Thursday, May 15, 2014

मॉन्सून 17 मे पर्यंत अंदमानात !

हवामान विभागाचा अंदाज; वाटचालीस अनुकूल स्थिती; तीन दिवस आधी आगमनाची चिन्हे

*कोट
""वाऱ्यांचा वेग, दिशा, ढगांचे प्रमाण आदी सर्व परिस्थिती पाहता मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून महाराष्ट्रापासून अद्याप फार दुर आहे. यामुळे उत्तर भारतात होत असलेल्या पुर्वमोसमी पावसाचा व घटलेल्या कमाल तापमानाचा मॉन्सूनवर परिणाम होणार नाही.''
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक (हवामान अंदाज), भारतीय हवामानशास्त्र विभाग.

पुणे (प्रतिनिधी) ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशात दाखल होण्यास अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत म्हणजेच 17 मेपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. अनुकूलता कायम राहील्यास मॉन्सून देशात व राज्यात सर्वसाधारण वेळेत पोचण्याची शक्‍यता आहे.

सर्वसाधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे आहेत. देशात मॉन्सून एक जून रोजी सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होतो. पाठोपाठ सात जूनपर्यंत तो तळकोकणात मजल मारतो. यानंतर 11 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तरेच्या प्रवासाला निघतो. सर्वात शेवटी 15 जूलैपर्यंत तो पश्‍चिम राजस्थानसह संपूर्ण देश व्यापतो. गेल्या वर्षी मॉन्सूनचा हा सर्वच प्रवास अतिशय वेगाने झाला होता. या पार्श्‍वभूमीवर त्याच्या यंदाच्या संभाव्य प्रवासाविषयी देशभर उत्सुकता आहे.

दरम्यान, देशावर ठिकठिकाणी हवेचा दाब कमी झालेला असून अनेक ठिकाणी चक्राकार वारे सक्रीय आहेत. जम्मू काश्‍मिरमध्ये पाकिस्तानलगतच्या भागात पश्‍चिमी चक्रावात सक्रीय असून त्याचा हिमालयीन भागावर गुरुवारपर्यंत प्रभाव राहण्याचा अंदाज आहे. हरियाना व लगतच्या भागावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय असून ते बुधवारी आणखी पुर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे. याच वेळी पश्‍चिम बंगालचा हिमालयीन भाग व लगतच्या बिहारवरही समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत. आसाम व मेघालयातही हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे सक्रीय आहेत.

हिमालयीन पश्‍चिम बंगालपासून झारखंड, सिक्कीम व ओदिशापर्यंतच्या भागात हवेच्या खालच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुरुवारी सकाळपर्यंत या पट्ट्याची तिव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण छत्तिसगडपासून तेलंगणा, तामिळनाडू ते कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. याची तिव्रताही गुरुवारी सकाळपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. या सर्व हवामान स्थितींमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात चेरापुंजी येथे सर्वाधिक 90 मिलीमिटर पाऊस पडला. यामुळे बहुतेक ठिकाणी कमाल तापमानात घट झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक (हवामान अंदाज) डॉ. मेधा खोले म्हणाल्या, मॉन्सूनचे मॉनिटरींग करण्याचे काम 10 मे पासून सुरु आहे. त्यात प्रथमच मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात नैऋत्य मोसमी वार्यांची दिशा, वेग, पाऊस, ढगांचे प्रमाण इत्यादी हवामान घटकांची अनुकूलता दिसून आली. नैऋत्येकडून येणारे वारे स्ट्रॉंग आहेत. यानुसार 17 मे पर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. उत्तर भारतात सक्रीय असलेल्या विविध सिस्टिम्स मुळे उत्तर व इशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये ढगाळ हवामान व पाऊसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र त्याचा मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होण्याची शक्‍यता नाही.
-------------(समाप्त)-----------

No comments:

Post a Comment