिती व त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ ऍग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या संपूर्ण पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी सात या कालावधीत उपस्थित राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट विद्यापीठांशी, संशोधन संस्थांशी जोडणी करून आपल्या समस्यांवर उपाय मिळवणे व यापुढील काळातही त्यांचा थेटपणे वापर करून घेणे शक्‍य होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या संस्थांमार्फत करण्यात आले आहे.
सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मुंबई) प्रमुख पी. एम. बडगुजर, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (राहुरी) कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. टी. बी. बस्तेवाड, राष्ट्रीय कांदा व लसुण संशोधन संचलनालयाचे (राजगुरुनगर) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेंद्र घाडगे व बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष गोडसे हे प्रदर्शनाचे सर्व पाचही दिवस संबंधित संस्थांच्या दालनांमध्ये शेतकऱ्यांना थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (परभणी) दालनात 12 व 13 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. के. गोरे तर 14 व 15 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. व्ही. गुट्टे हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने ते मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत (शिरवळ, सातारा) कृषी प्रदर्शनामध्ये खास शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची फौजच तैनात करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे सर्व दिवस डॉ. स्मिता सुरकर (पशुपालन, महिलांसाठी पशुपालनातील रोजगार संधी) उपस्थित राहतील. त्याव्यतिरिक्त पहिले दोन दिवस डॉ. एम. बी. आमले (पशुप्रजनन व्यवस्थापन), डॉ. एस. एम. भोकरे (डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन) व डॉ. डी. टी. सकुंडे (दुग्धपदार्थ प्रक्रिया) उपस्थित असतील.
पाठोपाठ 14 नोव्हेंबरला डॉ. ए. व्ही. खानविलकर (जनावरांची निवड, डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन), डॉ. व्ही. डी. लोणकर (कुक्कुटपालन), डॉ. एस. टी. बोरीकर (पशु रोग व्यवस्थापन) थेट भेटीसाठी उपस्थित राहतील. प्रदर्शनाच्या अखेरचे दोन दिवस म्हणजेच 15 व 16 नोव्हेंबरला डॉ. तेजस शेंडे (शेळीपालन), डॉ. एस. बी. स्वामी (पशु रोग व्यवस्थापन), डॉ. आर. पी. कोल्हे (पशुसामूहिक स्वास्थ्य व्यवस्थापन) आणि डॉ. एस. बी. कविटकर (पशुआहार व्यवस्थापन) हे शेतकऱ्यांच्या थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.
------------- 

अत्याधुनिक तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या गोठ्यात

-----------
संजीव लाटकर, संचालक, डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि.
-----------
डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स कंपनीची सुरवात 1991 मध्ये झाली. स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या अडचणी आव्हान म्हणून स्वीकारून संशोधनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारी दर्जेदार उत्पादने बाजारात आणली. आज संपूर्ण दूध साखळी संपूर्णपणे स्वयंचलित (ऑटोमेशन) करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायासंबंधित सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यापासून मोठ्या प्रकल्पापर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. आम्हाला अडचण, समस्या सांगा आणि ती सोडविणारे तंत्रज्ञान विकसित करून देतो, असे आमचे स्वरूप आहे. सुरवातीला ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या होती. त्यावर डीएसकेने पेट्रोल व केरोसीन इंधन आवश्‍यक नसलेला इन्व्हर्टर तयार केला. वारणा समूह उद्योगापासून त्याची सुरवात झाली. त्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आम्हाला दूध या विषयातले काहीच माहीत नव्हते. दुग्ध उत्पादकांनी त्यांना हवे ते, हव्या त्या प्रकारचे व माफक किमतीतील तंत्रज्ञान आमच्याकडून विकसित करून घेतले. जशा येतील तशा शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही दूर करीत गेलो.

कस्टमाइज सोल्युशन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, दूध संकलन व्यवस्थेचे सर्व ऑटोमेशन हा सर्व प्रवास वेगाने झाला. आज वेगवेगळ्या प्रकारची 23 उत्पादने डीएसकेमार्फत उपलब्ध आहेत. दूध व्यवसायातील पशुखाद्यापासून ते बिलिंग, प्रोसेसिंगपर्यंतची सर्व कामे सोपी झाली आहेत. दूध सचिव यंत्रणा राज्य शासनाच्या अनुदानामुळे राज्यातील सर्व संघांमध्ये पोचली. सन 1997-98 मध्ये संगणक आल्यानंतर त्यावर आधारित विविध उपकरणे, "टेस्टिंग'ची साधने विकसित केली. दूध जास्त असेल तर जास्त पैसे मिळतात, हा समज खोटा ठरविण्यात आम्ही यशस्वी झालो. यामुळे दुधाची गुणवत्ता वाढीस लागली. संघांचा, संस्थांचा दुधातील पाणी बाजूला काढण्यासाठीचा अवांतर खर्चही कमी झाला. कंपनीच्या या गुणवत्ता पद्धतीला (क्वालिटी सिस्टीम) "एनडीडीबी' संस्थेनेही वाखाणले.

यानंतर 2003 पर्यंत दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, टेस्टिंग युनिटची संकल्पना लोकप्रिय झाली. सन 2007 पर्यंत फक्त पाच ते सहा टक्के स्वयंचलित यंत्रणा होती. तंत्रज्ञानात अनेक अडचणी होत्या. देश त्यासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून होता. कंपनीने यातील सर्व त्रुटी दूर करून गोठ्यापासून डेअरीचा मुख्य प्लॅंट, शेतकरी, संकलन केंद्र, बल्क मिल्क कुलर, चिलिंग सेंटर, डेअरी प्लॅंट व बिलिंगची प्रोसेस ही दुधाची पूर्ण साखळी ऑटोमाइज केली आहे. शेतकरी दूध घालून डेअरीच्या बाहेर पडेपर्यंत त्याच्या बॅंक खात्यात दुधाचे पैसे जमा झालेले असतात. सुमारे 250 प्रकारचे रिपोर्ट तयार करणारे मराठी व इंग्रजी, या दोन्ही भाषांतले डेअरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, गोठ्यातच हिरवा सेंद्रिय चारा तयार करणारे मशिन, सौर ऊर्जेवर व सायकलवर चालणारी उपकरणे, मिल्किंग मशिन, लहान शेतकरी व लहान गोठे केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध केलेली किफायतशीर व कमी खर्चाची यंत्रे अशा विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केलेले आहे.

