Monday, September 29, 2014

दिल्ली, हरियानात देशात नीचांकी पाऊस

गुजरात, राजस्थानने गाठली सरासरी; 36 पैकी 11 उपविभागांत कमी पाऊस

पुणे (प्रतिनिधी) ः नैर्ऋत्य मोसमी पावसाने देशपातळीवर हंगामाची सरासरी गाठली असली तरी 36 पैकी 11 विभागांमध्ये सरासरीहून मोठ्या प्रमाणात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यांपुढील आव्हाने कायम आहेत. राजस्थान, जम्मू-काश्‍मीर, कर्नाटक, केरळ व अंदमान निकोबार बेटे वगळता एकाही राज्यामध्ये पावसाने सरासरी गाठली किंवा ओलांडलेली नाही. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तराखंड, पूर्व व पश्‍चिम उत्तर प्रदेश, मराठवाडा, तेलंगण, किनारी आंध्र प्रदेश व पूर्वांचल (नागालॅंड, मिझोराम, मणिपूर व त्रिपुरा) या उपविभागांमध्ये सरासरीहून 20 ते 55 टक्‍क्‍यांपर्यंत कमी पाऊस झालेला आहे.

हवामान खात्यामार्फत सरासरीहून 19 टक्‍क्‍यांपर्यंतचा कमी पाऊसही सरासरीएवढा गृहीत धरण्याच्या निकषाच्या आधारे देशात सरासरीएवढा पाऊस पडल्याचे चित्र रंगविण्यात येत असले तरी विदर्भ, पश्‍चिम मध्य प्रदेश, रायलसीमा, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल या उपविभागांमध्ये 11 ते 19 टक्के कमी पाऊस पडलेला असून त्यातील बहुसंख्य भागांमध्ये टंचाईसदृश स्थिती आहे. यामुळे एकंदरीत विचार करता सुमारे निम्म्या देशात सरासरीहून मोठ्या प्रमाणात कमी पाऊस तर निम्म्या देशात सरासरीएवढा पाऊस असे चित्र आहे. देशात कोठेही पावसाने सरासरीचा उंबरठा ओलांडलेला नाही.

एक जून ते 26 जून या कालावधीतील मोसमी पावसाची देशपातळीवरील सरासरी 869.4 मिलिमीटर आहे. प्रत्यक्षात यंदा या कालावधीत 769.2 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीहून 12 टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, हवामान खात्याच्या कमीअधिक 19 टक्‍क्‍यांच्या निकषानुसार हा पाऊस सरासरीएवढा म्हणून गणण्यात आला आहे. जुलै व सप्टेंबर महिन्यात काही आठवड्यांत झालेल्या जोरदार पावसाने सरासरी उंचावली आहे. हंगामात उर्वरित सर्व आठवड्यांत पाऊस सरासरीहून कमी होता.

यंदा 20 जुलैपर्यंत देशपातळीवर पाऊस सरासरीच्या सुमारे 40 टक्‍क्‍यांनी कमी होता. त्यानंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही तूट 20 टक्‍क्‍यांपर्यंत भरून निघाली. सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने ही तूट आणखी कमी होऊन 12 टक्‍क्‍यांवर येऊन ठेपली आहे. वायव्य भारतातून मॉन्सून माघारी फिरल्याने आता ही तूट आणखी कमी होण्याची शक्‍यता जवळपास मावळली आहे. यामुळे मॉन्सून पावसाचे हेच सर्वसाधारण चित्र मॉन्सून देशातून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे.

*चौकट
- सर्वाधिक पावसाचे 32 दिवस
देशात चालू हंगामात आतापर्यंत चार महिन्यांपैकी फक्त 32 दिवस सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. यातही जुलै महिन्यातील 13 व सप्टेंबर महिन्यातील 12 पावसाळी दिवस देशाची सरासरी उंचावण्यात मोलाचे ठरले आहेत. सरासरीहून अधिक पाऊस झालेल्या दिवसांमध्ये 3 जून, 15, 16, 18 ते 24 व 28 ते 31 जुलै, 4 ते 7 आणि 15 व 16 ऑगस्ट, 1 ते 9 व 20 ते 22 सप्टेंबर या दिवसांचा समावेश आहे. देशातील एका दिवसातील सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद पाच सप्टेंबर रोजी 19 मिलिमीटर झाली आहे.

*चौकट
कमी पाऊस झालेले उपविभाग (1 जून ते 26 सप्टेंबर)
उपविभाग --- सरासरी (मि.मी.) --- पडलेला पाऊस (मि.मी.) --- पावसातील तूट (टक्के)
हरियाना, दिल्ली --- 461.6 --- 202.2 --- 56
पंजाब --- 485.2 --- 243.4 --- 50
पश्‍चिम उत्तर प्रदेश --- 760.3 --- 340.2 --- 55
मराठवाडा --- 662.8 --- 398.8 --- 40
किनारी आंध्र प्रदेश --- 555.2 --- 443.2 --- 20
तेलंगण --- 735.7 --- 497.2 --- 32
पूर्व उत्तर प्रदेश --- 883.2 --- 513.9 --- 42
हिमाचल प्रदेश --- 816.7 --- 517.2 --- 37
पूर्व मध्य प्रदेश --- 1040.5 --- 746.7 --- 28
उत्तराखंड --- 1216.9 --- 884.2 --- 27
पूर्वांचल --- 1463 --- 1099.7 --- 25
----------------- 

No comments:

Post a Comment