Tuesday, February 4, 2014

कृषी विद्यापीठांत "सेंद्रिय शेती विभाग' येणार अस्तित्वात

आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही सुरू; महिनाअखेर मंजूर होणार प्रकल्प आराखडा

पुणे (प्रतिनिधी) ः हिमाचल प्रदेश, धारवाड, शेर ए काश्‍मीर कृषी विद्यापीठांच्या धर्तीवर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेतीचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तालयामार्फत नुकतीच सुरू करण्यात आली. चारही विद्यापीठांमार्फत यासाठी आयुक्तालयाकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, या प्रस्तावांची फेरतपासणी करून प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी चारही विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांची समिती गठित करून दोन कोटी रुपयांच्या मर्यादेत संशोधन आराखडा तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

कृषी विद्यापीठांच्या स्वतंत्र सेंद्रिय शेती विभागासाठी सुरवातीला करार पद्धतीवर अधिकारी, कर्मचारी घ्यावेत व त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यापीठांनी त्यांची व्यवस्था करावी, अशी सूचना कृषी आयुक्तांनी केली आहे. सेंद्रिय शेती धोरण समन्वय व संनियंत्रण समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधनावर भर द्यावा, यासाठी फलोत्पादन संचालकांमार्फत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची विशेष बैठक आयोजिण्यात यावी, सेंद्रिय शेती संशोधनासाठी विद्यापीठांनी प्रथम स्वतःकडील साधनसामग्री वापरण्यास पुढाकार घ्यावा, इतर विद्यापीठांच्या सेंद्रिय शेती विभागांचा अभ्यास करून त्यातील बाबींचा समावेश या विभागात करावा, सेंद्रिय शेती धोरणात तरतूद आहे म्हणून विद्यापीठांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या उपकरणांची, साहित्याची पुन्हा खरेदी करू नये, शेतकऱ्यांच्या गरजांचा, मागण्यांचा मागोवा घेऊन दोन कोटी रुपयांच्या मर्यादेत संशोधन आराखडा तयार करून समितीच्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या बैठकीत सादर करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

-अझाडीरेक्‍टीनची उपयुक्तता तपासा
कृषी विद्यापीठांनी निंबोळी पावडरमधील अझाडीरेक्‍टीनची उपयुक्तता तपासून त्याच्या वापराविषयी शिफारस करावी. यासाठी लिंबाच्या झाडांखाली प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री अंथरूण 25 मे ते 7 जून या कालावधीत निंबोळ्या गोळा कराव्यात. निम केक, तेलाच्या वापराविषयी पुणे कृषी महाविद्यालयामार्फत; तर निंबोळी अर्काच्या फवारणीविषयी क्षेत्रीय पातळीवरून विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- सेंद्रिय शेतमालासाठी स्वतंत्र विक्री केंद्रे
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे सुरू करावीत व यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती विभागाला देण्यात आल्या आहेत. सेंद्रिय शेतमाल विक्रीस चालना देण्यासाठी मेळाव्यांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही शासकीय यंत्रणेला करण्यास आल्या आहेत.

- शेतावर उभारणार 8 प्रशिक्षण केंद्रे
यशस्वी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरच सेंद्रिय शेती बहुविध प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व लातूर या आठ विभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून घेऊन पुढील बैठकीत ते सादर करण्याच्या सूचना सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी विभागीय सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा.

- प्रमाणीकरणावर होणार स्वतंत्र बैठक
सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची विश्‍वासार्हता राखण्यासाठी व प्रमाणीकरणास गती देण्यासाठी याबाबतच्या सर्व शासकीय व खासगी संस्थांची विशेष बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पुण्यात आयोजिण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची सहभागी हमी योजना (पीजीएस) व गटांच्या माध्यमातून प्रमाणीकरणाच्या अंमलबजावणीबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
----------------------------

No comments:

Post a Comment