ग्रामीण भागात परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भारताचा पहिला सोलर कॉम्प्युटिंग डिव्हाइस मोबिलिझ कंपनीने तयार केला. सोलर बेस ऑटोमॅटिक मिल्क कलेक्‍शन युनिट हे एकच यंत्र दूध संकलन आणि बॅंकेचे सर्व व्यवहार करण्याचे काम करते. दुधाचे खाते बॅंकेशी निगडित करून दिले आहे. डेअरी टु बॅंक या संकल्पनेनुसार या यंत्राद्वारा दूध संकलन, बॅंक, शिक्षण, बचत गटाची कामे अशी अनेक प्रकारची कामे करता येतात. ग्रामीण भागात हे यंत्र क्रांतिकारक ठरत आहे. गोठ्यातील सर्व कामे करणारा व सौर ऊर्जेवर चालणारा रामू यंत्रमानव, दारात जाऊन दूध गोळा करण्याची सायकलवरील ऑटोमेशनची सुविधा, बल्क कुलर मॉनिटरिंग सिस्टीम असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केले आहे. हे सर्व पाहण्याची संधी शेतकऱ्यांना ऍग्रोवन कृषी प्रदर्शनात मिळेल.
----------

उत्पादनाचे मूल्यवर्धन हा आमचा "फोकस' - बावसकर


शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मॉन्सून उशिरा किंवा लवकर येणार असेल तर त्या दृष्टीने पिकांचे नियोजन करता येणे महत्त्वाचे असते. यात सरकार, स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना थेट शेतावर संभाव्य आपत्तीच्या दोन महिने आधी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. चालू वर्षी पाऊस उशिरा झाला. शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. दोन-तीन वेळा पेरणी करूनही बियाणे वाया जाते. गेली पन्नास वर्षे हेच सुरू आहे. शास्त्र खूप पुढे गेले आहे. सरकारने संभाव्य धोक्‍यांची पूर्वसूचना शेतकऱ्यांना पावलोपावली मोफत दिली पाहिजे. समाजाला चालना देण्यासाठी संकटे उपयुक्त असतात. संकटे ही सुसंधी असते. ती मेंदूला चालना देतात. शिथिलतेचे ऊर्जेत रूपांतर करतात. फुले, आंबेडकर यांच्यासारख्या शून्यातून घडलेल्या व्यक्तींनी संकटांचे रूपांतर संधीत केलं. मानवजातीचा विकास केला. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

पाणी वाचवणे हे फार महत्त्वाचे आहे. ते अतिशय योग्य रितीने वापरले तर उत्पादन व दर्जा सुधारेल, खर्च कमी होईल. शेतकरी बॅंकेच्या दावणीला बांधला जाणार नाही. आज खेडी ओस पडताहेत व शहरे अजगरासारखी सुजताहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तालुका पातळीवर प्रक्रिया उद्योगाची ट्रेनिंग सेंटर काढायला हवीत. चीनमध्ये फॅक्‍टरीज भाड्याने दिल्या जातात. शासनाने दुजाभाव न करता प्रक्रिया उद्योगासाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण व लहान फॅक्‍टरी भाड्याने द्यावी. देशासाठी झोकून घेतले पाहिजे. चीनमध्ये पाण्याला पैसा मानतात. आपल्याकडे पैसा पाण्यासारखा वापरतात व पाण्याची नासाडीच नाही तर हत्या करतात.

बावसकर टेक्‍नॉलॉजीमार्फत आम्ही संकटाच्या काळातही शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन घेता येईल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. निविष्ठा, सुविधा, हवामान यांच्या कमतरतांवर मात करून चांगले उत्पादन मिळवण्यास मदत होते. शेतकऱ्याला स्वतःचे बियाणे अधिक उत्पादनासाठी वापरता येते. आमचे तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीच्या पलीकडचे आहे. आमची जैविक, सेंद्रिय उत्पादने पिकातले विष काढून टाकण्याचे काम करतात. बिगर हंगामातही चांगले पीक उत्पादन मिळवून देतात. रोग-किडींच्या नियंत्रणासाठी जैविक, आयुर्वेदिक उत्पादने वापरून 40 ते 50 टक्के उत्पादन जास्त मिळते. मूल्यवर्धन हा आमच्या कामाचा मुख्य "फोकस' आहे. मूल्यवर्धित उत्पादन कसे घ्यायचं हे गेली 25 वर्षे आम्ही शेतकऱ्यांना शिकवतो. देशातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होत आहे. ज्यांना काहीच आधार नाही अशा हजारो कुटुंबांना आम्ही या तंत्रज्ञानाने उभे केले आहे. आम्हाला मानवतेचा प्रसार करायचा आहे.
------------

डॉ. व्ही. एस. बावसकर, संचालक, बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. 

ऍग्रोवन कृषी ज्ञान मेळाव्यास आज प्रारंभ

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी ज्ञान तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करून शेतीची आव्हाणे पेलण्याचे बळ देणाऱ्या ऍग्रोवनच्या बहुउपयोगी भव्य कृषी प्रदर्शनास आज (ता.12) पुणे कृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर प्रारंभ होत आहे. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी असतील. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक शिरीष कुलकर्णी व डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. चे प्रमुख डॉ. वि. सु. बावसकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रदर्शन मंडप राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सर्व सहभागी कंपन्या, संस्था आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, उत्पादनांसह प्रदर्शनस्थळी एक दिवस आधीच हजर झाल्या आहेत. सकाळी 11 वाजता प्रदर्शनाला प्रारंभ होईल. येत्या रविवारपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन सुरू राहील. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी प्रदर्शन मंडपाच्या पुढे व मागे वाहनतळ उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी या ठिकाणी विशेष मदतनिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना देश-विदेशातील अत्याधुनिक कृषी यंत्र, अवजारे, निविष्ठा, ज्ञान व तंत्रज्ञान पाहण्याची, अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची संधी या प्रदर्शनात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकरी संशोधकांपासून ते जागतिक पातळीवरील कंपन्यांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून कृषी विद्यापीठे व राष्ट्रीय संशोधन संस्थांपर्यंत कृषीविषयक सर्व बाजूंशी संबंधित कंपन्या, संस्थांचा यात समावेश आहे. फक्त शेतकरीच नाही तर कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे प्रदर्शन उपयुक्त ठरू शकते. फोर्स मोटर्स लि. व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि. व डॉ. बावसरकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

