Sunday, April 20, 2014

"ऍग्रोवन'चे दहाव्या वर्षात दमदार पदार्पण

राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; विविध ठिकाणी झालेल्या चर्चासत्रांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यभरातील शेतकऱ्यांचा विश्‍वासू साथीदार, मित्र व मार्गदर्शक बनलेल्या "सकाळ ऍग्रोवन'ने रविवारी (ता. 20) नऊ वर्षे पूर्ण करत दहाव्या वर्षात दमदार पदार्पण केले. राज्यात ठिकठिकाणी थेट बांधावर शेतीविषयक चर्चासत्रांचे आयोजन करून "ऍग्रोवन'चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शेकडो शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांना उपस्थित राहून "ऍग्रोवन'वरील प्रेम व्यक्त केले. "ऍग्रोवन'चे कार्यालय, फेसबुक पेज आणि प्रतिनिधींकडे दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

सकाळ माध्यम समूहाने नऊ वर्षांपूर्वी 20 एप्रिल 2005 रोजी "ऍग्रोवन'ची मुहूर्तमेढ रोवली. समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या दुरदृष्टीतून "ऍग्रोवन'ची कल्पना पुढे आली. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या मागील उद्देश होता. फक्त शेती आणि शेतकऱ्यांसाठी वाहिलेले दैनिक किती दिवस चालणार असे प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आले. मात्र गेल्या नऊ वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाच्या जोरावर "ऍग्रोवन'ने दमदार मजल मारली आहे.

"ऍग्रोवन'च्या कामगिरीने देशाच्या कृषी पत्रकारितेच्या इतिहासात नवी यशोगाथा, नवा इतिहास निर्माण झाला आहे. देशातील पहिले कृषिदैनिक म्हणून "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, मराठी विज्ञान परिषदेकडून गौरव आदी अनेक मानाचे तुरे "ऍग्रोवन'च्या शिरपेचात खोवण्यात आले आहेत. या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यभरातील शेतकऱ्यांनी सरपंच महापरिषद, कृषी प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम, दुष्काळमुक्ती अभियान आदी उपक्रमांचा विशेष उल्लेख करत "ऍग्रोवन'ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

- विशेषांकास मोठा प्रतिसाद
गेल्या काही वर्षांपासून वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शेतकऱ्यांना विशेषांकाच्या माध्यमातून कृषी ज्ञान तंत्रज्ञानाची अनोखी मेजवानी देण्याचा "ऍग्रोवन'चा पायंडा आहे. यंदा वर्धापनदिनानिमित्त तीन विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत. "ऍग्रोवन'च्या मदतीने स्वतःची यशोगाथा घडविलेल्या शेतकऱ्यांच्या प्रेरक प्रतिक्रिया, मनोगतांचा "प्रगतीचा साथी ऍग्रोवन' हा विशेषांक रविवारी वर्धापनदिनी प्रसिद्ध झाला. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आज (ता.21) "साथी हाथ बढाना' हा गटशेतीतून समृद्धीची वाट दाखवणारा विशेषांक, तर उद्या (ता. 22) "साथ साथ' हा कृषिकेंद्रित ग्रामविकास साधलेल्या गावांच्या यशोगाथांचा विशेषांक प्रसिद्ध होत आहे.


No comments:

Post a Comment