Wednesday, November 26, 2014

राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट

29 नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्रित प्रभावामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. या दोन्ही विभागांमध्ये 29 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण अरबी समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याशी संलग्न असलेले चक्राकार वारे लक्षद्वीप परिसरात सक्रीय आहेत. याच वेळी उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. पाठोपाठ 29 पासून महाराष्ट्रातही पावसाला सुरवात होण्याची दाट शक्‍यता आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात थंडी वाढली आहे. या ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचीत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. कोठेही पावसाची नोंद झाली नाही. दिवसभरात गोंदिया येथे राज्यात सर्वात कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे बुधवारी (ता.26) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 21, अलिबाग 20.2, रत्नागिरी 19.3, पणजी 19.3, डहाणू 21.1, भिरा 16.5, पुणे 12.4, नगर 11.4, जळगाव 12.2, कोल्हापूर 16.9, महाबळेश्‍वर 13.8, मालेगाव 15.5, नाशिक 12.5, सांगली 17.7, सातारा 12.5, सोलापूर 14.9, उस्मानाबाद 11.3, औरंगाबाद 14.4, परभणी 13.2, नांदेड 12, बीड 13.4, अकोला 14.2, अमरावती 15.6, बुलडाणा 15.5, ब्रम्हपुरी 12.9, चंद्रपूर 14.6, गोंदिया 11.2, नागपूर 12.1, वाशिम 15.4, वर्धा 13.2, यवतमाळ 13.2
------------ 

No comments:

Post a Comment