ऍग्रो संवाद या उपक्रमाचा प्रारंभ दुपारी दोन वाजता ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी. डी. जडे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ऊस लागवडीतील प्रगत तंत्र या विषयावर ते मार्गदर्शन करतील. गुरुवारी (ता.13) उद्धव खेडेकर (शेडनेटमधील भाजीपाला), शुक्रवारी (ता.14) संजय मोरे पाटील (केसर आंबा व्यवस्थापन), खेमराज कोर (दर्जेदार डाळिंब उत्पादन) व सौ. सुनीता घोगरे (प्रक्रिया उद्योगातील संधी), शनिवारी (ता.15) श्रीरंग सुपनेकर (शाश्‍वत शेती उत्पादन ते थेट विक्री) व कांतिलाल रणदिवे (सेंद्रिय शेती उत्पादन ते विक्री) आणि रविवारी (ता.16) अनिल जाधव (दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे) यांची व्याखाने होणार आहेत.
------------------ 

राज्यात पावसाळी हवा

कमी दाबाचा परिणाम; उस्मानाबादेत अतिवृष्टी

पुणे (प्रतिनिधी) ः बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्रात कर्नाटक व कोकण किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा या दोन्हींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामानात वाढ झाली असून ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात उस्मानाबाद शहरात तब्बल 155 मिलीमिटर पावसासह अतिवृष्टी झाली. कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी वाढत असल्याने शुक्रवारपर्यंत (ता.14) पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरुपात हलक्‍या ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सोलापूरमध्ये सर्वाधिक 20 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर व सांगलित बहुतेक ठिकाणी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तासगाव परिसरात अर्धा तास दमदार पाऊस झाला. परभणीत दोन तर तुळजापूर, कळंब व जेऊरमध्ये एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

दरम्यान, ढगाळ हवामान व पाऊस यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कोकणात तीन अंशांनी, मध्य महाराष्ट्रात पाच अंशांपर्यंत तर मराठवाड्यात तब्बल आठ अंशांपर्यंत उंचावले आहे. कमाल तापमानही ठिकठिकाणी सरासरीहून एक ते तीन अंश सेल्सिअसने उंचावले आहे. कमाल व किमान तापमानाच्या या वाढीत पुढील दोन दिवसात घट होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्यातील सुत्रांनी सांगितले.

*चौकट
- ढगाळ, पावसाळी आठवडा
हवामान खात्याने गेल्या आठवड्यातच 10 तारखेनंतर राज्यात पावसाची शक्‍यता व्यक्त केली होती. हा अंदाज खरा ठरला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली आहे. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एकाच वेळी उपसागर व अरबी समुद्रात हवेचा दाब कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून तिचा प्रभाव पुढील आठ दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.
----------- 

Wednesday, November 5, 2014

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन वैशिष्ट्ये बातमी - सेकंड एडिट


7 नोव्हेंबर रोजी पेस्टिंगसाठी
---------------
लोगो ः ऍग्रोवन कृषी प्रदर्शन 2014 व प्रायोजकांचे लोगो
---------------
ऍग्रोवन कृषी प्रदर्शन चार दिवसांवर; राज्यभरात वाढती उत्सूकता

पुणे (प्रतिनिधी) ः अत्याधुनिक इरिगेशन सिस्टिम्स, सौर उर्जेवर चालणारी कृषी पुरक उपकरणे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, पिक कापणी यंत्रे, पडगिलवारची सर्व पोस्ट हार्वेस्ट इक्विपमेंट, किर्लोस्करचा नवीन छोटा पॉवर टिलर, फोर्सचा मिनी ऑर्चड ट्रॅक्‍टर, डिएसकेंची दुग्धव्यवसायासाठीची विविध उपकरणे, गोठ्यात काम करणारा रामू यंत्रमानव, नवीन बियाणे, खते, कीडनाशके, धान्य निवडणीचा "नॅनो ग्रिन क्‍लिनिंग प्लॅन्ट' व "ग्रेडर' यासह देश विदेशात लोकप्रिय ठरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान खास शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधीत असलेल्या प्रत्येकाला शेकडो संधीचा खजिना उपलब्ध करुन देणारे ऍग्रोवन कृषी प्रदर्शन आता अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपले आहे.

राज्यातील शेती, शेतकरी व ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविणात सकाळ-ऍग्रोवन आघाडीवर आहे. ऍग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाने गेली काही वर्षे शेतकऱ्यांच्या मनात मानाचे स्थान पटकाविले आहे. या प्रदर्शनात सहभागी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला विकासात्मक कलाटणी मिळाली असून अनेक यशोगाथा घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या कृषी प्रदर्शनातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उपयोगाचे हवे ते सर्व उपलब्ध करण्याचे प्रयत्न ऍग्रोवन परिवाराकडून सुरु आहेत. पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर (रेंजहिल्स) येथिल नवीन मैदानावर बुधवारी (ता.12) प्रदर्शनाला भव्य प्रारंभ होणार आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि. आणि डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे सहप्रायोजक आहेत.

भारतीय निर्यात कर्ज हमी महामंडळ (ईसीजीसी), बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय आदी बॅंकांच्या खास शेतकऱ्यांसाठीच्या योजना; सेंद्रीय शेतीसाठीची खते, औषधे, बियाणे; कृषीविषयक माहिती प्रसाराच्या संस्था, कृषीविषयक साहित्य; लक्ष्मी, सुर्याटेक, सुदर्शन, जैन आदी आघाडीच्या कंपन्यांची अत्याधुनिक सौर उर्जा उपकरणे, पशुधनविषयक चारा, खुराक, यंत्रसामग्री; पॉलिहाऊस, शेडनेट विषयक उत्पादने, शेळी व मेंढीपालन, पिक उत्पादक संस्था आणि शेती व पुरक व्यवसाय संबंधीत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रदर्शनात नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, विविध कृषी संशोधन संस्था, अन्न प्रक्रिया संस्था, कृषी, अभियांत्रिकी व पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, केंद्रीय अन्न प्रक्रीया संस्था, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचलनालय, कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदी शेतीपुरक शासकीय विभाग व संस्था प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट जोडणी करण्यासाठी सहभागी होत आहेत. या संस्थांच्या दालनात शेतकऱ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व तंत्रज्ञान थेट बांधावर उपलब्ध करुन घेण्याची संधी मिळणार आहे.

