Thursday, May 14, 2015

सोमवारपर्यंत मॉन्सून अंदमानात

भारतीय हवामान खात्याचा अंदाज; सर्वसाधारण वेळेत वाटचाल सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहीलेले बहुप्रतिक्षित नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. येत्या सोमवारपर्यंत (ता.18) अंदमान-निकोबार द्वीपसमुह व लगतच्या भागात मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. विष्ववृत्तीय भागापासून सुरु झालेली मॉन्सूनची समुद्रातील वाटचाल सर्वसाधारण वेळेनुसार सुरु आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सून 20 मे रोजी अंदमानात दाखल होतो. त्यानंतर पुढील दहा दिवसात म्हणजेच एक जूनपर्यंत तो श्रीलंका व्यापून केरळात येवून धडकतो. यंदा तो 18 मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच मॉन्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेत सुरु असून अनुकूलता कायम राहील्यास पुढील दहा दिवसात तो केरळात दाखल होऊ शकतो.

लक्षद्वीप व लगतच्या केरळ किनारपट्टीवर समुद्रसपाटीच्या पातळीपासून 5.8 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय झाले असून त्यांचा विस्तार वाढलेला आहे. याशिवाय दक्षिण अंदमानचा समुद्र व लगतच्या बंगालच्या उपसागराच्या भागातही समुद्रसपाटीच्या पातळीहून 1.5 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय आहेत. यामुळे या भागात पावसाला सुरवात झाली असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या तीन चार दिवसात मॉन्सूनच्या वाटचालीत वेगाने प्रगती होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मॉन्सून दाखल होण्याआधी देशात ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कर्नाटकचा किनारी भाग, लक्षद्वीप बेटे, तामिळनाडू, अंदमान व निकोबारमध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस झाला. उत्तर भारत व इशान्येकडील राज्यांमध्येही अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यात देशात सर्वाधिक 111.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने शुक्रवारी (ता.15) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्यात उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे 42.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

गुरुवारी (ता.14) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः

मध्य महाराष्ट्र ः पुणे 111.8, खडकवासला 36, भोसरी 28, पौड 34, घोटवडे 28, पिरंगुट 49, वेळू 27, राजगुरुनगर 31.4, चाकण 61.2, आळंदी 22, कडूस 44.4, घोडेगाव 24, कळंब 34, न्हावरा 19, कोरेगाव 48, कटी 21, कळवण 6.4, येवला 10.5, देवळा 11, धुळे 4, नंदुरबार 20, कोरीत 12, सारंगखेडा 19.2, शहादा 13, मोहिडे 12, प्रकाशा 16, म्हसवड 12.3, तळोदा 25, बोरड 35, प्रतापपूर 27, रोशमाळ 12, चुलवड 10, तारणमाळ 12, वरणगाव 15, सावदा 28, ऐनपूर 11, समशेरपूर 52, सुपा 11, वडझिरे 10.8, बेलवंडी 20, चिंभळा 25, मिरजगाव 14, मही 20, जामखेड 13, अरणगाव 27, नानज 15, नायगाव 13.3, नेवासा 14, चांदा 11, वडाळा 15, शिबळपूर 25, अकोले 28, कोतुळ 19, ब्राम्हणवाडा 18, उंदीरगाव 27, रहाता 16, शिरसी 10, आटपाडी 13, सरुड 19

मराठवाडा ः वेरुळ 18, सोयागाव 13, टाकळसिंघ 20, पिंपळा 20, लाखणी 18, केज 20, हनुमंत 27, घोनशी 12, तेर 8, जवळा 12, वालवड 15, कळंब 17, इतकूर 18, मोहा 43, तेरखेडा 11, बिलोली 13, मुखेड 55, येवती 21, जाहूर 25, चांडोळा 19, मुक्रमाबाद 22, किनवट 13, सेनगाव 12

विदर्भ ः पिसेवडथा 37, गिरोली 15, पारडसिंगा 13.2, आमगाव 12, तिगाव 16.4, ठाना 15.6, चिचगड 7, एटापल्ली 9
------------------- 

No comments:

Post a Comment