Tuesday, February 4, 2014

कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद तीन महिन्यांपासून रिक्त

सात महिन्यांपासून बैठकच नाही; कामकाजावर विपरीत परिणाम

पुणे (प्रतिनिधी) ः मंत्रिपदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (कृषी परिषद) उपाध्यक्षपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून अद्याप नवीन नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेले नाही. उपाध्यक्षांअभावी कृषी परिषदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

राज्याचे कृषिमंत्री हे कृषी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र कृषिमंत्र्यांना व्यस्त कामकाजातून पुरेसा वेळ देणे शक्‍य होत नसल्याने चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय साधून कामकाजास गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी उपाध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा, वाहन, वाहनचालक, लेखनिक, शिपाई आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र सध्या उपाध्यक्षांची खुर्ची रिकामी असल्याने अनेक महत्त्वाच्या बाबींना खीळ बसल्यासारखी स्थिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी परिषदेची यापूर्वीची बैठक मे 2013 मध्ये शिर्डी (नगर) येथे झाली. यानंतर अद्याप परिषदेची बैठक होऊ शकलेली नाही. विद्यापीठांच्या संचालकांच्या एकत्रित शिक्षण, विस्तार व संशोधन विषयक आढावा बैठका, कुलसचिव, अभियंते, वित्त अधिकारी यांच्या समन्वय बैठका सध्या बंद आहेत. शासनाकडे प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे, विद्यापीठांना निधी मिळवून देण्याचा व मिळालेला निधी वेळेत खर्च करण्याचा पाठपुरावा करण्याची कामे सध्या बंद आहेत. विद्यापीठांची प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदी रिक्त पदभरती प्रक्रियाही थंडावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने राज्यात येत्या महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या पदावरील नियुक्ती साठी पुढील दोन-तीन आठवड्यांचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या पदावर नियुक्ती करता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर उपाध्यक्ष निवडीस विलंब झाल्यास त्याचा विपरीत परिणाम कृषी परिषदेच्या कामकाजावर होण्याचा धोका आहे.

चौकट
- कोणीही होऊ शकतो उपाध्यक्ष !
माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे आहे. पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना नावाची शिफारस केली जाईल व त्यानंतर मुख्यमंत्री उपाध्यक्ष नेमणुकीचा आदेश जारी करतील. उपाध्यक्षपदाच्या पात्रतेसाठी वेगळे निकष नाहीत. सर्वसाधारणपणे शेती व संलग्न क्षेत्रातील व्यक्तीची या पदी निवड केली जाते. राज्यातील प्रगत शेतकरी किंवा इतर कोणीही व्यक्ती उपाध्यक्ष होऊ शकते.

चौकट
- सुरेश वरपुडकर, सोपान कांचन चर्चेत
उपाध्यक्षपदासाठी सध्या माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष सोपान कांचन, माजी पाटबंधारे मंत्री अजित घोरपडे व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यातही वरपुडकर किंवा कांचन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------

No comments:

Post a Comment