- संधी अभ्यासाची, संधी प्रगतीची !
टिश्‍यू कल्चर, बायोटेक, पॅकिंग टेक्‍नॉलॉजी, सोलर टेक्‍नॉलॉजी, ऍग्रो इलेक्‍ट्रॉनिक्‍स, पल्विलायझेशन टेक्‍नॉलॉजी, डायड्रो पॉवर, केमिकल व ऑरगॅनिक फार्मिंग टेक्‍निक्‍स, मायक्रो इरिगेशन टेक्‍नॉलॉजी, शेतीसाठीची मोबाईल टेक्‍नॉलॉजी, ऍग्री बॅंकिंग, बियाणे तंत्रज्ञान, ब्लोअर, ग्रीन हाऊस टेक्‍नॉलॉजी आदी अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची, हाताळण्याची, जाणून घेण्याची, तुलना करण्याची व पटेल ते आत्मसात करण्याची संधी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
------------ 

बुधवारपासून पुण्यात सुरु होणार ऍग्रोवन कृषी प्रदर्शन महामेळा

लोगो ः ऍग्रोवन कृषी प्रदर्शन 2014 व प्रायोजकांचे लोगो
----------------------------
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या ऍग्रोवनच्या यंदाच्या बहुप्रतिक्षित, बहुचर्चित कृषी प्रदर्शनाला येत्या बुधवारपासून (ता.12) पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथिल नवीन मैदानावर भव्य प्रारंभ होत आहे. सलग पाच दिवस म्हणजेच 12 पासून 16 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत कृषी ज्ञान, तंत्रज्ञानाचा हा महामेळा सुरु राहणार आहे. फोर्स मोटर्स लि. हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि., डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

ऍग्रोवनचे कृषी प्रदर्शन हा राज्यातील कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. राज्य परराज्यांतून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, उद्योजक या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देत असतात. यंदाच्या प्रदर्शनातही शेती व शेतीसंबंधी सर्व घटकांची माहीती, ज्ञान, तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीपुढील नव्या आव्हाणांचा सामना करण्यासाठी बळ देवून शेतकऱ्यांचे जगणे सोपे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

देशभरातील प्रमुख खत कंपन्या, दुग्धव्यवसाय यंत्र सामग्री, ठिबक, तुषार सिंचन, पुस्तके व प्रकाशने, बॅंका, सल्ला सेवा, रोपवाटिका, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, अत्याधुनिक यंत्रसामग्री, अवजारे, शेततळे, सौर उर्जा सयंत्रे, फळ महोत्सव, शेळीपालन, पशुपालन, कृषी पर्यटन, हरितगृह, जैविक किडनाशके, बियाणे उत्पादक आदींचा या प्रदर्शनात सहभाग आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने नवीन उत्पादनांचे, साधनांचे लॉंचिंगही या प्रदर्शनात होणार आहे.

दरम्यान, कृषी प्रदर्शनाची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी चार ऍग्रोवन कृषी प्रदर्शन प्रचार महारथ विविध जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. हे महारथ सात हजार किलोमिटर प्रवास करुन 1200 गावांमध्ये प्रदर्शनाची माहीती थेट पोचविणार आहेत. कृषी विद्यापीठे, ग्रामपंचायत, कृषीविषयक संस्था व शेतकऱ्यांकडून या महारथांचे व कृषी प्रदर्शनाच्या उपक्रमाचे उत्स्फुर्त जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. पुढील पाच दिवस उत्तरोत्तर प्रदर्शनाची उत्कंठा वाढत जाणार आहे.

* प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये
- आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अविष्कार
- प्रगतशिल शेतकरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- कृषीतील नामवंत कंपन्यांचा सहभाग
- ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ
- ऍमिग्रोमार्फत राज्यस्तरीय फळ महोत्सव
-------------- 

Saturday, November 1, 2014

पुण्यातील 200 गावांमध्ये संतुलित पशुआहार योजना

पुणे (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ करुन सातत्य राखण्याठी राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत एनडीडीबीच्या आर्थिक सहाय्याने पुणे जिल्हा सहकारी दुध संघामार्फत संतुलित पशुआहार कार्यक्रम व वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास नुकतिच सुरवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील 200 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट संपर्कात राहून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 200 स्थानिक सेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्रात सुरु आहे.

जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्यात अनेकदा प्रोटिन, उर्जा, फॅट, जीवनसत्वे व क्षार यांचा अभाव असतो किंवा ते कमी प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर व दुध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. असंतुलित आहारामुळे जनावराच्या क्षमतेपेक्षाही कमी प्रमाणात दुध उत्पादन होते. ही घट टाळून उत्पादकतावाढ करण्यासाठी संघामार्फत संतुलित आहार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दोन वेतातील वाढते अंतर कमी करणे, दुध देण्याचा कालावधी वाढवणे, दुधाचा ताप व किटोसिन रोगांमुळे जनावरांचा होणारा मृत्यू रोखणे, कालवडी लवकर वयात आणून पहिल्या वेताचा कालावधी योग्य ठेवणे, उत्पादन कालावधी वाढून दुध उत्पादन वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

एप्रिलपासून आंबेगावमधील 30, दौंड 20, जुन्नर 49, पुरंदर 10,भोर 20, हवेली 6, खेड 17, मुळशी 10, शिरुर 28 तर मावळ व वेल्हा तालुक्‍यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला संतुलित पशुआहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गावातीलच एका व्यक्तीची स्थानिक सेवक (लोकल रिसोअर्स पर्सन) म्हणून निवड करण्यात आली आहे. या सेवकास पहिल्या वर्षी दरमहा 1500 रुपये व दुसऱ्या वर्षी दरमहा 750 रुपये मानधन देण्यात येणार आहे. जनावराचे वजन, आरोग्य तपासून संतूलित आहार ठरवून देण्याचे काम हे सेवक आपापल्या गावांमध्ये करणार आहेत. संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वीर हे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

- 4500 हेक्‍टरवर चारा पिक प्रात्यक्षिके
चारा पिकांच्या विकासासाठी संघामार्फत सुमारे साडेचार हजार हेक्‍टरवर वैरण विकास प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. यामध्ये मोअर मॅन्युअल, मोअर ऍटो पीकअप, बायोमास बंकर, सायलोट, सायलेज मेकिंग प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यासाठी व गायरान जमीनीच्या विकासासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. एनडीडीबीकडून वैरण विकासासाठी जिल्ह्याला 97 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून आंबेगाव, भोर, दौंड, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्‍यांमधील एकूण 58 गावांमध्ये मका, लसूण, ज्वारी, भात व ऊस या चारा पिकांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संघामार्फत याबाबत गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

- कोट
""संतुलित आहार कार्यक्रमासाठी एनडीडीबीकडून एक कोटी 78 लाख रुपये उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्स्फुर्त सहभागातून या कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
-------------- 

कात्रज - दुध संकलन केंद्र बळकटीकरण योजना, शेतकरी प्रशिक्षण

पुणे जिल्हा दुध संघ देणार
60 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

