Wednesday, September 17, 2014

पुणे - विधानसभा निवडणूक वार्तापत्र

--------------------
संतोष डुकरे
---------------------
पुण्याच्या तालमीत शेतीचाच जोर
---------------------
पुणे विभागातील सर्वच मतदारसंघांमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शेती व संलग्न प्रश्‍नांचा जोर राहणार असे चित्र आहे. सर्वाधिक साखर कारखाने, सहकारी संस्थांचे जाळे असलेल्या या भागात पाणी टंचाई-दुष्काळापासून बाजारभावापर्यंत अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे कायम आहेत. लोकसभा निवडणूकीत कानाडोळा झालेल्या या प्रश्‍नांना या निवडणूकीत निर्णायकी स्थान मिळू शकते. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेली कामे हीच कॉग्रेस राष्ट्रवादीची मुख्य शिदोरी आहे. तर तथाकथीत मोदी लाटेवर स्वार असलेल्या भाजप व सेनेकडून रखडलेले प्रकल्प, भ्रष्टाचार, घराणेशाही व असमतोल विकासाच्या मुद्‌द्‌यावर प्रहार केले जाण्याची चिन्हे आहेत.
---------------------
- बंडखोरांची मांदियाळी
या निवडणूकीत सर्वच पक्षांमध्ये इच्छूकांची मांदियाळी आहे. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेतही लोकांचा कल भाजपाकडे असल्याचा होरा बांधून अनेकांनी पक्ष बदलाबदलीला सुरवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकही आघाडी व युतीच्या माध्यमातून लढण्याची शक्‍यता असल्याने मित्रपक्षांतील अनेकजण बंडखोरी करुन पक्षांची डोकेदुखी वाढविण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना याचा फटका बसण्याचीही शक्‍यता आहे. यामुळे इच्छूकांना कसे शांत करायचे व बंडखोरी कशी रोखायची हा यक्षप्रश्‍न सर्वांसमोर आहे.

- पुणे जिल्ह्यात संघर्षाची स्थिती
जिल्ह्यात शेतीत प्रगती वेगाने झालेली आहे. मात्र ती सर्वसमावेशक नाही. जिरायती आणि बागायती भागात मोठा विरोधाभास आहे. यातील दरी कमी करण्यास फारसे यश आलेले नाही. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या या बालेकिल्ल्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत सत्ताधाऱ्यांना मोठे हादरे बसले. गेल्या निवडणूकीत मोठी आघाडी न मिळवू शकलेली मोठी नावं आणि लोकसभा निवडणूकीतील भाजपाची नमो लाट यामुळे यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्‍यता आहे. अद्याप उमेदवार जाहिर झाले नसल्याने झाकली मुठ सव्वा लाखाची अशी स्थिती आहे. तरीही जुन्नरचे वल्लभ बेनके वगळता बहुतेक सर्व विद्यमान आमदार या निवडणूकीत पुन्हा एकदा उभे ठाकणार हे जवळपास निश्‍चित आहे.

विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने साखर कारखाने, पतसंस्था, सहकारी बॅंका, शिक्षण संस्था, ग्रामपंचायती ही प्रमुख सत्ताकेंद्रे मानली जातात. सद्यस्थितीत पुणे विभागात या बहुतेक सत्ताकेंद्रांवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसची एकगठ्ठा सत्ता आहे. मात्र गेल्या काही दिवसात शहरी भागात भाजपा व ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेचा जोर ओसल्याचे चित्र असले तरी त्यांचा पाठींबाही निर्णायकी ठरण्याची शक्‍यता अनेक ठिकाणी आहे. मोदींनी मुक्काम ठोकला तर सत्तापालट होईल असा विश्‍वास विरोधकांना आहे. तर मोदींची लाट पश्‍चिम महाराष्ट्रात चालणार नाही. येथिल लोक झालेल्या विकासाला व शेतीच्या हिताला महत्व देतील असा सत्ताधाऱ्यांचा विश्‍वास आहे. अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दिलिप वळसे पाटील, दिलिप मोहिते पाटील, अशोक पवार आदी दिग्गजांचे भवितव्य या निवडणूकीत पणाला लागणार आहे.

- सोलापूरात पाणी तापणार
सोलापूर जिल्ह्यात पाणी या एकाच मुख्य मुद्‌द्‌याभोवती निवडणूक व प्रचार फिरणार असल्याचे चित्र आहे. पाणी वाटप, योजनांची हेळसांड, निधी वाटपातील गोंधळ-घोटाळे, ऊस दराचा प्रश्‍न यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला हा जिल्हा ढवळून निघणार आहे. आज जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व 11 आमदार करतात. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच, कॉंग्रेसचे दोन, भाजपचे दोन, एक कॉंग्रेसचा सहयोगी आणि एक शेकाप असे बक्षीय बलाबल आहे.

उजणी धरणाचा पाणी वाटप प्रश्‍न गेली कित्येक वर्षे कायम आहे. अनेक उपसा योजना वर्षानुवर्षे रखडलेल्या आहेत. राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरचा लौकीक आहे. नेहमीच्या उमेदवारांबरांबरच अनेक नवीन उमेदवार यंदा आखाड्यात उतरत आहेत. पक्षबदल, बंडखोरी आणी विरोधाला विरोधाचे राजकारण यावेळी रंगण्याची चिन्हे आहेत. माढ्यात विद्यमान आमदार बबनराव शिंदेंविरोधात कल्याणराव काळे, धवलसिंह मोहिते पाटील, प्रा. शिवाजीराव सावंत हे निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेले कारखानदार शिवसेनेकडून तयार आहेत.
------------(समाप्त)------------ 

No comments:

Post a Comment