Monday, September 29, 2014

मराठवाड्यात मॉन्सूनचा ठणठणाट !

पुणे (प्रतिनिधी) ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भावर उशीरा का होईना पण कृपेचे छत्र धरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मराठवाड्यात मात्र यंदाच्या हंगामात ठणठणाटच मांडला आहे. मॉन्सूनने उर्वरीत तिनही विभागात हंगामाची सरासरी गाठली असताना मराठवाड्याकडे मात्र सपशेल पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात सरासरीहून तब्बल 40 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला आहे. यामुळे आधीच सिंचन व्यवस्थेचा बोजवारा उडालेल्या मराठवाड्यात पुढील आठ दहा महिने पाण्याच्या गंभिर चिंतेत जाण्याचा धोका उद्भवला आहे.

मुळात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांची सरासरी राज्यातील इतर सर्व विभागांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक कमी आहे. यामुळे कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त क्षेत्रही मराठवाड्यातच सर्वाधिक आहे. यंदा त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. आत्तापर्यंत मराठवाड्यात अवघा 398 मिलीमिटर पाऊस पडला आहे. मराठवाड्याहून कोकणात सात पटीने, मध्य महाराष्ट्रात दीड पटीने तर विदर्भात दुपटीने अधिक पाऊस पडला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निकषांनुसार सरासरीच्या 19 टक्‍क्‍यांपर्यंतचा कमी किंवा जादा पाऊस हा सरासरीएवढा समजला जातो. या हिशेबाने कोकणात सरासरीहून पाच टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीहून चार टक्के कमी तर विदर्भात सरासरीहून 13 टक्के कमी असलेला पाऊसही सरासरीएवढाच गणला जाणार आहे. विदर्भाने मात्र सरासरीहून खाली कमी पावसाची (डेफिसिएट) पातळी गाठली आहे. सरासरीहून 20 ते 59 टक्के पाऊस या पातळीत गणला जातो.

मॉन्सूनचा माघारीचा प्रवास अद्याप सुरु असल्याने अद्यापही मराठवाड्यात पावसाची धुगधुगती आशा आहे. मात्र यापुढील काळात कमी जास्त पाऊस झाला तरी सरासरीतील सध्याची तुट फारशी भरुन येण्याची शक्‍यता नाही. उलट काही भागात ही तुट आणखी वाढू शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सुत्रांनी दिली.

*चौकट
- निम्म्या महाराष्ट्रात गंभीर स्थिती
राज्यातील 353 तालुक्‍यांपैकी तब्बल 178 तालुक्‍यात म्हणजेच निम्म्या महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत अवघा 25 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे या तालुक्‍यांतील खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगाम, उन्हाळा आणि जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही येत्या काही दिवसात अधिक गंभिर होण्याची शक्‍यता आहे. सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस पडलेल्या 118 तालुक्‍यातही परिस्थिती पूर्णतः समाधानकारक नाही. अवघ्या 57 तालुक्‍यात सरासरीहून अधिक पाऊस आहे. यात मराठवाड्यातील एकाही तालुक्‍याचा समावेश नाही. राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या 33 पैकी 23 तालुके एकट्या मराठवाड्यातील आहेत. जालना जिल्ह्याला कमी पावसाचा सर्वाधिक फटका आहे.

* चौकट
- कमी पावसाचे तालुके व सरासरीच्या तुलनेत टक्केवारी (1 जून ते 27 सप्टेंबर 2014 पर्यंत)
पैठण 49.2 (औरंगाबाद), गेवराई 42.8, परळी 45 (बीड), हिंगोली 43.8, बसमत 40.7 (हिंगोली), बदनापूर 48.3, घनसांगवी 39.7, मंठा 46.7 (जालना), औसा 49.6, जळकोट 48 (लातूर), बिलोली 31.4, कंधार 45.1, हादगाव 47.9, देगलूर 36, मुदखेड 45.9, धर्माबाद 43.2, अर्धापूर 47.7, नायगाव खुर्द 45.3 (नांदेड), परभणी 37.5, गंगाखेड 48.2, पूर्णा 45.1, पालम 41, सेलू 45.5 (परभणी)
(स्त्रोत ः कृषी विभाग)

*चौकट
- विभागनिहाय पाऊस (1 जून ते 26 सप्टेंबर 2014)
विभाग --- सरासरी (मि.मी.) --- प्रत्यक्ष पडलेला पाऊस (मि.मी.) --- पावसातील तुट (टक्के)
कोकण --- 2870.4 --- 2740.9 --- (-) 5
मध्य महाराष्ट्र --- 705.8 --- 674 --- (-) 4
मराठवाडा --- 662.8 --- 398.8 --- (-) 40
विदर्भ --- 941.6 --- 817.5 --- (-) 13
(स्त्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग)
------------(समाप्त)------------- 

No comments:

Post a Comment