संकलन केंद्रांच्या बळकटीकरणासाठी तीन कोटी रुपये

पुणे (प्रतिनिधी) ः राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत गावपातळीवर दुध संकलन व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत नुकताच सुरु करण्यात आला आहे. यातून दुग्धव्यवसायाशी थेट संबंधीत असलेल्या सुमारे 60 हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून दुग्ध संस्थांना आधुनिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येत्या चार वर्षात यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

नॅशनल डेअरी प्लॅनमधून कात्रज संघाला सहा कोटी 75 लाख 12 हजार रुपये उपलब्ध होणार आहेत. यापैकी 4 कोटी 60 लाख 39 हजार रुपये 100 टक्के अनुदान तत्वावर होणार आहे. संघाचे योगदान दोन कोटी 14 लाख 73 हजार रुपयांचे राहणार आहे. जिल्ह्यात 236 दुग्ध संस्थांमार्फत 2017-18 पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात आंबेगावमधील 15, दौंड 52, जुन्नर 13, पुरंदर 25, भोर 28, हवेली 12, खेड 30, मुळशी 12, शिरुर 27, मावळ 10 तर वेल्हा तालुक्‍यातील 12 संस्थांचा समावेश आहे. प्रशिक्षण हा या योजनेचा महत्वाचा भाग आहे. येत्या पाच वर्षात छोट्या दुध उत्पादकांपासून संचालकांपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 60 हजार व्यक्तींना यातून प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे.

जिल्ह्यातील दुध संकलन केंद्रांच्या सुधारणेसाठी सर्वाधिक सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या शिवाय संकलन केंद्रांना पुरक ठरणारे संकलन साहित्य, कॅन्स, बल्क कुलर आदी साहित्याचाही पुरवठा या योजनेतून संस्थांना करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने या योजनांची अंमलबजावणी होणार असून सध्या शेतकरी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व इतर कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

- असे होणार दुध संकलन बळकटीकरण (2017-18 पर्यंत)
अनुदानाची बाब ---- नग --- उपलब्ध निधी (लाख रुपये)
दुध संकलन केंद्र --- 238 --- 274.90
संकलन साहित्य --- 374 --- 59.84
एस.एस.कॅन्स --- 1913 --- 57.39
बल्क कुलर --- 8 --- 44.29
ऍटोमेटेड दुध संकलन केंद्र --- 4 --- 6.30
आयसीटी सपोर्ट --- 1 --- 6
संस्था पातळीवर मानधन --- 236 --- 101.95
विस्तार साहित्य --- 6 --- 24
शेतकरी प्रेरणा कार्यक्रम --- 472 --- 2.83
शेतकरी विकास कार्यक्रम --- 160 --- 0.96
स्वच्छ दुध निर्मिती प्रशिक्षण --- 9440 --- 3.54
सचिव प्रशिक्षण --- 396 --- 20.16
संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी प्रशिक्षण --- 54 --- 3.32
---------- 

पुस्तक परिचय - मनापासून मनाकडं - डाॅ. कृष्णा मस्तुद

जावे पुस्तकांच्या गावा ः संतोष डुकरे
------------
पुस्तकाचे नाव - मनापासून मनाकडं
लेखक - डॉ. कृष्णा मस्तूद
पृष्ठ - 216
मुल्य - 240 रुपये
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, सकाळ पेपर्स प्रा. लि, 595, बुधवार पेठ, पुणे 2.
संपर्क - 020 24405678
-------------
माणसाच्या मनाचा ठाव कुणाला लागू शकत नाही. याचं मनच थाऱ्यावर नाही. मन मारून संसार केला. खुळं आहे ते... असे शेलके टोमणे असतील किंवा वेडा आहे म्हणून केलेले दुर्लक्ष, मारलेले दगड असतील. समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण मनाचा धांडोळा घेतो. स्वतःच्या मनाला ओळखायला, त्याच्याशी संवाद साधायला, त्याला घडवायला बहुतेक जण विसरतात. आणि मग स्वतःबरोबरच इतरांच्याही आयुष्यावर बिब्बा घालत राहतात. मनाच्या हिंदोळ्यावर अधांतरी टांगून राहण्यापेक्षा त्याच्या प्रखर ताकतीवर यशाची शिखरे सर करणे कोणाला नको असते? पण मग मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बार्शी येथील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद यांनी आपल्या या पुस्तकात अतिशय सहजपणे ही जीवनविद्या वाचकांसाठी खुली केली आहे.

डॉ. मस्तूद यांच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील गाजलेल्या "मनापासून मनाकडं' या सदरातील सर्व 52 लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रस्तावना आणि डॉ. मस्तूद यांच्या मनोगताने या पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सर्व लेख मनाची मशागत करून यशस्वी जगण्याचा पाया घालणारे आहेत. गौतम बुद्धांपासून संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, कबीर ते अगदी रोजच्या जगण्यातील दाखल्यांचा आधार घेत मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत. मनाची मशागत करून आयुष्याचे पीक सुदृढ, संपन्न व फलदायी करण्याची, स्वतःच्या मनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी हे पुस्तक देते. मनातून निर्माण होणाऱ्या विकारांवर विजय मिळवण्याचा सहजसोपा मार्गही हे पुस्तक दाखवते. स्वयंविकास ही अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरू राहणारी प्रक्रिया असते. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी तुमच्या मनाला लागलेली जळमटं झटकून जगण्याला नवा अर्थ आणि नवी झळाळी देण्यात हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे निश्‍चित.
-------------

हवामानाधारित रब्बी विम्याला 15 दिवसांची मुदतवाढ

गहू, हरभरा पिकांना मिळणार लाभ

पुणे (प्रतिनिधी) ः हवामानाधारित रब्बी पिक विमा योजनेतील शेतकरी सहभागाची अंतिम मुदत हरभरा पिकासाठी 31 ऑक्‍टोबरवरुन 15 नोव्हेंबरपर्यंत तर गहू पिकासाठी 22 नोव्हेंबरवरुन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नगर, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती व नागपूर या पाच जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. यापैकी रब्बी ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण मिळवण्याची अंतिम मुदत नुकतिच (31 ऑक्‍टोबर) संपली आहे.

