Sunday, September 28, 2014

औरंगाबाद - मराठवाडा कृषी विद्यापीठ ५६ वी रब्बी बैठक

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः मोसंबी व डाळींब ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दोन प्रमुख नगदी पिके असून त्यांच्या समस्या सोडविण्यास शास्त्रज्ञांनी अग्रक्रम द्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची 56 वी रब्बी हंगाम बैठक डॉ. व्यंकटेश्‍वरलू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पैठण रोड येथे नुकतिच पार पडली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, औरंगाबादचे विभागिय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, लातूरचे विभागिय कृषी सहसंचालक के. एन. देशमुख व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार, कृषी विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे मराठवाड्यातील सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेश्‍वरलू म्हणाले, की मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करताला जमिनीच्या पोतानुसार कोणते पिक घ्यावे, याविषयी मार्गदर्शन झाले पाहिजे. त्यासोबतच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी स्थानिक समस्यांवर आधारीत संशोधन करुन त्यावर शिफारशी द्याव्यात. त्याचा प्रसार कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर व्हावा. शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्यासाठी गटांना चालना द्यावी. शाश्‍वत शेती उत्पादनासाठी मृद व जलसंधारणाचे उपाय तातडीने करावेत.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपसंचालक आत्मा, विस्तार कृषी विद्यावेत्ता व कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयांनी यावेळी जिल्हानिहाय गेल्या रब्बी हंगामातील पिक परिस्थिती व समस्या याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाने प्रत्याभरनाबाबतच्या समस्या उपस्थित केल्या. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यावर उपाय सुचवून त्यावर आधारीत संशोधनाची पुढील दिशा ठरविण्याचे निश्‍चित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुर्यकांत पवार यांनी केले. प्रा. दिनेश लोमटे यांनी सुत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन डॉ. नंदकुमार सातपुते यांनी केले.
------------ 

No comments:

Post a Comment