रब्बी पिकांच्या पेरणीस विलंब झाल्याने हरभरा व गहू पिकांसाठी विमा उतरविण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची मागणी कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विमा कंपनीकडे करण्यात आली होती. यानुसार कंपनीने मुदतवाढीला हिरवा कंदील दाखवला असून राज्य शासनानेही याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. योजनेच्या इतर निकषांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. योजना राबविण्यात येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेवून पिकांना विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
---------------- 

Friday, October 31, 2014

दृष्टिकोन - बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ

दुग्ध व्यवसायाला हवे
स्थिर दीर्घकालीन धोरण
-----------
गेल्या काही वर्षात राज्यातील दुग्ध व्यवसायाची चांगली प्रगती झाली आहे. उत्पादन, प्रक्रिया वाढली आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे नवीन समस्या उभ्या राहिल्या आहेत. लोकांनी दुधापेक्षा दारू प्यावी, अशी सध्याची धोरणे आहेत. सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून उत्पादन ते निर्यातीपर्यंतची धोरणे राबवण्याची गरज आहे. सांगताहेत "पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा'चे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी.
----------
- विविध पातळ्यांवर दुग्ध व्यवसायाची सद्यःस्थिती काय आहे?
महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने दुधामुळे पुढे गेला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा 1988 मध्ये देशात दुधाचे सर्वाधिक विपणन करणारा संघ होता. 1992-95 पर्यंत देशात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. नंतर ही परिस्थिती पालटली. आज पुण्यात दुधाचे 100 ब्रॅंड आहेत. दुधाच्या गुणवत्तेचा प्रश्‍न मोठा आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. भेसळ प्रतिबंधक कायदा फक्त कागदावर असल्याची स्थिती आहे. पुण्यात दररोज 20 लाख लिटर दूध संकलित होते. प्रत्यक्षात येथे दररोज एक कोटी लिटर दूध प्रक्रिया क्षमतेचे प्रकल्प आहेत. या एकाच जिल्ह्यात 65 प्रक्रिया प्रकल्प आहेत. सगळ्यांनी मिळून दुग्ध व्यवसायाचा पचका करायचे ठरवलेय की काय, अशी स्थिती आहे. बेशिस्तीचा फटका सगळ्यांनाच बसतोय. शासकीय अनुदानातून स्थापन झालेले दूध भुकटी व इतर प्रक्रिया उद्योग बंद पडत आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित लोक या व्यवसायात असल्याने प्रत्येकाकडे काणाडोळा केला जातोय. त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत.

- सातत्यपूर्ण दूध उत्पादनासाठी कात्रजमार्फत काय प्रयत्न सुरू आहेत?
दर्जेदार जनावरांची निर्मिती हा दुग्ध व्यवसायातील महत्त्वाचा भाग आहे. देश दूध उत्पादनात जगात वरच्या क्रमांकावर आहे. पण प्रति जनावर उत्पादकता अजूनही खूप कमी आहे. जिल्हा दूध संघामार्फत आम्ही यास सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी "एनडीडीबी'च्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दर्जेदार जनावरांपासून सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे हेही मोठे आव्हान आहे. जनावरांची निगा राखणे आणि ती रोगमुक्त ठेवणे महत्त्वाचे असते. आपले बहुसंख्य गोठे अस्वच्छ असतात. परिणामी जंत व गोचिड यांच्यामुळे दूध उत्पादनात 30 ते 35 टक्के घट होते. संघामार्फत दर वर्षी जंत व गोचिडनिर्मूलन सप्ताह पाळला जातो. उत्पादनातील सातत्यात गोठ्यांची चुकीची पद्धत हाच मोठा अडथळा आहे. आधुनिक दूध उत्पादनात मुक्त संचार पद्धतीचे गोठे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहेत. यासाठी एनडीडीबीच्या मदतीने संघामार्फत वडगाव कांदळी (जुन्नर) व टुलेवस्ती (दौंड) येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्रे (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) सुरू केली आहेत. येथे शेतकरीच शेतकऱ्यांना मुक्त गोठा पद्धतीने जनावरांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रशिक्षण देणार आहेत. पशू आहाराच्या बाबतीत जागृती करण्यासाठीही संघाचे प्रयत्न सुरू आहेत.

- राज्यातील खासगी व सहकारी दूध संस्थांतील संघर्ष वाढत असल्याचे चित्र दिसते. याबाबत आपली भूमिका काय?
शासनाच्या धोरणामुळे गेल्या काही वर्षात राज्यात खासगी व्यावसायिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पण ते वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात. खासगी संस्था नफा होत असतो तेव्हा विचार करत नाहीत. एक-दोन महिने अडचणीचे आले की लगेच शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली जाते. दर जादा दिल्याचे दाखवतात; पण सेवा काहीच देत नाहीत. सर्व पैसा मधल्या दलालांकडे जातोय. आगाऊ रक्कम देऊन (ऍडव्हान्स) वेठबिगार तयार करून ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. "गाय झाली छोटी आणि गोचिड झाली मोठी' अशी स्थिती आहे. सहकारी संस्था शेतकरी हितासाठी काम करतात. यामुळे दूध उत्पादकांनी तात्पुरती सोय, फायदा न पाहता सहकारी संस्थांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. धरसोड करणारे शेतकरी फक्त पायापाशी पाहतात; दूरचा विचार करत नाहीत. ही चूक वेळीच सावरली पाहिजे. सहकाराशी प्रामाणिक राहणाऱ्या दूध उत्पादक संस्थांच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचा दूरगामी फायदा होईल. सहकार टिकला तर दुधाचे भाव टिकतील व व्यवसाय फायद्यात राहील.

- दुग्ध व्यवसायात दरवाढ, कपात असे सतत चढ-उतार सुरू असतात. यामागे धोरणात्मक अपयश आहे का?
गेल्या काही वर्षात राज्यात दुग्ध व्यवसायात मोठी क्रांती झाली. "एनडीडीबी'ने केलेल्या प्रयत्नांतून उत्पादनाला चांगली गती मिळाली. गेल्या काही वर्षात दूध भुकटी निर्मितीसंदर्भात चांगल्या पद्धतीने धोरणे राबवली. यामुळे दुधाचे उत्पादन वाढून दरातही लक्षणीय वाढ झाली. सहकारात भुकटी उद्योग कमी असल्याने खासगीकडे लोकांचा ओढा वाढला. यातही संघांनी चांगले दर देऊन स्थिरता राखण्याचा प्रयत्न केला. सध्या केंद्राने भुकटीसंदर्भातील धोरणे बदलल्याने दुधाच्या खरेदी दराला फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारही कारणीभूत आहेतच. त्यात खासगी संस्था फक्त 20 रुपये लिटर दराने दूध खरेदी करत आहेत. शासनाचे धोरण धरसोडीचे आहे. धोरण बदलल्यावर सर्व गोंधळ होतो. शासनाने दीर्घकालीन स्थिर धोरण अवलंबण्याची गरज आहे.

- दुधाचा दरडोई वापर वाढवण्यात आपण नक्की कोठे कमी पडतोय?
सध्या राज्यात दुधाचे मार्केटिंग बरोबर होत नाही. चहा, कॉफी, दारूच्या जाहिरातींचा मारा दुधापेक्षा जास्त आहे. मध्यंतरी "पिओ ग्लास फुल' ही दुधाची जाहिरात चांगली लोकप्रिय झाली. त्यामुळे दुधाचा खपही वाढला. मात्र काही काळानंतर ती जाहिरात बंद झाली. सध्या याबाबत काहीही सुरू नाही. संडे हो या मंडे... ही अंड्यांची जाहिरात "नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी'मार्फत सतत सुरू असते. अशा प्रकारे दुधाचा खप, दरडोई वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने जाहिरात करणे गरजेचे आहे. दुधाचा खप वाढला तर सर्वांनाच संधी राहील. सध्या राज्यात दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत आहे.

- संपूर्ण राज्याचा विचार करता सहकारी संघांचे जाळे कमकुवत आहे. याबाबत काय प्रयत्न सुरू आहेत?
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा एक ब्रॅंड तयार करण्याची गरज आहे. हे काम अवघड आहे; पण अशक्‍य नाही. काही दिवसांपूर्वी याबाबत चाचपणी झाली; पण पुन्हा सारे शांत झाले. आज सहकारी संघांच्या बरोबरीने खासगी संस्थांचे पाऊल मोठे झाले आहे. शासन, संघ व खासगी संस्थांचा मेळ घालून दुधाच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची गरज आहे. सध्या सर्व जण एकमेकांची पुनरावृत्ती म्हणजेच "डुप्लिकेशन ऑफ वर्क' करत आहेत. ज्याची जी गुणवत्ता चांगली आहे त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. यामुळे सर्वच संघांचा व पर्यायाने शेतकऱ्यांचा फायदा होईल. आज सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत. याचा तोटा सर्वांनाच सहन करावा लागत असून राज्यातील बाजारपेठेतही झगडावे लागत आहे. आपले दूध शिल्लक राहतेय आणि मुंबईला दिल्लीवरून दूध येतेय.

- शासनाकडून काय अपेक्षा आहेत?
तूप व इतर दुग्धप्रक्रिया उत्पादनांवर कर भरावे लागतात. ते रद्द केले पाहिजेत. दूध उद्योग हा शेती व्यवसायाचाच भाग गृहीत धरून त्यासाठी शेतीसाठीच्या दराने वीज उपलब्ध करून द्यावी. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा दरडोई वापर वाढण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय पोषण आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ देण्याची आवश्‍यकता आहे. याचा फायदा थेटपणे शेतकऱ्यांना होईल. गेल्या काही वर्षात पशुखाद्य, मजुरी आदी सर्व बाबींचे दर वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायातून बाहेर पडत आहेत. नवी पिढी या व्यवसायात येण्यास फारशी उत्सुक नाही. यामुळे छोट्या प्रमाणातील या व्यवसायाला थोडे मोठे स्वरूप देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना भरीव पाठबळ देण्याची गरज आहे.

- दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत देशी गाईंचे महत्त्व वाढले आहे. संघामार्फत याबाबत काय उपक्रम सुरू आहेत?
देशी गाईंच्या दुधाला सध्या मोठ्या प्रमाणात महत्त्व आले आहे, हे खरे. पुण्यातील काही सुवर्ण व्यावसायिकांकडून प्रतिलिटर 80 रुपये दराने, देशी गाईंचे पाच हजार लिटर दूध उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा झाली. देशी गाईंच्या दुधापासून चुलीवर तयार केलेल्या तुपाला तब्बल 2400 रुपये प्रतिकिलो दराने मागणी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यास संघ सध्या असमर्थ आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळण्यासाठी अशा पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे राहील.
.................
कोट - सहकाराशी प्रामाणिक राहणाऱ्या दूध उत्पादक संस्थांच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचा दूरगामी फायदा होईल. सहकार टिकला तर दुधाचे भाव टिकतील व व्यवसाय फायद्यात राहील.
.................
संपर्क - श्री. खिलारी 9011099966
.................

फडवणविस मंत्रीमंडळ - मंत्री परिचय

देवेंद्र फडणविस, मुख्यमंत्री
- नागपूरमधून सलग चारवेळा आमदार
- नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास
- 2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष
-------
एकनाथ खडसे
- सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेवर
- युती सरकारमध्ये अर्थ, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री
- विरोधी पक्षनेते म्हणून लक्षवेधी कामगिरी
- कोथळी गावचे सरपंच ते भाजपचे जेष्ठ नेते
- खानदेशातील भाजपचा चेहरा म्हणून लौकीक
-------
चंद्रकांत पाटील
- कोल्हापूर भाजपचे अग्रणी नेते, विधान परिषदेत भाजपचे प्रतोद
- 2008 पासून पुणे पदवीधरमधून विधान परिषदेवर सदस्य
- भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, सरचिटणीस म्हणून काम
- शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव
- 1980 ते 1993 - विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते
- 1995 ते 1999 - आरएसएसचे कोल्हापूर विभाग सहकार्यवाह
-------
विनोद तावडे
- विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम
- मुंबई भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान
- अभाविपच्या माध्यमातून भाजपमध्ये सक्रीय
-------
पंकजा पालवे
- बीडमधील परळीतून दुसऱ्यांदा आमदार
- भाजप कोअर कमिटीच्या सदस्या
- स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी "लेक वाचवा, राष्ट्र वाचवा' अभियान
- त्यांच्या संघर्ष यात्रेने भाजपला मोठे राजकीय बळ
-------
प्रकाश मेहता
- सलग सहा वेळा घाटकोपरमधून आमदार
- युती सरकारच्या काळात उत्पादन शुल्क मंत्री
- मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
- मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष
- आणीबाणी विरोधी आंदोलनात सहभाग
-------
सुधिर मुंगुटीवार
- सलग पाच वेळा विधानसभेचे आमदार
- भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष
- युती सरकारमध्ये पर्यटन, ग्राहक संरक्षण मंत्री
- अनुभवी, अभ्यासू, प्रभावी वक्तृत्व असलेला नेता
- बल्लारपूर तालुक्‍याच्या निर्मितीत योगदान
-------
विष्णू सावरा
- पालघर जिल्ह्यातील विक्रमगडचे विद्यमान आमदार
- विधानसभेवर सहा वेळा निवड
- युती सरकारच्या काळात आदिवासी विकासमंत्री
- आदिवासी नेता अशी ओळख
------------
विद्या ठाकूर (राज्यमंत्री)
- गोरेगावमधून भाजपच्या आमदार
- मुंबईच्या माजी उपमहापौर
- मुंबई मनपात चार वेळा नगरसेविका
- भाजपचा उत्तर भारतीय चेहरा
-------------
दिलीप कांबळे (राज्यमंत्री)
- पुणे कॅटोन्मेंटमधून दुसऱ्यांदा विजयी
- युती सरकारच्या काळात राज्यमंत्री
- स्वारगेट एसटी स्थानकातले एकेकाळचे फुलविक्रेते
- भाजपचा दलित चेहरा
------------------------------------ 

Thursday, October 30, 2014

निलोफर चक्रीवादळाची अति तिव्रता ओसरली

उत्तर गुजरात, कोकणात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातून उत्तर गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या निलोफर चक्रिवादळाची अति तिव्रता कमी होवून त्याचे रुपांतर तिव्र चक्रीवादळात झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याची तिव्रता आणखी कमी होऊन ते सौम्य स्वरुपात (डिप्रेशन) गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी हे वादळ गुजरातपासून सुमारे 620 किलोमिटर अंतरावर पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात सक्रीय होते. वादळ उत्तर गुजरातला धडकल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज कायम आहे.

निलोफर चक्रिवादळाची तिव्रता मध्यंतरी वाढल्याने गुजरातमध्ये अतिदक्षतेच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता हे वादळ कमी दाबाच्या क्षेत्राच्या तिव्रतेहून अधिक व वादळाच्या तिव्रतेहून कमी स्वरुपात गुजरातमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमिटर राहण्याचा अंदाज आहे. वादळाची तिव्रता ओसरल्याने किनारपट्टीवर फारशी हानी होण्याची शक्‍यता नाही. मात्र या वादळाच्या प्रभावामुळे या भागात दमदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात कोकण वगळता उर्वरीत भागात हवामान कोरडे व स्वच्छ सुर्यप्रकाश राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या आसपास तर किमान तापमान सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरलेले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. उस्मानाबाद येथे राज्यात सर्वात कमी 13.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. भिरा येथे राज्यात सर्वात जास्त 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 35.3 (24.9), अलिबाग 34.2 (22), रत्नागिरी 33.9 (20), पणजी 33.5 (21.3), डहाणू 34.8 (21.8), भिरा 36.5 (17.5), पुणे 31 (13.9), नगर (15.2), जळगाव 33.5 (14.1), कोल्हापूर 29.9 (17.6), महाबळेश्‍वर 25.1 (15), मालेगाव 34.4 (16.4), नाशिक 30.5 (15), सांगली 30 (16.7), सातारा 29.6 (14.5), सोलापूर 33 (16), उस्मानाबाद 31.8 (13.8), औरंगाबाद 32 (16), परभणी 32.6 (14.7), नांदेड 31.5 (15.5), अकोला 34.5 (16.9), अमरावती 31.8 (18.4), बुलडाणा 31 (17.8), ब्रम्हपुरी 33.2 (17.8), गोंदिया 31.1 (15.4), नागपूर 32.6 (16.1), वाशिम 32 (18), वर्धा 32 (16.4), यवतमाळ 31.6 (15.6)
------------------ 

Wednesday, October 29, 2014

दुध पावडरच्या दरावरुन खरेदी दराचे राजकारण

खासगी संस्थांचा शेतकऱ्यांना दणका; सहकारी संघांकडून दर कायम

पुणे (प्रतिनिधी) ः आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी झाल्याच्या कारणाखाली खासगी दुध संस्था, प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दुध खरेदीच्या दरात कपात करण्यास सुरवात केली आहे. मात्र आपल्याशी प्रामाणिक असलेल्या दुध संकलन केंद्रे व शेतकऱ्यांच्या दुध खरेदी दरात कपात न करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघांनी घेतला आहे. यामुळे खासगी प्रकल्पांशी संबंधीत शेतकरी संकटात सापडले असून सहकारी संघांशी संबंधीत शेतकऱ्यांनी संकट टळल्याचा निश्‍विास सोडला आहे.

पुणे जिल्ह्यातील खासगी प्रकल्प व दुग्ध संस्थांनी गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर दोन ते अडिच रुपयांनी कमी केले आहेत. यामध्ये स्वराज्य दुध, डायनामिक्‍स डेअरी, प्रभात दुध, गोविंद दुध, पारस आदी प्रकल्पांचा समावेश आहे. इंदापूरच्या सोनई दुध प्रकल्पाने एक नोव्हेंबरपासून दुधाला 20 रुपये प्रति लिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तुलनेत पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 24 रुपये, दूध संस्थांना वरकड खर्चासाठी प्रति लिटर एक रुपया व वाहतूकीसाठी प्रति लिटर किमान 95 पैसे स्वतंत्रपणे देण्यात येत आहेत.

*चौकट
- खासगी संस्थांकडून गैरफायदा ?
आंतरराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर खाली वर होत असतात. मात्र या बाबीचा बाऊ करुन काही खासगी संस्था शेतकऱ्यांचा खिसा कापत आहेत. दुध पावडरला जास्त दर मिळतो तेव्हा हे प्रकल्प त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा देत नाही. अडचण असून शकते. मात्र तो व्यवसायाचा भाग असतो. पशुखाद्य, भुसा, गाईंच्या किमती, चारा व औषधे, टॉनिक, मजूरी यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना मुळात कमी असलेल्या पावडरला दर नाही या कारणाखाली दुध दरात आणखी कपात करुन शेतकऱ्यांना भुर्दंड देणे चुकीचे आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

*कोट
""गेल्या पंधरा दिवसात दुध भुकटीचे दर 300 रुपयांवर 180 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळे विक्री ठप्प आहे. गोकुळमार्फत दररोज एक ते दीड लाख लिटरची पावडर केली जाते. सध्या दर नसल्याने आम्ही पावडरचा साठा करत आहोत. दुध खरेदी दर कमी करण्याचा संघाचा विचार नाही.''
- दिलीप पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकूळ)

""खासगी संस्थांनी दर जास्त कमी केल्याने संघाकडे अचानक दुधाची आवक वाढली आहे. नेहमीच्या दुधाला पुर्वीप्रमाणेच दर कायम ठेवून अचानक वाढलेल्या दुधाला एक रुपया कमी दर देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (कात्रज)
----------(समाप्त)-----------